Home Blog Page 671

700 हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साकारली  महात्मा गांधींची भव्य प्रतिमा

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार  ब्युरो-गोवा ने 2 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छ भारत दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला . आज पेडणे(पेरनेम) येथील व्हिस्काउंट ऑफ पेरनेम हायस्कूल, येथे सुमारे 700 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महात्मा गांधींची भव्य प्रतिमा साकार  केली.

‘संपूर्ण सरकार’ दृष्टीकोना अंतर्गत, स्वच्छता ‘प्रत्येकाची सवय’ बनवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त  व्हिस्काउंट शाळेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कला शिक्षक राजमोहन शेट्ये यांच्याकडे  पाच दिवस प्रशिक्षण घेतले होते. महात्मा गांधींची भव्य प्रतिमा साकारण्याच्या  संपूर्ण प्रक्रियेचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यात आले.

त्यानंतर, शाळेतील एका कार्यक्रमात बोलताना, शिक्षणतज्ज्ञ रुपा देशप्रभू म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणे आणि अशा प्रकारे स्वच्छ भारत मोहिमेला एक व्यापक चळवळ बनवणे  महत्त्वाचे आहे. एक उत्कृष्ट राजकारणी आणि भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही आज जयंती असून त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थितांना संबोधित करताना, रियास बाबू, क्षेत्रीय  प्रचार अधिकारी, सीबीसी गोवा , म्हणाले की स्वच्छ भारत अभियान केवळ परिसर स्वच्छ करण्यापुरते मर्यादित नाही. “नेचर मासिकाने या अभियानाच्या  प्रयत्नांची प्रशंसा केली आहे, त्यांनी अंदाज वर्तवला आहे की यामुळे दरवर्षी 60,000-70,000 बालमृत्यू टाळण्यात मदत झाली आहे . त्याचप्रमाणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या 2018 च्या अहवालात  अंदाज वर्तवला आहे की या अभियानामुळे 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये अतिसारामुळे होणारे 3 लाखांहून अधिक  मृत्यू रोखले गेले. त्यामुळे, हे अभियान जीव वाचवणे, आरोग्यदायी वातावरण आणि वंचितांना सन्मान प्रदान करणे याबद्दल आहे. ,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वच्छता संकल्पनेवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथही घेतली. व्हिस्काउंट शाळेचे मुख्याध्यापक  राजेंद्र बोंद्रे, इतर शिक्षक कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि सीबीसीचे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा एक भाग म्हणून, सीबीसी ने स्वच्छता मोहीम आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. एक पेड माँ के नाम कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमही राबवण्यात आली. जनतेमध्ये स्वच्छतेप्रति जागरूकता निर्माण करण्याच्या उपक्रमांचा भाग म्हणून सीबीसी ने पणजीत आणि आसपासच्या परिसरात  स्वच्छता अभियानसंबंधी फलक देखील  लावले आहेत.

पैसे घेऊन चुकीची जमीन मोजणी करणाऱ्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा

– तक्रारदारासह कोर्टाचीही केली फसवणूक
– कारवाई न झाल्यास तक्रारदार यांचा उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा
– भूमी अभिलेख विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

पुणे : तक्रारदार यांचे त्यांच्या मूळ जागेवर घर बांधलेले असताना त्या जमिनीची शासकीय मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत शेजारी जागा असणाऱ्यांनी संगनमत करून त्यामध्ये परस्पर खोटा बदल केला. घर शेजाऱ्याच्या जागेवर बांधले असल्याचं कागदोपत्री दाखवुन ते कागदपत्रे कोर्टातही सादर केले. घर त्या जागेवरच नसूनही त्या कागदपत्रांवरून कोर्टाने घर पाडण्याचेही आदेशही दिले. याप्रकारे तक्रादार यांची फसवणूक आणि चक्क कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित भूमिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी तक्रारदार मुळशी तालुक्यातील राउतवाडी येथे राहणारे अरुण राऊत यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचाही इशारा देखील त्यांनी दिला आहे.

याबाबत तक्रारदार तथा शेतकरी अरुण राऊत यांनी पौड तहसीलदार, पौड पोलीस ठाणे येथे आमरण उपोषण करण्याचा अर्ज केला आहे. अर्जानुसार राऊत यांचे राउतवाडी, लवळे, ता. मुळशी येथे गट नंबर 413 येथे दहा गुंठे जागा आहे. त्याला लागूनच गट नंबर 430 असून  त्याचे मालक शीतल नुपूर लडकत यांच्या सोबत गेली ३७ वर्षा पासून जमिनीवरून वाद सुरु आहे. याबाबत २००६ साली शासकीय मोजणी झाली, ती मोजणी भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी हेमंत निगडे यांनी केली.

त्या मोजणीची क प्रत गटाच्या नकाशा प्रमाणे केली. पण राऊत यांचे घर सीमेवर नसताना सु‌द्धा (गट नंबर 413 व गट नंबर 430) सीमेवरवर घर असल्याचे ड्रॉइंग काढून दाखवले. त्यानंतर राऊत यांनी खात्री करायला २०२१ ला खाजगी मोजणी केली. त्यात त्यांचे घर गट न. ४१३ मध्ये दाखवले व घरा मागे म्हणजे लाईन आणि घरापासून चे अंतर २५ फूट जागा सु‌द्धा दाखवली. त्यानंतरही २०२३ मध्ये दोन्ही गटाच्या सरकारी मोजण्या झाल्या ती मोजणी प्रसाद तरटे आणि अंकुश जाधव यांनी केल्या असता ती पण नकाशाला ग्राह्य न धरता त्यांचे पूर्ण घर गट न. ४३० मध्ये दाखवले.

वास्तविक पाहता राऊत यांचे घर गट क्रमांक 430 पासून दूर असल्याने त्यांनी हे प्रकरण मी सर्व वरिष्ठ अधिका-यान कडे पोहचवले व पौड च्या अधिका-यांना जागेवर आणून दाखवले परंतु ते फक्त मान हलवतात बाकी कुठलाही प्रतिसाद देत नाहीत. जागेबाबत पुरावा म्हणून तसे नकाशे देखील उपलब्ध आहेत. या प्रकरणा सबंधी त्यांनी शासकीय अधिकारी व प्रदिवादी यांच्या विरोधात हे प्रकरण लावून धरले आहे. अमरण उपोषण करणार असल्याने मला व माझ्या कुटुंबाच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे, तरी याबाबत योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणाचा मला न्याय मिळवून ‌द्यावा आणि मोजणी अधिकारी, प्रतिवादी व अजून वरून कोणाचा हात असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून मला योग्य न्याय मिळवून ‌द्यावा, अन्यथा मी अमरण उपोषणास बसन्याचा निर्णय घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मोजणी ऑफीस मधिल अधिकारी व त्या वेळी मोजणी करणारे कर्मचारी आणि आमचे प्रतिवादी यांनी संगनमताने विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने मोजणी नकाशामध्ये घर नसताना सुद्‌धा नकाशामध्ये दाखवण्यात आले आहे. भूमिअभिलेख मोजणी अधिकाऱ्यांकडून कडून मोजणी संदर्भात सुनावणी बाबत योग्य तो निर्णय देण्यात टाळाटाळ करण्यात येत असून चुकीचे काम केल्यास संबंधित 3 मोजणी अधिकारी आणि प्रतिवादी याच्यावर यांची चौकशी करून कार्यवाही न झाल्यास मी सहकुटुंब २२ ऑक्टोबर २०२४ रोजी अमरण उपोषणास बसणार आहे, हे सगळ करून पण मला न्याय नाही मिळाला तर मी आत्मदहन करणार आहे.

