Home Blog Page 641

आधुनिकीकरणपेक्षा संस्कृती रक्षण अधिक महत्त्वाचे:ज्येष्ठ उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल

: श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर जीवनगौरव पुरस्कार सोहळा 

पुणे: आजच्या काळामध्ये आपण टीव्ही सुरू केल्यानंतर अनेक नकारात्मक बातम्या पाहायला मिळतात, अशा गोंधळलेल्या आणि नकारात्मक वातावरणात आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट करत आहे. त्यामुळेच या देवस्थानच्या विविध उपक्रमांच्या मी पाठीशी कायमच उभी असते. आधुनिकीकरणापेक्षा संस्कृती रक्षण करणे आज अधिक महत्त्वाचे आहे, अशी भावना ज्येष्ठ उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्ता शोभा धारिवाल यांनी व्यक्त केली.

शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र संगीत महोत्सवात वृद्धेश्वर सिद्धेश्वर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शोभा धारिवाल बोलत होत्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मुख्य चोपदार राजाभाऊ रंधवे, शिवाजीनगर चे आमदार सिद्धार्थ शिरोळे, ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते, आर्किटेक्ट शिरीष केंभवी यावेळी उपस्थित होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांना सामाजिक क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार तर परमपूज्य श्री योगीराज भाऊ महाराज परांडे यांना धार्मिक क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.

शोभा धारिवाल म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या महान व्यक्तीने बलिदान देऊन आपली संस्कृती टिकवण्याचे काम केले. आज याच संस्कृतीचे संवर्धन करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. केवळ आधुनिकीकरण करून संस्कृतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. संस्कृती टिकली तर आपण टिकणार आहोत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती रक्षणाचे करत आलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे.

राजाभाऊ रंधवे चोपदार म्हणाले, पुण्यामध्ये शेकडो देवस्थान आहे. त्यांच्याकडे हजारो एकर जमिनी आहेत या जमिनी जर मराठवाडा आणि विदर्भातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेच्या माध्यमातून उपयोग करून दिला तर त्यांना निश्चितच याचा फायदा होईल. असाच एक उपक्रम वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान हे अभ्यासिकेच्या माध्यमातून हाती घेणार आहे. त्यांच्या या अभ्यासिकेमुळे भविष्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, समाजामध्ये अनेक व्यक्ती आपापल्या परीने राष्ट्र निर्मितीचे काम करीत असतात हे काम करणाऱ्या व्यक्तींना प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे कार्य वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान करत आहे, त्यांचे हे कार्य समाजासाठी निश्चितच महत्त्वाचे आहे.

हनुमंत बहिरट पाटील म्हणाले, महापालिकेपासून ते मेट्रो पर्यंत अनेक प्रशासकीय अडचणी देवस्थान समोर आल्या, परंतु विश्वस्त मंडळाने या सर्व अडचणींवर मात करून मंदिराच्या परिसराचा विकास करण्यावर भर दिला. त्याचेच आज फलित  दिसत आहे. समाजातील अनेक व्यक्तींना एकत्र आणून देवस्थानचे विकास करण्याचे उद्दिष्ट भविष्यातही साध्य करण्यात येणार आहे.

मराठी उद्योजकांनी निर्यात क्षेत्रातील संधींचा फायदा वेळीच घ्यावा – धनंजय दातार

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२५ – भारताची निर्यात गेल्या दशकभरात विक्रमी वाढून ऎतिहासिक उच्चांकी पातळीला पोचली आहे आणि पुढील दशकातही हा वेग टिकून राहण्याची चिन्हे आहेत. भारतात व विशेषतः महाराष्ट्रात निर्य़ातीस अनुकूल अशा महत्त्वाच्या घडामोडी घडत असून त्या संधींचा फायदा मराठी व्यावसायिक व उद्योजकांनी वेळीच घ्यावा, असे आवाहन दुबईस्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकतेच येथे केले.

‘मिती ग्रुप’तर्फे आयोजित ‘महाराष्ट्र बिझनेस एन्क्लेव्ह २०२५’ परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या यशस्वी उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. माटुंग्यातील ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील नामवंत तसेच नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय अर्थव्यवस्था पुढील दोन-तीन वर्षांत ५ लाख कोटी रुपये उलाढालीची करण्याचे उद्दिष्ट असून त्यात निर्यातीचा महत्त्वाचा वाटा असेल, असे सांगून डॉ. दातार म्हणाले, “ सरकारने निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. नवे परकी व्यापार धोरण अस्तित्वात आले आहे. उद्योग-व्यवसाय-व्यापार यासाठी गरजेच्या पायाभूत सुविधांचा दहा वर्षांपूर्वी हाती घेतलेला विकास पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे वस्तू व सेवांची देशांतर्गत उलाढाल, तसेच परदेशांना निर्यात आगामी काळात अनेकपटींनी वाढणार आहे. इंडिया-मिडल इस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसारखा (आयएमइइसी) प्रकल्प दशकभरात साकारला तर भारतातून युरोपला होणाऱ्या निर्यातीचा कालावधी निम्मा होईल आणि खर्चही वाचेल. देशातील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे तर महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग प्रकल्पही पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. नवी मुंबई येथे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. नुकताच जाहीर झालेला वाढवण बंदर व आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक निर्य़ातीत अग्रेसर बनवणार आहे. हा सर्व विकास येत्या पाच-दहा वर्षांत फलदायी होणार असल्याने मराठी उद्योजकांनी निर्यातीच्या संधी साधायला हव्यात.”

ते पुढे म्हणाले, “दुबईतील ‘जेबेल अली’ बंदराची उभारणी, तसेच नवी मुंबईतील ‘जेएनपीटी’ बंदराची उभारणी झाल्यावर आजूबाजूच्या परिसराचा वेगवान विकास मी पाहिला आहे. आताही वाढवणसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर साकारल्यावर मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या पट्ट्यात विकासाची गंगा जोमाने वाहणार आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि निर्यातेच्छुक उत्पादक यांनी ही संधी सोडू नये, अन्यथा ‘गंगा दारातून वाहिली, पण अंघोळ करायची राहिली’ अशी हळहळ वाट्याला येईल. नवउद्यमींनी आताच निर्यातीचे प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू केल्यास दहा वर्षांत तो प्रस्थापित उद्योग बनेल आणि समृद्धीची फळे चाखता येतील. त्याखेरीज मालवाहतूक, बांधकाम, पूरक उद्योग, सामग्री पुरवठा, शीतगृहे, पर्यटन, कृषी उत्पादने प्रक्रिया अशा विविध क्षेत्रांत व्यापार व रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. डॉलरच्या तुलनेत घटलेला रुपया, उत्पादकांना मिळणारा करपरतावा, सरकारची प्रोत्साहक धोरणे या पार्श्वभूमीवर निर्यात उद्योग सुरू करायला सध्याचा काळ अनुकूल आहे. व्यवस्थापन शिक्षण संस्था तसेच व्यापारी संस्थांनी नवउद्योजकांना निर्यातवृद्धीसाठी मार्गदर्शन वाढवले पाहिजे.”

