Home Blog Page 619

अजित पवारांच्या नावाने धनंजय मुंडेंच बीडचे छुपे पालकमंत्री :तृप्ती देसाई यांचा आरोप

26 पोलिसांविरोधात पेनड्राईव्हद्वारे पुरावे दिले

बीड-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने धनंजय मुंडे हेच बीडचे पालकत्व सांभाळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे. बीडमध्ये दररोज एकाहून एक भयंकर घटना उजेडात येत आहेत. पण अजित पवार कुठेच दिसत नाहीत. ते त्यावर काही बोलतही नाहीत. त्यामुळे अजित पवार पालकमंत्रिपद चालवत आहेत की, त्यांच्या नावाने धनंजय मुंडे हेच कारभार पाहत आहेत हे कळत नाही, असे त्या म्हणाल्यात.तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वी बीडच्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडशी हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर बीड पोलिस दलात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या निर्देशांनुसार, पोलिसांनी तृप्ती देसाई यांना आपल्या आरोपाचे पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार तृप्ती देसाई यांनी सोमवारी बीड दौऱ्यावर जाऊन पोलिसांना आपल्या आरोपांची पुष्टी करणाऱ्या पुराव्यांचा पेनड्राईव्ह सुपूर्द केला.

तृप्ती देसाई सोमवारी सकाळी 11.30 वा. बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाल्या. त्यानंतर बीडचे अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, मी 26 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधातील पुरावे पोलिसाना दिलेत. त्यांनी माझा जबाबही घेतला. मी माझे सर्व पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून दिलेत. आता पोलिसांनी चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जिल्ह्याबाहेर पाठवावे. यापैकी अनेक पोलिस कर्मचारी गत अनेक वर्षांपासून एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

तृप्ती देसाईंनी यावेळी धनंजय मुंडे हेच अजित पवारांच्या नावाने बीडचे पालकमंत्रिपद सांभाळत असल्याचाही आरोप केला. त्या म्हणाल्या, आजही बीड पोलिस दलातील अनेक अधिकारी वाल्मीक कराडला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण, येथील पालकमंत्रिपद आजही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अजित पवार तर कुठे दिसत नाहीत. ते दरवेळी आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो असा दावा करतात. पण त्यानंतरही बीडमध्ये दररोज भयंकर घटना घडत असल्याचे उजेडात येत आहे. दादा त्यावर काहीच बोलत नाहीत. त्यामुळे अजित पवार पालकमंत्रिपद चालवत आहेत की त्यांच्या नावाने धनंजय मुंडे हेच कारभार पाहत आहेत हे कळत नाही.

ज्या पद्धतीने आष्टीची घटना पुढे आली, खोक्या भोसलेची घटना पुढे आली, नागरगोजे नामक शिक्षकाची घटना घडली आहे. मग पालकमंत्री काय करत आहेत? पालकमंत्री बदलून काही फरक पडला आहे का? जर झाला नसेल, तर गुंडाराज थांबवता येत नसेल तर अधिवेशनातच या प्रकरणी योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. पण तसा निर्णय घेताना कुणीही दिसत नाही. बीडला खरेच गुन्हेगारीमुक्त करायचे असेल, तर गुंडांना पाठिशी घालणारे, त्यांना आश्रय देणाऱ्या पोलिसांना जिल्ह्याबाहेर पाठवावे लागेल. धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीने झाला नाही. शेवटी काही पुरावे आल्यानंतर तो घ्यावा लागला. आम्ही सादर केलेले पुरावे अत्यंत अचूक आहेत. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

अन्याय सहन करू नका, स्वाभिमानासाठी उभे राहा”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

नाशिकमधील ‘आम्ही साऱ्याजणी’ कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन

नाशिक : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिक शहर महिला संघटनेने २१ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘आम्ही साऱ्याजणी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्त्रियांच्या प्रगतीच्या दिशेने चाललेल्या जागतिक आणि स्थानिक स्तरावरील चळवळींचा वेध घेतला आणि महिलांसाठी असलेल्या कायदेशीर, सामाजिक आणि आर्थिक संधींवर विशेष प्रकाश टाकला.

कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद, दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि स्वागत गीताने झाली. मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात स्त्रियांच्या समानतेच्या लढ्यातील विविध पैलूंवर भर दिला.

स्त्रियांच्या हक्कांसाठी जागतिक चळवळ आणि सामाजिक स्थिती

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “१९७५ ते १९८५ हा दशकभराचा काळ महिलांच्या हक्कांसाठी जागतिक चळवळीचा होता. समानता, शांतता, विकास आणि मैत्री या तत्वांवर महिलांचे संघटन जगभरात मजबूत होत गेले.” त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षण, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावर महिलांना अनेक आव्हाने होती. जरी हुंडाबळी, सतीप्रथा यासारख्या काही कुप्रथा बंद झाल्या असल्या तरीही अजूनही बलात्कार, कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक शोषण यासारख्या समस्या महिलांसमोर उभ्या आहेत.

