Home Blog Page 712

मुख्य जलवाहिन्यांवर वारंवार कारवाई करूनहीं परत परत बेकायदा नळजोडणी: धायरीत पाणी टंचाई: प्रशासन हतबल

पुणे-पाण्याच्या मुख्य जललाईनवरील बेकायदेशीर नळजोडणी घेतल्याने धायरी गाव व परिसरातील पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे ‌ वांरवार बेकायदा नळजोडणी तोडूनही अनेक समाजकंटक पुन्हा बेकायदा नळजोडणी करून मुख्य लाईनवरून पाणी घेत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा प्रशासन हतबल झाले आहे बेकायदा नळजोडणी घेणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत. बेकायदा नळजोडणी तातडीने तोडण्यात यावीत तसेच काढून टाकलेली नळ जोडणी पुन्हा करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे.
या बेनकर यांनी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले आहे.धायरीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारांगणी मळा विहीर ते धारेश्वर मंदिर पाण्याची टाकी पर्यंत तसेच धनगर वस्ती लाईनवर बेकायदेशीर नळजोडण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकृत पाणी पुरवठा होणाऱ्या ग्राहकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .पाणी कमी दाबाने येत आहे तसेच कधी दिवसाआड तर कधीकधी ३ ते ४ दिवसाने पाणी मिळत आहे. त्यामुळे एक लाखांवर रहिवाशांना
बाराही महिने तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

पाणी पुरवठा विभाग वरवर बेकायदा नळजोडणी तोडण्याची कारवाई करत आहे. मात्र बेकायदेशीर नळजोडण्या काढून टाकण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई येत नसल्याने पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे.याकडे आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
बेकायदा नळजोडणी तोडण्याची ठोस कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यास जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. पाणीपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने होईल यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना येत्या १० दिवसांत कराव्यात.
अन्यथा पालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे

बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याची हाताळणी ही सामान्य माणसाला धडकी भरवणारी आणि हतबल करणारी: मुकुंद किर्दत, आप

पुणे-आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहेकी,’मागील वर्षी पुण्यामध्ये पोर्शे कार अपघात प्रचंड गाजले होते आणि त्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधी सुद्धा कशा पद्धतीने गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात हे समोर आले होते. आताचे बीड मधले संतोष देशमुख हत्या प्रकरण हे राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधितच पदाधिकारी गुंतलेले आहेत. त्यानिमित्ताने भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे आणि खंडणी, अपहरण, खून ते महिलांची निंदा नालस्ती असे सर्वच प्रकार दिसून आले आहेत. शिवाय तब्बल 22 दिवस पोलीस आणि सीआयडीला यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा सापडला नव्हता. तो आता स्वतःहून हजर झालाय. मात्र त्याची माहिती त्याच्या समर्थकांना होती. यासर्वात मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे यांच्याकडे संशयाचा इशारा त्यांच्याच आघाडी पक्षातील आमदार धस करत आहेत.
संशयित आरोपी वाल्मीक कराडला पकडण्याच्या ऐवजी त्याची मालमत्ता ताब्यात घेण्याची मोहीम सीबीआय राबवत होती. याच्याने गुंडगिरीला कसा आळा घातला जाईल हेही आता गृहमंत्री फडवणीस यांनी जनतेला सांगायला हवे. 22 दिवस हा संशयित सापडत नाही याचा अर्थ काय? तो स्वतःच हजर झाल्यावर त्याची तब्येत बिघडते आणि त्याला औषधोपचार सुरू होतात. हा सर्वच घटनाक्रम गृहखात्याच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
परभणी आणि त्यानंतर आता बीड मधील घटना या प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी कुठल्या स्तरावर गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात हे अधोरेखित करते. सामान्य माणसाला कोणीही वाली राहिला नाही अशी भावना आज सर्वच मराठी माणसाच्या मनात निर्माण झालेली आहे. गेले काही वर्षे गृह खात्यावर सातत्याने ठपका ठेवला जात असतानाही फडणवीस हे ते खाते स्वतःकडे ठेवण्यात आग्रही आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतःला चाणक्य म्हणून घेत असले तरी ते गृह खाते सांभाळण्यामध्ये मात्र अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करण्यासाठी त्यांनी गृह खाते सोडावे व सक्षम व्यक्तीकडे हे खाते द्यावे अशी मागणी करीत आहोत.असेही किर्दत यांनी म्हटले आहे.

