पुणे- महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन खा. अमोल कोल्हे यांनी ,केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना नवी दिल्ली येथे दिले. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील ही उपस्थित होते. बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे यावेळी डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी केंद्रीय सरकारकडे सातत्यातने पाठपुरावा सुरु आहे. महाराष्ट्राची सुमारे ४०० वर्षांची परंपरा, बैलगाडा शौकिन व मालक यांच्या भावना,देशी गोवंशाचे रक्षण व ग्रामीण पर्यटनाला चालना या हेतूने ‘बैल’ या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश वगळावा, यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होतील, अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना केली.