त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात उदाहरण देताना सांगितले की, “महिला अनेकदा म्हणतात की आमच्यावर हिंसाचार झाला नाही, पण होईल अशी भीती वाटली होती.” ही मानसिक भीतीच मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना दडपून ठेवते.

“ऑनर किलिंग आणि वर्णद्वेषाच्या मानसिकतेत बदल आवश्यक”

स्त्रियांच्या सामाजिक स्वातंत्र्याबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी ऑनर किलिंगच्या वाढत्या घटनांचा उल्लेख केला. “आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या नावाने बोलतो, पण प्रत्यक्षात जात, धर्म, वर्ण, आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या चौकटीत स्त्रियांना बांधून ठेवतो. तसेच त्यांनी भारतीय समाजातील वर्णद्वेषावरही प्रकाश टाकला. “

“स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत संधी मिळाली पण मानसिक हिंसा अजून कायम”

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “स्त्रियांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी मजल मारली आहे, पण कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांना अजूनही संपूर्ण सहभाग मिळालेला नाही.” त्या पुढे म्हणाल्या की, जरी आजच्या काळात शारीरिक हिंसा कमी झाली असली तरीही मानसिक हिंसा वाढलेली आहे.

“कायद्याचे संरक्षण आणि आर्थिक स्वावलंबन आवश्यक”

“कायदे जरी स्त्रियांच्या बाजूने असले, तरी त्यांच्या अंमलबजावणीची मोठी अडचण आहे. अनेक वेळा आरोपी आणि त्यांचे वकील कायद्यातील त्रुटींचा फायदा घेतात.” असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी कौटुंबिक कायद्यांबद्दल सांगताना मुलींच्या संपत्तीच्या हक्काचा मुद्दा उपस्थित केला.

“स्त्रिया डिजिटल आणि तांत्रिक क्षेत्रात पुढे गेल्या पाहिजेत”

डॉ. गोऱ्हे यांनी डिजिटल साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. “स्त्रियांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उपस्थिती वाढवली पाहिजे. सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास महिलांचे नेतृत्व आणखी दृढ होईल.”

“पुरुष सहकार्याने समानता साधता येईल”

स्त्री-पुरुष समानतेवर बोलताना त्या म्हणाल्या, “महिलांनी सार्वजनिक जीवनात यायलाच हवं, पण यासाठी पुरुष सहकार्य देखील गरजेचं आहे. समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक आहे.”

त्यांनी कोरोना काळात पुरुषांच्या भूमिकेतील बदलांचाही उल्लेख केला. “पुरुषांनी लक्षात घेतलं की मुलांवर संस्कार करणं हे आईपुरतं मर्यादित नाही. यामुळे कुटुंबसंस्थेत सकारात्मक बदल घडतो आहे.”

“स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी पुढे यायला हवं”

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांना आवाहन केले की, “स्त्रियांनी आपल्यासाठी काय योग्य आहे हे ठरवलं पाहिजे. चांगल्या- वाईट चौकटींमध्ये स्वतःला अडकवून घेऊ नका. अन्याय सहन करू नका, स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभं राहा.”

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला नाशिक शहर महिला संघटनेच्या संस्थापिका प्रभाताई कुलकर्णी, अध्यक्ष सीमा शिंपी, उपाध्यक्ष पद्मा सोनी, सचिव वृंदा लवाटे, सहसचिव संजीवनी कुलकर्णी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. संध्या खेडेकर, शीतल जगताप आणि महिला मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेवती पारखे यांनी केले.

एक धक्का और दो.. औरंगजेब की कब्र तोड़ दो

पुणे : “देश का बल बजरंग दल.. छत्रपती के सन्मान में, बजरंग दल मैदान में.. हटली पाहिजे हटली पाहिजे औरंगजेब ची कबर हटली पाहिजे… एक धक्का और दो.. औरंगजेब की कब्र तोड़ दो”  अशा घोषणा देत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने  क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव आंदोलन करण्यात आले.

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन, आणि प्रांत सह संयोजक संदेश भेगडे, प्रांत गौरक्षा प्रमुख ऋषिकेश भागवत, पूर्व पुणे मंत्री धनंजय गायकवाड, प्रांत विशेष संपर्क सह प्रमुख श्रीकांत चिल्लाळ, पूर्व पुणे बजरंग दल विभाग संयोजक सुशांत गाडे, सह संयोजक आकाश दुबे,  जिल्हा संयोजक दत्ता तोंडे, चैतन्य बोडके, विक्रम घुंगरूवाले, निलेश बोमा, राजू कुंडले, सुरज पडवळ, ईश्वर राऊत, दिपूल इनामदार, जिल्हा मंत्री विजय कांबळे, आशिष दुसाने, विवेक गिरी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

किशोर चव्हाण म्हणाले, क्रूरकर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही स्वतंत्र भारत देशात गुलामीचे, अनंत यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करायला हवी. जर शासनाने ही कबर नष्ट केली नाही, तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाला सोबत घेऊन कारसेवा करुन ती कबर उध्वस्त करेल.

