पुणे – मुळशी धरणामधून पाच टीएमसी पाणीपुरवठ्याबरोबरच मोशी येथील सरकारी खाणीची जागा कचरा टाकण्यासाठी महापालिकेला त्वरित द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी सोमवारी सांगितले.
महापालिकेच्या हद्दीमध्ये भविष्यात 34 गावांचा समावेश होणार आहे. हद्दीलगतच्या गावांना पाणीपुरवठा करणे महापालिकेला बंधनकारक असल्यामुळे पाटबंधारे विभागाकडून मिळणारे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी पिण्यासाठी प्राधान्याने शहराला देण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे धनकवडे यांनी सांगितले.
मुळशी धरणाची क्षमता 21.33 टीएमसी आहे. पुणे जिल्ह्यातील गावांसाठी 1.2 टीएमसी पाणी पिण्यासाठी देण्यात येत आहे. त्याचधर्तीवर पुणे शहराला पाच टीएमसी पाणी देता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये 31 डिसेंबरनंतर कचरा टाकता येणार नाही. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या लक्षात घेता मोशी येथील 25 एकर जागा महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी त्वरित द्यावी, अशी मागणी आहे. ही जागा मिळावी म्हणून 30 ऑगस्टला महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील मेट्रो प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळवून देणे, मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या कंपनीची स्थापना करणे, सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करणे, पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्तावाला निधी देणे, 23 गावांमधील बीडीपीच्या आरक्षणाला मंजुरी देणे, विकास आराखड्यातील सार्वजनिक प्रयोजनार्थ आरक्षित जागांचा आगाऊ ताबा देणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. “जेएनएनयूआरएम‘ प्रकल्पांतर्गत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावांसाठी निधी मिळण्यासाठी मदत करणे, शासनाकडील महापालिकेची थकीत रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी बैठकीत करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.