पुणे: मर्सिडीझ-बेंझ इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादक कंपनीला जंगल संवर्धनाच्या कार्यासाठी ‘ग्रीन ऍपल अवॉर्ड फॉर एन्व्हायरन्मेंटल बेस्ट प्रॅक्टिसेस‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.२०१७ सालापासून मर्सिडीझ-बेंझ इंडियाने वृक्षारोपण अभियानाला सुरुवात केली आहे. जंगल क्षेत्रामधील लोप पावत चाललेल्या हिरवाईला पुनरुज्जीवित करण्यात ही कंपनी आपले योगदान देत आहे. भारतातील आदिवासी भागांवर त्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे.वातावरणात होत असलेल्या बदलांचे प्रमुख कारण आहे जंगलांचा ऱ्हास. वाढते ऊन, अकाली पाऊस, अचानक पूर येणे, जंगलांमध्ये पेटणारे वणवे असे अनेक विपरीत परिणाम झेलावे लागत आहेत.पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामांच्या व्यतिरिक्त जंगलांच्या ऱ्हासामुळे भारतातील आदिवासी समुदायांचे रोजगार आणि एकंदरीत जीवन धोक्यात आले आहे.वृक्षारोपण अभियान राबवून मर्सिडीझ-बेंझ इंडिया या आव्हानांचा मुकाबला करण्यात आपले योगदान देत आहे. सध्या या अभियानात भारतातील पश्चिम घाटातील आठ गावांचा समावेश करण्यात आला असून भारत सरकारने ‘वंचित आदिवासी समूह‘ म्हणून विभागणी केलेल्या समुदायांची संख्या जास्त असलेल्या भागांमध्ये त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
नैसर्गिक साधनस्रोत पुनरुज्जीवित केले जावेत, भूगर्भातील जलपातळी वाढावी, मातीचा दर्जा सुधारावा, स्थानिक जैवविविधतेची योग्य निवास पुन्हा निर्माण व्हावा, कार्बन उत्सर्जन रोखले जावे आणि स्थानिक गावकऱ्यांना पर्यायी रोजगार मदत मिळावी ही उद्धीष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
५०० प्रवेशिकांमधून मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या प्रकल्पाची या पुरस्कारासाठी निवड केली गेली. लंडनमध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात मर्सिडीझ-बेंझ इंडिया कंपनीचे सीएसआर मॅनेजर श्री. मंदार कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट – कस्टमर सर्विसेस अँड कॉर्पोरेट अफेअर्स श्री. शेखर भिडे यांनी सांगितले, “वातावरणातील बदलांचे परिणाम प्रत्यक्षात दिसून येऊ लागले आहेत. युरोपमधील उष्णतेची प्रचंड लाट, भारतात दीर्घकाळपर्यंत पडलेला पाऊस, व्हेनिसमधील पूर, ऑस्ट्रेलिया व कॅलिफोर्नियातील आगी हे सर्व पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम आहेत. कॉर्पोरेट नागरिक या नात्याने मर्सिडीझ-बेंझ नेहमीच पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी वचनबद्ध आहे, गाड्यांचे उत्पादन असो किंवा पश्चिम घाटात आम्ही चालविलेला प्रकल्प असो आम्ही पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाबाबत जागरूक असतो. आपण सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिल्यास पर्यावरण बदलाच्या समस्येचे निराकरण करू शकतो हे आमच्या या वचनबद्धतेतून आम्ही सिद्ध करत आहोत.”
ग्रीन ऍपल एन्व्हायरन्मेंट पुरस्कारांची सुरुवात १९९४ साली झाली. जगभरात पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी केल्या जात असलेल्या चांगल्या कामांचा गौरव करणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. व्यक्ती, कंपन्या यांची पर्यावरण विषयक कामगिरी सुधारावी, स्रोतांचा सक्षम वापर केला जावा, संस्थांमधील स्पर्धात्मकता वाढावी आणि त्यातून शाश्वत विकासाच्या उद्धिष्टांना मदत व्हावी, समाज व कर्मचारी यांच्या सहभागातून सामाजिक लाभ मिळावेत हे या पुरस्कारांचे उद्देश आहेत.