पुणे, दि. २७:- महिला सक्षमीकरण कार्यासाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती पुरस्कार-२०२१’ साठी पात्र महिला आणि संस्थांनी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईनरित्या अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांना सर्व क्षेत्रामध्ये सहभाग घेण्याच्या उद्देशाने प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच भारतीय युवक-युवतींना समाज व राष्ट्र निर्माण यामध्ये महिलांच्या योगदानाचे महत्त्व समजण्यासाठी नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. विशेषत: दुर्बल घटकातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांना आणि सामाजिक संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्कारासाठी इच्छुक पात्र महिला व सामाजिक संस्थांनी आवश्यक कागदपत्रासह ३१ जानेवारी २०२२ पर्यंत www.wcd.nic.in किंवा www.awards.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. पुरस्काराचे स्वरुप दोन लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे आहे.
पुरस्कारासाठी महिला व सामाजिक संस्थानी अर्ज करावेत. वैयक्तिक पुरस्कारासाठी महिलांचे वय १ जुलै २०२१ रोजी वय २५ वर्षे पूर्ण झालेले असावे. एखादी सामाजिक संस्था अर्ज करु इच्छित असेल तर महिलांसाठी आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्ये ५ वर्ष कामाचा अनुभव आवश्यक राहील. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या महिलांनी किंवा सामाजिक संस्थांना अर्ज करता येणार नाही.
महिलांसाठी सर्वसाधारण परीस्थितीमध्ये आर्थिक सामाजिक सक्षमीकरणाठी संबंधित क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या महिलांना व सामाजिक संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांनी महिलांना निर्णायक भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन दिलेले असावे, पारंपारिक व अपारंपरिक क्षेत्रामध्ये महिलांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिलेले असावे. ग्रामीण महिलांना मुलभुत सेवा पुरविण्याच्या उददेशाने कार्य केलेले असावे. महिलांना विज्ञान, औद्योगिक, खेळ, कला, संस्कृती, आरोग्य व स्वास्थ शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण प्रोत्साहित केलेले असावे आदी पात्रता व निकष पुरस्कारासाठी आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी कळविले आहे.
**