पुणे- सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे देशातील प्रत्येक नागरिकाला आचरणात आणावे लागेल तरच माणूस माणसाला जोडला जाईल आणि त्यातून देश जोडला जाईल असे मत विमुक्त, घुमंतू जनजाती विकास परिषदेचे अध्यक्ष दादा इदाते यांनी व्यक्त केले.
अॅस्पायर नॉलेज अँड स्किल्स (इंडिया) प्रा. लि. ,पुणे यांच्या वतीने सन्मान गुणवत्तेचा… गौरव जीवनाचा..या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
जेष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, खादी ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष यशोवर्धन बारामतीकर, टेलेकॉम सेक्टर स्किल कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. जनरल डॉ. एस. पी. कोचर, एआयसीटीईच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. दीपक शिकारपूर, स्ट्रॅटेजीक फोरसाईट ग्रुपचे सिनिअर प्रोग्रामअॅडवायजर सचिन इटकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. शंकर देओस्कर, हिरवाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, पुणे मॅनजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप तुपे, व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्रचे मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, ग्रीन थंबचे सल्लागार आणि राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रशांत पगारे, डॉ. दयानंद सोनसालेआदी यावेळी उपस्थित होते. डॉ. गजानन एकबोटे यांना शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर जीवन गौरव पुरस्कार, डॉ. जयंत अभ्यंकर (शारंगधर ग्रुप) यांना आरोग्य क्षेत्रातउल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर हॉल ऑफ फेम पुरस्कार, श्री विनायक निम्हण (सनी वर्ल्ड) यांना हॉटेल व रिसोर्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर प्रॉमिसिंग ब्रँड पुरस्कार, गीतराम कदम यांना अन्न प्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायरब्रँड टू वॉच २०१९, शेखर मुंदडा यांना स्वयंसेवी संस्था क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर एनजीओ पुरस्कार, डॉ. सुभाष मारलेवार यांना होलेष्टीक औषध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर सर्व्हिस टू सोसायटी पुरस्कार, पांडुरंग शेलार यांना पाणी व्यवस्थापन क्षेत्रातउ ल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आणि संतोष राऊत यांना सामाजिक सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अॅस्पायर प्रॉमिसिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनिष भांदवे, अविनाश तरवडे, अतुल निकम यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
दादा इदाते म्हणाले, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे अशी प्रतिज्ञा रोज म्हटली जाते. परंतु आपल्याला खरोखर भारत व त्यातील लोक यांची माहिती असते का? कारण देश आणि लोक यांच्यामध्ये खूप मोठे अंतर आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे देशातील प्रत्येक नागरिकाला आचरणात आणावे लागेल त्यातूनच माणूस आणि देश जोडला जाईल असे ते म्हणाले. विद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावात फक्त चौथी पर्यंत शाळा होती. मात्र, बाबासाहेबांनी देशाची घटना लिहिली. त्या गावात काम सुरु केले. आज त्याठिकाणी मॉडर्न कॉलेज आहे. देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी, त्याच्या उन्नतीसाठी अनेकांचे योगदान असते. त्यांचे कार्य समाजासमोर येणे महत्वाचे असते. त्यासाठी त्यांचा सन्मान होणे उचित ठरते असे त्यांनी नमूद केले.
मनोज जोशी म्हणाले, गावाकडून येऊन तळागाळातल्या मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम संजय गांधी अॅस्पायर नॉलेज अँड स्किलच्या माध्यमातून करत आहेत. जे जीवनात यशस्वी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी अॅस्पायर झटत आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे.
डॉ. एकबोटे म्हणाले, मी पेशाने डॉक्टर असलो तरी अपघाताने गुरूंच्या सांगण्यावरून शिक्षण क्षेत्रात आलो. आपल्या हातून चांगली पिढी घडविण्याचे पुण्य मिळेल या हेतूने शैक्षणिक संस्था सुरु केली. आज संस्थेच्या ६८ शाखा आणि ५५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तळागाळातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देणे हा हेतू ठेवून आजपर्यंत वाटचाल चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
विनायक निम्हण म्हणाले, गेली ३०-३५ वर्षे राजकारण, समाजकारण करतो आहे. त्या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले परंतु व्यवसायामधला हा पहिला पुरस्कार आहे. तो मला सर्वात जास्त महत्वाचा वाटतो. राजकारण, समाजकारण किंवा व्यवसाय असे कोणतेही काम मनापासून केले तर ते सोपे होते आणि त्यात यश नक्की मिळते असे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. जयंत अभ्यंकर, गीतराम कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये संजय गांधी यांनी अॅस्पायर नॉलेज अँड स्किल संस्था करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तरुणांना त्यांचे कौशल्य विकसित करून त्यांच्या पायावर उभे करण्याबरोबरच सर्वांना एकत्र करून एक नवा भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने अॅस्पायर काम करीत आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. समिधा गांधी आणि समिरा गुजर यांनी केले तर आभार हुसेन हाजिते यांनी मानले. त्यानंतर अभिनेते मनोज जोशी यांची प्रमुख भूमिका असलेले ‘चाणक्य’ हे महानाट्य सादर करण्यात आले.