– अरुण राऊत, तक्रारदार तथा शेतकरी, राउतवाडी, लवळे, ता. मुळशी, जि. पुणे

चांगल्या शिक्षणानेच आर्थिक, सामाजिक स्थिती बदलेल

  • सुनील फुलारी यांचा बांधकाम मजुरांच्या मुलांना सल्ला; ‘बीएआय’र्फे गुणवंत मुलांचा सत्कार

पुणे : “बांधकाम मजुरांची आर्थिक स्थिती हलाखीची असते. त्यातूनही अनेक पालक मुलांना शिकवण्याची धडपड करतात. त्यामुळे शिक्षणाची संधी मिळालेल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन स्वतःची व कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत. चांगले शिक्षण घेऊन करिअर घडवले, तर आर्थिक व सामाजिक स्थिती बदलेल,” असा सल्ला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बांधकाम मजुरांच्या मुलांना दिला.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरच्या वतीने बांधकाम मजुरांच्या गुणवंत मुलांच्या सत्कार सोहळ्यात सुनील फुलारी बोलत होते. शनिवार पेठेतील विष्णुकृपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘बीएआय’च्या पश्चिम विभागाचे माजी उपाध्यक्ष रणजित मोरे, ‘बीआयए’ पुणे सेंटरचे चेअरमन सुनील मते, व्हाईस चेअरमन अजय गुजर, मानद सचिव राजाराम हजारे, खजिनदार शशिकांत किल्लेदारपाटील, कार्यक्रमाचे समन्वयक करण पवार उपस्थित होते. जवळपास १०० मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सुनील फुलारी म्हणाले, “बांधकाम मजुर व त्यांच्या मुलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. असोसिएशनने त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवी. या मुलांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. बांधकाम मजुरांप्रती सहानुभूती दाखवायला हवी. मजुरांनी आणि विशेषतः मुला-मुलींनी व्यसनांपासून दूर राहायला हवे. पोलीस भरती, बँक भरती व अन्य क्षेत्रातील करिअरकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. या कामात असोसिएशनने मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी.”

रणजित मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देताना तुम्हाला मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन स्वतःसह कुटुंबाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचे आवाहन केले. बिल्डर्स असोसिएशन बांधकाम मजुरांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी सांगितले.

सुनील मते यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अजय गुजर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम हजारे यांनी आभार मानले.

काही प्रवृत्तींकडून गांधींच्या मृत्यूनंतरही गांधींना मारण्याचा प्रयत्न केला जातोय -उल्हास पवार

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आज शास्त्री पुतळा, दांडेकर पूल ते गोपाळकृष्ण गोखले पुतळा, फर्ग्युसन कॉलेज रोड पर्यंत “महात्मा गांधी विचार दर्शन रॅली” काढण्यात आली. तसेच काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, ‘‘अनेक देशांनी महात्मा गांधींच्या विचारांना मानले आहे. पण काही प्रवृत्तींकडून गांधींच्या मृत्यूनंतरही गांधींना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधींनी मानवता, समता आणि नैतिकता या तीन मूलभूत मूल्यांवर भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. शांततेच्या मार्गाने जनशक्तीचे दर्शन जगाला घडवून दिले. शेवटच्या माणसांचा प्रथम विचार गांधींनी केला. आज विविध मार्गांनी महात्मा गांधी यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, ही मोठी खंत आहे. भारताचे सर्वोच्च नेतेही परदेशात गेल्यावर तुमचे नाव घेऊन तुमच्या पुतळ्याला वंदन करतात, मात्र काही अंधभक्त गांधींच्या विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही मूठभर लोकांच्या कृत्यामुळे गांधींजी आपल्याला वेदना होत असतील, आम्ही आपली क्षमा मागतो.’’
यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधी ज्यावेळी ज्यावेळी जे बोलायचे तसेच आचरण करायचे. आपल्या प्रत्येकामध्ये एक महात्मा गांधी आहे आणि तो आपण आचरला पाहिजे. महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या विरोधात जी आंदोलने केली ती सर्व शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने केली. आज काही मूठभर समाज कठंक धार्मिक जातीय तेढ निर्माण करून देशाचे सार्वभैमत्व आणि अखंडत्वाला धक्का लावण्याचे काम करीत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिक म्हणजेच महात्मा गांधी हे आहेत. ‘शब्दांमध्ये वाईटाचे चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते’, असा विश्वास बाळगणार्‍या गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा, नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी नेहमी सगळ्यांना संगितले. देशातील लोकशाही ही अबाधीत राहिली पाहिजे. जे लोक लोकशाहीला बाधा आणण्याचे काम करीत आहे त्यांना आपण रोखले पाहिजे. जर अशा समाज कंठकांना रोखले नाही तर पुढच्या काळात आपल्या पुढच्या पिढीला मुक्तपणे राहता येणार नाही.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘साम्राज्यवादी ब्रिटीशांनकडून केवळ देशाला स्वातंत्र मिळून दिले नाही तर राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया देखील स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून महात्मा गांधींनी केली. आज जगामध्ये चालू युध्द पाहिल्यानंतर अहिंसेच्या तत्वज्ञानाची किती नितांत गरज आहे हे आपण समजू शकतो.
निरनिराळे लढे असहकार, अहिंसा, सत्याग्रह या तत्वांवर आधारित आपण कसे यशस्वी होवू शकतो हे गांधीच्या जीवनाकडे पाहिले तर आपल्या लक्षात येते. या मूल्यांचा आधार घेवून अफ्रिकेतील काही राष्ट्र स्वातंत्र्य मिळवू शकले आहेत. त्यांच्या आचाराचा व विचाराचा प्रचार करण्याची आजही गरज असून तरूण पिढीने त्यातून बोध घेणे गरजेचे आहे.’’
यानंतर नगरसेवक अविनाश बागवे यांनीही आपले महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या विषयी बहुमोल विचार व्‍यक्त केले.
या मिरवणुकीमध्ये महात्मा गांधी – लालबहाद्दूर शास्त्री, महात्मा गांधी – कस्तुरबा गांधी, मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, चंपारण्य सत्याग्रह, चले जाव चळवळ, पुणे करार आदी विषयांवर चित्ररथ तयार केले होते. या यात्रेमध्ये शारदा विद्यालय (इंग्रजी माध्यम), वसंतराव विद्यालय, प्रियदर्शनी शिक्षण संस्था, न्यू मिलियम स्टार या शाळेतील मुलांनी गांधींजीच्या आयुष्यातील महत्वांच्या घटना, गांधीजी व त्यांच्या समकालिन नेत्यांच्या वेशभुषा परिधान करून साकारण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे संयोजन महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष नीता रजपूत व गणेश भंडारी यांनी केले होते.
यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी आमदार उल्हास पवार, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी,अविनाश बागवे,अजित दरेकर महिला अध्यक्षा पुजा आनंद, लता राजगुरू, उस्मान तांबोळी, कैलास गायकवाड, भीमराव पाटोळे, जेंद्र भुतडा, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, अक्षय माने, आसिफ शेख, विशाल जाधव, राज अंबिके, संदिप मोरे, मिलिंद अहिर, चैतन्य पुंरदरे, महेश हराळे, अभिजीत महामुनी, फैय्याज शेख, शाम काळे, संदिप मोरे, सचिन दुर्गोडे, ज्योती परदेशी, रफिक शेख,सुंदरा ओव्‍हाळ, नलिनी दोरगे, अजय खुडे, नरेंद्र खंडेलवाल आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

