प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय : ५ व्या जाधवर सायन्स फेस्टिव्हलचे आयोजन
पुणे : वेस्ट टू वेल्थ, झिरो गारबेज सिस्टिम, इलेक्ट्रिसिटी जनरेशन यांसह डिझास्टर मॅनेजमेंट, पर्यावरणाच्या समस्या व उपाय, टेक्नॉलॉजी इन बायो मेडिकल एरिया, रोबोटिक्स अशा विविध विषयांवर ५ व्या जाधवर सायन्स फेस्टिव्हलमध्ये शालेय व महाविद्यालयीने विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक अविष्कारांचे सादरीकरण केले. सायन्स सोसायटी आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत आयोजित विज्ञान महोत्सवात राज्यभरातून विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘पाचव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन न-हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. अतर सिंग पिपल, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. महोत्सवामधील स्पर्धा शालेय (इयत्ता ८ वी ते १० वी) , कनिष्ठ (इयत्ता ११ वी व १२ वी), वरिष्ठ महाविद्यालय (पदविका शिक्षण) आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटात पार पडली. विद्यार्थ्यांनी पॉल्युशन कंट्रोल, फ्री एनर्जी जनरेशन, इनोव्हेशन स्किल इन हेल्थ, विशेष व्यक्तींसाठी तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी इन इंडस्ट्री अशा विविध संकल्पनांवर प्रकल्पाचे सादरीकरण केले.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिवल’ मध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळाले. विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात आहे.
ते पुढे म्हणाले, भारताबाहेरील इतर देशांमध्ये संशोधन करुन पेटंट मिळविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये संशोधन व पेटंटचे प्रमाण कमी असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटने अभिनव योजना सुरु केली आहे. इन्स्टिटयूटमधील संशोधन करणा-या विद्यार्थ्याला विनातारण १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची गोडी निर्माण होत अधिकाधिक संशोधनास युवावर्ग प्रवृत्त होईल, असेही त्यांनी सांगितले.