शासकीय विभागीय ग्रंथालय येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, दि.३१: ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या वाचन पंधरवडा उपक्रमानिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालय, शनिवार पेठ न.वि. गाडगीळ शाळा, पुणे येथे १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य सचिव तथा उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम शासन स्तरावर राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे मार्फत स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, वाचक सभासद नोंदणी यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे या कार्यालयातील नामांकित ग्रंथ, वर्तमान पत्रे व नियतकालिकांचे प्रदर्शन प्रामुख्याने भरविण्यात येणार आहे. तसेच दुर्मिळ ग्रंथांचे डिजीटायझेशन कशाप्रकारे करण्यात येते त्याचे प्रात्यक्षिकही यानिमित्त पहावयास मिळणार आहे. तरी सर्व वाचक सभासद, विद्यार्थी व नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे पेन्शन मेळावा

पुणे दि. ३१: पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० ते ५.३० वा. गांधी सभागृह, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे पेन्शन मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यामध्ये जिल्हा कोषागाराच्यावतीने निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन विषयक प्रश्नांविषयी विचार विनिमय व शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. तरी पुणे जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्तीवेतनधारकांना पेन्शन मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे सहायक संचालक (निवृत्तीवेतन) यांच्यामार्फत प्रसिद्धीपत्रकान्वये करण्यात आले आहे.

संगीत साधनेतूनच ईश्वरीय दर्शन- प्रा.डॉ. विश्वनाथ कराड

 उस्ताद डागर बंधु यांच्या हस्ते एमआयटी सांस्कृतिक संध्याचे उद्घाटन

पुणे, दि. ३१ डिसेंबर: ” सांस्कृतीक संध्या ही संगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती देणारी आहे. त्यातूनच प्रत्येकाला ईश्वरीय दर्शन घडते. वैश्विक भारतीय संस्कृती ही मानवतावादी आहे. आजच्या तरुण पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृती रुजविण्यासाठी भारतीय संगीत महत्वाची भूमिका बजावत आहे.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे लोणी काळभोर येथील विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग येथे आयेाजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सावाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उस्ताद नफीसुद्दीन डागर व उस्ताद अनीसुद्दीन डागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हेाते. तसेच पं. उध्दवबापू आपेगांवकर, विश्वशांती कला अकादमीचे महासचिव आदिनाथ मंगेशकर, दूरदर्शनेचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण आणि प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” भारतीय युवक ज्या मार्गाने जात आहे तो योग्य नाही. येथील संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून ती विश्वशांतीचा मार्ग दाखविणारी आहे.”
डॉ. मुकेश शर्मा म्हणाले,” भारतीय संस्कृती ही संस्कार देणारी आहे. नव वर्षात प्रवेश करतांना आपण संस्कृतीचे जतन करावे. संगीत साधना ही सर्व शास्त्रांमध्ये सर्वोच्च आहे. यात नाद व ताल आहे. ही संगीत संध्या नसून संस्कृती आहे.”
या संगीत महोत्वसावाच्या उद्घाटनानंतर भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर विश्वशांती संगीत अकादमीचे विद्यार्थ्यांनी शिव वंदना आणि गणेशवंदना सादर केली. प्राचार्या श्रेयसी पावगी यांचे गायन झाले. त्यानंतर ज्येष्ठ व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन झाले. तसेच ज्येष्ठ गायिका कल्याणी बोद्रें यांचे गायन आणि मा. उस्ताद नफीसुद्दीन डागर व उस्ताद अनीसुद्दीन डागर यांचे धृपद गायन झाले. यांना पखवाजवर पं. उद्धवबापू आपेगांवकर यांनी साथ संगत दिली.
आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. संजय उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.

गोग्रीन सेवेचा पर्याय निवडा व वीजबिलात एकरकमी 120 रुपये सूट मिळवा

0

नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट

मुंबई, दिनांक 31डिसेंबर 2024 – नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी  120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने  केली आहे.

महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ 120 रूपये एकरकमी सवलत मिळणार आहे.

गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ् या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येते.

महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे.

महावितरणच्या 3 कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत 4 लाख 62 हजार म्हणजेच 1.15 टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे 120 रुपये  एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे.

गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येणार आहे.  ग्राहकांनी या योजनेचा लाभ  घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा.

श्रीपाल सबनीस म्हणजे दु:खाला वाचा फोडणारे मानवतावादी साहित्यिक : चंद्रकांत दळवी

ईश्वराबाबत मी अज्ञेयवादी : डॉ. श्रीपाल सबनीस
‌‘विवेकनिष्ठ प्रज्ञावंत डॉ. श्रीपाल सबनीस‌’ गौरवग्रंथाचे प्रकाशन

पुणे : डॉ. श्रीपाल सबनीस हे संवेदनशील मन जपणारे परंतु त्याच वेळी चळवळी वृत्ती असणारे समाजाच्या वेदना, प्रश्नांना पाहून त्यांच्या परिहारार्थ झटणारे, दु:ख-दैन्याला वाचा फोडण्यासाठी कार्यरत असणारे साहित्यिक आहेत, अशा शब्दात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी डॉ. सबनीस यांचा गौरव केला. बुद्धीवादी आणि बुद्धवादी याने जात मानू नये. संतत्वामधील चांगुलपणाची बेरीज करत मर्यादा वजा करणारा मी ईश्वराबाबत अज्ञेयवादी आहे, अशा भावना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केल्या.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‌‘विवेकनिष्ठ प्रज्ञावंत डॉ. श्रीपाल सबनीस‌’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (दि. 31) आयोजित करण्यात आला होता. गौरवग्रंथाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी (भा. प्र. से.) यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख अध्यक्षपदी होते.

डॉ. श्रीपाल सबनीस, ललिता सबनीस, पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे (भा. प्र. से.), दै. केसरीचे सहसंपादक रामदास नेहुलकर, संस्कार मंदिर संस्थेच्या कला, वाणिज्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक स्वप्नील गायकवाड गौरव ग्रंथांचे संपादक शिरीष चिटणीस, यशोदीप पब्लिकेशनच्या प्रा. रुपाली अवचरे, निखिल लंभाते मंचावर होते.
चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले, सबनीस यांचे व्यक्तीमत्व साधेपणाला मर्यादा नसणारे आहे. त्यांना पाहण्यापेक्षा त्यांचे साहित्य वाचणे महत्त्वाचे आहे. आपल्या वडिलांचा लढवैय्या वारसा घेऊन ते पुढे आलेले आहेत. गौरवग्रंथात समाविष्ट असलेल्या विविध लेखकांच्या लेखांविषयी दळवी यांनी याप्रसंगी टिप्पणी केली.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. देशमुख यांनी सबनीस या नावाची ‌‘स‌’ म्हणजे सर्वोत्तम साहित्यिक, ‌‘ब‌’ म्हणजे बहाद्दूर, ‌‘नी‌’ म्हणजे निरलस आणि निगर्वी तर ‌‘स‌’ म्हणजे समयसूचक आणि समीक्षक अशी फोड करत ते पुढे म्हणाले, साहित्याचे उत्तम समीक्षण व सत्य मांडणारे प्रेरणादायक साहित्यिक आहेत. डॉ. श्रीपाल सबनीस हे साहित्यावर निष्ठा असणारे मानवतावादी अष्टपैलू लेखक आहेत. ज्वलंत ज्ञानकोश असलेल्या डॉ. सबनीस यांना वाचक, सुहृदांतर्फे साहित्यरत्न पदवी बहाल करावी, असे आवाहनही केले. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, मी मांडत असलेल्या भूमिकेवर सर्व जाती-धर्म-पंथातील व्यक्तींनी प्रेमच केले हे आनंददायी आहे. मानवतावादाच्या भूमिकेतून मी प्रत्येक समाजातील चांगुलपणाची, ज्ञानाची, सत्याची, संचिताची, शहाणपणाची बेरीज करायला शिकलो आहे.
रामदास नेहुलकर म्हणाले, सामाजिक प्रबोधन घडविणारा, माणसात राहणारा, वावरणारा ज्ञानवंत, विचारवंत असा साहित्यिक म्हणजे श्रीपाल सबनीस होय.
जीवननिष्ठेप्रती प्रामाणिक असणारे, शोषित वर्गाबद्दल कणव असणारे आणि देशाला, समाजाला दिशा देताना स्पष्टपणे मते मांडणारे डॉ. श्रीपाल सबनीस आहेत, असे मत श्याम देशपांडे यांनी व्यक्त केले.
स्वप्नील गायकवाड म्हणाले, समाजात अनेक साहित्यिक असले, त्यांची साहित्यिक मूल्ये मोठी असली तरी श्रीपाल सबनीस हे या गुणांव्यतिरिक्त मानवतावादी, प्रेमळ, संवेदनशील व्यक्ती आहेत. आजच्या काळात भावनांक कमी होत असताना देखील सहवेदना आणि संवेदना जपणारे आहेत.
स्वागतपर प्रास्ताविकात शिरीष चिटणीस म्हणाले, हा गौरवग्रंथ हे समाजाचे धन असून शहरांचा इतिहास आहे. डॉ. श्रीपाल सबनीस यांचे विचारधन सामान्यांपर्यंत पोहोचावेत, समाजप्रबोधन व्हावे या विचाराने या गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. रुपाली अवचरे यांनी मनोगत व्यक्त केले.

