२६वीं तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या दुसर्या सत्रात
पुणे,दि.२६ नोव्हेंबर:“आजकालच्या वाढत जाणार्या घटस्फोटाला थांबविण्यासाठी पती-पत्नीच्या नात्यामध्ये संवाद, स्पर्श, सहवास, स्वातंत्र्य आणि सन्मान या पाच गोष्टी असणे अत्यंत महत्वाचे आहे. ताण तणावातून मुक्त होऊन सुखमय जीवन जगण्यासाठी वर्तमानकाळात जगायला शिका.” असा सल्ला सांगली येथील नंदादीप आय हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. दिलिप पटवर्धन यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २६व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी डीडी सह्याद्रीचे माजी संचालक मुकेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये आणि डॉ. गोविंद पालकर, डॉ. बी.एस.कुचेकर, डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
डॉ. दिलिप पटवर्धन म्हणाले,“जीवनात ताण असेल तर मानवाची कार्यक्षमता वाढते हे सत्य आहे. कोणत्याही परिस्थितीत सदैव सकारात्मक विचार केल्यास मानव कधीही दुखी होऊ शकणार नाही. वर्तमानकाळात जगणे, चेहर्यावर सदैव हास्य ठेवणे आणि कौतुक करणे हे जीवन जगण्याची सर्वात मोठी कला आहे. तणाव घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत आनंद निर्माण करावा, सुख हे बाहेर नाही तर ते अंर्तमनात शोधावे. भूतकाळात घडलेल्या चुका सुधारून वर्तमानकाळात बदल करा व आयुष्य सुकर करा.”
“सुंदर जीवनासाठी आपण कोणाकडूनही अती अपेक्षा करू नये. येणार्या वस्तूस्थितीचा स्विकार करा आणि त्याला योग्य आकार दया. अहंकारापासून मुक्त झाल्यावर जीवनाचा खरा आनंद काय असतो हे कळते. जीवनात ४ ‘वा’ या गोष्टींचा उपयोग करा, त्यात वाचवा, वाढवा, वापरा आणि वाटा. म्हणजेच आपल्या जवळील ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते सर्वांना दया.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार कमी करण्यासाठी अध्यात्म गरजेचे आहे. सामाजिक शांतीसाठी अध्यात्माची गरज आहे. स्वत्व, स्वाभिमान आणि स्वधर्म जागृत करण्याचे कार्य या व्याख्यानमालेतून करण्याचा प्रयत्न आहे.”
मुकेश शर्मा म्हणाले,“ईश्वराला कोणीही शोधू शकत नाही, पण त्याचा अनुभव घेऊ शकतात. धर्म हे जीवनाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी असते. धर्मातून सदैव सकारात्मक ऊर्जा मिळते. धर्मातून जीवन जगण्याची नवी दृष्टी मिळल्याने आम्हाला सृष्टी ही चांगली दिसायला लागते. विज्ञानाने मानवाचे जीवन सुखमय केले आहे. परंतू ते अंर्तमनापर्यंत पोहोचलेले नाही. पण अध्यात्म मानवाच्या अंर्तमनात पोहोचले आहे. त्यामुळेच अध्यात्म हे विज्ञानाच्या पुढे गेले आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ भारतीय संतांचा विचार संपूर्ण जगात पोहोचविण्यासाठी एमआयटी शिक्षण संस्था शिक्षणाबरोबरच हे कार्य करीत आहेे. धर्माच्या माध्यमातून मानवी जीवनाला वेगळे वळण दिले जाते. त्यामुळेच प्रत्येक वेळी जीवनात संतुलन आवश्यक आहे. मी पणा, अहंकार आणि इच्छा या गोष्टी आल्या की आपल्या अपेक्षा भंग होतात. मानवाच्या मनात विलिनता आली तरच तो आनंदी होईल.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.
डॉ. पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.