पुणे-: पुणे महानगर नियोजन समितीवर मुख्यमंत्री असणे आणि उपमुख्यमंत्री नसणे हे तर आश्चर्यकारक आहेच पण संजय राऊत आणि तानाजी सावंतांचा संबध काय ? खासदार गिरीश बापट यांना या समितीत स्थान न देणे हा मात्र पुण्याचा अवमान असल्याची टीका पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने काल एक प्रसिद्धी पत्रक काढून पुणे महानगर प्राधिकरणसाठी महाराष्ट्र महानगर नियोजन समितीची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्र महानगर नियोजन समितीच्या नियुक्तिमध्ये राजकारणाचा वास येत असून या समितीमध्ये पुणे शहराचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांचा समावेश नसणे हे खूप गंभीर बाब आहे. पुणे शहर भाजप मार्फत आम्ही या गोष्टीबद्दल जाहीर निषेध करतो. असे पत्रक भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, राज्यामध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना या तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र या तिन्ही पक्षांमध्ये एकजूट नाही. सतात्याने ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काल राज्य शासनाच्या वतीने घोषित केलेल्या महाराष्ट्र महानगर नियोजन समितीच्या सदस्यांच्या नियुक्तिवरून हे पुन्हा एकदा सिद्ध होते. कॉँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या सरकारच्या काळात आमदार असताना गिरीश बापट यांनी विधानसभेत सातत्याने मागणी करत पुण्याच्या शास्वत विकासासाठी पुणे महानगर प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना करण्याचा विषय लावून धरला होता. मात्र या प्राधिकरणाचे अध्यक्षपद कॉँग्रेसकडे असावे की राष्ट्रवादी कडे या वादात या विषयाला बगल दिली गेली. याच वादाच्या पार्श्वभूमीवर या वेळीही या समितीचे अध्यक्षपद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे न देता मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवले आहे. आम्हाला त्यांच्या अंतर्गत वादात पडण्याची आवश्यकता नाही मात्र या समिती मध्ये खासदार गिरीश बापट यांचे नाव नसने म्हणजे पुण्याच्या विकासाला खिळ बसवण्याचा प्रकार आहे.
राज्यात युतीसरकार सत्तेत आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांची नियुक्ति करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएची स्थापना करून घेतली. यामुळे पुण्याच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू झाला. पीएमआरडीएचे काम करत असताना सर्व नगररचने संदर्भात निर्णय घेण्यात आले. आज पुण्यात हिंजवडी ते शिवाजी नगर या मेट्रोचे काम पीएमआरडीए मार्फत सुरू आहे, रिंगरोडची आखणी सुरू झाली आहे, नियोजनबद्ध काम करण्याच्या आग्रहामुळे पीएमआरडीएच्या क्षेत्रात डीपी प्लान पासून वेगवेगळी कामे सुरू झाली आहेत. पुण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली हे काम झाले आहे.
या नव्या पुणे महानगर समिती सदस्यांच्या नियुक्तिमध्ये पीएमआरडीएची स्थापना करण्यासाठी आग्रह धरून, अनेक विकसकामांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या खासदार बापट यांचे नाव नाही. मात्र ज्यांचा पुण्याशी संबंध नाही अशा राज्यसभा सदस्य असणाऱ्या संजय राऊत तसेच तानाजी सावंत यांच्या नावाचा समावेश आहे. खासदार बापट यांना पुणेकर जनतेने विक्रमी मताधिक्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे याची अधिसूचना काढताना ही चूक दुरुस्त करून खासदार बापट यांना या समितीमध्ये स्थान द्यावे अशी मागणी ही सुनील माने यांनी केली आहे.