‘मिती ग्रुप’च्या उत्तरा मोने यांनी घेतलेल्या मुलाखतीत डॉ. दातार यांनी आपला उद्योजकीय प्रवास, त्यातील अनुभव व संघर्ष, परदेशी बाजारपेठांचा अभ्यास व त्यानुसार व्यवसायात केलेले बदल विशद केले. परदेशात व्यवसाय करताना येणाऱ्या आव्हानांना कसे तोंड द्यावे, तेथील नियम, कर, धोरणे यांची माहिती कशी करुन घ्यावी याचे मार्गदर्शन त्यांनी केले. परिषदेत जागतिक बाजारपेठेतील संधी, नेतृत्व व संघटन कौशल्य, डिजीटल व्यवसाय व विपणन, व्यवसायातील आर्थिक व्यवस्थापन व शाश्वतता यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरही परिसंवाद झाले.

काश्मीर ते कन्याकुमारी हा सर्वात जलद ३,८२३ किमीचा ईव्ही ड्राइव्ह फक्त ७६ तास ३५ मिनिटांत रेकॉर्ड केला.

प्रवासात २० विक्रम गाठले

भारतातील विस्तारत चाललेले सार्वजनिक चार्जिंग नेटवर्क प्रदर्शित करते: महामार्गांवर जलद गतीसह अधिक चार्जिंग पॉइंट्स

कन्याकुमारी, २८ फेब्रुवारी २०२५: भारतातील सर्वात मोठी चारचाकी वाहन उत्पादक आणि भारतातील ईव्ही उत्क्रांतीची प्रणेती TATA.ev ने आज भारताच्या स्वतःच्या एसयूव्ही कूप, Curvv.ev च्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी हा सर्वात जलद ईव्ही ड्राइव्ह फक्त ७६ तास ३५ मिनिटांत (पूर्वीचा विक्रम धारक, पूर्वीचा नेक्सॉन ईव्ही मॅक्सपेक्षा १९ तासांपेक्षा कमी) नोंदवला. भारताच्या संपूर्ण लांबीवर सर्वात जलद ३,८०० किमी अंतर कापण्याव्यतिरिक्त, Curvv.ev ने २० राष्ट्रीय विक्रम यशस्वीरित्या प्रस्थापित केले.

हा उल्लेखनीय प्रवास पूर्ण करताना, Curvv.ev ला फक्त १६ चार्जिंग थांबे लागले, ज्यामध्ये चार्जिंगसाठी सरासरी वेळ २८ तासांवरून १७ तासांपर्यंत कमी झाला, ज्यामुळे बॅटरी तंत्रज्ञानातील प्रगतीच दिसून आली नाही तर भारतातील व्यापक सार्वजनिक चार्जिंग नेटवर्क देखील प्रदर्शित झाले, ज्यापैकी बहुतेक आता महामार्गांवर जलद चार्जिंग गतीला समर्थन देतात.

श्रीनगरमध्ये औपचारिक ध्वजारोहण झाल्यानंतरजम्मू आणि काश्मीरचे माननीय मुख्यमंत्री श्री. ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते, Curvv.ev ने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ४:०० वाजता आपला प्रवास सुरू केला. TATA.ev कडून आलेले हे प्रमुख विमान वेगवेगळ्या हवामान परिस्थिती, विविध भूप्रदेश आणि भारताच्या सार्वजनिक चार्जिंग नेटवर्कमधून प्रवास करत २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८:३५ वाजता कन्याकुमारी येथे पोहोचले, जिथे ते तिरु यांनी स्वागत केले. विजय वसंत, खासदार, कन्याकुमारी .

या रोमांचक मोहिमेबद्दल बोलताना, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे ​​मुख्य व्यावसायिक अधिकारी श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, “ ईव्हीसह लांब इंटरसिटी ड्राइव्ह किती सहज, कार्यक्षम आणि आरामदायी असू शकतात हे दाखवण्यासाठी आम्ही या रोमांचक नॉन-स्टॉप प्रवासाला सुरुवात केली. दररोज अंदाजे १,२०० किमी अंतर कापण्याच्या योजनेसह, नाविन्यपूर्ण acti.ev शुद्ध ईव्ही आर्किटेक्चर आणि ५५ किलोवॅट प्रति तास बॅटरीने समर्थित Curvv.ev ने प्रवाशांसाठी हे सहनशक्ती आव्हान सुरळीत आणि थकवामुक्त केले. सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधा १८,००० पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्सपर्यंत वाढल्यामुळे, Curvv.ev ने पार केलेल्या १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्याला जलद-चार्जर्सने विद्युतीकरण करण्यात आले. या व्यतिरिक्त, Curvv.ev ला वेगाने वाढणाऱ्या हाय-स्पीड चार्जिंग नेटवर्क आणि गुळगुळीत महामार्गांच्या सोयीचा देखील फायदा झाला. या उल्लेखनीय कामगिरीने हे सिद्ध होते की टाटा ईव्ही आयसीई-चालित वाहनाच्या बरोबरीने इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करू शकते, रेंजची चिंता किंवा चार्जिंग पायाभूत सुविधांबद्दलच्या चिंता दूर करते आणि लांब रस्त्याच्या प्रवासात आराम आणि खर्च कार्यक्षमता वाढवते. आम्ही आमच्या स्वतःच्या विक्रमाला १९ तासांनी मागे टाकू शकलो ही गोष्ट ईव्ही तंत्रज्ञानाची आणि त्याच्या परिसंस्थेची परिपक्वता दर्शवते. आम्हाला विश्वास आहे की Curvv.ev द्वारे सादर केलेले हे उत्कृष्ट प्रदर्शन संभाव्य ग्राहकांमध्ये ईव्ही खरेदी करून शून्य उत्सर्जन गतिशीलता स्वीकारण्याचा आत्मविश्वास वाढवेल आणि ईव्ही मालकांमध्ये अभिमान निर्माण करेल.