कात्रज घाटात गोळीबार

पुणे : कर्जबाजारी झाल्याने तरुणाने पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली. कात्रज घाटात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांला तातडीने रुग्णालयात दाखल केले. कात्रज घाटात चोरट्यांनी अडविले. पैसे न दिल्याने चोरट्यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती तरुणाने पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कात्रज घाटातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तरुणाने दिलेली माहिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीत कर्जबाजारी झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्याने दिली. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित तरुणाने बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले, यादृष्टीने तपास सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

बीड प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही:आम्ही गुंडांचे राज्य चालवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी फासावर लटकेपर्यंत पोलिस स्वस्थ बसणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही. या प्रकरणात ज्याचा संबंध ज्या प्रकरणात आढळेल त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. आम्ही गुंडांचे राज्य चालवू देणार नाही. कुणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही व खंडणी मागता येणार नाही, असे ते म्हणालेत.

बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड आज अखेर सीआयडीपुढे शरण आला. त्याने पुणे स्थित सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी भाष्य करताना बीडच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, बीडच्या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही. या प्रकरणात ज्याचा संबंध ज्या प्रकरणात आढळेल त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंडांचे राज्य आम्ही चालवू देणार नाही. कुणालाही या प्रकरणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. त्या दृष्टिकोनातून तपास अतिशय गतीशिल करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे.

या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके सक्रीय झाले आहेत. सरकार कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. सर्वांचा शोध घेतला जाईल. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवरून चर्चा झाली आहे. मी त्यांना काळजी न करण्याची ग्वाही दिली. यासंबंधी काय वाटेल ते झाले तरी सर्व दोषी शोधून ते फासावर लटकेपर्यंत पोलिस स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वास मी त्यांना दिला आहे, असे ते म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे पोलिस सांगतील. हे पोलिसांचे काम आहे. प्रस्तुत प्रकरणात पुराव्यांच्या आधारावर कुणालाही सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितले आहे. यासंदर्भात पोलिस वेळोवेळी निर्णय घेतील. वेळोवेळी ब्रीफिंग करतील. ही केस जाणिवपूर्वक सीआयडीला देण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्ता देण्यात आली आहे. त्यांच्यावर कुणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही. कुणालाही दबाव टाकू दिला जाणार नाही.

वाल्मीक कराडने एका व्हिडिओत आपल्यावरील आरोप फेटाळलेत. तसेच आपल्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाई केला जात असल्याचा दावाही केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले, कुणी काही म्हणत असले तरी पोलिस जो काही पुरावा आहे त्या पुराव्याच्या आधारावर कारवाई करतील. त्यामुळे व्हिडिओत कोण काय म्हणत आहे किंवा काय म्हणत नाही याचा विषयच नाही. जिथे पुरावा आहे, त्याला सोडले जाणार नाही हा विषय आहे.

पत्रकारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी होणाऱ्या मागणीविषयी विचारले. त्यावर ते म्हणाले, मला या प्रकरणाच्या राजकारणात जायचे नाही. मी पूर्वीपासूनच सांगत आहे की, प्रस्तुत प्रकरणात कुणाकडे पुरावे असतील तर द्यावे. माझ्यासाठी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचे आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभो. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की, फार फायदा होईल. मला त्यात जायचे नाही. मला त्याचे समर्थनही करायचे नाही किंवा विरोधही करायचा नाही. त्यांनी त्यांच्या ठिकाणी राजकारण करावे. पण संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा ही आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे.

