पुणे : कला, गायन, वादन, नृत्य आणि संगीताचा मिलाफ असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवास सोमवारी दिमाखदार आणि रंगारंग सोहळ्याने प्रारंभ झाला. महोत्सवाचे यंदाचे २८ वे वर्ष आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा रंगमंच मध्ये आयोजित महोत्सवाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमल व्यवहारे, जयश्री बागुल, उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्यासह चित्र तारका व अभिनेत्री पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर या अभिनेत्री या सोहळ्यास उपस्थित होत्या.
यावेळी विवध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे, सामाजिक नेते अंकूश काकडे आणि लावणी सम्राज्ञी प्रियांका गौतम आदींना यावेळी श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून धमाल कार्यक्रम व नियोजन पहायला मिळाले. आबा बागुल विधानसभेत येणे गरजेचे आहे. आबा चैतन्यमय व्यक्तीमत्व आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचा महोत्सव आहे, याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव म्हंटले तर काही वावगे ठरणार नाही. पुणे हे जशे शिक्षणाचे माहेर घर आहे, तसेच हे सांस्कृतिक शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात कलाकार आहेत. अंकुश काकडे, उल्हास पवार, मोहन जोशी यांच्याकडे पाहिल्यावर नवी पिढी कुठे आहे, असे प्रश्न मनात येतो.
डॉ. पी. डी. पाटील माझे आवडत व्यक्तीमत्व आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण आक्षरांनी लिहीले आहे.
कधी कधी खूप वाईट बातम्या ऐकल्यावर आपले मन व्यथीत होते. महिलांवर अत्याचार होतात, त्यांच्या घरच्यांना मारतात आणि आरोपी बाहेर आल्यावर त्यांची सत्कार व मिरवणुक काढली जाते, हा प्रकार माणुसकीला कलंक आहे.
अंकुश काकडे यांनाच अद्याप संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीत त्यांना संधी मिळेल असे वाटत नाही. असे असताना काकडे यांनी आबांना ऑफर देणे योग्य नाही. उलट काकडे यांनीच आमची ऑफर स्विकारावी असे मिस्किलपणे ते म्हणाले.
उल्हास पवार म्हणाले, मी आणि मोहन जोशी पहिल्या नवरात्रौ महोत्सवापासून गेली २८ वर्षे या सोहळ्यात सहभागी होत आहोत. ग्रामीण भागातून सर्वसामान्य कुटुबात जन्म घेवून डॉ. पी. डी. पाटील यांनी मोठे काम केले. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेकांना मदत केली. त्यांना माणुसकीची जाण आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब धार्मिक आहे. अंकुश काकडे आमचे जगन्मित्र आहेत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुखाचे व आनंदाचे क्षण येत असतात. स्वत:चे दु:ख विसरून दुसऱ्यांना हसवत राहणे, खूप अवघड काम आहे, हे काम अंकुश काकडे करतात. प्रवीण तरडे यांच्या चित्रपटापासून समाजाला अनेक गोष्टी शिकता येतात. लोकाभिमूख नगरसेवक व कल्पक बुद्धीचा नगरसेवक कसा असावा याचे उदाहरण म्हणजे आबा बागुल, असेही पवार म्हणाले.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, आजचा दिवस दृढनिश्चयाचा आहे. या दिवसी आमचा सन्मान झाल्याने आम्ही भाग्यवान आहोत. मितेश घट्टे म्हणाले, माणुसकी व माणुसकीचे महत्व कोरोनाच्या काळात समजले. त्या काळात जे कार्य केले, त्याची पोहोच पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली.
प्रवीण तरडे म्हणाले, अनेक चित्रपट लिहीले, पण मी हा पुरस्कार मुळशी पॅटर्नसाठी स्विकारतो. शेती विकायची नसते तर राखायची असते, हा संदेश मी दिला.
अंकुश काकडे म्हणाले, गेली २८ वर्षे बागुल परिवार हा महोत्सव साजरा करत आहेत. त्यांना आता मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावर महोत्सव घ्यायचा आहे. त्यासाठी आबाला बाळासाहेब थोरातांनी मुंबईला न्यावे, नसेल तर आबांनी हातात घड्याळ बांधावे, त्यांना पाहिजे ते मिळेल असे मिस्किलपणे ते म्हणाले .
प्रियंका गौतम म्हणाल्या, बागुलयांनी मला सन्मान देवून नवीन कलाकाराचा सन्मान केला आहे. माझे आई वडील शिक्षकआहेत, तरीही मी कलेसाठी लावणी नृत्य करते. आई वडीलांनी मला कायमचा पाठिंबा दिला.
महोत्सवाचे मुख्य आयोजक अध्यक्ष माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की महोत्सव सुरु करने सोपे असते मात्र चालू ठेवणे अवघड असते. गेली २८ वर्षे हा महोत्सव सुरु आहे हे केवळ श्री लक्ष्मी मातेच्या कृपेनेच.
प्रारंभीमहाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्काराने महोत्सवास सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात केली. नादरूप संस्थेच्या नृत्य गुरू शमा भाटे यांनी त्यांच्या शिष्यांसह महाकाली चंड चामुंडा हा नृत्याविष्कार सादर करून महोत्सवाची सुरूवात केली.
– रत्ना दहिवलेकर महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री हा विशेष कार्यक्रम सादर केला.- विनोद धोकटे, स्वाती धोकटे यांनी अवतार जगदंबेचा कार्यक्रम सादर केला.- सँण्डी डान्स अॅकेडमीतर्फे बॉलिवूड 2022 हा नृत्य व संगीताचा धडाकेबाज कार्यक्रम सादर केला. – पायल वृंद तर्फे अभिनेत्रींनी कॅलिडोस्कोप दिलखेचक नृत्याविष्कार सादर केला. या नृत्याविष्काराते दिग्दर्शन अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी केले आहे. यामध्ये पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर यांनी नेत्र दीपक नृत्य विष्कार सदर करून डोळ्याचे पारणे फेडले. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दीपप्रज्वलन व आरती होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. घनशांम सावंत यांनी आभार मानले.
उद्घाटन समारंभानंतर गफार मोमीन, रामेश्वरी वैशंपायन, प्रीती पेठकर आणि मोनाली दुबे यांनी वाद्यवृंदासह स्वरसम्राट महमंद रफी यांच्या सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर केला.