भारताच्या ईव्ही कथेतील विद्युतीकरण प्रगती

  1. गेल्या विक्रमी धावण्यापासून भारतातील चार्जिंग पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. २०२३ मध्ये Nexon.ev साठी, चार्जिंग पायाभूत सुविधांमध्ये सर्वात इष्टतम मार्ग ४,००४ किमी होता. या विक्रमी धावण्यामुळे, Curvv.ev साठी अंतर ३,८२३ किमी पर्यंत कमी झाले कारण चार्जर शोधण्यासाठी इष्टतम मार्गात कमी विचलन करावे लागले. चार्जर्सच्या वाढत्या संख्येमुळे ICE आणि EV मधील इष्टतम प्रवास अंतर कमी करण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवास EV साठी जवळजवळ तितकेच कार्यक्षम झाले आहेत.
  2. सध्या १८,००० चार्जर्ससह, भारतातील चार्जिंग पायाभूत सुविधा २०२३ च्या तुलनेत २२७% ने सुधारल्या आहेत, विशेषतः जलद उच्च-शक्तीच्या ६०-१२० किलोवॅट चार्जर्सच्या समावेशासह.
  3. भारतातील ८५% राष्ट्रीय महामार्गांवर दर ५० किमीवर जलद चार्जर आहे.
  4. iRA.ev अॅपच्या चार्ज पॉइंट अ‍ॅग्रीगेटरमुळे ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी वाढतो, जो १२,००० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स मॅप करतो आणि कार्यक्षम मार्ग नियोजनासह वाहनांसाठी अनुकूल अंतर्दृष्टी देतो. याव्यतिरिक्त, .ev व्हेरिफाइड चार्जर प्रोग्राममुळे लांब प्रवास अधिक अंदाजे झाले आहेत, जो प्रत्येक चार्जरला विश्वसनीय चार्जिंग, मूलभूत सुविधांची उपलब्धता आणि सुलभ स्थानांवर आधारित मूल्यांकन करतो.
  5. TATA.ev युनिफाइड RFID कार्डमुळे EV मध्ये चार्जिंग सुरू करण्यासाठी विविध CPO कडून स्वतंत्र अनुप्रयोगांमध्ये प्रवेश करण्यासाठी इंटरनेटवर अवलंबून न राहता सोयी वाढल्या.

Curvv.ev ची यशस्वी K2K रन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वाढीव श्रेणी प्रदान करून भारताच्या EV इकोसिस्टमला पुढे नेण्याच्या TATA.ev च्या वचनबद्धतेला आणखी बळकटी देते. भारतातील पहिली SUV Coupe जवळच्या टाटा मोटर्स डीलर किंवा TATA.ev स्टोअरमध्ये उपलब्ध आहे ज्याची किंमत INR 17.49 लाख पासून सुरू होते. अधिक जाणून घेण्यासाठी, येथे भेट द्या: https://ev.tatamotors.com/curvv/ev.html

सहकार क्षेत्राला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ:राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे

पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) तर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन

पुणे : सहकार विषयासंदर्भात यापूर्वी केंद्र शासनाशी संबंध येत नव्हता. सर्व अडी-अडचणींसंदर्भात आम्ही राज्य शासनाशी संपर्कात असायचो. मात्र, सन २०१८ पासून केंद्राशी संबंधात आहोत. दररोज चांगले निर्णय होत आहेत. सहकार क्षेत्राला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ आहे. नवनवीन ठिकाणी नागरी सहकारी बँकांची स्थापना व्हावी, याकरिता केंद्र शासन प्रयत्नशील असून सहकार्य देखील करीत असल्याचे मत राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी व्यक्त केले.

पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) च्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‘सहकारी बँकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता- एक गेम चेंजर’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन हॉटेल शेरेटन ग्रँड येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य हौसिंग सोसायटी फेडरेशनचे लि. चे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, संचालक निलेश ढमढेरे, रमेश वाणी, बाळकृष्ण उंदरे, मंगला भोजने, डॉ. प्रिया महिंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते.

परिषदेचे उद्घाटन सहकार व तंत्रज्ञानरुपी रोपाला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमात सहकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले नवनियुक्त आमदार हेमंत रासने, पुणे बार असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड.हेमंत झंझाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध भागातील ३५० बँकांच्या प्रतिनिधींचा सहभाग या परिषदेमध्ये होता.

दीपक तावरे म्हणाले, सहकारी बँकांची क्षमता केवळ आकडयांमध्ये न मोजता त्यांचे सोशल आॅडिट होणे गरजेचे आहे. सर्व प्रकारचे धोके पत्करुन गरजूंना या बँका मदत करतात. यातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य उभे रहात आहेत. सहकारी बँकांची ही चांगली बाजू लोकांसमोर यायला हवी. आता आपण डिजिटल क्षेत्रात गेलो आहोत. सेवा आणि नोंदी या डिजिटल स्वरुपात द्यायला हव्या. एआय च्या माध्यमातून परदेशात अनेक ठिकाणी व्यवहार सुरु आहेत. त्याप्रमाणे आपण देखील यातून पुढचे पाऊल टाकायला हवे.

हेमंत रासने म्हणाले, बँकिंग क्षेत्रातील अडचणी आपल्याला माहित आहेत. केंद्र सरकारला सहकार व ही चळवळ वाढवायची आहे. त्यामुळे सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली. सर्वसामान्यांना बँकिंग खुले करणारे हे क्षेत्र असल्याने केंद्राचे सहकाराकडे विशेष लक्ष आहे. सहकाराशिवाय उद्धार नाही, असे आपण मानतो. त्यामुळे सहकार वाढविणे आणि टिकविणे हे आपले काम असल्याचे त्यांनी सांगितले. सुहास पटवर्धन म्हणाले, आपल्याकडे मूळ बुद्धिमता आहे. एआय मुळे नोक-या जातील, असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळे एआय सारख्या कृत्रिम बुद्धीमत्तेचा योग्य वापर केल्यास कोणाच्याही नोक-या जाणार नाहीत.

अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, सहकारात सहकार हा मंत्र जपण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. बँकिंगमध्ये सर्वत्र डिजिटायझेशन सुरु आहे. यामध्ये आता एआय चे नवे पर्व सुरु होत आहेत. त्यात आपण मागे राहता कामा नये. पूर्वी बँकेत येऊन प्रत्यक्ष काम चालत होते. मात्र, आता ग्राहकांचे बँकेत येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बँकेत न जाता बँकिंग करण्याची सवय आहे. शाखा बँकिंग राहिल की नाही, हा प्रश्न देखील आहे. नागरी सहकारी बँकांच अस्तित्व टिकवणे, हा अशा परिषदांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. निलेश ढमढेरे यांनी आभार मानले.

हायसेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटच्या नावाने वाहनधारकांची लूट तात्काळ थांबवा

0

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी.

इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हायसेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी तिप्पट शुल्क का? जीएसटी का लपवला?

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी २०२५
भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेची लूट करण्याची एकही संधी सोडत नाही. जनता आधीच महागाईने त्रस्त असताना आता वाहनधारकांच्या खिशावर सरकारची नजर पडली आहे. वाहनांच्या हायसेक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर दुपटीपेक्षा जास्त असून हे शुल्क नाही तर ‘जिझिया’ करच आहे असा आरोप करून हे शुल्क कमी करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी हायसेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बंधनकारक करण्यात आली आहे. या उपक्रमाचा हेतू चांगला वाटत असला तरी या आडून राज्यातील वाहनधारकांची अक्षरशः लूट सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने या नंबरप्लेटसाठी आकारलेले शुल्क हे इतर राज्यातील शुल्काच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट आहे. शेजारच्या गोवा राज्यात दुचाकीसाठी १५५ रुपये आकारले जातात तर महाराष्ट्रात हाच दर ४५० रुपये आहे. तीनचाकी वाहनांसाठी गोव्यात १५५ रुपये तर महाराष्ट्रात ५०० रुपये तर चारचाकी वाहनांसाठी गोव्यात २०३ रुपये आणि महाराष्ट्रात ७४५ रुपये आकारले जातात. आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब राज्यातही महाराष्ट्रापेक्षा कमी दर आकारले जातात. मग महाराष्ट्रातच हे दर दुप्पट वा तिप्पट आकारण्याचे कारण काय? या नंबरप्लेटसाठी १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे पण ही बाब आरटीओंनी लपवली आहे, हा भुर्दंडही वाहनधारकाच्या माथीच लादलेला आहे.

नंबर प्लेटचे कंत्राट सुद्धा मंत्रिमंडळ स्थापन्याची घाई सुरु असताना देण्यात आले आहे. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी संगनमताने यास मंजुरी दिली आहे. यासाठी कंत्राटदाराला दिलेले लेटर ऑफ इंटेट व वर्क ऑर्डर जाहीर करावी. या नंबरप्लेट साठी वाहनधारकांना दिलेली मुदत वाढवावी, इतर जाचक अटी काढाव्यात व या नंबरप्लेट सहज उपलब्ध कशा होतील याकडे लक्ष द्यावे. ही नंबर प्लेट ३१ मार्चनंतर वाहनावर नसल्यास ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे, दंडाची ही रक्कमही जास्त आहे. कोणताही नवीन बदल करताना जनतेला नाहक त्रास होणार नाही याचा विचार केला पाहिजे पण या प्रकरणात तसे होताना दिसत नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या पत्रात केली आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) आणि गोवा सरकार यांच्यात बीएफएसआय क्षेत्रासाठी ‘स्टुडंट स्किलिंग प्रोग्रॅम’ लाँच करण्यासाठी करार

गोवा-पणजी – नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) आणि गोवा सरकार यांनी ‘स्टुडंट स्किलिंग प्रोग्रॅम’ लाँच करण्यासाठी करार केला असून त्याअंतर्गत गोव्यातील तरुणांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रासाठी सक्षम करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला असून त्यामुळे उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये तरुणांना शिकवण्याच्या दृष्टीने लक्षणीय पाऊल टाकण्यात आले आहे. तरुणांचा कौशल्य विकास करण्यासाठी एनएसईबरोबर करार करणारे गोवा हे उत्तराखंड, उत्तराखं, मेघालय, छत्तीसगढ आणि आसामनंतरचे पाचवे राज्य आहे.

या करारावर श्री. भूषण के सवाईकर, संचालक, डिरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन, गोवा सरकार आणि श्री. श्रीराम कृष्णन, प्रमुख व्यवसाय विकास अधिकारी, एनएसई यांनी सह्या केल्या. यावेळी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. हा करार गर्व्हन्मेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सांखळी, गोवा येथे करण्यात आला.

गोव्याची आर्थिक यंत्रणा वेगाने विस्तारत असून तरुणांचा योग्य कौशल्यांसह विकास करून या क्षेत्राला लक्षणीय योगदान देण्यासाठी सज्ज आहे. एनएसईचा स्टुडंट स्किलिंग प्रोग्रॅम गोवा सरकारच्या मानवी भांडवल उभारण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत असून त्यामुळे आर्थिक स्वास्थ्या आणि सामाजिक चालना मिळण्यास मदत होणार आहे. एनएसई आणि गोवा राज्याने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचे ठरवले असून कौशल्य विकास व राज्यातील तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगार संधी यातील दरी सांधण्यासाठी बांधील आहे.

स्टुडंट स्किलिंग प्रोग्रॅम दोन टप्प्यांत घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २० तासांच्या ट्रेनिंग प्रोग्रॅमचा समावेश असून तो पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘फाउंडेशन कोर्स इन बीएफएसआय’चे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक वित्तीय कौशल्ये आत्मसात करता येतील आणि त्याद्वारे वैयक्तिक तसेच व्यावसायिक विकास साधता येईल. दुसऱ्या टप्प्यात ३० तासांच्या अत्याधुनिक ट्रेनिंग प्रोग्रॅमचा समावेश असेल. हा प्रोग्रॅम विद्यार्थ्यांना एनएसआयएम रेग्युलेटरी परीक्षेसाठी तयार करण्याच्या दृष्टीने बनवण्यात आला आहे. यशस्वी उमेदवारांना उद्योगक्षेत्रासाठी प्रमाणित असलेले प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यामुळे भांडवली बाजारपेठेत रोजगार मिळवण्याच्या त्यांच्या संधी वाढतील.

एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, ‘गोवा सरकारबरोबर करण्यात आलेली ही भागिदारी बीएफएसआय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा अभाव कमी करण्याची आमची बांधिलकी दर्शवणारा आहे. दर्जेदार आणि प्रमाणबद्ध प्रशिक्षण उपलब्ध करून आम्ही भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ तयार करण्याचे व आर्थिक क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.’