हात-पाय नसले तरी मनाने ताकदवान राहण्याची शिकवण सैनिकांकडून मिळते -निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले

क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ला समर्थ गौरव पुरस्कार प्रदानसमर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढोल तलवार पथकाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा
पुणे : सीमेवर भारतीय सैन्य उभे राहते कारण देशप्रेमी लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. देशातील लोक कायमच सैनिकांप्रती कृतज्ञ भावना ठेवतात. हेच सैनिक देशासाठी लढताना अपंगत्व आले तरी जिद्द सोडत नाहीत. आत्मविश्वासाने ते आलेल्या परिस्थितीला सामोरे जातात. दोन्ही हात-पाय नसले तरी मनाने ताकदवान राहिले पाहिजे हे त्यांच्याकडून शिकायला मिळते, असे मत निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.

समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक हे २५ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहेत. त्यानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. यंदाचा समर्थ गौरव पुरस्कार क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भूषण गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी इन्स्टिट्यूटचे  डीन कर्नल वसंत बल्लेवार (निवृत्त) आणि कर्नल चंद्रशेखर चितळे (निवृत्त) यांनी पुरस्कार स्विकारला. 
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उद्योजक पुनीत बालन, किरण साळी, हनुमंत बहिरट, अ‍ॅड. प्रताप परदेशी, , डॉ. अ.ल.देशमुख, प्रसाद कुलकर्णी, प्रशांत टिकार, विकास पवार, भूषण पंड्या, पराग ठाकूर, संकेत मते, शाहीर दादा पासलकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते,उपाध्यक्ष अथर्व कुलकर्णी, सचिव योगेश यादव,खजिनदार निरंजन माळवदकर, सदस्य जय सूर्यवंशी, संदेश खरात, नितीन डिंबर हे उपस्थित होते.

रुपये २५ हजार, सन्मान चिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी समर्थ प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील झाले. हिरामण बनकर विद्यालय, पुणे विद्यार्थी गृह यांना क्रीडा साहित्य खरेदी साठी प्रत्येकी २५ हजार आणि  वृद्धश्वर सिद्धेश्र्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये देण्यात आले. २५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व यावेळी घेण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च इंद्राणी बालन फाऊंडेशन आणि समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.

वसंत बल्लेवार म्हणाले, भारताची सेना विश्वातील एक नंबर आहे. देशातील नागरिक सैनिकांप्रती ज्या भावना व्यक्त करतात आणि सहकार्य करतात त्यामुळे सैनिकांना स्फूर्ती मिळते. सिमेवर जेव्हा सैनिक उभा असतो, तेव्हा तो फक्त देशाचा विचार करत असतो. देशातील लोक हे सैनिकांची ताकद आहेत. समर्थ प्रतिष्ठानने केलेला हा सन्मान देशातील प्रत्येक सैनिकांपर्यंत पोहोचेल. त्यांचे मनोबल वाढविणारा हा सन्मान आहे.

कर्नल चितळे म्हणाले, देशासाठी कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना पुन्हा आत्मविश्वासाने स्वबळावर उभे करण्याचे काम क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये केले जाते. हे काम १०६ वर्षांपासून सुरु आहे. काळानुसार या संस्थेत बदल होत गेले. अनेक अपंग सैनिक या माध्यमातून उद्योजक झाले आहेत.

संजय सातपुते म्हणाले, वादनासोबतच सामाजिक बांधिलकी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून जपली जाते. आजपर्यंत एकूण १ कोटी २५ लाखांपेक्षा अधिक रक्कम शैक्षणिक व सामाजिक कायार्साठी देणगी देऊन सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केला आहे. पराग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व कुलकर्णी यांनी आभार मानले.  

पर्वतीतून माधुरी मिसाळांच्या विरोधात जोरदार छुपे प्रयत्न

पुणे-पर्वती विधानसभा मतदार संघातून आमदार माधुरी सतीश मिसाळ आता पुन्हा निवडून आल्या तर मंत्रिपदाच्या त्या दावेदार होतील, आणि एक ताकदवर समजली जाणारी महिला येथे मंत्री होईल याच कारणाने त्यांच्या विरोधात त्यांच्या पक्षातील काहींनी विशिष्ठ माध्यम प्रचारकांना हाताशी धरून जोरदार प्रयत्न आणि पर्यटन सुरु केल्याचे दिसून आले आहे. मिसाळ यांच्या विरोधात भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडे तक्रार केल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत दि.1 ऑक्टोंबर 2024 रोजी पर्वती विधानसभा मतदार संघ येथे मोगरा हॉल बिबवेवाडी येथे मतदान प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याबाबत च्या या तक्रारी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे

पर्वती मतदारसंघांमध्ये आमदार माधुरी मिसाळ यांनी मनमानी कारभार करून अनेक जुन्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून त्यांच्या घरातील कामगार व घरातील नातेवाईक यांना हाताशी धरून बिबवेवाडी येथे मतदान प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने पार पाडली आहे वास्तविक डावललेले कार्यकर्ते हे गेली 30 ते 40 वर्षे काम करीत असून दिलीप कांबळे, स्वर्गीय विश्वास गांगुर्डे व विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचे निवडणुकीत काम केलेले असून सर्व कार्यकर्ते नियुक्त प्रभारी असून या कार्यकर्त्यांना घेऊन हि प्रक्रिया पूर्ण राबवावी अशी मागणी करताना अपमान करून आपण विजय मिळवू शकतो का? असा प्रश्न विचारत या विषयावर गांभिर्याने विचार करून तातडीने निवडणूक प्रक्रिया पुन्हा करावी अशी मागणी भूपेंद्र यादव यांच्याकडे केल्याचे वृत्त आहे. दरम्यान अशा पद्धतीने उमेदवारी मिळविण्यापूर्वी सुरु झालेल्या राजकारणाने आता कळस गाठला असून अशाच पद्धतीच्या राजकारणाचा गेल्या विधानसभेला खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादीला फटका बसला होता .हेच राजकारण आता भाजपात देखील सुरु झालेले दिसते आहे. हे असेच सुरु राहिले तर मिसाळच काय अन्य कोणीही उमेदवार भाजपने दिला तर खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादीच्या तोंडापर्यंत आलेला विजय जसा निसटून गेला तसाच प्रकार भाजपात पर्वती मतदार संघातूनही दिसून येईल असा सूत्रांचा दावा आहे.

