संपूर्ण भारतात २३ मार्च रोजी कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाउन करण्यात आले होते. त्यास देशातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होत आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी जुलै महिन्यापासून अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली असून नागरिकांची वर्दळ रस्त्यावर वाढलेली दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात दिवसाला हजार रुग्ण सापडत असून आज रोजी पुण्यात १००२६४ रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याबाबत प्रशासनाकडून माहिती मिळत आहे.
पुणे शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहराची आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे.शहरात नागरिकांना उपचार देण्यासाठी सार्वजनिक हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात नसून, पुणे महानगरपालिका देत असलेल्या रेटने खासगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास तयार नाही. तसेच रोजगार गेल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कोरोनावरील उपचार घेण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे काँग्रेस पक्षाचे गटनेते, जेष्ठ नगरसेवक आबा बागुल म्हणाले.
आबा बागुल म्हणाले की , आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही अनेक इन्शुरन्स कंपन्यांना कोरोना आरोग्य विम्याबाबत माहिती घेतली.त्यापैकी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सर्वात कमी प्रीमियममध्ये कोरोना कवच विमा दिला असून यामध्ये ४० वर्षापर्यंत वय असणाऱ्या प्रती व्यक्तीस वनटाईम ८७७ रुपये व ४१ ते ६० वर्षापर्यंत वय असणाऱ्या प्रती व्यक्तीसाठी वनटाईम ११६८ रुपये वनटाईम प्रीमियम भरून २ लाख रुपयांचा कोरोना कवच आरोग्य विमा साडे नऊ महिन्यांसाठी काढण्यात येतो.हा आरोग्य विमा काढल्यास कोरोना झालेल्या व्यक्तीस भारतामध्ये कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा मिळून त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातील. यामाध्यमातून कोरोना रुग्णांवर त्वरित उपचार होतील. कोणत्याही नागरिकाचा उपचाराविना जीव जाणार नाही.
यासाठी पुणे महानगरपालिकेने इतर सुविधांवर जास्त खर्च न करता आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचा कोरोना कवच आरोग्य विमा काढावा जेणे करून कोरोना झाल्यावर उपचार घेण्यास त्यांना आर्थिक अडचणी येणार नाहीत.त्यामुळे कोणाचाही उपचाराविना नाहक मृत्यू होणार नाही. आपण अल्पदरामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हा कोरोना कवच देऊ शकतो. त्यासाठी आपण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींन बरोबर बैठक घेऊन लवकरात लवकर पावले उचलावी अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या पत्रात आबा बागुल यांनी केली.