नागपूर – मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. बावनकुळेंच्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहेत. न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे. जो जो समाज त्यांच्याकडे गेला. त्याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, सर्वांसाठी त्यांनी काम केलं. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे की ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे असे स्पष्ट वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते मुख्यमंत्री झाले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांत चुळबूळ सुरु होऊ शकणार आहे. नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर तेली समाजातील नागरिक उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. त्यांनी म्हटले की, समाजाला जेव्हा काही द्यायचा प्रश्न आला, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की पुन्हा एकदा 2014 ते 2019 चा काळ महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व समाजातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे आवाहन बावनकुळे यांनी केले. फडणवीस यांनी कधीही आपल्याकडून (समाजाकडून) अपेक्षा व्यक्त केली नाही, की अमक्या समाजाने माझ्यासाठी हे करावं. देवेंद्र फडणवीस यांना फक्त पदावर बसवण्यासाठी नाही तर सर्व समाजाला न्याय मिळण्यासाठी आता आपली जबाबदारी वाढली आहे असे ही बावनकुळे म्हणाले.