नाट्यछटेचे लेखन आणि सादरीकरण नाटकापेक्षा कठीण राजीव तांबे

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे : भूमिका हा परकाया प्रवेश असतो. नाटकात वेगवेगळी पात्रे आपली भूमिका निभावतात; पण नाट्यछटेत एकाच कलाकाराला प्रसंग उभा करावा लगातो. त्यामुळे नाटकापेक्षा नाट्यछटेचे लेखन आणि सादरीकरण करणे या गोष्टी कठीण आहेत, असे प्रतिपादन बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी केले.

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण तांबे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज (दि. 2) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी मंचावर होते.

नाट्यछटेचे लेखन कशा पद्धतीने व्हावे या संदर्भात कार्यशाळा आयोजित केली जावी, अशी अपेक्षा तांबे यांनी व्यक्त केली.

सुरुवातीस प्रकाश पारखी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती सांगितली. राजीव तांबे यांचा परिचय संध्या कुलकर्णी यांन करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा कुलकर्णी यांनी केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल
सुमन नाट्यछटा स्पर्धा (विजेते आणि नाट्यछटेचे नाव या क्रमाने)
गट 1 : वयोगट 9 ते 12 : प्रथम नित्य पवार (जिंकाव तर अर्जूनासारख).
गट 2 : वयोगट 13 ते 18 : प्रथम आर्या अमोल कुलकर्णी (सिम्मी काकूंची एलिझाबेथ), द्वितिय निलाक्षी निलेश नरवणे (माझं झाड).
गट 3 : वयोगट 19 ते 50 : प्रथम आम्रपाली देशपांडे (फस्ट्रेनशन आलय मला), द्वितिय निनाद देशपांडे (टचवूड), तृतिय दिपाली रवींद्र आखाडे (वंशाला दिवा तर हवाच!), उत्तेजनार्थ शिवांगी मलगुंडे (आपल्या व्ोळी असं होतं का हो?), शिल्पा पराग कुलकर्णी (वेळ).
गट 4 : वयोगट 50 वर्षांपुढील : प्रथम वंदना चेरेकर (मुक्या प्राण्यांवर दया करा), द्वितिय मीरा शेंडगे (निर्मला : द बॉस!)

शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणातील मर्म युवा कलाकारांनी जाणून घ्यावे : डॉ. विनय सहस्रबुद्धे

भरत नाट्य संशोधन विद्यालयातर्फे डॉ. विकास कशाळकर यांचा अमृत महोत्सवी सत्कार
पुणे : भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा खूप मोठी अन्‌‍ गहन आहे. संगीत साधना करणाऱ्या व्यक्तीला संगीताद्वारे जीवनरस मिळत राहतो. संगीत माणसाला खऱ्या अर्थाने ताजेतवाने व टवटवीत ठेवते. संगीत क्षेत्रात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाचे मर्म युवा कलाकारांनी समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
भरत नाट्य संशोधन विद्यालयातर्फे डॉ. विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे भरत नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कशाळकर यांचा सत्कार डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते. पंडित उल्हास कशाळकर, श्रीकांत कशाळकर, गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, गोविंदराव बेडेकर, प्रा. प्रकाश भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, शास्त्रीय संगीताची मैफल ऐकताना भावनिक आदानप्रदान होते. यातून मिळणारा आनंद, समाधान भारतीय शास्त्रीय संगीताने समाजाला अनेक वेळा दिले आहे. या संगीत साधनेच्या परंपरेतील परिश्रमी, तपस्वी व्यक्तीमत्त्व असलेल्या कशाळकर यांना संगीत साधनेत अतीव समाधान देणारे दीर्घायुरोग्य लाभो.
सत्कार सोहळ्यापूर्वी डॉ. विकास कशाळकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना पंडित पांडुरंग मुखडे (तबला), प्रविण कासलीकर (संवादिनी), परिमल कोल्हटकर, अभिषेक कुलकर्णी (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली. डॉ. कशाळकर यांनी मैफलीची सुरुवात राग भूपमधील ‌‘जप ले तू नाम प्रभू का‌’ या बंदिशीने केली. त्यानंतर वाचस्पती रागातील ‌‘तू ही करता, सुख के दाता‌’ ही बंदिश सादर केली. द्रुत लयीत ‌‘अरज सुनो मोरे साई‌’ ही रचना अखेरीस सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जबडे, रवींद्र खरे यांनी केले.
सुरुवातीस ‌‘यमनरंग‌’ या सांगीतिक कार्यक्रमात भरत नाट्य संशोधन विद्यालयाच्या बिल्वा द्रविड आणि त्यांच्या शिष्यांचे गायन झाले. यमन रागातील मराठी, हिंदी गीते, नाट्यगीते सादर केली. त्यांना ओंकार श्रोत्री, अमित लिमये (तबला), सचिन घाणेकर (पखवाज), नितीन पुरंदरे (संवादिनी) यांनी साथ केली. त्यानंतर विकास कुचेकर, अमित लिमये, केतकी वैद्य-गोडसे, ओंकार श्रोत्री यांचे एकल तबलावादन झाले. निवेदन लौकिका गोखले-रास्ते यांनी केले.

ABP माझा चे राजीव खांडेकर तसेच वंदना चव्हाण यांच्यासह मान्यवरांना‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार‌’ देऊन होणार सन्मान

30व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे दि. 3 ऑक्टोबर रोजी नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन

विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात ‌‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार‌’ देऊन गौरविले जाते. यंदा राजीव खांडेकर (ज्येष्ठ संपादक), ॲड. वंदना चव्हाण (माजी खासदार, पर्यावरणवादी), नितीन बानगुडे-पाटील (प्रसिद्ध व्याख्याते), डॉ. संजीव चौधरी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑर्थोपेडिक सर्जन), आनंदी विकास (ज्येष्ठ संगीतकार व गायिका), हिंदवी पाटील (लावणी लोककलावंत) यांना उद्घाटन सोहळ्यात श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

पुणे-नवरात्रौत सलग 10 दिवस चालू असणारा ‌‘पुणे नवरात्रौ महोत्सव‌’ हा सांस्कृतिक महोत्सव यंदा दिमाखदार 30वे वर्ष साजरे करीत आहे. घटस्थापनेच्या दिवशी गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे याचे शानदार उद्घाटन संपन्न होईल. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात या दिवशी सकाळी ६.०५ वाजता आबा बागुल व सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते घटस्थापना होईल.

सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, फुलवंती चित्रपटातील नायिका प्राजक्ता माळी यांची उद्घाटन सोहळ्यातील उपस्थिती लक्ष्यवेधी असेल.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून  माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी,  माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व  माजी आमदार उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस अरविंद शिंदे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, पुणे शहर प्रशांत जगताप, शहर प्रमुख, शिवसेना उबाठा पक्ष संजय मोरे, अध्यक्ष, एनएसयूआय महाराष्ट्र प्र. काँग्रेस अमिर शेख, अध्यक्षा, पुणे शहर महिला काँग्रेस पूजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची उपस्थिती उद्घाटन सोहळ्यात असणार आहे.

उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ सनईच्या मंजुळ सुरांनी होणार असून दीपप्रज्वलनाने 30व्या महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर देवीची सामूहिक आरती होईल.उद्घाटन सोहळ्याची सुरुवात  कथक नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांच्या ‌‘दुर्गा नमनाने‌’ होईल. त्यानंतर स्वाती धोकटे आणि विनोद धोकटे ‌‘देवीचा जागर व गोंधळ‌’ सादर करणार आहेत.

‌‘नृत्यरंग‌’ कार्यक्रमाअंतर्गत सिनेतारकांचा नृत्याविष्कार व बॉलीवुड धमाका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड यांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे करणार आहेत.

‌‘पुणे नवरात्रौ महोत्सवा‌’चा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथील उद्घाटन सोहळा व सर्व रोजचे सांस्कृतिक कार्यक्रम यांचे थेट प्रक्षेपण पुण्यात आयसीसी केबल नेटवर्क, जीटीपीएल केबल नेटवर्क, नेक्स्ट जनरेशन केबल नेटवर्क आणि एससीसी केबल नेटवर्क वरून केले जाणार आहे.

उद्घाटनानंतर सायंकाळी 7 वाजता ‌‘परंपरा‌’ कार्यक्रमाअंतर्गत भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी ते विराज जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडला जाणार असून श्रीनिवास जोशी व विराज जोशी यांचे कार्यक्रमात सादरीकरण होणार आहे. अशी माहिती पुणे नवरात्रो महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.

‘जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका’-दंगलमुक्त देशासाठी काढलेल्या ‘शांती मार्च’ला तरुणाईचा प्रतिसाद

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने ‘दंगलमुक्त पुणे’ हा संदेश घेऊन ‘शांती मार्च’ काढण्यात आला.गोखले चौक (कलाकार कट्टा) ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (डेक्कन) ते कर्वे पुतळा (कोथरूड) ते महात्मा गांधी पुतळा (गांधी भवन) या मार्गावर हा शांती मार्च काढण्यात आला.या शांती मार्चला चांगला प्रतिसाद मिळाला.समाजात शांतता नांदावी असा आग्रह धरणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असेल तरच समाजात शांतता नांदते,असा शांती मार्च आयोजनामागचा उद्देश होता.

‘महात्मा गांधी अमर रहे’,’दंगल आहे अमंगल’,’जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका’,’बलवान माणूसच क्षमा करू शकतो’,’गांधी विचार -राष्ट्रीय एकात्मतेचा आधार’,’जात -पात बंधन तोडो’,’महात्मा गांधी म्हणजे प्रेम,सद्भाव आणि एकोपा’असे फलक शांती मार्च मध्ये तरुणाईने हाती घेतले होते.
डॉ.प्रवीण सप्तर्षी,प्रा.सौ.रमा सप्तर्षी,जांबुवंत मनोहर,एड.स्वप्नील तोंडे,तेजस भालेराव,रोहन गायकवाड,माजी नगरसेवक निलेश निकम,सचिन पांडुळे,नागेश भोसले,उमेश चव्हाण,मिलिंद गायकवाड,विवेक काशीकर,उमेश कंधारे,चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी,महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले.प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.शांतताविषयक विविध संदेश आणि फलक घेऊन तरुणाई या मार्चमध्ये सहभागी झाली. शांती मार्च मध्ये भारती विद्यापीठ, एमसीई सोसाइटी (आझम कॅम्पस ), पूना कॉलेज, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय,ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस,माहेर संस्था,रूग्ण हक्क परिषद, जमाते इस्लामी हिंद यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. गांधी भवन येथे समारोप प्रसंगी या सर्वांना डॉ.कुमार सप्तर्षी यांनी मार्गदर्शन केले.दादा पाटील,अन्वर राजन,एम.एस.जाधव यावेळी उपस्थित होते.
तत्पूर्वी,गांधीभवन येथे सकाळी आठ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यक्रम झाला.गांधी जयंती निमित्त स.११ ते दु. ३ दरम्यान सर्वांकरीता प्रसाद भोजन आयोजित करण्यात आले.

सप्ताहातील आगामी कार्यक्रम
दि.३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नागरी समाज व निवडणुका ‘ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली)यांचे व्याख्यान होणार आहे.दि.४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले आहे.दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर,पत्रकार रवींद्र पोखरकर सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.

खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव

गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्येच विविध चित्रपट दाखवले जातील.दि.२ ऑकटोबर रोजी दुपारी १ वाजता ऑस्कर विजेता ‘गांधी’ हा चित्रपट दाखवला गेला .दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम’,दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत.

कसबापेठ विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन

पुणे, दि. २ : महात्मा गांधी जयंती निमित्त कसबापेठ विधानसभा मतदार संघात स्वीप कार्यक्रमांतर्गत आप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर रॅलीच्या माध्यमातून ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा’ अशा घोषणा देत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी मतदान आपला हक्क असून सर्वांनी मतदान करावे. आपल्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्याविषयी प्रवृत करावे, असेही आवाहन करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲपवर ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येते, असेही रॅलीच्या माध्यमातून सांगण्यात येत होते.

गांधी विचारच जगाला तारणारा, धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी गांधी विचार अवलंबावा: रमेश चेन्नीथला.

भाजपाने लढण्याआधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार: नाना पटोले

गांधी जयंतीनिमित्त मणिभवनला भेट देऊन काँग्रेस नेत्यांचे गांधींजींना अभिवादन.

मुंबई, दि. २ ऑक्टोबर २०२४
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण व इस्राईलमध्ये आज जे सुरु आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गाधींजींनी घालून दिलेला आदर्श व अहिंसेचा मार्गच महत्वाचा ठरतो, जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधींजींनी घालून दिलेल्या मागार्चा अवलंब करावा, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. तसेच चरक्यावर सुत कातले व भजन गायनही करण्यात आले. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, आ. अमिन पटेल माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, चरणजित सप्रा, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे नाव सातत्याने घेत असतात पण ते गांधीजींचा आदर्श तसेच गांधीजींनी घालून दिलेला अहिंसेच्या मार्गाचे पालन करताना दिसत नाहीत. जातीच्या धर्माच्या नावावर लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम ते करत आहेत, हे देशाच्या हिताचे नाही. देशाच्या विकास व प्रगतीसाठी गांधी विचारच महत्वाचा आहे त्याचा अवलंब त्यांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याआधीच महाराष्ट्रात पराभव मान्य केला आहे. भाजपाची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी आहे तेच महाराष्ट्रातही भाजपा मित्रपक्षांसोबत करत आहे असेही चेन्नीथला म्हणाले. भाजपा सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे पण सरकारकडे पैसा नाही व निवडणूक होणार असल्याने त्याची अमंलबजावणी होणे कठीण आहे. मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारची शेवटची धडपड सुरु आहे पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना सर्व समजते असेही चेन्नीथला म्हणाले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आपल्याला जागा मिळावी याचा विचार करत असतो. पण महायुतीमध्ये जागा वाटपावरून महाभारत सुरु आहे ते पहा, त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांना विचारा. भाजपा सरकारने १० वर्षात महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारात भाजपा सरकारने विक्रम केला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत, महागाई प्रचंड वाढली आहे, अशी अवस्था असून या महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस जनतेने केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2024:शांतता, सहिष्णुता व महात्मा गांधींचा वारसा साजरा करूया

सर्व जगाला शांतता व अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर या जयंतीदिनी दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा होतो. समाजउभारणीसाठी अहिंसेची ताकद दर्शवणारा हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने २००७ साली घोषित केला होता. 