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि गोवा सरकार यांच्यात करण्यात आलेला हा सामंजस्य करार गोव्यातील तरुणांना आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सक्षम करण्याच्या आमच्या ध्येयाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. या स्टुडंट स्किलिंग प्रोग्रॅममुळे आमच्या गुणवत्तापूर्ण तरुणांना चांगले करियर करता येईल तसेच भांडवली बाजारपेठेची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल. एनएसईसारख्या संस्थेबरोबर करार करत आम्ही विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि उद्योगक्षेत्रातील मापदंड व नव्या गरजांशी सुसंगत प्रशिक्षण मिळेल याची काळजी घेतली आहे. हा करार गोव्याचे नॉलेज हबमध्ये रुपांतर करत तरुणांना आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सक्षम करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाशी अनुकूल आहे. ’

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रयोग करण्यात दंग झाले नवीन मराठी शाळेतील भावी वैज्ञानिक

पुणे : शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. इ वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू ,विविध वैज्ञानिक खेळणी यांचे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांपैकी उत्कृष्ट प्रयोगांचे प्रदर्शन नवीन मराठी शाळेत भरविण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वकील, पत्रकार , नाट्य दिग्दर्शक, लेखक, व्याख्याता असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले मा.श्री. दीपक चैतन्य हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तसेच नागेश चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख श्री.नागेश चव्हाण हे सुद्धा या कार्यक्रमाला सपत्नी उपस्थित होते. नागेश चव्हाण सरांच्या नागेश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मेडल्स ट्रॉफी व प्रशस्तीपत्रके देण्यात आली. तसेच बालाजी मंदिराचे ट्रस्टी व १९६२ सालचे माजी विद्यार्थी श्री.प्रदीप असावा व आजी पालक श्री. दिनेश निसंग हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन,दीप प्रज्वलन व सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना, “आपली जिज्ञासा जागृत ठेवून प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवा, विज्ञानाची कास धरा, देशाची प्रगती करा.” असे सांगितले.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले.
पवनचक्की,सूर्यचूल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे, ठिबक सिंचन, सोलर पॅनल, पाण्याचे शुद्धीकरण, धुराचा गजर, हायड्रोलिक पार्किंग सिस्टम,जलचक्र,सूर्यमाला,बिजांकुरणतरंगणे-बुडणे, पाण्याची घनता, हवेचा दाब,प्रकाशाचे अपवर्तन,आंतरेंद्रिये ,
फुफ्फुसाचे कार्य अशी विविध मॉडेल्स प्रयोग सादर केले.त्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिक सादरीकरण प्रदर्शनाचे प्रमुख अतिथी चैताली कुलकर्णी व मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ” चला मुलांनो सफर करूया विज्ञानाच्या दुनियेची”या विज्ञान गीताचे इ.१ ली ते ४ थी मधील गीतमंचाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. शिवनेरी वर्गातील शार्दुल दळवी या विद्यार्थ्याने विज्ञान दिनाची माहिती सांगितली. तसेच इ.१ली अननस वर्गातील चि. सार्थक खांबे हा विद्यार्थी डॉ.सी.व्ही. रामण यांच्या वेशभूषेत आला होता. दिनेश निसंग सरांनी आणलेल्या रोबोट ने वेगवेगळ्या शारीरिक हालचाली सादर करत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. श्री. नागेश चव्हाण सरांनी प्रयोग सादरीकरण करणाऱ्या मुलांचे कौतुक केले.
श्री. दीपक चैतन्य विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रयोग सादरीकरण करणाऱ्या मुलांचे कौतुक केले. तसेच अल्बर्ट आईन्स्टाईन या वैज्ञानिकाची गोष्ट मुलांना सांगितली. मान्यवरांच्या हस्ते बाल वैज्ञानिकांना बक्षिसे देण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांनी सर्वांना विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.प्रिया मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली जाधव अतिथी परिचय करून दिला. स्वप्ना वाबळे यांनी बक्षीस वाचन केले. मनीषा कदम यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. तनुजा तिकोने,धनंजय तळपे यांनी नियोजन सहाय्य केले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून इ.१ली अननस वर्गाचे “गोष्टी मुलांच्या मनातल्या” व २ री चातक वर्गाचे “गणितीय गोष्टी” या मुलांनी लिहिलेल्या गोष्टींच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.शाळेत भरविण्यात आलेली विज्ञान प्रयोग प्रदर्शनी पुढील १ दिवस पालकांसाठी देखील खुली असणार आहे अशी माहिती मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी दिली.

मेट्रो स्‍टेशन कनेक्‍टीव्‍हिटीसाठी रिक्षा चालकांचा पुढाकार : बाबा कांबळे

  • मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्‍या सोबत सकारात्‍मक चर्चा

पिंपरी ! प्रतिनिधी –
घरापासून मेट्रो स्‍टेशन पर्यंत येण्यासाठी नागरिकांना शेअर रिक्षाद्वारे रिक्षा चालकांकडून सेवा दिली जाईल. त्‍यासाठी रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करणार आहे. नागरिकांना घरापासून मेट्रो स्‍टेशनपर्यंत कनेक्‍टीव्‍हिटी सुलभ होण्यासाठी रिक्षा चालक पुढाकार घेतील, असा सकारात्‍मक प्रतिसाद महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.

पुणे मेट्रोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्‍या सोबत बाबा कांबळे यांच्‍या नेतृत्‍त्‍वाखाली महाराष्ट्र रिक्षा पंचायत या संघटनेची बैठक पार पडली. पुण्यात पार पडलेल्‍या या बैठकीत मेट्रो स्‍टेशनपर्यंत येण्यासाठी नागरिकांना रिक्षा चालकांनी सेवा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या वेळी पुणे शहर कार्याध्यक्ष विलास केमसे, शहराध्यक्ष मोहंम्‍मद शेख, सचिव अविनाश वाडेकर आदी या वेळी उपस्‍थित होते.

या बैठकीत बोलताना मेट्रोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्‍हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दिवसाकाठी लाखो प्रवाशांची नोंद पिंपरी ते स्‍वारगेट दरम्‍यान प्रवासाची होत आहे. नोकरदार वर्गासोबतच विद्यार्थी, महिला, वयस्‍कर नागरिकांनाही याचा मोठा फायदा होत आहे. मात्र घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठी नागरिकांना स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागतो. त्यांना इतर साधने उपलब्ध नाहीत. त्‍यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. स्‍वतःची वाहने आणल्‍याने मेट्रो स्‍थानकाजवळच वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होईल, अशी भिती आहे. या प्रवाशांना रिक्षा चालकांनी पारदर्शक, सुलभ मीटर प्रमाणे व शेअर रिक्षा सेवा दिल्यास प्रवाशांची गैरसोय दुर होईल. तसेच रिक्षा चालकांनाही मोठा आर्थिक फायदा होऊन त्यांचे आर्थिक प्रश्न सुटतील, असे श्रावण हर्डिकर म्‍हणाले.

