पुणे : रिक्षा संघटनांनी जोरदार विरोध करत संप केल्यावर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर आरटीओ ने आता कुठे बाईक टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून म्हणजेच आरटीओकडून आत्तापर्यंत ६४० बार्इक टॅक्सी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. कारवार्इची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर या दुकाची चालकांना परत करण्यात आल्या आहेत.
बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याचा ठपका ठेवत दुचाकी चालकांकडून दंडासह वाहतुकीचा कर ही वसूल केला जात आहे. वाहन परमीट नियमानुसार एका सिटप्रमाणे ३०६ रुपयांचा कर आकारण्यात येत आहे. तसेच, दुचाकी मालक व्यवसाय करीत असेल तर गाडीचे कागदपत्रे सादर करून त्याला १० ते २० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे, तर दुचाकी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिली असेल तर चालकाला २० ते ३० हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे, असे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या संख्येने दुचाकीचालकांनी बाईक टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. बाईक टॅक्सीमुळे सोसावी लागत असलेली आर्थिक झळ थांबावी यासाठी ही सेवा बंद करण्याच्या मागणीसाठी शहरातील अनेक रिक्षा संघटना रस्त्यावर उतरल्या असून वारंवार तीव्र आंदोलन करीत आहेत. बाईक टॅक्सी कायमस्वरूपी बंदी आणावी, या मागणीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी एकत्र येत आरटीओ कार्यालयासमोर सोमवारी चक्का जाम आंदोलन केले होते. हजारो रिक्षाचालक त्यात सहभागी झाले होते.