गांधींचा अहिंसेचा वारसा

महात्मा गांधींचे सत्याग्रह व अहिंसक प्रतिकाराचे तत्वज्ञान आधुनिक इतिहासातील सर्वात जास्त परिणामकारक परिवर्तनकारी शक्तींमधील एक आहे. ब्रिटिशांच्या राज्यविरोधातील त्यांच्या शांततापूर्ण निदर्शनांमधून, विशेषतः १९३० मधील दांडीयात्रेसारख्या आंदोलनांमधून जुलमी शक्तींच्या विरोधात अहिंसा तत्वाच्या ताकदीवर असलेला त्यांचा विश्वास अधोरेखित होतो. महात्मा गांधीसाठी अहिंसेचे तत्व हे केवळ राजकीय आंदोलनांसाठीचे हत्यारच नव्हे तर एक जीवनपद्धती होती. शांतता मिळवण्यासाठी शांततापूर्ण मार्गच चोखाळावे लागतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

महात्मा गांधींचे प्रसिद्ध वाक्य आहे, “अहिंसा तत्व हे मानवजातीला उपलब्ध असलेली सर्वात मोठी शक्ती आहे. सर्व विनाशकारी आयुधांपेक्षाही याची ताकद जास्त आहे.”  अमेरिकेतील  मार्टिन ल्युथर किंग जुनियर यांच्या  मानवी हक्कासाठीच्या चळवळीपासून दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांची वर्णभेदाविरोधातील आंदोलनापर्यंत जगभरातील अनेक चळवळी  याच तत्वाने प्रेरित झाल्या आहेत. त्यांच्या तत्वज्ञानाचा अनेक नेत्यांवर, आंदोलनांवर प्रभाव पडला असून त्यामुळे प्रतिकाराचे व समाजसुधारणेचे शक्तिशाली साधन म्हणून अहिंसा तत्वाचे महत्व अधोरेखित झाले आहे.

महात्मा गांधींची आजच्या जगातील समर्पकता

राजकीय , सामाजिक व पर्यावरणीय समस्यांनी ग्रासलेल्या आजच्या काळात महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वावरील विश्वास आणखी बळकट होतो आहे. दहशतवाद, संघर्ष, हवामान बदल, आणि वाढती विषमता यावर तातडीने शांततामय उपाय शोधण्याची गरज आहे. मानवामधील अंगभूत चांगुलपणावर गांधींच्या असलेल्या विश्वासातून भेदाभेद, तसेच साथरोग किंवा गरिबीसारख्या आधुनिक जगातील समस्यांवर नक्कीच उपाय शोधता येतील.

शांतता ही केवळ एक दूरस्थ आदर्श नसून, गाठता येऊ शकणारे उद्दिष्ट आहे, हा विश्वास त्यांच्या तत्वज्ञानातून मिळतो! त्यांच्या शिकवणीतून आशा व सामंजस्याचा कालातीत संदेश मिळतो.

महात्मा गांधींची विचारधारा केवळ राजकीय आंदोलनांपुरतीच नव्हे तर शाश्वत विकासासाठी देखील उपयोगी आहे. त्यांचे सुप्रसिद्ध वचन आहे, “ जगात सर्वांच्या गरजेपुरती संसाधने आहेत,पण सर्वांच्या हावरटपणाला पुरेशी नाहीत.” यातून अहिंसा व संसाधनाचा जबाबदारीने वापर या दोन्हींमधील परस्परसंबंध अधोरेखित होतो. साधेपणा, संवर्धन व स्वावलंबनासारख्या त्यांच्या तत्वांचे प्रतिबिंब आजच्या काळातील स्वच्छता व पर्यावरण संवर्धन करणाऱ्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त पडलेले दिसून येते.

अहिंसा तत्वाचा जागतिक उत्सव : गांधींच्या वारशाचा सन्मान

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या द्वारे  महात्मा गांधींच्या शांतता व अहिंसा तत्वज्ञानाचे पुनर्स्मरण  सर्व जगाला होत असते. त्यांच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या या दिवशी त्यांनी आयुष्यभर प्रसार केलेल्या अहिंसात्मक प्रतिकाराच्या तत्वांना आपण आदरांजली  वाहत आहोत.

भारतात २०२३ साली झालेल्या जी २० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जागतिक नेत्यांसह राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली होती. आपल्या  सर्वसमावेशक, शांततापूर्ण व समरसतापूर्ण भविष्यकाळासाठी  महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसा या कालातीत तत्वांचे मार्गदर्शन सतत लाभत राहील यात शंका नाही.

2022 मध्ये, युनेस्को महात्मा गांधी शांतता आणि शाश्वत विकास शिक्षण संस्थेने (एमजीआयईपी) या दिवसाच्या स्मरणार्थ न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महात्मा गांधींच्या पूर्णाकृती  होलोग्रामने  शांतता आणि शाश्वत समाजांना प्रोत्साहन देण्याचे  एक साधन म्हणून शिक्षणावरील  पॅनेल चर्चेचे नेतृत्व केले.  राजदूत रुचिरा कंबोज आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची कन्या बर्निस ए किंग यांसारख्या मान्यवरांनी आधुनिक आव्हानांना सामोरे जाताना  गांधींजींची आदर्श मूल्ये  आजही किती प्रासंगिक आहेत यावर आपले विचार मांडले होते.

गांधींजींचा वारसा

महात्मा गांधींच्या शिकवणींचा भारताच्या सामाजिक आणि राजकीय चौकटीवर आजही खोलवर प्रभाव आहे. विविध सरकारी विभाग आणि संस्था सक्रियपणे त्यांच्या आदर्शांचे पालन  आणि प्रचार करत आहेत आणि  स्वच्छ, आत्मनिर्भर  आणि शांततापूर्ण  समाजाचे  गांधींचे स्वप्न आधुनिक शासन आणि सार्वजनिक जीवनात अमलात येईल याकडे लक्ष देतात.

2014 मध्ये सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्र उभारणीसाठी महात्मा गांधींचे स्वच्छतेचे तत्वज्ञान आवश्यक असल्याचे प्रतिबिंबित करणाऱ्या सर्वात उल्लेखनीय उपक्रमांपैकी एक आहे. या अभियानाचा उद्देश स्वच्छ आणि निरोगी भारत निर्माण करणे हा असून, “स्वच्छता हे ईश्वराचे दुसरे रूप  आहे” या गांधींच्या विश्वासाला  अनुसरून आहे. ते नागरिकांना वैयक्तिक आणि सामुदायिक सहभाग वाढवून, त्यांच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी घेण्यास प्रेरित करते.

‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेसह स्वच्छता ही सेवा 2024 अभियान 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाच्या  दशकपूर्तीनिमित्त आयोजित या अभियानाचा  2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी  समारोप झाला. स्वच्छता ही सेवा अभियानाने संपूर्ण भारतामध्ये स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षा कायम  राखण्यासाठी वर्तणुकीतील बदल आणि समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला.

11 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गांधी दर्शन, राजघाट, दिल्ली येथे महात्मा गांधींना समर्पित विशेष रेल्वे कोच चे उद्घाटन केले. रेल्वे मंत्रालयाद्वारे समर्पित  हा कोच   महात्मा गांधींच्या कालखंडातील काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेला  रेल्वे कोच आहे, जो राष्ट्राला एकत्र आणण्याच्या आणि न्याय आणि समानतेचा पुरस्कार करण्याच्या त्यांच्या ध्येयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्रतिष्ठित रेल्वे प्रवासाचे प्रतीक आहे.

उद्घाटनादरम्यान, शेखावत यांनी सांगितले की या रेल्वे कोचचा थेट संबंध महात्मा गांधींच्या जीवनात एक परिवर्तन घडवणाऱ्या घटनेशी आहे आणि त्यांचे विचार  प्रत्यक्ष  सांगण्यासाठी त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कोचमधील गांधींच्या प्रवासाचे तसेच  सहप्रवाशांसोबतच्या संवादाचे समृद्ध  शिल्पांद्वारे  चित्रण एक अविस्मरणीय  अनुभव प्रदान करतो. गांधी दर्शनासाठी येणारे अभ्यागत आता हे  क्षण पुन्हा जगू शकतील , गांधींच्या प्रवासाविषयी माहिती  प्राप्त करू शकतील , जे  अहिंसा आणि सामाजिक न्यायाचे तत्त्वज्ञान घडवण्यात महत्त्वपूर्ण  होते.

हा ऐतिहासिक क्षण महात्मा गांधींच्या चिरस्थायी वारशाला तसेच  भारताचे  स्वातंत्र्य आणि एकतेप्रती  त्यांच्या अतूट  वचनबद्धतेला समर्पक मानवंदना आहे.

खादी: आत्मनिर्भरता आणि शाश्वततेचे प्रतीक

साधेपणा आणि आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या हाताने कातलेल्या खादी या कापडाच्या  प्रचारातून महात्मा गांधींनी आत्मनिर्भरता आणि शाश्वततेचा केलेला पुरस्कार सतत प्रतिध्वनीत होत  आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोग दरवर्षी खादीचा प्रचार करून आणि ग्रामीण सक्षमीकरणाला प्रोत्साहन देऊन गांधी जयंती साजरी करते.  2023 मध्ये गांधी जयंती दिनी कनॉट प्लेस, नवी दिल्ली येथील खादी भवनने 1.52 कोटी रुपयांची उलाढाल करून खादी उत्पादनांच्या विक्रीचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, जे स्वयंपूर्णतेच्या या प्रतीकाला समर्थन देण्याप्रति जनतेच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते.

डिजिटल स्मरणोत्सव

2019 मध्ये, पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या स्मरणार्थ #Gandhi150 ही  एक विशेष मायक्रोसाइट सुरू केली. या साइटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट संग्रहातील  दुर्मिळ व्हिडिओ क्लिप पहायला मिळतात, ज्यात गांधींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण, जसे की त्यांचा प्रवास, अहिंसावरील भाषणे आणि लोकांशी संवाद दर्शवला आहे. या डिजिटल उपक्रमाने जनतेचा लक्षणीय  सहभाग नोंदवला  आहे, आणि 3.6 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि नवीन पिढ्यांपर्यंत गांधींचा संदेश पोहोचवला आहे.

निष्कर्ष

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा महात्मा गांधींच्या शिकवणींच्या चिरस्थायी प्रासंगिकतेचे एक शक्तिशाली स्मरण आहे. केवळ रणनीती म्हणून नव्हे तर जीवनपद्धती म्हणून अहिंसेचा स्वीकार करून आपण भावी पिढ्यांसाठी अधिक सामंजस्यपूर्ण आणि शाश्वत जग निर्माण करू शकतो. शिक्षण, जागरुकता आणि जागतिक आव्हानांवर अहिंसक उपायांना प्रोत्साहन देऊन  आपण  महात्मा गांधींच्या वारशाचा आणि मानवतेप्रति  त्यांच्या सखोल योगदानाचा सन्मान करतो. अहिंसक कृतीतून शांतता प्राप्त करता येते हा त्यांचा कालातीत संदेश जगभरातील लाखो लोकांना आजही  प्रेरणा देत आहे.

उद्यापासून रंगणार कोथरूड नवरात्र महोत्सव – संदीप खर्डेकर यांची माहिती.

संजीव अरोरा, मनोज हिंगोरानी, अरुण जिंदल ह्या उद्योजकांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

पुणे-उद्या 3 ऑक्टोबर रोजी भेलकेवाडी, डी पी रस्ता, परांजपे शाळेसमोर, कोथरूड येथे सकाळी 11 वाजता वाघजाई देवीची घटस्थापना होऊन कोथरूड नवरात्र महोत्सवास सुरुवात होईल. यावेळी एकदंत वाद्य पथक यांचे देवीच्या मंडपासमोर स्थिर वादन होणार आहे.
महोत्सवादरम्यान केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर न देता विविध सामाजिक संस्थांना उपयोगी साहित्याची मदत,भोर येथील करंदी गावातील येसाजी कंक शाळेला शालेय साहित्याची मदत करण्यात येणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, विश्वस्त उमेश भेलके तसेच युवा उत्सव प्रमुख प्रतीक खर्डेकर यांनी सांगितले.
महोत्सवादरम्यान केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुण्याच्या उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ग्लोबल ग्रुप चे संस्थापक संचालक संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी, तसेच वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे संचालक अरुण जिंदल यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले. संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी हे अस्सल पुणेकर असून त्यांनी ग्लोबल ग्रुप च्या माध्यमातून तब्ब्ल 100 पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय उद्योगांना पुणे, चाकण, हिंजेवाडी, रांजणगाव, सणसवाडी इ ठिकाणी Built to Suit जागा दीर्घाकालीन काळासाठी लीज वर उपलब्ध करून दिली आणि त्यायोगे हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला, श्री. अरुण जिंदल यांनी देखील वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या माध्यमातून रोजगार निर्मिती व आर्थिक चलनास गती दिल्याबद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात येणार आहे असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
ह्या महोत्सवादरम्यान दिनांक 5 ऑक्टोबर ला रात्री 9 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात “गेम ऑफ पॉवर ” ह्या राजकीय विनोदी नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल तर दि. 6 ऑक्टोबर ला दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे सिनेतारका, लावणी क्वीन अर्चना सावंत यांचा “अप्सरा आली” हा लावण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येईल अशी माहिती महिला उत्सव प्रमुख व मा. नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर, सौ. श्वेताली भेलके, सौ.अक्षदा भेलके आणि सौ. कल्याणी खर्डेकर यांनी दिली.
वरील कार्यक्रम मोफत असून प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सर्वांना नाट्यगृहात प्रवेश देण्यात येणार आहे.
तसेच 8 ऑक्टोबर ला बालजत्रा, 9 ऑक्टोबर ला भोंडला आणि महिलांची महाआरती आणि तृतीयपंथीयांना साडी भेट, 11 व 12 ऑक्टोबर ला रासदांडिया आणि 16 ऑक्टोबर ला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे ही सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

एअर इंडिया एक्सप्रेसने पूर्ण केले AIX कनेक्टसोबतचे विलीनीकरण

एअर इंडिया समूहाच्या परिवर्तनाच्या प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड

विलीनीकरणात दोन लो-कॉस्ट कॅरियर्समधील ऑपरेशनल मॅन्युअल्सचे एकत्रीकरण, विमाने
हस्तांतरित करणे, कामकाजाच्या जोडीलाच सुरक्षा आणि देखभाल मान्यता यांचा समावेश
 एअर इंडिया समूह त्यांच्या ५ वर्षीय Vihaan.AI परिवर्तन कार्यक्रमाचा भाग म्हणून चार
विमान कंपन्यांचे दोन मध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेत

गुरुग्राम, : एअर इंडिया समूहाने एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड आणि AIX कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड(पूर्वीचे एअरएशिया इंडिया) यांच्या कामकाज एकत्रीकरण आणि कायदेशीर विलीनीकरणाचे काम पूर्ण करून त्यातून एका मोठ्या लो-कॉस्ट कॅरियरची स्थापना झाली आहे.
विलीनीकरण झालेली संस्था ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ नावाखाली आणि एकत्रित एअरलाइन कोड IX
सह कार्यरत राहील. हा एअर इंडिया समूहाच्या परिवर्तन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून
त्यायोगे चार विमान कंपन्यांचे दोन मध्ये विलीनीकरण करण्यात येत आहे. जागतिक दर्जाची
विमानकंपनी म्हणून उभे राहण्यासाठी हा समूह सध्या विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण
करण्याच्या प्रक्रियेत आहे.
विमानकंपनीच्या रीफ्रेश ब्रँडच्या अनावरणानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत एअर इंडिया
एक्सप्रेससाठीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. यात विलीनीकरणासाठी सहाय्यक ठरणाऱ्या
ऑपरेशनल मॅन्युअल्सचे एकत्रीकरण आणि एअर ऑपरेटर सर्टिफिकेट्स (AOCs) चे हस्तांतरण
समाविष्ट होते. अशा विलीनीकरणाच्या गुंतागुंतीमुळे, या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी आणि
सहाय्य करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) सोबत जवळून काम
करणे आवश्यक होते. या विलीनीकरणाला नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MOCA), नागरी
विमान सुरक्षा ब्युरो (BCAS) आणि इतर महत्त्वाच्या भागधारकांचे पाठबळ मिळाले.
मंगळवारी, DGCA चे महासंचालक विक्रम देव दत्त यांनी DGCA मुख्यालय, नवी दिल्ली येथे
एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंह यांना अद्ययावत AOC सुपूर्द केले.
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष कॅम्पबेल विल्सन
या कार्यक्रमाला उपस्थित होते.

DGCA चे महासंचालक विक्रम देव दत्त म्हणाले, “AIX कनेक्टचे एअर इंडिया एक्सप्रेससोबत
यशस्वी एकत्रीकरण आणि विलीनीकरण हे प्रशंसनीय आहे आणि विमान कंपन्यांच्या
विलीनीकरणासाठी एक अनुकरणीय उदाहरण ठरले आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात
मोठी विमानवाहतूक बाजारपेठ म्हणून भारताची वेगाने वाटचाल होत असताना एका मजबूत
नियामक व्यवस्थेची गरज आहे. या गुंतागुंतींच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण टप्पा साध्य करणे,
हे DGCA आणि ऑपरेटर अशा दोघांच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतिक आहे.”
DGCA च्या फ्लाइट स्टँडर्ड्स डायरेक्टरेटने तयार केलेल्या लाईव्ह ट्रॅकरसह ही प्रक्रिया सुरळीत
होण्यासाठी देखरेख ठेवणाऱ्या समर्पित टीमने प्रगतीचा सातत्याने मागोवा घेण्यासाठी वेळेत
आव्हानात्मक कार्य पूर्ण करण्यास मदत केली.
एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंह म्हणाले, “सुमारे वर्षभरापूर्वी आम्ही
AIX कनेक्ट आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही संस्थांना एका सामाईक ब्रँडच्या मागे आणत
त्यांच्या एकत्रीकरणास सुरुवात केली. त्याच वेळी, आम्ही आज दोन्ही संस्थांच्या कामकाज आणि
कायदेशीर विलीनीकरणात परिणत होणाऱ्या गुंतागुंतीच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेवर काम केले.
DGCA, BCAS, MoCA, AIX आणि ग्रुप लीडरशिप टीम आणि इतर अनेक सहकाऱ्यांमधील
सहयोगा या संपूर्ण प्रक्रियेच्या यशात महत्त्वाचा ठरला.”
एअर इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एअर इंडिया
एक्सप्रेसचे अध्यक्ष कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “AIX कनेक्टचे एअर इंडिया एक्सप्रेससोबतचे
एकत्रीकरण हे एअर इंडियाच्या Vihaan.ai परिवर्तन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
विलीनीकरण झालेली संस्था भारताभोवती आणि आजूबाजूच्या प्रदेशात नवीन आणि अधिक
आकर्षक मूल्य उत्पादने शोधत असलेल्या विशेषत: देशातील महत्वाकांक्षी तरुण पिढीसाठी हवाई
प्रवासाची सेवा देईल. या विलीनीकरणानंतर विस्ताराचे एअर इंडियामध्ये १२ नोव्हेंबर रोजी
विलीनीकरण होईल. DGCA च्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी
कार्यरत आहोत.”
विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, एअर इंडिया एक्सप्रेस भविष्यातील विकास आणि परिवर्तनाच्या
धोरणावर लक्ष केंद्रित करेल. विमानकंपनीच्या विमानांचा ताफा आतापर्यंत ८८ विमानांवर
पोहोचला आहे. त्यात दरमहा सुमारे चार नवीन विमानांची भर पडत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या
अखेरीस विमानांचा ताफा १०० विमानांचा आकडा ओलांडण्याची अपेक्षा असून विमानकंपनीचे
नेटवर्क भारत, आखाती प्रदेश आणि आग्नेय आशिया येथे पसरलेले आहे.

AIX कार्यरत असलेल्या मार्गांची संख्या ७४ वरून १७१ इतकी वाढली आहे आणि टाटा समूहाने
२०२२ च्या सुरुवातीला एअर इंडियाचे अधिग्रहण घेतल्यानंतर प्रवासी वाहतुकीत ४००% पेक्षा
जास्त वाढ झाली आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये, एअरलाईनने एकत्रित ब्रँड ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ चे अनावरण केले.
त्यानंतर, AIX कनेक्टद्वारे चालवली जाणारी विमानसेवाही ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ ब्रँड अंतर्गत
सुरू असून त्यासाठी आवश्यक नियामक मान्यता घेण्यात आली आहे.