वाल्मिक कराड सरेंडर: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…अतुल लोंढे

बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा तपास विद्यमान न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली करा.

मुंबई, दि. ३१ डिसेंबर २०२४
महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार पाहता या प्रकरणाचा तपास विद्यमान न्यायमूर्ती यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, राज्यातील पोलीस दल व सीआयडी आजही सक्षम आहेत पण ते राजकीय दबावाखाली असल्याने त्यांचे मनोबल कमजोर होते. आरोपी शरण येतो पण त्याला पकडू शकत नाही ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? नागपूरमध्ये ७ दिवसात ७ खून झाले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व मीडियातून स्वतःचे कौतक थांबवावे असेही अतुल लोंढे म्हणाले.

बीड प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. बीड मधील गुन्हेगारीला सत्ताधारी पक्षाचे आमदार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ म्हणतात. बीडमधील गुन्हेगारीला आळा घालून राजकीय आशिर्वादाने फोफावलेली ही विषवल्ली कायमची नष्ट करा व यामागे ज्यांचा हात आहे त्यांनाही अद्दल घडवावी असे अतुल लोंढे म्हणाले.

व्हिडीओ प्रसारित करून वाल्मीक कराड पुण्यात CID ला शरण

पुणे-बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड आज अखेर सीआयडीपुढे शरण आला. त्याने पुणे स्थित सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला आहे.

वाल्मीक कराड याने मंगळवारी सकाळी एका व्हिडिओद्वारे आपण पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार असल्याचे सांगितले होते. तो आपल्या व्हिडिओत म्हणाला, मी वाल्मीक कराड. माझ्याविरोधात बीडच्या केज पोलिस ठाण्यात खंडणीची खोटी फिर्याद दाखल केली आहे. मला अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.

‘८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी

0

पालघर दि. ३० : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४ नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे.आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला दुकानामध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.

रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी ही मुलगी दुकानात गेली असता आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले, त्यामुळे घडलेला प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर पालकांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला . ‘आरोपीचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासवणारे आहे, अशा नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी’, असे निर्देश या प्रकरणाबाबत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी श्री.बाळासाहेब पाटील , पालघर पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.

सदर घटनेचा तपास लवकरात लवकर करुन संबंधित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात यावा असं म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी दिलेल्या आहेत.

घटनेचा तपास अधिक जलदगतीने करावा व आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. आरोपीला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर जामीनास कसून विरोध करण्यात यावा. पीडित मुलीचे समुपदेशन व शालेय शिक्षण चालू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

31 डिसेंबर…झिंगाट ग्राह्कांच्याबाबत हॉटेल्स असोसिएशनचा निर्णय

पुणे : आम्ही पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवणार आहोत. तसेच खबरदारी म्हणून आम्ही एखाद्या व्यक्तीनं जास्त ड्रिंक केल्यास त्याला ड्रिंक सर्व्ह करणं बंद करणार आहे. तसेच त्यांच्या ग्रूपमधील लोकांना देखील आम्ही सांगणार आहोत की, यांना आता ड्रिंक करणे तुम्ही थांबवा. त्याचबरोबर आम्ही आमच्या स्टाफला देखील सूचना दिल्या आहेत की, कोणीही वादविवाद करू नये सर्वांनी शांततेत आपली ड्युटी करावी. तसेच आम्ही आमच्या ग्रूपमधील कार चालकांना देखील सांगितलं की, ३१ डिसेंबरला रात्री एक ते दीड नंतर आपण तयार रहा. कारण एखाद्या व्यक्तीने जास्त ड्रिंक केली तर त्याला आम्हीच कारने घरी सोडणार आहोत. मग जरी त्यांनी त्यांची दुचाकी किंवा कार आणली असेल तरी, आम्ही त्यांना घरी सोडणार आहोत. कारण हे लोक आमचे ग्राहक असून एक दिवस ग्राहकांसाठी असा निर्णय आम्ही घेतला आहे.” अशी माहिती हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आलीय. तर दुसरीकडं पोलिसांकडून देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास ३ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. असं असताना आता हॉटेल चालकांनी देखील खबरदारी घेतली आहे. शासनाकडून ३१ डिसेंबर रोजी हॉटेल पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं मोठ्या उत्साहात नागरिकांकडून नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. मात्र असं असलं, तरी खबरदारी म्हणून हॉटेल असोसिएशननं देखील नियमावली बनवली आहे, अशी माहिती गणेश शेट्टी यांनी दिली.

मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री पुणे शहरासह सर्वच ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, पब चालकाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. मात्र असं असलं, तरी ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करून ड्रिंक पिऊन अनेकवेळा ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’च्या घटना घडतात. हीच बाब लक्षात घेता आता पुणे शहरातील हॉटेल्स असोसिएशनच्या वतीनं एक नियमावली बनवण्यात आल्याची माहिती, हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.

याबाबत हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले की, “सर्वप्रथम आम्ही शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसारच आम्ही पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवणार आहोत. तसेच खबरदारी म्हणून आम्ही एखाद्या व्यक्तीनं जास्त ड्रिंक केल्यास त्याला ड्रिंक सर्व्ह करणं बंद करणार आहे. तसेच त्यांच्या ग्रूपमधील लोकांना देखील आम्ही सांगणार आहोत की, यांना आता ड्रिंक करणे तुम्ही थांबवा. त्याचबरोबर आम्ही आमच्या स्टाफला देखील सूचना दिल्या आहेत की, कोणीही वादविवाद करू नये सर्वांनी शांततेत आपली ड्युटी करावी. तसेच आम्ही आमच्या ग्रूपमधील कार चालकांना देखील सांगितलं की, ३१ डिसेंबरला रात्री एक ते दीड नंतर आपण तयार रहा. कारण एखाद्या व्यक्तीने जास्त ड्रिंक केली तर त्याला आम्हीच कारने घरी सोडणार आहोत. मग जरी त्यांनी त्यांची दुचाकी किंवा कार आणली असेल तरी, आम्ही त्यांना घरी सोडणार आहोत. कारण हे लोक आमचे ग्राहक असून एक दिवस ग्राहकांसाठी असा निर्णय आम्ही घेतला आहे.” अशी माहिती हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.

शहरातील हॉटेल्स व्यवसायिकांकडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. पुणे शहरात फक्त पुणे नव्हे तर आजूबाजूच्या शहरातील लोक देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने विविध ऑफर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आल्या आहेत. काही हॉटेलमध्ये तर दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. जेणेकरुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्राहकांची पूर्ण खबरदारी हॉटेलकडून घेण्यात आली आहे, असं देखील यावेळी शेट्टी यांनी सांगितलं.

विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी

पुणे, दि. ३०: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी विजयस्तंभाचे सुशोभीकरण, गर्दी व्यवस्थापन, रांगा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केलेले नियोजन, आजूबाजूच्या जागेचे सपाटीकरण तसेच उभारण्यात येत असलेली शौचालये, उभारलेले पेंडाल, पोलीस सूचना मनोरे आदींच्या उभारणीची तयारी आदीची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या. उपस्थित विविध संघटनांचे प्रतिनिधींशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी

पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येत असतो. याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाहनतळ उभारण्यासाठी तसेच अन्य बाबीसाठी खासगी मालकीच्या मोकळ्या मिळकती तात्पुरत्या स्वरुपात २ जानेवारी २०२५ पर्यंत अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश प्रा. जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.

जयस्तंभाजवळ वाहनांची मोठी गर्दी होऊ नये यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ६५ अन्वये प्रभारी जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार मौजे वढू खुर्द ता. हवेली येथील गट क्र. १४४ मधील अनिल रामचंद्र चोंधे व इतर यांचे क्षेत्र ३.०३ हे. आर ‘शेतकरी मिसळ’ शेजारील जागा मिळकत अधिग्रहित करुन अनुयायांच्या वाहनांसाठी वाहनतळ म्हणून वापरण्यात येणार आहे.

https://youtu.be/HWcYGoo91Rk
पुणे जिल्ह्यातील #पेरणे येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विजयस्तंभास अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी वाहतूक व्यवस्था व वाहनतळाबाबतची माहिती घेऊन सहकार्य करावे- जिल्हा प्रशासनाचे आवाहन

विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी वाहने बंद पडल्यास किंवा अपघात घडल्यास तात्काळ वाहनांना हलविण्याकरीता उत्कृष्ट क्षमतेचे क्रेन्स अधिग्रहन करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत.

