पुणे, 20 जानेवारी 2023
पौष्टिक तृणधान्यांचा वापर आपल्या घरापासून सुरू करावा असे आवाहन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी केले आहे. ते काल अटारी पुणे यांनी आयोजित केलेल्या “नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये” या विषयावर आयोजित कार्यशाळेचे उदघाटक म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी; डॉ. व्ही. पी. चहल, सहाय्यक महानिदेशक (कृषि विस्तार), भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली; डॉ. सी. के. तिंबाडीया, कुलगुरू, गुजरात नैसर्गिक आणि सेंद्रिय कृषि विद्यापीठ, आनंद, गुजरात; श्री. विजयअण्णा बोराडे, अध्यक्ष, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, जालना; डॉ. लाखन सिंग, संचालक, अटारी पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना चौधरी म्हणाले की, नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये या दोन्ही बाबी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून त्या संदर्भात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका पुढील काळात निर्णायक असणार आहे. नैसर्गिक शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांना स्वतंत्र पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी केली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्ध्तीचा अवलंब करावा तर प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने आपल्या प्रक्षेत्रावर किमान 25 टक्के क्षेत्रावर नैसर्गिक शेती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
श्री. विजय आण्णा बोराडे यांनी आपल्या भाषणात पौष्टिक तृणधान्याच्या प्रचार प्रसारासाठी यांत्रिकीकरणावर भर देण्याचे आवाहन केले. बदलत्या परिस्थितीनुसार कृषि विज्ञान केंद्रातील मनुष्यबळ वाढविण्याच्या व कृषि विज्ञान केंद्रांना अधिक बळकट करण्याची सूचना त्यांनी केली.
डॉ. पी. जी. पाटील यांनी डॉ. लाखन सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले, तर महात्मा फुले कृषि विद्यापीठाने ज्वारी, बाजरी या पिकात अनेक चांगले वाण विकसित केले असून त्याचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.
डॉ. व्ही. पी. चहल यांनी सुरुवातीला प्रास्ताविक करतांना कृषि विज्ञान केंद्रांचा इतिहास व त्यांचे महत्त्व विषद केले. देशात सध्या 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत असून अजूनही नवीन कृषि विज्ञान केंद्र स्थापीत होणार असल्याचे सांगितले.
डॉ. तिंबडीया आणि डॉ. चापके यांनी उपस्थितांना अनुक्रमे नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. लाखन सिंग यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन शास्त्रज्ञ डॉ. राजेश टी. यांनी केले.
या कार्यशाळेस महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्राच्या प्रमुखांसह कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, अशासकीय संस्थांचे अध्यक्ष, भारतीय कृषि अनुसंधान परिषद संलग्न संस्थांचे संचालक, सर्व विद्यापीठांचे विस्तार शिक्षण संचालक, राज्य शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख यांचेसह 300 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.