‘ऋत्विक फाउंडेशन’तर्फे ‘ख्याल विमर्श’ कार्यक्रम उत्साहात
पुणे : “भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा लोकप्रिय प्रकार असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. विलंबित (मोठा ख्याल) व द्रुत (छोटा ख्याल) अशा दोन प्रकारातील ख्याल गायकी उत्स्फूर्त बांधणी व नवनिर्मितीला वाव देते. तालक्रियेतील दोन भाग आणि बारा स्वरांच्या पलीकडे जाऊन लागणाऱ्या श्रुती यामुळे गायकाला अभिव्यक्त होता येते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं. सत्यशील देशपांडे यांनी केले.
तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी यासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘ख्याल विमर्श’ या विशेष कार्यक्रमात पं. देशपांडे बोलत होते. कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध मुखड्यांचे सादरीकरण करत त्यातील बारकावे, तुकडे, आवर्तन, ताल, राग, बोल असे अनेक प्रकार समजावून सांगितले. फाउंडेशनचे प्रवीण कडले, चेतना कडले उपस्थित होते.
‘आधा है चंद्रमा, रात है आधी’, ‘कजरा रे कजरा रे’ अशा लोकप्रिय गाण्यांचे मुखडे अनुक्रमे एकताल व तीन ताल या शास्त्रीय तालांमध्ये आणून नवनिर्मितीला व वैयक्तिक अभिव्यक्तीला कसा वाव मिळतो हे सप्रयोग दाखवले व याच मुखड्यांच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सृजन देशपांडे यांनी सह गायन, तर विभाव खंडोलकर यांनी तबल्यावर साथ संगत केली.
पं. सत्यशील देशपांडे म्हणाले, “अभिजात शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे. आपल्याकडे त्याच गवयाचा तोच राग ऐकायला श्रोते पुन्हा येतात, हे आपल्या संगीताचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये आपली कला दाखवायला कसा वाव असतो, तो जगातील इतर संगीतापेक्षा कसा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे विषद करून सांगितले. विशेषतः पाश्चात्य कला-संगीत, कसे समूह संगीत आहे, आणि त्यात पूर्वनियोजितपणावर किती भर असतो ते सांगितले. बंदिशीबद्दलचे त्यांचे विचार, तिचे तीन घटक, आणि बंदिश कसे राग दर्शवतो, पण बंदिश म्हणजे पूर्ण राग कसा नाही हे सप्रयोग दाखवले.