वफ्फ बोर्ड वाहनतळ, अहिल्यानगर मार्ग, शिक्रापूर, टोरंट गॅस वाहनतळ, चाकण रोड, जातेगाव खुर्द, चाकण चौक, शिक्रापूर, सणसवाडी चौक, हॉटेल ग्रीन गार्डन पिकअप पाईंट, डिंग्रजवाडी कोरेगाव भिमा, कोरेगाव भिमा बाजारतळ आणि महाराणी येसूबाई कमान वढू बु या ठिकाणाकरीता 10 क्रेन्स अधिग्रहण करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि करुणा मुंडेंचीही महिला आयोगाकडे आहे तक्रार -रुपाली चाकणकर

पुणे- अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केलेली तक्रार राज्य महिला आयाेगास ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. याबाबत संबंधित पोलिसांना चाैकशी करुन त्याबाबत कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयाेगास सादर करण्याचे सूचना दिल्या आहे, अशी माहिती राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांना दिली आहे.त्याच बरोबर करुणा मुंडे यांच्यादेखील तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी या पुण्यातील येरवडा पोलिस स्टेशन व संगमनेर पोलिस स्टेशन यांच्या हद्दीतील हाेत्या. नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेऊन दाेनजणांनी फसवणुक केल्याची तक्रार घेतली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. येरवडा येथे काेणीतरी त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली त्याबाबत करुणा मुंडे यांना कारवाई करुन न्याय दिला गेला. त्यांची तिसरी तक्रार धनंजय मुंडे यांच्याबाबत असून ती मी न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही असे चाकणकर यांनी सांगितले.

चाकणकर म्हणाल्या,’ महाराष्ट्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या सुमारे ३५ टक्के आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा मिळविण्यासाठी आम्ही समितीच्या माध्यमातून उपाययाेजना राबवत आहे परंतु त्यात आम्हाला फारसे यश अद्याप मिळाले नाही. समितीकडे तक्रार नाेंदवणे, व संबंधित आराेपीकडून आणखी त्रास हाेईल यामुळे महिला तक्रारीस पुढे येत नाही. विविध क्षेत्रात महिला कार्यरत राहून अग्रेसर राहत आहे. परंतु साेशल मिडियाच्या माध्यमातून महिलांचे चारित्र्य हनन तक्रारी वाढल्या आहे. मागील तीन वर्षात आयाेगाकडे ३० हजार ७५५ तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी ३० हजार ३४७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे. ४०८ कारवाईसाठी हाेत्या व त्यावर मागील दाेन महिन्यात कारवाई करण्यात आली आहे.

चाकणकर म्हणाल्या, साेशल मिडियाच्याद्वारे एखाद्या महिलेचे किंवा तिच्या कुटुंबाचे फाेटाे माॅर्फ करुन अश्लील पाेस्ट करुन टीआरपी वाढविण्यासाठी वेगवेगळे कॅप्शन देऊन युटयुबद्वारे प्रसारित केले जातात. यामध्ये संबंधित कुटुंब व व्यक्तीवर विपरीत परिणाम हाेताे व सदर महिलेचे चारित्र्य हनन हाेते यामुळे नैराश्यातून आत्महत्येचे घटना घडत आहे. त्यामुळे यावर अंकुश बसणे गरजेचे आहे. अभिव्यक्ती विचारस्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उध्दवस्त करणे, चारीत्र्य हनन करणे हे अपेक्षित नाही. याबाबत सायबर शाखेकडून कारवाई करण्यात यावी. डिजीटल माध्यमातून काेणतीही युटयुबचे टीआरपी वाढावे यासाठी दिशाभूल मजकूर प्रसारित केला जाताे त्यास कारवाई करुन आगामी काळात आळा बसेल. सायबर सुरक्षाबाबत राज्य महिला आयाेग विविध महाविद्यालय, शाळेत जाऊन जनजागृती करत आहे. आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी लवकर निकाली काढण्यात येत आहे.