नागपूर -अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणं बहिष्कार घातला आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून(सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकारपरिषदही झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
यावेळी अजित पवार म्हणाले की, हे अधिवेशन तीन आठवड्याचं घ्यावं अशी आमची मागणी आहे. सरकारकडून काम करण्याऐवजी नको ते उद्योग सुरु आहेत, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, आम्हाला चहापणाला उपस्थित रहा असं सांगितलं, मात्र 6 महिने सरकारं सत्तेवर आलं आहे. मात्र जनतेच्या अपेक्षा यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. अनेक मंत्री, आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. सीमा प्रश्नाबाबत देखील अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही. 865 गावांचा प्रश्न अजून कायम आहे. आहे ती गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत. असा प्रयत्न 62 वर्षात कधीही झाला नव्हता. त्यावेळी पलीकडच्या राज्यांतील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक होती. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. उलट आत्ताचे मंत्री पुरेशी बाजू देखील मांडू शकले नाहीत, असंही ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, ज्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्या मिळतात त्याचे पैसे देखील वेळेवर जात नाही. अनेक संस्थांचे पैसे थकले आहेत. राज्यात मराठवाडा, विदर्भ कोकणला देखील मदत मिळाली पाहिजे. कर्ज काढण्याला विरोध नाही मात्र त्यातून सर्वांना न्याय मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. विदर्भाचा अनुशेष अजुनही पुरेसा नाही. धान खरेदी तोंड बघून केली जाते, असा आरोपही त्यंनी केला.
अजित पवार म्हणाले की, राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. लाखो कोटीची गुंतवणूक होणार होती. मात्र या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र मुकला आहे. विरोधाला विरोध करणारे आम्ही नाहीत. आम्ही चर्चेतून मार्ग काढणारी लोकं आहोत. आम्ही आमदाराचा निधी वाढवला होता. त्यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी 7 कोटी निधी करावा आहे का हिंमत बघुयात. असं अजित पवार म्हणाले.