पुणे : आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा आज पुण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांनी प्रचंड मोठया संख्येने, जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. शिवसेनेने गद्दारांना राजकीय ओळख दिली, तिकीट दिले, निवडून आणले.मात्र यांनी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ४० आमदारांनी सुरतेला पळून जाऊन उठाव नव्हे तर गद्दारीच केली. आत्ताचे गद्दारांचे सरकार बेकायदेशीर व घटनाबाह्य असून सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहा .हिंमत असेल तर निवडणूक लढवुन दाखवा असे आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
शिव संवाद संवाद यात्रेच्या सभेला डॉक्टर नीलम गोऱ्हे, आदेश बांदेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर पुणे शहराध्यक्ष संजय मोरे , संभाजी थोरवे, कल्पना थोरवे गजानन थरकुडे, रघुनाथ कुचिक, ,रविंद्रजी मिर्लेकर ,आदित्य शिरोडकर युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदित्य यांनी सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. आज काही गद्दार जिल्ह्यात फिरत आहेत, असा निशाणा त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर साधला.व्यासपिठावर जाताना कार्यकर्त्यांनी आदित्य यांना गराडा घालत, हातात हात देण्याचा प्रयत्न केला. आदित्य यांनीही प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न करत हातात हात देत होते. इथे येताना गर्दीमुळे धक्काबुक्की झाली. याबर बोलताना आदित्य म्हणाले. मला वाटले कोणी माझा हात नेते की काय पण या हातांनी धनुष्यबाण पकडले आहे. गद्दारांना उत्तर देण्याची त्यांची लायकी नाही, असा घणाघात त्यांनी केला. आज काही गद्दार पुण्यात फिरत आहेत. असा टोला त्यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांना लगावला.
आदित्य ठाकरे म्हणाले, फंड मिळाले नाही म्हणून आरोप केले पण अजितदादांनी विधान मंडळात सर्वांची चिरफाड केली. आदित्य ब्ल्यू शर्ट घालतो म्हणून बाहेर पडलो, असे म्हणायला गद्दार मागे पुढे पाहणार नाहीत. काय कमी दिल आम्ही यांना. त्यावेळेस निर्लज्ज गद्दार टेबलावर उड्या मारून नाचत एकमेकांना पेढे भरवत होते. हे गद्दारच आहेत. जे स्वतःच्या परिवाराचे नाही झाले. हे जनतेचे काय होणार.असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले,उद्या इथे कांही बिघडल तर हे दिल्ली आणि गुवाहटीला पळून जातील. वार करायचेच होते तर छातीवार करायला पाहिजे होते. पाठीवर काय करताय बेडकांसारख्या उड्या मारत 40 गद्दार आमदार पलीकडे गेलेले आहेत. राज्यपालांनी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर टीका कोली होती. आता ते मराठी माणसावर बोलत आहेत. मराठी माणसांना बाजूला पाडण्यासाठी हे असे कृत्य करत आहेत. महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्यासाठी राज्यपालांची अशी वक्तव्य चालू आहेत. ठाकरे परिवाराला एकटे पाडू शकत नाही, कारण महाराष्ट्राची जनता हेच सर्व ठाकरे परिवार आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कोविड रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदारांची बैठक घेत होते. याकाळात या गद्दारांनी महाराष्ट्राची सेवा करण अपेक्षित होते. पण यांनी आमदार फोडायला सुरुवात केली. त्यावेळी स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी कट रचायला सुरुवात केली, असेही ते म्हणाले. ज्या माणसाने तुम्हाला सर्व कांही दिले. त्यामाणसासोबत गद्दारी करण्यासाठी यांनी राजकारण सुरु केले. जेंव्हा उद्धव साहेबांना कोविड झाला तेंव्हा हे डरपोक सुरतेला पळून गेले.असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.