या वेळी बाबा कांबळे म्‍हणाले की, रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करून शेअर रिक्षासाठी व मेट्रो स्टेशन पासून मीटरने रिक्षा व्यवसाय करण्यात येईल. तसेच मेट्रो स्‍टेशनपर्यंत नागरिकांना येण्यासाठी रिक्षा चालकही योग्य सेवा देतील यासाठी आम्ही लवकरच जनजागृती अभियान राबवून याबद्दल ठोस उपयोजना करणार आहोत. त्‍यासाठी रिक्षा चालकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

स्वारगेट बस स्थानकात बलात्कार:युवक काँग्रेसचे लष्कर पोलीस चौकीसमोर आंदोलन

पुणे – स्वारगेट बस स्थानकात बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून अटक करण्यात आली.या आरोपीला लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून काही वेळात आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.यादरम्यान लष्कर पोलीस स्टेशनबाहेर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी केले. या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि गृहमंत्री,पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तारिक बागवान,विरधवल गाडे.मेघश्याम धर्मावत, आनंद दुबे,आजिनाथ केदार,गणेश उबाळे,पुणे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, हडपसर वि.आ.मतिन शेख, कोथरूड वि.आ.आजीत ढोकळे, सद्दाम शेख, स्वप्निल गायकवाड,विशाल कामेकर, हर्षद हांडे, स्वप्नील शेलार,सौरभ रूपनर, वैभव बुरंगुले, मुरली बुधराम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवराज मोरे म्हणाले, “नुकताच गृहमंत्र्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनंदन पत्र देण्यात आले. हे पत्र कशाच्या आधारावर गृहमंत्र्यना देण्यात आले. आज पुणे गुन्हेगारीच्या दिशीने वळत आहे त्याला जबाबदार कोण. आज हे सरकार महिल्यांच्या सुरक्षा बाबत अपयश ठरलेले आहे. जर या आरोपीला फाशीची शिक्षा नाही झाली तर युवक काँग्रेस कडून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल”.

सौरभ आमराळे म्हणाले, आज पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सरकार केवळ आश्वासन देण्यात व्यस्त आहे. एवढेच काय तर गृहमंत्र्यांनी चक्क पीडितेवर आरोप केले आहे. एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि दुसरी कडे आज त्याच बहिणीवर अत्याचार होतं आहे तर सरकार मूक गिळून बसले आहे. स्वारगेटची घटना फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे”.

एक लाखाची बक्षिशी देणार आणि गावाच्या विकासासाठी प्रयत्नही करणार -पोलीस आयुक्त अमितेश कुमार

स्वारगेट बस स्टँडवरील बस मध्ये बलात्कार करणारा आरोपी पकडून दिल्याबद्दल आयुक्तांनी मनाले अनेकांचे आभार

पुणे-स्वारगेट एसटी स्थानक परिसरात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी शिरूर परिसरात गुनाट गावच्या हद्दीतून शुक्रवारी रात्री अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 500 पोलिस कर्मचारी मागील तीन दिवस काम करत होते . त्यासोबत गावातील 400 ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. श्वान पथकाने ऊस शेतातील जागा दाखवल्या होत्या तसेच ड्रोन मदत घेण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येईल. या प्रकरणात विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक न्यायालयात केस चालवण्यात येईल अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अमितेश कुमार म्हणाले की, शहरातही महिला सुरक्षा आढावा घेण्यात आला आहे. शहरातील विविध भागातील सेफ्टी ऑडिट घेतले जात आहे. मनपा सोबत एकदा पुन्हा डार्क स्पॉट जागी लाईट खांब लावून गस्त वाढविण्यात येईल. महिला सुरक्षा बाबत सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात येईल. तपास उशिरा लागला असला तरी तक्रार आल्यावर याबाबत तपास तातडीने सुरू करण्यात आला. आरोपी बाबत सीसीटीव्ही तपासणी करून त्याची ओळख पटविण्यात आली. ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांना सहकार्य केले आहे त्यामुळे स्वतः मी गावात जाऊन त्यांचा सन्मान करणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहे आणि या गुन्ह्यात आरोपीला कडक शिक्षा करण्याबाबत पोलिस प्रयत्नशील राहतील.अमितेश कुमार म्हणाले की, प्रकरणात आरोपी शोधण्यावरुन पोलिसांमध्ये कोणताही श्रेयवाद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तर सर्व पोलिस तपास कार्यात सहभागी होते असे त्यांनी स्पष्ट केले. रात्र दिवस पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र काम केले. आरोपीचे नाव तक्रार दाखल होताच निष्पन्न करण्यात आले होते. ग्रामस्थ आणि पोलिस एकत्रित काम करत होते. गावातील सार्वजनिक वाहने ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. त्यामुळे आरोपीला गावा बाहेर पडणे शक्य झाले नाहीं. ज्या ग्रामस्थाने आरोपी बाबत माहिती दिली त्यांना एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल. गावासाठी देखील काही देता येईल का याबाबत आम्ही विचार करू.

आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. त्याला लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पत्रकारांनी याविषयी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत. या व्रणानुसार आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने तशी कबुली दिली. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दोरी तुटल्यामुळे व वेळीच इतर लोक धावून मदतीस आल्यामुळे आपला जीव वाचला असे त्याने सांगितले आहे. आता आरोपीने खरेच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? याची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी तपास पथक पाठवण्यात येणार आहे. पण प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते.
अमितेश कुमार पुढे म्हणाले, स्वारगेट बसस्थानकातील 23 सीसीटीव्ही कॅमेरे व स्थानकाबाहेरील 48 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर अवघ्या दीड-दोन तासांतच पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. मागील 2 दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात शोधमोहिम राबवत होतो. काही पोलिस कर्मचारी तिथे तळ ठोकून होते. ते झोपलेही नाही. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर आज त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. याकामी मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे मी अभिनंदन करतो. आम्ही गावाला भेट देऊन तेथील नागरिकांचा सत्कार करणार आहोत. विशेषतः गावासाठी काही करता येईल का? याचाही आमच्या पातळीवर विचार सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एकदम शेवटी मिळालेल्या खबरीनुसार आरोपीला अटक केली. त्यात आरोपी कुठेतरी पाणी पिण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले होते. आरोपी पाणी पिण्यासाठी आला असता तो एका व्यक्तीला दिसला. त्याने ती खबर पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. त्यानंतर ड्रोनच्या मदतीने दिसलेल्या त्याच्या दिशेतून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे ही खबर देणाऱ्या व्यक्तीला 1 लाखाचे बक्षीस दिले जाईल.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0

