नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्काराने २५ ऋषीतुल्यांचा सन्मान
पुणे : “समाजातील पंचवीस स्वयंप्रकाशीत ताऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोणत्याही सांदी कोपऱ्यात असला तरी तो कोपरा माझ्या परीने प्रकाशित करीन, या ध्येयाने या ऋषीतुल्यांची कार्य केले आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाजाला जागृत करायचे असते. लोकमान्य टिळकांनी याच उद्देशाने गेणशोत्सव सुरू केला. त्याला विधायक कामाची जोड दिली आणि स्वातंत्र्यलढा उभारला. त्यामुळे उत्सवांना विधायक कामाची जोड दिली, तर त्याचे महोत्सवात रूपांतर होते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले.
पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुणे नवरात्र महोत्सवात यंदा २५ ऋषीतुल्यांचा सन्मान राजदत्त यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सोहळ्यावेळी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, संयोजक आबा बागुल, जयश्री बागुल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यंदा महोत्सवाचे २५ वे वर्ष असल्याने २५ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. डॉ. अनिल अवचट (सामाजिक), विद्या बाळ (महिला सक्षमीकरण), डॉ. कुमार सप्तर्षी (सामाजिक), अनिस चिश्ती (अध्यात्मिक), प्रभाकर जोग (संगीत), मोरेश्वर घैसास (वेदाचार्य), रामभाऊ जोशी (पत्रकारिता), विजयकांत कोठारी (उद्योग), डॉ. कल्याण गंगवाल (व्यसनमुक्ती), वालचंद संचेती (शिक्षण), डॉ. वसंत शिंदे (शिक्षण), एस. के. जैन (कायदा), विठ्ठल काटे (हास्ययोग), डॉ. संप्रसाद विनोद (अध्यात्म), उमेश झिरपे (गिर्यारोहण), डॉ. दिपक शिकारपूर (माहिती तंत्रज्ञान), संजय टकले (क्रिडा), डॉ. दत्ता कोहिनकर (समुपदेशन), आदिनाथ चव्हाण (कृषि पत्रकारिता), श्री. द. महाजन (पर्यावरण), यशवंत खैरे (पर्यावरण), चंद्रकांत काळे (गायन), शमा भाटे (नृत्य), विवेक खटावकर (शिल्पकला) यांना ‘महर्षी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
उल्हास पवार म्हणाले, “अशी ऋषितुल्य व्यक्तिमत्वेच पुण्याचे भूषण आहेत. आज यांच्या सन्मानामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. त्यांच्याकडून समाज हिताचे काम होईल. या विविध व्यक्तींच्या उतुंग कार्यामुळे त्यात्या क्षेत्रात भरीव कामगिरी झाली आहे आणि याचा समाजाला फायदाही झाला आहे. त्यामुळे अश्या व्यक्तींच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना एक सकारात्मक उर्जा मिळते.”
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, “नम्रता मानवी जीवनात बहुआयमी आहे, आज विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव केला, ती समाजाची गरज आहे. अशा लोकांच्या कार्यामुळेच समाज सुदृढ बनतो. सांस्कृतिक पोषण चांगले हवे. कारण जिथे सांस्कृतिक कुपोषण आहे, तिथे युद्धे होतात. सुरुवातीच्या काळात एकजुट पाहायला मिळायची. मात्र, आज जातीपातीच राजकारण सुरू आहे. द्वेषाचे हे स्वरूप असेच वाढत राहिले, तर आपल्या देशाची व्याख्या बदलेल. त्यामुळे द्वेषभाव बाजूला करून माणूस म्हणून आपण जगले पाहिजे.
विद्या बाळ म्हणाल्या, आजही स्त्री स्वातंत्र्याची आणि समानतेची लढाई सुरू आहे. ही पुरुषांविरोधातील लढाई नसून पुरुषशाहीविरोधातील आहे. समानतेचा प्रवास आजही सोपा नाही. या पुरस्काराच्या निमित्ताने कामाचा गौरव झाला. पुण्यात कर्तृत्ववान महिलांची संख्या अधिक आहे, त्यामुळे अधिकाधिक कर्तृत्ववान महिलांचा गौरव व्हावा. डॉ. अनिल अवचट म्हणाले, शांतीच्या मार्गाने आज सर्व गोष्टींवर विजय मिळवता येतो. त्यामुळे महात्मा गांधींच्या विचारावर आपण चालणे गरजेचे आहे. जगभर जिथे आंदोलने सुरू आहेत, तिथे महात्मा गांधी यांचा नामोल्लेख होतो, यावरून त्यांच्या कार्याची प्रचिती येते.
मिलिंद जोशी म्हणाले, “भारतीय संस्कृतीचा पाया ही ज्ञानी व्यक्तीवर उभा आहे. माणसाने तत्वानुसार जगले पाहिजे. तत्व सोडले तर जीवनाला अर्थ राहणार नाही. सत्ता संपत्तीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट विकत घेता येते. पण आदर्श व्यक्तीमत्व हे आचार विचारांनीच बनते. समाजाला सकारात्मकतेची गरज आहे. सज्जन व्यक्तींचे एकत्र येणे गरजेचे आहे.” डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, आपापल्या क्षेत्रात सखोल अभ्यास करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाला आहे. कोणत्याही क्षेत्रातील सखोल दृष्टी प्राप्त झालेली व्यक्ती महर्षी होतात. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात असाल तरी तेथे सखोल अभ्यास करत रहा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबा बागुल यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. घनःश्याम सावंत आभार मानले.