पुणे – मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्टच्या वतीने ‘आला … आला… तुळशीबागेचा गणपती आला…’ या गीताचे अनावरण ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक पं. राजेश दातार यांनी हे गीत लिहून संगीतबद्ध करुन गायले आहे.
यावेळी पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त विश्वास भोर, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडीत, विनायक कदम, दत्ताभाऊ कावरे, गणेश रामलिंग, किरण चौहान आदी यावेळी उपस्थित होते.
पं. रघुनंदन पणशीकर म्हणाले, संगीतकार, गायक हे जसे संगीताचे सेवक आहेत. तसे सगळे गणेशभक्त हे गणेशाचे सेवक आहेत. आपल्याकडे जुनी धारणा असते ती विघ्नहरण म्हणजे गणेश, त्यानंतर नवरात्र म्हणजे शक्तीची पूजा करुन सिमोल्लंघन करणे. या सगळ्याची माहिती मंडळांनी करुन द्यावी, असे त्यांनी सांगितले.
राजेश दातार म्हणाले, बाप्पानी हे गाणे माझ्याकडून लिहून घेतले आहे. गीताच्या माध्यमातून गणरायाची सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून अशी सेवा यापुढेही करत राहीन, असेही ते म्हणाले. हेमंत रासने, श्रीकांत शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विनायक कदम यांनी आभार मानले.