पुणे – पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाला आज रात्री दीडच्या सुमारास अटक पुण्यातील शिरूर तालुक्यातील एका गावातून पुणे पोलिसांनी बेड्या घालून पुण्यात आणले आहे.100 पोलिस, श्वान पथक आणि ड्रोन कॅमेराची नजर, तरीही नराधम दत्ता गाडे पोलिसांना सापडत नव्हता,पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आणि अवघा महाराष्ट्र हादरला. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची टीम कामाला लागली.गुनाट गावात 100 पोलिसांचं विशेष पथकाने शोध सुरू केला. श्वान पथकाकडूनही शोध सुरू झाला. पाच ड्रोन्सच्या सहाय्याने… क्राईम ब्रँचचे पोलिसही कामाला लागले. बलात्कार करून पळून जाणारा गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी थांबला होता ही माहितीसुद्धा समोर आली होती .पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. गाडेची माहिती देणाऱ्यांना एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं.असे असूनही आणि एवढा आटापिटा करूनही दत्ता गाडे मात्र पोलिसांच्या हाती लागत नसल्याने टीकेचा भडीमार होत होता तर पोलिसांचा बचाव करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता दिसत होती . दुसरीकडे आता या घटनेनंतर परिवहन खातं खडबडून जागं झाल्याचं दिसलं .शिरुरच्या गुनाट गावात 140 पोलिसांचा ताफा तैनात असून आरोपीचा शोध घेतला गेला . ऊसाच्या शेतात आरोपीचा शोध घेतला . तर ड्रोनच्या नजरेतूनही आरोपीला शोधलं गेल . पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आठ ते दहा पथके आरोपीच्या मागावर राहिली . दरम्यान व्हिडीओत दिसणाऱ्या या घरात आरोपीने पाणी प्यायलं होतं. इथे तो काही वेळ थांबला होता. त्यानंतर तो बेपत्ता झालाय. दरम्यान या परिसरात पोलिसांनी शोधमोहिम केली मात्र अंधार पडल्याने आणि बिबट्याच्या वावरामुळे पोलिसांना शोधमोहीम थांबवावी लागली . आणि रिकाम्या हाती परतावं लागेल असे वाटत असताना तो हाती लागला .कसा ते आता पोलीस आयुक्त आज पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत .

कात्रज -कोंढवा रस्त्यावर सुरु होणार ८ वर्षे रखडलेली ई-लर्निंग शाळा:प्रशासकीय काळातील झेप

पुणे- राजकीय हस्तक्षेपांमुळे २७ वर्षे कात्रज कोंढवा रस्त्यावरील मुख्य चौकातील ४० गुंठे जमीन महापालिका संपादित करू शकली नव्हती ती प्रशासकीय काळात नुकतीच संपादित केल्यावर आता कात्रज -कोंढवा रस्त्यावर ८ वर्षे रखडलेली ई-लर्निंग शाळा प्रशासकीय काळात सुरु होण्याच्या मार्गावर आहे. येत्या जून मध्ये हि शाळा सुरु करण्याकरिता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सर्वे नंवर १९ पार्ट येथील अॅमेनिटी स्पेसवर ई-लर्निंग शाळेचे काम मागील आठ वर्षांपासून सुरु आहे. मात्र, आता प्रशासकीय काळात नागरिकांची प्रतिक्षा संपली असून ही शाळा जूनमध्ये सुरु होणार असल्याचे महापालिकेकडून संकेत देण्यात आले आहे. तशा पद्धतीने तयारीचे आदेश महापालिका आयुक्तांकडून विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहेत.संबंधित शाळेच्या इमारतीला २०१५ मध्ये तळ मजल्याव्यतिरिक्त ५ मजले अशी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर २०१६मध्ये सदर कामाचे भूमीपूजन करण्यात आले आणि प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. सद्यस्थितीत याठिकाणी लोअर ग्राउंड, लोअर पार्किंग, अप्पर ग्राउंड व पहिला मजला पूर्ण झाला आहे.दुस-या मजल्याचे काम सुरु आहे. २०१६ ते २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्यांत निधी उपलव्ध झाल्याने हे काम रेंगाळले होते. आता एकुण १८ वर्गखोल्या व स्वच्छतागृहाचे कामे पुर्ण करण्यात येणार आहे.एप्रिल २०२५पूर्वी महापालिका आयुक्तांनी भवन रचना विभागाला काम पूर्ण करुन दोन मजल्यांसह शाळेची इमारत हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भवन रचना विभागाकडून कामाला गती देण्यात आली आहे. इमारतीचे दोन मजले वापरायोग्य पुर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे.एप्रिल २०२५ पुर्वी काम पूर्ण होईल या उद्देशाने दोन मजल्यांवर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची कार्यवाही करावी’ असेही आदेश शिक्षण विभागालाही दिले आहेत. त्याचबरोबर, या इमारतीची विद्युतविषयक कामे करण्यासाठी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने विद्युतविषयक कामांचे पुर्वगणनपत्रक व निविदा प्रक्रिया राबविण्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जूनमध्ये किमान दोन मजल्यांवर शाळा सुरु होणार हे निश्चित झाले आहे.

पोलीसाच्या खुनाची शिक्षा भोगत असलेला कैदी पळाल्यावर तब्बल ११ वर्षानंतर शिताफीने जेरबंद

पुणे-पोलीसाच्या खुनाची शिक्षा भोगत असलेला कैदी पोलिसांच्या तावडीतून पळाल्यावर तब्बल ११ वर्षानंतर पुन्हा त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

