पुणे दि.१९-जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार लंपी स्किन रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण व निर्मुलन करण्यासाठी तसेच गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशी यांच्या वाहतुकीवर, बाजार भरवण्यावर, जनावरांची जत्रा व जनावरांच्या प्रदर्शनावर बंदी घालणे इ. अनुषंगिक उपाययोजना प्रभावीपणे सनियंत्रीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांची त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पुढील आदेश होईपर्यंत सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणुक केली आहे.
उपविभागीय अधिकारी यांनी शासनाच्या ८ सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांमध्ये व गावांमध्ये जनावरातील लंपी रोग नियंत्रणासाठी पुढील आदेश होईपर्यंत सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावयाची आहे. गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशी यांच्या वाहतुकीवर बाजार भरवण्यावर, जनावरांची जत्रा व जनावरांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याबाबत व आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्यक असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.
प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अंतर्गत अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आलेली आहे.
गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गो प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आलेली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.