पुणे-देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केला. नागपूर शहर हे ‘गुन्हेगारांची राजधानी’ असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, आत्ताच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री असताना, राज्य सरकारच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात अपयशी गृहमंत्री म्हणून त्यांची नोंद घेतली जाईल. सध्या त्यांना काय झाले आहे मला समजत नाही. त्यांना अधिकार नाहीत का? असा प्रश्न निर्माण होतो. अजित पवार यांनी यापूर्वी फडणवीस यांच्यावर आरोप करत, नागपूर शहर हे ‘गुन्हेगारांची राजधानी’ असल्याची टीका केली होती. तोच प्रत्यय पुन्हा येत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री होतात तेव्हा राज्यात गुन्हेगारी वाढते असे दिसून येत असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी यांना शेतकरी प्रश्नांवर आयोजित आक्रोश मोर्चाचे निवेदन देण्यासाठी त्या दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार संजय जगताप त्यांच्यासोबत उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, संसदेमधून आम्हाला निलंबित करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी, दुष्काळ समस्येमुळे शेतकरी कोलमडलेला आहे. सरकारने पाण्याचे नियोजन करण्याची गरज असून पिण्याचे पाणी मिळणे देखील शहरात अवघड बनले आहे. पाणी कपातीचे संकट लोकांसमोर आहे. सरकारने पक्ष , लोक फोडणे हे उद्योग बंद करून केंद्र सरकारने सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजे. परंतु खोके सरकार असंवेदनशील असून शेतकरी आत्महत्या करत असताना, सत्ताधारी नेते जल्लोषत दिसून येतात हे राज्याचे दुर्दैव आहे .महायुतीतील नेते राज्यात दौरे करत असताना, त्यांनी दुष्काळावर ,नागरिकांच्या समस्येवर बैठका घेऊन त्याची सोडवणूक करणे गरजेचे आहे. राज्य सरकारला धोरणात्मक लकवा झालेला असून कोणत्याही गोष्टीवर निश्चित धोरण व अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटनाचे निमंत्रण अद्याप मला मिळाले नसल्याचे सांगत सुळे म्हणाल्या ,जगात कोणत्याही मंदिरात जाण्यास मला कोणाच्याही आमंत्रणाची गरज नाही .ज्यावेळी मला वाटेल त्यावेळी मी मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकते.
पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची वर्णी लावल्याबाबत सुळे म्हणाल्या, कोणत्या अधिकाऱ्यास कोणत्या जागी नेमायचे हा पूर्णता सरकारचा वैयक्तिक प्रश्न आहे. सरकारने नवे बिल आणले असून देशातील कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅपिंग करण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांना दिला आहे ही बाब चुकीची असून वैयक्तिक अधिकारांवर गदा आणणारी आहे.