पुणे –नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी करत महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यातील कार्यकारी अभियंत्याची जबरदस्तीने पूजा करून कार्यालयाच्या साहित्याची नासधूस व टाळा ठोकण्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि चार नगरसेवकांसह 41 जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.यातील नगरसेविकांची महिला कारागृहातून तर माजी आमदार टिळेकर व आदींची बार्टी शेजारील कोरोंटाइन सेंटर मधून सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी संबंधितांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी झाली.माजी आमदार टिळेकर यांच्यासह सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमांनुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, ऋषाली कामठे, वीरसेन जगताप अशी अटक झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी कार्यकारी अभियंता अषित देवप्रकाश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीतर्फे ऍड. प्रसाद कुलकर्णी, ऍड. सुधीर शहा, ऍड. के. टी. आरु, ऍड. शैलेश म्हस्के,, ऍड. रवी लाढाणे, ऍड. ऋषिकेश घोरपडे, ऍड. सिद्धार्थ राठोड यांनी कोर्टात कामकाज पाहिले. या प्रकरणात संबंधितांना जामिनावर सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला.कात्रज- कोंढवा रस्ता, बालाजीनगर, धनकवडी परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टिळेकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या स्वारगेट येथील कार्यालयात आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळेकर यांनी फिर्यादी यांच्या टेबलावरील काच फोडली व कार्यालयातील फाइल फेकून दिल्या. तर कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची नुकसान करून काचा फोडल्या. त्यानंतर टिळेकर यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून येत त्यांना दमदाटी करून ढकलत कार्यालयाबाहेर काढत सरकारी कामात अडथळा आणला होता.
पाण्याच्या राजकारणापायी त्यांनी पाहिल्या कारागृहाच्या उत्तुंग भिंती …
महिला नगरसेविकांना याप्रकरणी 2 रात्री ३ दिवस कारागृहात काढाव्या लागल्याचे समजते . टिळेकर आणि काही कार्यकर्ते मात्र बार्टी शेजारील कोरोंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते .या सर्वांना आज संध्याकाळी उशिरा सोडण्यात आले. यावेळी त्यांचे मोजके कार्यकर्ते बाहेर त्यांच्या प्रतीक्षेत होते . पोलीस उपायुक्त यांच्या उपस्थितीत येथे यावेळी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता . कार्यकर्त्यांसह माध्यम प्रतिनिधींना दूरवर राहण्याची सूचना देण्यात आली होती. कोणतेही बडे नेते,पदाधिकारी यावेळी इकडे फिरकले नाहीत .पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलनास गेलेल्या महिला नगरसेविकांनी कारागृहाचा अनुभव घेतल्याने बाहेर पडताच त्यांना रडू कोसळले होते . पण त्यांचे नातलग ,’तुम्हीलोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे भोगलेत ‘ असे सांगून त्यांची समजूत काढताना दिसत होते.