‘ डीपी’ नुसार शहरात रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करा:आबा बागुल
पुणे : क्षेत्रफळाने दिवसेंदिवस पुणे शहराचा विस्तार होत असताना विकास आराखड्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याकडेच पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शहराची वाहतूक जीवघेणी ठरत आहे.त्यात पालिकेकडे ७कोटी स्क्वेअर फूट जागा कागदोपत्री ताब्यात असूनही प्रत्यक्ष किती ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाले याची ठोस आकडेवारीही नाही.त्यामुळे १९८७ते २०१७पर्यंत मान्य विकास आराखड्यानुसार पालिका प्रशासनाने मोबदला अदा केलेल्या जागा ताब्यात घेवून रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करावे ,अशी मागणी महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे की,सद्यस्थितीत शहराचा वाहतुकीचा गंभीर बनलेला प्रश्न सोडविण्याकडे महापालिकेसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.परिणामी जीवघेण्या वाहतुकीत पुणेकरांचा श्वास गुदमरत आहे आणि अपघातांचा आलेखही उंचावत आहे.
भविष्याचा विचार करता आतापासून आपल्याला वाहतूक नियोजनासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी शहराच्या वाहतुकीबाबत नियोजनाचा मास्टर प्लॅन तयार असणे अनिवार्य आहे. मात्र सद्यस्थितीत बिकट बनलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीरीत्या राबविल्यास वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळणे सहजशक्य आहे.मात्र त्यासाठी १९८७ पासून २०१७पर्यंत विकास आराखड्यात दर्शविलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करणे अपरिहार्य आहे. पण त्याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ‘ पी पी पी ‘ तत्वावर काही मूठभर लोकांसाठी रस्त्यांची आखणी करणाऱ्या पालिका प्रशासनाला एफ. एस.आय.,टीडीआर,आर्थिक मोबदला अदा करून कागदोपत्री ताब्यात घेतलेल्या ७कोटी स्क्वेअर फूट जागांचा सोईस्कर ‘विसर ‘पडला आहे.
विशेष म्हणजे माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत प्रशासनाने झोन निहाय दिलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.त्यामुळे एफ. एस.आय, टीडीआर,आर्थिक मोबदला दिलेल्या बहुतांश जागा या आजही मूळ मालकांच्या ताब्यात आहेत.अनेक ठिकाणी अतिक्रमणे कायम आहेत .केवळ सातबारावर पालिकेचे नाव लागले आहे मात्र ताबा पालिकेकडे आजतागायत नसल्याची वस्तुस्थिती आहे.त्यामुळे रस्ता
रुंदीतील या जागा ताब्यात घेऊन तातडीने रस्ते विकसित करणे आवश्यक आहे.असेही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नमूद केले आहे.
सुरळीत वाहतुकीसाठी प्रभावी उपाययोजना
सध्या शहरात होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अरुंद रस्त्यांसह शहरातील सर्वच रस्त्यांवर चार चाकी वाहनांना पार्किंगला अटकाव घालणे, वाहतूक नियंत्रक दिव्यांचे सुसूत्रीकरण करणे, अतिक्रमण विरहित फुटपाथ, रस्ता रुंदीतील जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणे, प्रत्येक चौकात दोनशे मीटर अंतरावर गतिरोधक उभारणे, रस्त्यात बंद पडलेल्या वाहनांना घेऊन जाण्यासाठी क्रेनची व्यवस्था सक्षम करणे, चोवीस तास वाहतूक नियंत्रक दिवे सुरु ठेवण्यासाठी वीज बॅटरी बॅकअप यंत्रणा प्रभावी करणे, जिथे आवश्यक,त्या ठिकाणी एकेरी मार्गाची आखणी करणे, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वाहनतळांची निर्मिती करणे आदी विविध उपाययोजना माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाला सुचविल्या असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर नेमावेत आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर पोलिसांच्या मदतीने सुरळीत वाहतुकीची जबाबदारी त्या त्या ट्रॅफिक प्लॅनरवर सोपवावी असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे