Home Blog Page 648

 देशाच्या विकासात योगदान द्यायचे असेल तर सहकार हा एकमेव मार्ग-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा

: जनता सहकारी बॅंक लिमिटेड पुणे बँकेच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारोहाचे आयोजन
पुणे: नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला पूर्ण विकसित राष्ट्र करणे आणि २०२७ पर्यंत त्याच्या अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणे हे दोन संकल्प राष्ट्राच्या समोर ठेवले आहेत. सहकारी क्षेत्राच्या योगदानाने दोन गोष्टी साध्य करता येऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम देणे आणि प्रत्येक व्यक्तीला देशाच्या विकासाशी जोडणे, प्रत्येक कुटुंबाला समृद्ध करणे हे केवळ सहकारी चळवळीच्या माध्यमातून शक्य आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची सुरुवात केली आहे. देशाच्या विकासात योगदान द्यायचे असेल तर सहकार हा एकमेव मार्ग आहे. सहकाराच्या माध्यमातून छोटी छोटी रक्कम जमा करून मोठे काम होऊ शकते, असे मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.

जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे बँकेच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारोहाचे आयोजन हडपसरमधील स्व. विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा होते. सांगता समारोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप उपस्थित होते. जनता सहकारी  बँकेच्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. अंब्रेला आॅर्गनायझेशनसाठी ५ कोटी चा धनादेश यावेळी बँकेच्या वतीने देण्यात आला.
अमित शहा म्हणाले,  छोट्या लोकांची मोठी बँक हा विश्वास जनता सहकारी बँकने  सार्थ केला आहे. देशातील पहिली को-अाॅपरेटीव्ह डिमॅट संस्था बनण्याचा बहुमान बँकेने प्राप्त केला आहे. ज्या बँकेचे लाभार्थी सगळ्यात जास्त ती बँक यशस्वी बँक आहे. आज जनता बॅंकेची ठेवी ९६०० कोटीपेक्षा अधिक आहे, हे बँकेचे यश आणि लोकांचा विश्वास आहे. सामाजिक कार्यात देखील बँक अग्रेसर आहे. कोणतीही संस्था जेव्हा सातत्यपूर्ण प्रगती करते तेव्हा त्यांचे संस्थापक, संचालक, सदस्य हे तिघे सगळ्या उद्देशांना पूर्ण करतात तेव्हाच ही प्रगती शक्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अमित शहा म्हणाले, देशात १४६५ सहकारी बँका आहेत, आणि त्यापैकी ४०० हून अधिक फक्त महाराष्ट्रात आहेत. आम्ही एक अंब्रेला संस्था (UMBRELLA ) सक्रिय करत आहोत, जी सर्व सहकारी बँकांना शक्य त्या सर्व प्रकारे मदत करेल. अंब्रेला संस्थेसाठी सहकारी बँकानी  ३०० कोटी रुपयांचे भागभांडवल उभे केले आहे. यामध्ये केंद्र सरकारचे देखील सहकार्य आहे. शाह म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाने शहरी सहकारी व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशातील पहिले सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक कार्यालय मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुण्यात सुरु होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रविंद्र हेजीब म्हणाले, अनेक आव्हानांना तोंड देत समर्थपणे आपल्या विचारांचा वारसा जपत अमृतमहोत्सवी वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे सिंहावलोकन करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. बँकेवर काम करणारे भागधारक, निष्ठावान खातेदार, निस्वार्थी संचालक आणि प्रामाणिक सेवक ही या बँकेची खरी शक्तीस्थाने आहेत. समाजातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेने मागील ७५ वर्षे आपली भूमिका अत्यंत प्रभावीपणे निभावली आहे, असे सांगत बँकेच्या योजना आणि सामाजिक कार्यातील उपक्रमांची माहिती दिली.

जगदीश कश्यप यांनी स्वागत केले. रवींद्र हेजीब यांनी प्रास्ताविक केले. अलका पेटकर यांनी आभार मानले.

असली राष्ट्रवादी कोणती हे जनतेने दाखवून दिले: अमित शहा

पुणे-महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद करण्यासाठी मी आज पुण्यात आलो असल्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार येथे स्थापन केले आहे. महायुतीला ऐतिहासिक बहुमत तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेच आहे मात्र, त्याच बरोबर कोणती शिवसेना असली आणि कोणती शिवसेना नकली तसेच कोणती एनसीपी असली आणि कोणती नकली, याचा निर्णय देखील महाराष्ट्रातील जनतेने केला असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये असलेली जवळीक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मात्र, आज अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. खरी एनसीपी कोणाची हे आता महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. पुण्यात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत लाभार्थींना मंजूरी पत्र व पहिल्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमा’त ते बोलत होते.

या वेळी अमित शहा म्हणाले की, 20 लाख कुटुंबीयांना घर देताना त्या सर्व कुटुंबीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मी अभिवादन तसेच अभिनंदन करतो. देशाच्या प्रगतीत विकासाचा पाया रचत असताना या सर्व कुटुंबांनी कामाला लागण्याचा संकल्प शहा यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्प्या दोनची सुरुवात केली आहे. देशभरात सर्वात जास्त घरे ही महाराष्ट्राला मिळाली असल्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे. याचा आम्हाला सर्वांना आनंद आणि गौरव असायला हवा, असे देखील ते म्हणाले. घराचा अर्थ केवळ चार भिंती नाही तर विकासाच्या स्वप्नाला साकार करणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येकाचे घर हे स्वर्गा सारखे तर असतेच मात्र येणाऱ्या पिढीसाठी हा विकासाचा प्रथम टप्पा देखील असतो. गरिबांना घरासोबतच शौचालय देणे म्हणजे त्यांच्या सन्मानाची आणि स्वाभिमानीची रक्षा मोदीजींनी केली असल्याचे शहा यांनी म्हटले आहे.

प्रत्येकाला घर या योजनेअंतर्गत महिला, मागासवर्गीय, एसटी, एससी, गरीब समाजाला स्वतःचे घर देण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. 2029 पर्यंत यात पाच कोटी घरे दिली जाणार आहेत. त्यातील तीन कोटी 50 लाख नागरिकांना आतापर्यंत घरे देण्यात आली आहेत. तर महाराष्ट्रात देखील आतापर्यंत तेरा लाख पन्नास हजार घरे देण्यात आली आहेत. आता 19 लाख 50 हजार घरे देण्यात येत आहेत. ही सर्व घरे वेळेत पूर्ण करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केले असल्याचे म्हणत अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे देखील कौतुक केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीत गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया उपक्रम

बारामतीत सुरू झाला रुग्णसेवेचा नवीन आयाम

बारामती, दि. 22 : आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या बालकांसाठी एक दिलासादायक उपक्रम बारामतीत सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने गरजू मुलांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

बारामतीतील मुथा हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा आणि डॉ. सौरभ मुथा यांच्या सहकार्याने मुंबईतील प्रख्यात शल्यविशारद डॉ. संजय ओक आणि त्यांचे सहकारी हे बालकांवर सेवाभावी वृत्तीने मोफत शस्त्रक्रिया करत आहेत.

शनिवार व रविवार या दोन दिवसांत ३० बालकांवर विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार असून, त्यात हर्निया, टाळूला चिटकलेली जीभ दुरुस्त करणे, तसेच शरीरावरील गाठी काढणे यासारख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तसेच डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, अनिल नवरंगे, अनिल जोगळेकर, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, प्रियांका मुथा, डॉ. अनिल मोकाशी, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी नितीन हाटे, किरण तावरे आणि प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांची उपस्थिती होती.

मोफत शस्त्रक्रियांचा उपक्रम नियमित राबवणार!

“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रेरणेतून बारामतीत हा उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प केला आहे. यामुळे गरजू बालकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल,” असे डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

उपचारांची नवी पहाट!

या अभिनव उपक्रमामुळे बारामतीतील गरजू कुटुंबांसाठी आरोग्यसेवेचे नवे दार खुले झाले आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम एक मोठी संधी ठरणार आहे.

मालपाणी इस्टेटला आकारलेला 1 कोटी 28 लाख दंड व्याजासहित वसुल कधी करणार ? रयत विद्यार्थी परिषदेचा सवाल

पुणे :
बालेवाडी येथील सर्वे नं 23 या ठिकाणी विनापरवाना रस्ते खोदाई करून विद्युत केबल 350 मी टाकण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी विनापरवाना रस्ते खोदाई करून बालेवाडी येथील मालपाणी इस्टेट या बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना खोदाई केल्यामुळे त्यास आकारलेला 1,28,01,600₹ दंडाची नोटीस 27/12/2023 रोजी पाठवण्यात आली होती तो दंड आज एक वर्ष उलटून गेले तरी बांधकाम व्यावसायिकाने दंड मनपा कोषागारात भरला नाही. पुणे मनपाने व्यावसायिकास पुन्हा एकदा नोटीस देऊन दंड व्याजासहित वसूल करावा. अन्यथा या व्यावसायिकाचे शहरात चालू असणाऱ्या मालपाणी यांच्या इतर बांधकामांना Work Stop Notice द्यावी.या बांधकाम व्यावसायिकाची कृती ही मनपा स्ट्रेचिंग पाॅलिसी भंग करणारी आहे.या व्यावसायिकाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे दंड वसुल करावा अन्यथा आम्ही येत्या काही दिवसांत न्यायालयाचा मार्ग अवलंबवू असा इशारा रयत विद्यार्थी परिषदेचे ऋषिकेश कानवटे यांनी दिला.

“न्यू इंडिया” प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडेच संशयाची सुई?

लाखो खातेदार, ठेवीदार असलेल्या मुंबईतील न्यू इंडिया सहकारी  बँकेमध्ये उघडकीस आलेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आणि रिझर्व्ह बँकेने त्याबाबत केलेली कारवाई यामुळे पुन्हा एकदा  सहकारी बँकिंग क्षेत्र व बँकिंग क्षेत्राची  नियामक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या एकूण क्षमतेविषयीच सर्वसामान्यांमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. या आर्थिक गैरव्यवहाराचा  घेतलेला  लेखाजोखा.

मुंबईतील न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात ‘स्पॉट ‘ लेखा परीक्षण केले त्यावेळी हा गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे रिझर्व्ह बँकेने न्यू इंडियाचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक व सल्लागार मंडळ नेमले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया चे माजी सरव्यवस्थापक श्री. श्रीकांत हे प्रमुख प्रशासक असून त्यांना सल्ला देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक श्री. रविंद्र व सीए अभिजीत देशमुख यांची समिती नेमली आहे.

दरम्यान बँकेला नवीन कर्ज वाटप करण्यास, मुदत ठेवी घेण्यास व कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यास मनाई केली आहे. एकंदरीतच बँकेचे व्यवहार स्थगित करण्याची कडक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान  2019 ते 2025 कालावधीत बँकेचा महाव्यवस्थापक असलेल्या हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेतर्फे  अफरातफरीबद्दल अटक करण्यात आलेली आहे. हितेश याने पदाचा गैरवापर करून अन्य साथीदारांच्या मदतीने बँकेत कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याची कबुली दिली आहे. त्याने मुंबईतील  धर्मेश  पौन या बांधकाम व्यावसायिकाला 70 कोटी रुपये दिले होते. कांदिवली येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी त्याने ही रक्कम दिल्याचे उघडकीस आल्याने धर्मेश पौन यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. परंतु या दोन व्यक्तींच्या अटकेमुळे खऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता नाही.
बँकेचे विद्यमान प्रमुख कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. वरकरणी हा घोटाळा बँकेतील अधिकाऱ्यांनी केलेला  असला तरीही याबाबत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या  नियामकाला   आर्थिक घोटाळा शोधण्यात किंवा टाळण्यामध्ये आलेले अपयश हे अत्यंत गंभीर व  महत्त्वाचे आहे.

न्यू इंडिया सहकारी बँकेच्या संबंधात एका माजी कर्मचाऱ्याने ‘ व्हिसल ब्लोअर ‘ नात्याने जानेवारी 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेकडे लेखी तक्रार करून बँकेत आर्थिक गैरव्यवहार, व्यवहारातील अनियमितता, भ्रष्टाचार व अनैतिक व्यवहार होत असल्याबाबतचे पत्र पाठवले होते. या तक्रारी मध्ये बँकेचे अध्यक्ष हिरेन भानू यांचा सहभाग असल्याचेही नमूद करण्यात आले होते. बँकांच्या विविध शाखा व्यवस्थापकांना डावलून 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जे बँकेच्या संचालक मंडळांनी दिल्याचा उल्लेख त्यात केला होता. यामध्ये बॉलीवूडमधील लोकप्रिय नटी प्रीती झिंटा हिला 18 कोटी रुपये असे कर्ज वाटप केले होते. ते थकल्यानंतर बँकेने ही रक्कम वसूल करण्याऐवजी ‘राईट ऑफ’ केलेली होती. तसेच राजहंस ग्रुप व अन्य काही उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले व ही सर्व कर्जे “अनुत्पादक कर्जे ‘म्हणून बुडीत झालेली आहेत. या तक्रारीचा संपूर्ण तपशील ‘मनी लाईफ’ या गुंतवणूक विषयक साप्ताहिकाने प्रसिद्ध केला आहे. 

एकंदरीत ही   अफरातफर अचानकपणे एका रात्रीत झालेली नाही. याबाबत रिझर्व्ह बँकेने काही वर्षांपूर्वीच ही कारवाई करणे अपेक्षित होते. विशेषतः 2021 पासून या बँकेमध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम शिल्लक असल्याचे आढळलेले होते. त्याचवेळी  बँकेच्या राखीव निधी मध्ये एक नवा पैसा नसल्याचे लक्षात आलेले होते. असे असतानाही गेल्या तीन वर्षात रिझर्व्ह बँकेच्या तपासणी पथकाने  त्याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही किंवा यात काही गडबड असल्याचे निदर्शनास आणून दिले नाही. त्यामुळे या सर्व आर्थिक घोटाळ्यामागे रिझर्व्ह बँकेच्या उच्च पदस्थांचा हात आहे किंवा कसे याचा शोध घेण्याची निश्चित वेळ आलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने याबाबत दाखवलेला निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे. किंबहुना या प्रकरणात रिझर्व्ह बँकेची अकार्यक्षमता प्रकर्षाने जाणवत असून कदाचित त्यांनी जाणून-बुजून  हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला आहे किंवा कसे हे अत्यंत गंभीरपणे शोधले पाहिजे.

न्यू इंडिया सहकारी बँकेच्या सध्या 30 शाखा असून 2022-23 या आर्थिक वर्षात बँकेला 23 कोटी रुपयांचा  निव्वळ तोटा होता तर 2023-24 या वर्षात हा निव्वळ तोटा 31 कोटी रुपयांवर गेलेला होता. एवढेच नाही तर मार्च 2024 अखेरच्या वर्षात बँकेचे कर्जवाटप 1330 कोटी रुपयांवरून 1175 कोटी रुपयांवर घसरलेले होते. मात्र ठेवींचे प्रमाण याच काळात 2406 कोटी रुपयांवरून 2436 कोटी रुपयांवर थोडेसे वाढलेले होते. बँकेमध्ये 1 लाख 30 हजार पेक्षा जास्त ठेवीदार असून 90 टक्के ठेवी पाच लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या आहेत. यामध्ये बचत खात्यात 27.95 टक्के म्हणजे 671.51 कोटी रुपयांच्या ठेवी असून चालू खात्यामध्ये 103.21 कोटी रुपये आहेत. तसेच विविध मुदतीच्या 1652.25 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्याचे प्रमाण 68 टक्क्यांच्या घरात आहे. या वर्षात बँकेचा भांडवल पर्याप्तता रेशो 9.06 टक्के होता. नियमानुसार तो किमान दहा टक्के असण्याची आवश्यकता होती. परंतु बँकेने त्याचे पालन केलेले नव्हते. बँकेचा 2023 अखेरचा जो ताळेबंद प्रसिद्ध झाला आहे त्या बँकेच्या हातात 122 कोटी रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होती. हीच रक्कम एप्रिल 2024 या वर्षाच्या अखेरीस 135 कोटी रुपयांवर गेलेली होती.

यातील आरोपी हितेश मेहता याने बँकेतून 2020 पासून रोख रकमेची अफरातफर केल्याची कबुली दिलेली आहे. अशी जर वस्तुस्थिती होती तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ला त्यांच्या दरवर्षीच्या बँकेच्या तपासणीमध्ये याबाबत काहीही सापडले नाही असे म्हणणे हे योग्य ठरणार नाही. विशेषतः रिझर्व्ह बँक जेव्हा बँकेच्या सर्व खात्यांची दरवर्षी तपासणी करत असते तेव्हा ते मुदत ठेवी, कर्जवाटप आणि त्याची वसुली,  यासह  प्रत्येक गोष्टी अत्यंत बारकाईने तपासत असते. एका माहितीनुसार रिझर्व बँकेचे तेच अधिकारी अनेक वर्षे या बँकेची तपासणी करत असून त्यांनी या बँकेला सातत्याने  ‘क्लीन चीट’ दिलेली आहे. पीएमसी बँकेमधल्या  गैरव्यवहार प्रकरणात याच तपासणी अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचे सांगण्यात येते.

रिझर्व बँकेने दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी या बँकेच्या रोख रकमेची तपासणी केलेली होती मात्र त्यांनी त्याच वेळेला बँकेचे व्यवहार गोठवणे आवश्यक होते ते काम केले नाही. या घटनेनंतर 24 तास उलटून गेल्यानंतर नियमकाने ही कारवाई केलेली आहे. याचा अर्थ या काळात काही मंडळींना बँकेतील ठेवी काढून घेण्याची संधी त्यामुळे लाभली असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात सीबीआय सारख्या संस्थेने किंवा आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने तपासणी करून बँकेतील ठेवी कोणी काढून घेतल्या याचा शोध घेतला पाहिजे. जेव्हा रोख रक्कम गायब झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले होते तेव्हाच त्यांनी का कारवाई केली नाही हा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

हा आर्थिक घोटाळा शोधून काढण्यात रिझर्व्ह बँकेला सपशेल अपयश आलेले आहे हे नाकारता येणार नाही. उलटपक्षी यामुळे रिझर्व्ह बँके मधील  अंतर्गत व्यवस्थेवर  प्रकाश पडत आहे. त्यांच्या विविध विभागांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये  योग्य समन्वयाचा अभाव असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट होत आहे. एखाद्या नागरी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम गायब होते आणि त्याच्यावर कोणीही कारवाई करत नाही यावर विश्वास बसणे केवळ अवघड आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेतल्या काही अधिकाऱ्यांचे अशा नागरी सहकारी  बँकांमध्ये “हित संबंध “आहेत किंवा कसे हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या संबंधांचा त्यांना काही लाभ होत आहे किंवा कसे याचाही शोध घेण्याची गरज आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्रात आर्थिक घोटाळा ही नवीन गोष्ट नाही. 2019 मध्ये पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये ( पीएमसी) मोठा घोटाळा झाला होता. त्या घोटाळ्यामुळे रिझर्व बँकेने देशातील सर्व नागरी  व बहुराज्य स्तरावरील सहकारी बँका आपल्या थेट नियंत्रणाखाली  घेऊन त्यांच्यावर कडक  नियंत्रण ठेवण्यास प्रारंभ केला. परंतु न्यू इंडिया सहकारी बँकेच्या प्रकरणात रिझर्व्ह बँकेची भूमिका संशयास्पद असून त्यांचे नियामकाचे पितळ उघडे पडले आहे असे वाटत आहे.  याची  केंद्रीय वित्त मंत्रालयाने वेळीच दखल घेतली नाही तर सर्वोच्च न्यायालयांमध्ये याबाबतचे दरवाजे ठोठावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लेखक-प्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

ग्रंथनगरीत पुस्तक खरेदीकडे रसिकांचा ओढा

0


मान्यवरांची हजेरी : परराज्यातील प्रकाशकांचाही सहभाग
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (दिल्ली) :
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ग्रंथनगरीमध्ये पुस्तक प्रकाशन संस्थांना विविध राजकीय नेते आणि मान्यवरांनी लावलेली हजेरी हा औत्सुक्याचा विषय ठरला. दिल्लीत स्थायिक झालेल्या मराठी जनांनी मराठी साहित्याच्या ओढीने पुस्तक दालनांना भेट देत पुस्तक खरेदीचा आनंद घेतला. तरुणाईची संख्याही लक्षवेधी होती.
प्रथमच अभिजात मराठीचे बिरूद घेऊन सुरू असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त राजधानी दिल्लीत 100 हून अधिक प्रकाशन संस्थांनी सहभाग दर्शविला आहे. त्यानिमित्ताने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई त्यांच्या पत्नी-सुप्रसिद्ध लेखिका सागरिका घोष, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, मसापचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सतीश देसाई, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या लिखित पुस्तकांचे स्वतंत्र दालनही येथे पहावयास मिळाले. महाराष्ट्रासह, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील प्रकाशन संस्थांनी दर्जेदार पुस्तकांसह सहभाग घेतला आहे.
बालभारती, मसाप तेलंगणा राज्य, वऱ्हाडी बोली-वऱ्हाड संस्था, अकोला (रावसाहेब काळे), महाराष्ट्र अंनिस, जयको पब्लीशिंग हाऊस, इंडस सोर्स बुक्स, पुस्तक वाणी, ऑडिओ बुक्स पुणे, श्री नरसिंह पंत वाङ्मय प्रकाशन व प्रसार मंडळ आदी दालनांत साहित्य प्रेमींनी लावलेली हजेरी लक्षणीय आहे. संदेश भंडारे यांचे ‌’तमाशा आणि वारी‌’ हे चित्रांचे दालन हा चित्र वाचनाचा प्रकारही रसिकांच्या पसंतीस पडला.
साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवसापासून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने उत्तम विक्री झाल्याचे प्रकाशकांनी आवर्जून सांगितले. साहित्य संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातील विविध साहित्य रसिक तसेच दिल्ली येथे स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांनी संमेलनातील विविध उपक्रमांसाह ग्रंथनगरीतील प्रकाशकांच्या स्टॉल्सला उत्साहाने भेट दिली.

कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

दिल्लीतील ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कवी कट्ट्याचे उद्घाटन

दिल्ली दि. २२ फेब्रुवारी २०२५ : दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (२३ फेब्रुवारी २०२५) महात्मा ज्योतिराव फुले सभामंडपात “कवी कट्ट्याचे” उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कवी कट्ट्याचा वर्षांचा प्रवास उलगडून दाखवला आणि मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे समन्वयक राजन लाखे व गोपाळ कांबळे यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. प्रारंभी राजन लाखे यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी मराठी भाषा संचालनालयाचे संचालक डॉ. शामकांत देवरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक ॲड. प्रमोद अदरकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष रवींद्र शोभणे उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मराठी साहित्याच्या वाढीसाठी कवी कट्ट्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात कवी कट्ट्याचा वर्षांचा प्रवास, मराठी भाषा, साहित्य, आणि मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या संघर्षाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “कवी कट्ट्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दरवर्षी मंडपाचा आकार वाढवत न्यावा लागतो, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”

त्यांनी महिला आणि साहित्य यांचा परस्पर संबंध, तसेच साहित्यिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवरही प्रकाश टाकला. त्यांनी ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे उदाहरण देत साहित्यसेवेसाठी कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले.

साहित्यिक चळवळींना बळ देण्याचा संकल्प

महिलांचे साहित्य संमेलन आणि बालकवी संमेलन आयोजित करणे, सर्व कवींना एकत्र आणणारे अखिल भारतीय कवी संमेलन भरवणे, विद्यापीठांच्या धर्तीवर साहित्य विश्वात माजी कवी-सदस्य (Alumni) संकल्पना राबवणे असे म्हणत डॉ. गोऱ्हे यांनी कवी कट्ट्याच्या पुढील वाटचालीसाठी हे महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले.

कवितेच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा

डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या काही कविता सादर करताना लोकशाही, सामाजिक जाणीव आणि सत्यासोबत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

ग्रंथदालनास भेट आणि समारोप

उद्घाटन समारंभानंतर डॉ. गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात लावलेल्या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन प्रकाशक, लेखक आणि वाचकांशी संवाद साधला.

पात्र ठरलेल्या सदन‍िकाधारकांनापीएमआरडीएकडून आवाहन

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण १३३७ शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरीमध्ये १२ फेबुवारीला १०१५ लाभार्थी पात्र झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी १७ ते २५ फेबुवारीपर्यंत सदनिका स्वीकारणे अथवा समर्पित करणेबाबत संबंध‍ितांच्या लॉग‍िनला पत्र पाठविण्यात आले आहे.

पात्र लाभार्थ्यांनी सदनिका स्वीकारल्यानंतर त्यांना तात्पुरते देकारपत्र देण्यात येणार येणार आहे. त्यामध्ये प्रथम टप्प्यातील २५% रक्कमेचा भरणा करण्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर (तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून ४५ दिवसानंतर) SBI च्या MCLR दराप्रमाणे व्याज आकारणीच्या अधिनराहून १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. या कालावधीतही (तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून ६० दिवसांत) प्रथम टप्प्यातील २५% रक्कम न भरल्यास सदनिकेचे वितरण कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल.

टप्पा १ च्या मुदतीनंतर पुढील ६० दिवसांत सदनिकेची उर्वरित ७५% रक्कम भरणे बंधनकारक आहे. सदर कालावधीतही (७५% रक्कमेकरिता ६० दिवस) अर्जदाराने ७५% रक्कम भरणा न केल्यास, १०५ दिवसांचा विहित कालावधी संपुष्टात आल्यानंतर MCLR नियमाप्रमाणे व्याज आकारणीच्या अधीनराहून अर्जदारास अधिकतम ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. ज्या अर्जदारांना १००% रक्कम एकाच वेळेस भरणा करावयाची आहे, असे अर्जदार सदर रक्कमेचा भरणा उपरोक्त नमूद केलेल्या टप्प्याच्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने त्याचा भरणा एकाच दिवशी करू येवू शकता.

कोरेगाव भीमा, डाहुलीतील अतिक्रमणावरपीएमआरडीएच्या पथकाकडून कारवाई

पुणे (दि.२२) : वाहतूक व्यवस्थेला अडचणी निर्माण करणाऱ्या कोरेगाव भीमा आणि डाहुली भागातील अतिक्रमणावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून निष्कासनाची कारवाई करण्यात आली. अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामावर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन विभागाच्या पथकाने शुक्रवारी संबंधित कारवाई केली.

अनधिकृत बांधकामे वाढत असल्याने याचा रहदारीस अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. याची पीएमआरडीएच्या पथकाने दखल घेत शुक्रवारी कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर निष्कासणाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास ३६ पत्राशेड काढण्यात आले असून काही नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. यासह डाहुली (ता. मावळ) येथील रवींद्र ओसवाल, चेतन शहा आणि विवेकानंद सोनावणे या सर्वांचे एकूण १२ हजार ९४७ चौ.फू. बांधकाम निष्कासित करण्यात आले.

पीएमआरडीएच्या अधिकारी यांचेमार्फत यापुढे अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संबंध‍ित कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाच्या स‍ह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्यासह कनिष्ठ अभियंता, पोल‍िस कर्मचारी यांनी पार पाडली. पीएमआरडीच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा सर्वे करण्यात येत असून अशा बांधकामांवर सातत्याने कारवाई होणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले आहे.

“बॉलिवूड कधीच माझा प्लॅन नव्हता, पण मुंबईतील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला.” – पापोन

·         “पापोन हे फक्त एक टोपणनाव होते, पण जेव्हा मी गुलजार साहेबांना माझे खरे नाव वापरण्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले – ‘तू दिसतोस आणि पापोनसारखा बोलतोस.'” – पापोन

मुंबई,: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार पापोन यांनी एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ मध्ये “रिदम डिव्हाईन: ग्रोइंग अप विथ म्युझिक फॉर द सोल” या सत्रात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी त्यांच्या संगीतमय संगोपन, बॉलिवूडमधील प्रवास आणि संगीताशी असलेल्या त्यांच्या खोल नात्याबद्दल विचार केला.

“मी भाग्यवान आहे की मी अशा कुटुंबात जन्मलो जिथे संगीत ही जीवन जगण्याची एक पद्धत होती. घरी ते नेहमीच मेहफिलसारखे असायचे,” तो म्हणाला. बिहू सम्राट म्हणून ओळखले जाणारे त्याचे वडील, ज्यांनी त्याला पारंपारिक आसामी सुरांपासून ते गुलाम अली आणि जगजीत सिंग सारख्या दिग्गजांपर्यंतच्या सुरांच्या दुनियेची ओळख करून दिली.

आपल्या संगीताच्या उत्क्रांतीबद्दल बोलताना, पापोनने आपल्या कलाकृतीला आकार देण्याचे श्रेय दिल्ली आणि मुंबईला दिले. “दिल्लीने मला खूप काही शिकवले – भाषा, बारकावे आणि संगीताची खोली,” तो म्हणाला. तथापि, बॉलिवूड त्याच्यासाठी कधीही नियोजित ठिकाण नव्हते. “मी कधीही बॉलिवूडसाठी निघालो नाही. येथील लोक अविश्वसनीयपणे पाठिंबा देतात – त्यांनी खरोखर माझ्यावर विश्वास ठेवला.”

त्यांच्या रंगमंचावरील नावामागील कथेबद्दल बोलताना त्यांनी खुलासा केला की ‘पापोन’ हे मूळतः एक टोपणनाव होते. जेव्हा त्यांनी दिग्गज गीतकार गुलजार यांना त्यांचे खरे नाव अंगराग महंता वापरण्याबद्दल विचारले तेव्हा गुलजार साहेब म्हणाले, “तुमचे खरे नाव सुंदर आहे, पण तुम्ही पापोनसारखे दिसता आणि ऐकता (‘तुम दिखते सुनते पापोन ही हो) आणि नावच अडकले.”

पॅपोनसाठी, संगीत हा नेहमीच एक जिव्हाळ्याचा अनुभव राहिला आहे, मग तो घरी गाणे असो किंवा हजारो लोकांसाठी सादरीकरण असो. “मैफिली हे मी घरी काही लोकांसाठी गाणे गाण्यासारखेच एक प्रकार आहे. आता, ते पाच हजार लोकांसाठी आहे, पण भावना तशीच आहे.”

या सत्राचा शेवट भावपूर्ण पद्धतीने झाला कारण पापोनने आपल्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि सर्वांना ताल आणि सुरांच्या जादूत सोडून दिले.

‘मानवतेची पुढची सीमा’ या थीमवर आधारित एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ ने वेगाने विकसित होणाऱ्या जगात भारताच्या वाढीवर चर्चा करण्यासाठी विचारवंत आणि नवोन्मेषकांना एकत्र आणले. या शिखर परिषदेत हवामान बदल, भू-राजकीय बदल आणि एआयमधील प्रगती यासह प्रमुख आव्हाने आणि संधींचा शोध घेण्यात आला. दोन दिवसांच्या या शिखर परिषदेत जागतिक विचारवंत, बुद्धिजीवी आणि बदल घडवणाऱ्यांच्या कल्पनांचा संगम झाला, ज्यामध्ये विज्ञान, औषध, सामाजिक करार आणि जागतिक नेतृत्वातील परिवर्तनात्मक शक्यतांचा समावेश होता, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ सर्वांसाठी चांगल्या, अधिक शाश्वत जगाचे धाडसी दृष्टिकोन देत होते.

“आज, कॉर्पोरेट व्यावसायिक तणावग्रस्त आणि नैराश्यात आहेत, तरीही चांगले कपडे घातलेले आहेत”-गौर गोपाल दास

मनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी गौर गोपाल दास ४ नॉट्स देतात: दुर्लक्ष करणे, वाटाघाटी करणे, नोट इट डाउन करणे आणि गैर-निर्णयात्मक निरीक्षणे

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२५ : पहिल्या दिवसाच्या जबरदस्त यशानंतर, एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भिक्षू आणि प्रेरक वक्ते गौर गोपाल दास यांनी ‘मास्टरिंग द माइंड – लिव्हिंग अवर बेस्ट लाईव्हज’ च्या “४ एन’ज” वर विशद करून केली.

२१ व्या शतकातील कॉर्पोरेट कंपन्यांच्या जीवनावर भाष्य करताना गौर गोपाल दास म्हणाले, “आज, कॉर्पोरेट व्यावसायिक तणावग्रस्त आणि नैराश्यात आहेत परंतु चांगले कपडे घातलेले आहेत कारण ते त्यांचे मन शांत करू शकत नाहीत . आपण मानसिक आरोग्य समस्यांबद्दल बोलत आहोत पण आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत नाही. निरोगी मन असणे म्हणजे मनाला विश्रांती आणि रीबूट करण्याची परवानगी देणे.”

मुलांचे व्यवस्थापन कसे करावे याचे उदाहरण देताना गौर गोपाल दास म्हणाले, “मुले सुंदर आणि गोंडस असतात, पण त्यांच्यात प्रचंड अस्वस्थ ऊर्जा असते. त्यांना सांभाळणे कठीण असते. पण मुले झोपी जातात. तुमच्या प्रत्येकाच्या आत एक मूल असते जे तुमचे मन आहे. ते सांभाळणे कठीण असते आणि तुम्ही तुमचे मन झोपवू शकत नाही. आम्ही पालक असलो किंवा नसलो तरीही आम्ही मुलाशी वागतो आहोत.”

चार मार्गांबद्दल अधिक माहिती देताना, गौर गोपाल दास म्हणाले, “पहिली पायरी म्हणजे दुर्लक्ष करायला शिकणे. तुमचे मन सतत लहान मुलासारखे तुमचे लक्ष मागत असते. जर तुम्ही तुमच्या मनाकडे जास्त लक्ष दिले तर ते अधिक लक्ष मागेल. तुम्ही तुमच्या मुलाची ऊर्जा रचनात्मक गोष्टींसाठी वापरता तेव्हा तुम्हाला तुमची ऊर्जा रचनात्मक हेतूंसाठी वापरावी लागेल. पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे याची परिपक्वता समजून घेणे. काही पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक आहे, तर काहींकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकता ज्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता नाही तेव्हा मानसिक आरोग्य येईल.”

गौर गोपाल दास यांनी मनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी इतर पायऱ्यांबद्दल सविस्तरपणे सांगितले, गौर गोपाल दास म्हणाले, “दुसरी गोष्ट म्हणजे वाटाघाटी करणे. तुम्ही तुमच्या मुलाशी जसे वाटाघाटी करता तसे तुमच्या मनाशी वाटाघाटी करायला शिकले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे नोट इट डाउन. जर्नलिंग करणे शक्तिशाली आहे. झोपण्यापूर्वी जर्नलिंग सुरू करा कारण अन्यथा तुम्ही तुमचे विचार झोपेत घेऊन जात आहात. जर्नलिंगमुळे तुम्ही ऊर्जा रिकामी करत आहात. शेवटची गोष्ट म्हणजे गैर-निर्णयात्मक निरीक्षण. जेव्हा तुम्हाला विचारांनी भरलेले वाटते, तेव्हा तुमच्या मनातील बडबड विचार आणि भावनांमध्ये वर्गीकृत करण्यास सुरुवात करा. तुम्ही विचार आणि भावनांपासून जितके दूर जाल तितके तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणे थांबवता.”

यशाची व्याख्या विचारण्यात आली असता, गौर गोपाल दास म्हणाले, “आजकाल, जास्त असणे हे यशस्वी मानले जाते. जास्त असणे, लोक जास्त वाटणे विसरून गेले आहेत. त्यांच्याकडे सर्व काही आहे, तरीही त्यांना रिकामे वाटते. यश म्हणजे जास्त असणे आणि जास्त वाटणे यातील संतुलन आहे. आपल्याला योग्य संतुलन राखावे लागेल. मनाच्या शांतीसाठी, प्रमाण महत्त्वाचे नाही; गुणवत्ता महत्त्वाची आहे.”

गौर गोपाल दास म्हणाले, “मी माझ्या वडिलांशी बोलत नव्हतो कारण ते जास्त धूम्रपानामुळे त्यांचे आरोग्य बिघडवत होते. त्यांच्या आयुष्यात माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्याकडे माफी मागू शकलो नाही. मौल्यवान असलेल्या प्रत्येक गोष्टीत, लोक सर्वोच्च मूल्याचे असतात. ते सोडून देणे आणि निरोगी नातेसंबंधांना प्राधान्य देणे ठीक आहे.”

हृदय आणि विवाहाच्या बाबींमध्ये ते कसे सल्ला देतात या प्रश्नाचे उत्तर देताना, गौर गोपाल दास म्हणाले, “मी लिंग पाहत नाही. मला पुरुषी आणि स्त्रीलिंगी ऊर्जा दिसते. काही पुरुषांमध्ये जास्त स्त्रीलिंगी ऊर्जा असते; तर काही महिलांमध्ये जास्त पुरुषी ऊर्जा असते.”

“लोकांना जे बोलायचे आहे ते बोलू देऊन मी टीका व्यवस्थापित करतो.”, असे अनेक संबंधित विषयांवर चर्चा करताना गौर गोपाल दास म्हणाले. “जेव्हा शंका असेल तेव्हा मार्गदर्शन घ्या. आत्मविश्वास आणि स्वतःला तोडफोड करणे यात गोंधळ करू नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, परंतु आपण इतरांकडून मार्गदर्शन घेण्याइतके असुरक्षित असले पाहिजे. जेव्हा ओळखीचे लोक वर्षानुवर्षे एकमेकांमध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा तुम्हाला ओळखता येते की कोण तुमचा वापर करण्यासाठी आहेत आणि जे खरोखर तुमचे हितचिंतक आहेत.”

“तुमच्या मनाचे ऐकणे थांबवू नका. तुमचे प्रश्न लोकांशी मिटवा. तुम्ही जे शोधत आहात ते तुमच्या आत आहे!” गौर गोपाल दास यांनी सत्राच्या समाप्तीचे विचार मांडले.

‘मानवतेची पुढची सीमा’ या थीमवर केंद्रित असलेल्या एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया २०२५ ने वेगाने बदलणाऱ्या जगात भारताच्या उदयातील आव्हाने आणि संधींचा शोध घेण्यासाठी विचारवंत आणि नवोन्मेषकांना एकत्र आणले. हवामान बदल, भू-राजकीय संघर्ष आणि एआय सारख्या तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, शिखर परिषदेने भारताची एक प्राचीन संस्कृती आणि भविष्य घडवण्यात लोकसंख्याशास्त्रीय शक्तीगृह म्हणून भूमिका उलगडली. दोन दिवसांच्या या शिखर परिषदेत जागतिक विचारवंत, बुद्धिजीवी आणि बदल घडवणाऱ्यांच्या कल्पनांचा संगम होता, ज्यामध्ये विज्ञान, औषध, सामाजिक करार आणि जागतिक नेतृत्वातील परिवर्तनात्मक शक्यतांचा समावेश होता, विविध क्षेत्रातील तज्ञांनी सर्वांसाठी चांगल्या, अधिक शाश्वत जगाचे धाडसी दृष्टिकोन दिले.

प्रेम, संवाद, सहवास, सहनशीलतेमुळे मराठीचा अमराठीशी सुखाने संसार !

0

साहित्य संमेलनातील परिसंवादाचा सूर

दिल्ली दि.22:  प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलतेमुळे संसार सुरळीत होतोय असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातत आयोजित ‘मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी  संसार’ या परिसंवादातून निघाला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी  “मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी संसार” या विषयावरील परिसंवादात माजी सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि डॉ. साधना शंकर, रेखा रायकर आणि मनोज कुमार , ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष, गायिका उद्योजक डॉ. मंजिरी वैद्य आणि प्रसन्न अय्यर या मान्यवरांनी सहभाग घेतला. विशेष पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे कार्यवाह  आमदार डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते. या परिसंवादाचे संयोजन अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी केले होते.

परिसंवादादरम्यान मराठी-अमराठी संसारातील संवाद, संस्कृतीतील भिन्नता, कौटुंबिक नातेसंबंधांवरील परिणाम आणि मुलांच्या भाषिक जडणघडणीसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा झाली. भाषेमुळे एकमेकांशी संवाद होत असतो त्यामुळे अधिक व्याकरणात न पडता अधिकाधिक लोकांनी संवाद आपल्या आपल्या मातृभाषेत साधला पाहिजे असे एक मत या परिसंवादात व्यक्त झाले.

परिसंवादात सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांनी वैवाहिक जीवनातील भाषिक गमतीजमती उलगडल्या, तर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी विविध भाषांमधील संवादाने समजुतीला कसा हातभार लावला याची माहिती दिली. मनोज कुमार यांनी आपणास मराठी पूर्णपणे समजत असून मराठी सिनेमा आणि नाटकाचे चाहते असल्याचे त्यांनी सांगितले. सागरिका घोष मराठीतले काही शब्द हिंदीत वेगळा अर्थ निघतो मूळ अर्थ कळल्यावर आलेले हसू रोखता आले नाही असा अनुभव सांगितला. डॉ. साधना शंकर सासुबाईंसोबत भाषेतून आणि भावनेतून झालेला संवाद एकमेकांसाठी पुरेसा होता. मराठी येत नसल्यामुळे सासुबाई मनसोक्त व्यक्त व्हायच्या, ही आठवण त्यांनी ताजी केली. डॉ. मंजिरी वैद्य तमिळ कुटुंबात गेल्यावर पाल या शब्दाला दूध असे म्हटल्याने निर्माण झालेल्या गमतीचा अनुभव त्यांनी सर्वांसमोर मांडला. सासरचे कुटुंब मोठे सर्वांनी सांभाळून घेतल्याचे रेखा रायकर यांनी सांगितले .
परिसंवादाच्या शेवटी भाषिक विविधता हा अडथळा न ठरता समृद्धीचे साधन ठरू शकतो, असा सकारात्मक सूर उमटला.

मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रातसमर्पित भावनेने काम करावे

0

मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रातील सूर

नवी दिल्ली दि २२: मराठी तरुणांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास निश्चित यश मिळते, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रात उमटला.

नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात “मराठी पाऊल पडते पुढे” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर आयोजित चर्चासत्रात बीव्हीजी समूहाचे हणमंतराव गायकवाड, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर व वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी सहभागी झाले होते.

श्री हणमंतराव गायकवाड म्हणाले, मराठी संस्कृती दहीहंडीसारखी असावी, एकमेकांना हातभार लावून पुढे नेणारी असावी. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपल्याला काय काम करायचे आहे ते ठरविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी आहे, आपल्याला ज्या क्षेत्रात आनंद मिळतो तो मिळवावा असे सांगतानाच मला रोजगार, आरोग्य व शेतकरी बांधवांसाठी काम करण्यात आनंद आहे. असे काम करा असा सल्लाही त्यांनी दिला.

मराठी तरुणांनी आपले आवडते क्षेत्र निवडावे व त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे, असे सांगून श्री गायकवाड म्हणाले, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी देशातील शेतकऱ्यांची प्रगती अत्यंत महत्त्वाची आहे. गावातच सर्व सुविधा मिळतील अशा दृष्टीने नियोजनही महत्त्वाचे आहे. गावातच उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील त्यासाठी काम करावे लागणार आहे. आपण दहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून काम करत असल्याचेही श्री गायकवाड यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करत असल्याचे सांगून श्री. गायकवाड म्हणाले, बीव्हीजी समूहाचा आठ लोकांचा प्रवास आज एक लाख लोकांपर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेतही बीव्हीजी ग्रुप काम करत असून जगभर बीव्हीजी ग्रुपच्या माध्यमातून काम विस्तारण्याचा आमचा प्रयत्न आहे. जगात खूप संधी आहेत संधीचा आपण शोध घेतला पाहिजे. कोणतेही काम लहान नाही. आपण निवडलेले काम समर्पित भावनेने करा, असे श्री गायकवाड म्हणाले.

उद्योजक श्री. रवी पंडित म्हणाले, आपण आपल्या क्षेत्रात काम करताना ते काम चांगले असेल तर तेच काम आपली ओळख निर्माण करते. आपल्या वागण्या बोलण्यातून आपले व्यक्तिमत्व ठरते. आपण आपल्या क्षेत्रात ध्येयाने प्रेरित असाल तर लोकही मागे उभे राहतात. त्यासाठी आपला उद्देश चांगला पाहिजे. नवीन उद्योजक स्वतःच्या बळावर पुढे जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा आदर्श महत्त्वाचा आहे. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे लागणार आहे. उल्लेख श्री पंडित यांनी यावेळी केला.

ज्येष्ठ पत्रकार श्री पराग करंदीकर म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात मराठी पाऊल पुढे पडते आहे ही आनंदाची बाब आहे. आपल्याला प्रगतीसाठी सर्वसामावेशक व्हावे लागणार आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातील छोट्या-मोठ्या नोंदी आपल्याला ठेवाव्या लागणार आहेत. इतिहासाचे भान ठेवून वर्तमान कवेत घेऊन भविष्याचे नियोजन करावे लागणार आहे. वर्तमानाचा वेध घेताना भविष्याची बांधणी होऊ शकते असेही ते म्हणाले.

प्रत्येकाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी व प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. आपल्याला वेळेचे नियोजन अत्यंत बारकाईने करावे लागणार आहे. प्रत्येक गोष्ट शिकण्याची वृत्ती बाळगावी यश निश्चित मिळेल असा विश्वास श्री करंदीकर यांनी व्यक्त केला.

वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी यांनी देशाने उद्योग तसेच विविध क्षेत्रातल्या प्रगतीत आपला सहभाग, उद्योजकांचे योगदान व सद्यस्थितीत सुरू असलेल्या बदलाबाबत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.

मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्राला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि करिअरच्या संधी वाढवण्यासाठी एमआयटी-डब्ल्यूपीयूने महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि टॅली एज्युकेशनसोबत सामंजस्य करार केले

0

मुंबई,: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू) येथील अर्थशास्त्र आणि वाणिज्य शाळेने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण अनुभव, उद्योग अनुभव आणि कर आणि वित्त क्षेत्रात करिअरच्या संधी प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए) सोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवी कर व्यावसायिकांकडून आयोजित इंटर्नशिप, उद्योग-नेतृत्वाखालील अतिथी व्याख्याने, कार्यशाळा आणि सेमिनारद्वारे कर आकारणीबद्दल व्यावहारिक अंतर्दृष्टी मिळू शकेल. याव्यतिरिक्त, या सामंजस्य करारांतर्गत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान आणि वास्तविक जगाच्या अनुप्रयोगातील अंतर भरून काढण्यासाठी डिझाइन केलेल्या विशेष मूल्यवर्धित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळेल.

या भागीदारीच्या महत्त्वाबद्दल बोलताना, एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सच्या डीन डॉ. अंजली साने म्हणाल्या, “महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनसोबतच्या सामंजस्य करारामुळे आमच्या विद्यार्थ्यांना कर कायदे आणि पद्धतींबद्दल व्यावहारिक अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी अमूल्य संधी मिळतात. हे सहकार्य वास्तविक जगातील कर आकारणीची त्यांची समज वाढवते, शैक्षणिक शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य यांच्यातील अंतर भरून काढते आणि त्यांना कर आणि वित्त क्षेत्रातील कुशल, नोकरीसाठी तयार व्यावसायिक बनवते.”

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाच्या बी.कॉम कार्यक्रमांमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना दोन महिन्यांच्या कालावधीत एमटीपीए द्वारे ऑफर केलेल्या प्रमाणन अभ्यासक्रमांचा फायदा होईल. याव्यतिरिक्त, एमटीपीए अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप सुलभ करण्यासाठी आपले समर्थन वाढवेल, जेणेकरून त्यांना कर आणि संबंधित आर्थिक क्षेत्रांमध्ये व्यावहारिक अनुभव मिळेल.

शिवाय, एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्सने टॅली एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडसोबत एक सामंजस्य करार केला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशनमध्ये व्यावहारिक कौशल्ये मिळतील. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या टॅली सॉफ्टवेअरमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल, ज्यामुळे ते उद्योगासाठी तयार होतील आणि त्यांची रोजगारक्षमता वाढेल.

डॉ. अंजली साने यांनी या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, “टॅली एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड सोबतचा सामंजस्य करार प्रगत शिक्षण आणि व्यावहारिक अनुभवाची दारे उघडतो, विद्यार्थ्यांना अकाउंटिंग आणि व्यवसाय व्यवस्थापनातील आवश्यक कौशल्ये प्रदान करतो. हे सैद्धांतिक ज्ञान आणि उद्योगासाठी तयार कौशल्य यांच्यातील अंतर भरून काढते, आर्थिक जगात भविष्यातील नेत्यांना प्रोत्साहन देते.”

या भागीदारी उद्योग-संबंधित शिक्षण प्रदान करण्याच्या आणि कर, वित्त आणि वाणिज्य क्षेत्रातील करिअरसाठी विद्यार्थी चांगल्या प्रकारे तयार आहेत याची खात्री करण्याच्या एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या वचनबद्धतेमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

असंघटित कामगारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य – विष्णुप्रिय रॉय चौधरी

-भारतीय जनता मजदूर सेलच्या राष्ट्रीय सचिवपदी संजय आगरवाल तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी जयेश टांक यांची नियुक्ती

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कामगारांच्या हितासाठी कार्यरत आहेत. त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून संघटित आणि असंघटीत मजुर, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता मजदूर सेल कायम कामगार हितासाठी प्रयत्नशील राहिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या कामगार हिताच्या १६७ योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करत असून असंघटित कामगारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य असल्याचे भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय चेअरमन विष्णुप्रिय रॉय चौधरी यांनी सांगितले.

भारतीय जनता मजदूर सेलच्या राष्ट्रीय सचिवपदी पुण्यातील संजय आगरवाल तर महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष पदी जयेश टांक यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांचा नियुक्ती पत्र प्रदान सोहळा आज शुभारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत विष्णुप्रिय रॉय चौधरी बोलत होते. यावेळी अखिल भारतीय जनता मजदुर (सेल) अध्यक्ष अर्णब चॅटर्जी, युवा अध्यक्ष दीपक शर्मा, महाराष्ट्र महिला अध्यक्ष सविता पांडे, उमेश शहा,अशोक राठी,सुनील ज्यांज्योत,दिलीप आबा तुपे,नितीन शितोळे,राजेंद्र गिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना विष्णुप्रिय रॉय चौधरी म्हणाले, राज्य व केंद्रातील सरकार कामगारांचे हित जोपासण्यावर भर देत आहेत, मात्र कंत्राटी कामगार आणि असंघटीत कामगारांचे प्रमाण मोठे आहे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा सेल प्रयत्नशील आहे. देशात सरकारच्या विविध योजना असंघटीत कामगारांसाठी आहेत, परंतु त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत, त्या पोहचल्या पाहिजे यासाठी आम्ही प्राधान्य क्रमाने काम करण्याचे ठरवले आहे. पीएफ, इएसआय आदि बाबी कामगारांना मिळतात किंवा नाही हे तपासण्याचे काम आम्ही करत आहोत, कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

अर्णब चॅटर्जी म्हणाले, महाराष्ट्रात सेलचे काम चांगले सुरू आहे. मागील तीन वर्षात आम्ही राज्यात २०० पेक्षा अधिक जास्त शाखा सुरू केल्या आहेत. इतर कामगार संघटनेच्या तुलनेत आम्ही चांगले काम करत असल्याने विविध प्रकारच्या कामगार निवडणूक मध्ये चांगले यश मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील, देशातील कामगारांचे हित जोपासण्यासाठी आणि संघटनेच्या वाढीसाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना कामगार, मजुर लोकांपर्यंत पोहवण्याचे काम करू असे संजय आगरवाल आणि जयेश टांक यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.