कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघाले, अशी जहरी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे.
जयंत पाटील यांनी म्हटले आहे की. “यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख आणि अनेक मोठ्या नेतृत्वाचा आदर्श या महाराष्ट्राला आहे. या नेत्यांनी कधी आपली पातळी खाली जाऊ दिली नाही. मात्र आज सत्तेत सामील असलेले मंत्री, आमदार, खासदार कधी सामान्य माणसांवर लाठीचार्ज करायला सांगतात, कधी पोलिस बांधवांच्या कानशीलात लगावतात तर कधी एकमेकांचा पाणउतरा करतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पार धिंडवडे काढले जात आहेत. हे महाराष्ट्र बघतोय ! जाहीर निषेध”, असे म्हणत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. यावेळी त्यांनी शिवीगाळही केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे येथील कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोच काल मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांची एका बैठकीतच एकमेकांना शिवीगाळ करणारा ऑडियो व्हायरल झाला. यावरूनच सध्या विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोडमध्ये बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी सत्तार यांनी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. तर अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात बैठकीतच वाद झाला आणि दोघांनी अश्लील भाषेत एकमेकांना सुनावल्याचे पाहायला मिळाले. याची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावरूनच जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