कर्नाटक पोलीस अंमलदार हे ड्युटी वरती असताना अमरीश काशीनाथ कोळी, रा. कर्नाटक याने त्यांचा खुन केला होता. सदर बाबत कर्नाटक, गुलबर्गा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५७/२००९ भा.द.वि.कलम ३०२,३५३,३३२,५०४ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर दाखल गुन्हयात न्यायालयाने आरोपीस ३० वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे.
सदर आरोपी अमरीश कोळी, हा शिक्षा भोगत असताना आजारी पडल्याचा बहाणा करुन उपचारा कामी विजापुर शासकीय रुग्णालय, विजापुर, कर्नाटक येथे उपचार घेत असताना दिनांक १४/०८/२०१४ रोजी पोलीसांच्या रखवालीतुन पळुन गेला होता. त्याबाबत कर्नाटक, विजापुर येथील गांधी चौक पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २५९/२०१४ भा.द.वि.कलम २२४ अन्वये गुन्हा नोंद आहे.
फुरसुंगी पोलीस स्टेशन कडील पोलीस अमंलदार सुनिल कांबळे व वैभव भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी, हा सद्या रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे याने १४ वर्षापुर्वी एका पोलीसाचा खुन केला असुन तो शिक्षा भोगत असताना ११ वर्षापुर्वी शासकीय रुग्णालयातुन पोलीसांच्या कस्टडी मधुन पळुन आला आहे. सद्या तो राहुल कांबळे व राजु काळे असे बनावट नाव धारण करुन ओळख लपवुन राहत आहे.
सदर आरोपी अमरीश कोळी, सद्या रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे याचे हालचालीवर नजर ठेवुन त्याचेबाबत माहीती घेतली असता तो कधी पुणे तर कधी सोलापुर येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे. तसेच त्याने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड काढलेले असुन तीन लग्न केलेले आहेत. कर्नाटक येथील गुलबर्गा पोलीस स्टेशनची संपर्क करुन इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी, याची माहीती व फोटो मागुन घेतला. सदरबाबत खात्री झाल्यानंतर गुलबर्गा ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क करुन कर्नाटक येथुन पो. अमंलदार भिमानायक व शशीकुमार हुगार हे दि.२६/०२/२०२५ रोजी पोलीस ठाणेस आल्यानंतर पोहवा. महेश उबाळे, पो. अंम सुनिल कांबळे व वैभव भोसले यांनी आरोपी नामे अमरीश काशीनाथ कोळी, वय ४५ वर्ष मुळ पत्ता-घाटगे लेआऊट, कलबुर्गी, कर्नाटक सद्या रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे यास शिताफीने पकडुन पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परी-५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले, त्यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राजेश खांडे, पोलीस हवा. महेश उबाळे, पो. अंमलदार सुनिल कांबळे वैभव भोसले सर्व फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली आहे.

पुणे:पोलीस ठाण्यातच पोलिसाने पेट्रोल अंगावर ओतून केला आत्महत्येचा प्रयत्न

पुणे-एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने गाेंधळ उडाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिस शिपाई विजय लक्ष्मण जाधव याच्यावर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्याचेवर निलंबन कारवाई केली आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाेलिसांचा नियंत्रण कक्ष असलेल्या डायल ११२वर धानाेरी परिसरात सहयाद्री काॅलनी येथे भांडणे झाल्याचा फाेन आला हाेता. त्यानुसार विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक एस माने हे घटनास्थळी गेले हाेते. त्यावेळी सदर ठिकाणी पाेलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पाेलिस शिपाई विजय जाधव व त्यांचा भाऊ विकी लक्ष्मण जाधव व इतर असे सर्वजण ओंकार गुलचंद सिंग हे राहते घराचे परिसरात व्यवसाय करत असलेल्या डुकरे पाळण्याच्या हद्दीवरुन त्यांच्यात वाद सुरु हाेते. त्यावरुन सदर दाेन्ही बाजूच्या लाेकांना विश्रांतवाडी पाेलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यावेळी पाेलिस स्टेशन मध्ये याबाबत चाैकशी केली जात असताना पाेलिस कर्मचारी विजय जाधव याने पाेलिस स्टेशनचे बाहेर जाऊन स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅन मध्ये आणले व स्वत:चे अंगावर ते टाकून अारडाअाेरड सुरु केल्याने गडबड उडाली. यावेळी पाेलीस स्टेशन मध्ये हजर असलेल्या अधिकारी व पाेलीस अंमलदार यांनी तात्काळ त्यास ताब्यात घेत यासंर्दभातील माहिती वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांना दिली. चाैकशी दरम्यान पाेलीस शिपाई विजय जाधव याने गैरवर्तन केल्याचे सिध्द झाल्याने त्याचेवर निलंबन कारवाई करण्यात अाल्याची माहिती पाेलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली अाहे. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पाेलीस करत अाहे.

लाल महाल, शनिवार वाडा परिसरात दुमदुमला मराठीचा जयघोष

साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि नवीन मराठी शाळेचा उपक्रम
पुणे : संत, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची वेषभूषा परिधान करून असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष करीत मराठीत बोलण्याची शपथ घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महाल आणि शनिवार वाडा येथे मराठी अभिमान गीत व महाराष्ट्र गीत सादर केले. ‌‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‌’, ‌‘माय मराठीचा जयजयकार असो‌’ अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
निमित्त होते मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्ट व शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आयोजित विशेष कार्यक्रमाचे. सुरुवातीस शनिवार वाडा आणि त्यानंतर लाल महाल येथे या कार्यक्रमाचे आज (दि. 27) आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेषभूषेत तसेच संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यलोक अहिल्याबाई होळकर, बाजीराव पेशवे, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह वारकरी, मावळ्यांच्या वेशभूषेत मुले-मुली सहभागी झाले होते.
‌‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी‌’, ‌‘मराठी माणसाने मराठी माणसासोबत मराठीतच बोलावे‌’, ‌‘मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा‌’ असे मराठी भाषेची अस्मिता दर्शविणारे फलक तसेच कवी कुसुमाग्रज यांचे छायाचित्र असलेले फलकही विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. मराठी भाषेची धुरा जणू हा बालचमू आनंदाने स्वीकारत आहे आणि मराठी भाषा प्रवाहित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासक चित्र या निमित्ताने पहावयास मिळाले.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती देताना पियूष शहा यांनी मराठी राजभाषा दिनाचे आणि केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. मुलांमध्ये मराठी भाषेविषयी अस्मिता जागृत व्हावी, मराठी बोलण्याचे संस्कार मुलांवर व्हावेत यातूनच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे आणि मराठी भाषा प्रवाहित रहावी हा कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन पियूष शहा व मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांची होती. शिक्षक प्रतिनिधी योगिता भावकर, सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख मिनल कचरे, प्रतिभा पारखे, वैशाली पाटील, धनंजय तळपे, साईनाथ ट्रस्ट मंडळाचे विक्रम गोगावले, नंदू ओव्हाळ, गंधाली शहा, समीक्षा सोनवणे, संकेत निंबाळकर, प्रणिता सरदेसाई, तन्वी ओव्हाळ उपस्थित होते.
पियूष शहा यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली तर आभार कल्पना वाघ यांन मानले.