पुणे – राज्यातील रोजगार बाहेरील राज्यात जात आहेत.बेरोजगारी वाढते आहे या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. वाहन उद्योगाला वेळीच पाठबळ दिले नाही तर 10 लाख लोकांचे रोजगार जायची भीती व्यक्त होते आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले . देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ५ टक्के असल्याचे राष्ट्रीय एनएसएसओने जाहीर केले आहे. मागील पाच वर्षांपासून विकासदराचे आकडे सतत घसरत आहेत. सरकार ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न दाखवित आहे. मात्र, राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्याबाबत सरकार हे माहिती देत नाही. नागपूरमधील मिहान हा उत्कृष्ट औद्योगिक प्रकल्प आघाडी सरकारने विकसित केला. तेथील ८ उद्योगपतींनी आता सरकारला जागा परत केल्या आहेत. याची जबाबदारी निश्चित करावी. पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आ. मोहन जोशी, शरद रणपिसे,कमल व्यवहारे , रवी धंगेकर ,अविनाश बागवे, संजय बालगुडे ,गोपाल तिवारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
पुढे चव्हाण म्हणाले, की बँकांमध्ये आमच्या काळात घोटाळे होत होते पण मोदी सरकारच्या काळात त्यात आणखी ७ पट वाढ झाली आहे ,घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी सरकारने १० राष्ट्रीयकृत बँकांचे विलिनीकरणाचा शुक्रवारी निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामधून केवळ वित्तीय चालना देण्याचा आभास निर्माण केला जात आहे. मंदी असल्याने काही कंपन्यांनी वृत्तपत्रात जाहिराती देऊन सरकरचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारच्या मेक इन इंडियाचे काय झाले हे सरकार सांगण्यास तयार नाही.
अलमट्टी धरणाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी बिगर राजकीय समितीची गरज-
सांगली आणि कोल्हापूर येथील पूर परिस्थितीट सरकारचा गलथनपणामुळे अधिक नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला . नागरिक पुरात अडकलेले असताना सांगली आणि कोल्हापूरचे पालकमंत्री पक्षाच्या मेळाव्यात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत व्यग्र होते. त्यामुळे सांगली कोल्हापूर पूर परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. तेथील नुकसान टाळता आले नाही. त्यामुळे कोल्हापूर शहराला अर्धवेळ पालकमंत्री नको तर पूर्णवेळ पालकमंत्री द्यावा, अशी तेथील लोकांची मागणी आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एक बिगर राजकीय समिती स्थापन करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाचे काम करावे-
दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत धाडसत्र सुरू आहे. इतर सर्व पक्ष संपून टाकायचे आणि एकाच पक्षाची सत्ता आणायचे, अशी भूमिका भाजपने घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीविरोधात याविरोधात लढायचे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपचा छुपा पाठिंबा होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्षनेता असेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे, असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
विरोधी नेत्यांना धमक्या देऊन भाजपमध्ये घेतले-
देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जात आहे. चौकशी लावू, अशी धमकीही त्यांना दिली जात आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाच प्रकारे धमक्या देऊन भाजपमध्ये घेतले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. सगळे विरोधी पक्ष संपवून एकाच पक्षाची सत्ता आणायची आणि एका पक्षाच्या सत्तेद्वारे हुकुमशाही कडे निघायचे अशी भाजपची वाटचाल दिसते आहे . काश्मीर केवळ पंडित नेहरू होते म्हणून भारतात आला . हे लक्षात घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले .