मुंबई-भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. न्यायव्यवस्थेत एका विचारांचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत असल्याचं संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना का मिळत नाही? त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे,आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी देशातील न्यायव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील शोषित, वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. मात्र, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनीही अश्रू ढाळले असते.
कालच INS विक्रांत प्रकरणी उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यावर अशाच प्रकारचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही आहेत. मात्र, त्यांना जामीन का मिळत नाही, असा सवाल करत आता विशिष्ट पक्षातील नेत्यांनाच जामीन मिळत आहे, असा आरोप त्यांनी केला.बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचित वर्गाला न्याय मिळून दिला. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र, आज देशातील स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे बाबासाहेबांची प्रकर्षाने आठवण येत आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, सोमय्या यांना केवळ अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मात्र, त्यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर आहेत. जामीन मिळाल्याने तुमचे आरोप धुवून निघत नाहीत. त्यामुळे जास्त वचवच करू नये, असेही त्यांनी सोमय्यांना सुनावले. अशा प्रकारचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही झाले. मात्र, ते अजूनही अटकेत आहे. त्यामुळे सोमय्यांना जामीन कसा मिळाला, याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्याचे संजय राऊत म्हणाले.
निवडणुकांसाठीच रामनवमीचा वापर!
बाबासाहेब आंबेडकरांनी जातीपातीविरहीत समाजाचे स्वप्न पाहिले. यासाठी त्यांनी संघर्षही केला. मात्र, आज देशातील वातावरण जाणूनबुजून गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रामनवमीनिमित्त काही भागांत जो धुडगूस घातला गेला ते याचेच उदाहरण आहे. झारखंड, राजस्थान, गुजरात या राज्यांत काही महिन्यांत विधानसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांसाठी रामनवमीचा वापर करून वातावरण तापवण्यात येत आहे. देशात यापूर्वीही अनेकदा रामनवमी साजरी झाली आहे. मात्र, असा उन्माद यापूर्वी दिसला नाही. केवळ राजकारणासाठी धर्माचा एवढ्या खालच्या पातळीचा वापर देशाने कधी पाहिला नाही. हे या देशाचे दुर्दैव आहे. देश पुन्हा फाळणीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानाची आज आठवण येत असल्याचे राऊत म्हणाले.
अखंड भारतासाठी आधी पाकव्याप्त काश्मीर, मग पाकिस्तान आणि जमले तर अफगाणिस्तानचाही ताबा आपल्याला मिळवावा लागेल
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच अखंड भारतासंदर्भात वक्तव्य केले होते. त्याबद्दल राऊत म्हणाले, मोहन भागवत यांच्या या स्वप्नाचे आम्ही स्वागत करतो. याला देशातील कोणताही पक्ष विरोध करणार नाही. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने याच मुद्द्यावर मतेही मागितली होती. मात्र, सर्वात प्रथम अखंड भारताची हाक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबतचे विचार जनसामान्यांमध्ये रुजवले होते. त्यामुळे आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, मग अखंड भारताचे बोला, असा टोला राऊत यांनी हाणला. तसेच अखंड भारतासाठी आधी पाकव्याप्त काश्मीर, मग पाकिस्तान आणि जमले तर अफगाणिस्तानचाही ताबा आपल्याला मिळवावा लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन कधी करणार?
अखंड भारताचे स्वप्न संघाने 15 वर्षांत नव्हे तर 15 दिवसांत पूर्ण करावे. त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, सध्या जे काश्मीर फाईल्सच प्रकरण तुम्ही उकरून काढले आहे, त्याबाबत आधी ठोस काहीतरी करा. हिंसेमुळे विस्थापीत झालेल्या काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करा, आधी त्यांची घरवापसी सुरक्षित पद्धतीने करा. मग त्यावर राजकारण करा, असे संजय राऊत यांनी सुनावले.