नितीन महाजन म्हणाले, भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या प्रवृत्तीला औरंगजेबाच्या कबरीतून प्रेरणा मिळते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल.

मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे-जयवंत कोंडिलकर

पुणे, ता. १७- (प्रतिनिधी)
“केशव माधव विश्वस्त निधी” तर्फे रविवार,१६ मार्च रोजी ‘धुमसता मणिपूर’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
मणिपूर आणि ईशान्य भारतात ‘शिक्षणच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता’ या ध्येयाने पाच दशके मणिपूर येथे प्रत्यक्ष कार्य केलेले पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. पूर्वोत्तर सीमा भागातील परिस्थिती बद्दल जागरूक करताना कोंडविलकर म्हणाले,”
​‘वसुदैव कुटुंबकम्’ या मूल्यांच्या आधारे भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल,तर नागरिकांच्या मनामध्ये प्रखर एकात्मतेची ज्योत सतत धगधगत रहायला हवी.
पूर्वोत्तर सीमा भागातील वांशिक भेद, फुटीरतावाद,दहशतवादाचे सावट,मादक द्रव्यांचा व्यापार, रोजगाराच्या अल्प संधी,आणि त्यातून बिघडलेला सामाजिक समतोल ,राष्ट्रीयत्वाच्या जाणिवांचा अभाव,वांशिक वेगळेपणाची भावना आणि पाश्चात्यशक्तींचा सांस्कृतिक दबाव अशा विविध समस्यांमुळे भारताचा पूर्वोत्तर प्रदेश विशेषत: सीमा भाग नेहमीच धुमसता असल्याचे दिसून येते.
​२१ व्या शतकातील बदलणारी भू- राजकीय समीकरणे आणि हिंद-पॅसिफिक भागाचे वाढते महत्व या बाबींचा विचार करता पूर्वोत्तर भारत सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा ठरतो. यामुळेचे तेथील समस्यांच्या मुळाशी जाऊन काम करणे गरजेचे आहे. पूर्वोत्तर सीमा भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा विचार खोलवर रुजविणे गरजेचे आहे.आरोग्य,शिक्षण सुविधा, कौशल्य विकास,स्थानिक संस्कृतीचे संवर्धन,युवकांच्या क्षमतांचा विकास यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. स्थानिकांमध्ये आपुलकी निर्माण करून आपलेपणाची भावना निर्माण करता येईल.त्यासाठी सामुदायिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहेत.
​स्व.भय्याजी काणे यांच्या मार्गदर्शनात स्थापन केलेल्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित शिक्षणाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विचार रुजविण्याचे कार्य गेले चाळीस वर्षांहून अधिक काळ करत आहे. प्रतिष्ठानच्या कार्यातून उभारलेल्या तीन शाळांतून वैश्विकतेचे भान असलेली आणि राष्ट्रीयत्वाची जाण असलेली पिढी घडत आहे. सेवा भावी संस्थांच्या कार्यातून शांतता प्रस्थापित करणे शक्य असल्याचा विश्वासही जयवंतजी कोंडविलकर यांनी व्यक्त केला.
​पटवर्धन बाग,एरंडवणे स्थित “सेवा भवन”च्या स्व.मुकुंदराव पणशीकर सभागृहात रविवारी,१६ मार्च रोजी सकाळी दहा ते साडे बारा या वेळेत हे व्याख्यान संपन्न झाले.संगणक तज्ञ डॉ दीपक शिकारपूर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.व्यासपीठावर पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे श्रीपाद दाबक,केशव माधव विश्वस्त निधीचे सचिव अरविंद देशपांडे,विश्वस्त योगेश कुलकर्णी,रवि जावळे ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
​यावेळी जयवंत कोंडविलकर ह्यांनी दृकश्राव्य (PPT- पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) द्वारे मणिपूर व ईशान्य भारत येथे पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानने जे कार्य गेल्या पाच दशकात केले आहे त्याची माहिती उपस्थितांना दिली.
जयवंत कोंडिलकर यांचे स्वागत केशव माधव विश्वस्त निधीचे विश्वस्त रवि जावळे यांनी तर श्रीपाद दाबक यांचे स्वागत योगेश कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विचाराचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन केले.
​प्रमुख पाहुणे डॉ दीपक शिकारपूर यांनी डिजिटल इंडिया विषयी माहिती दिली.तसेच पूर्वांचल भागातील विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट,कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणक साक्षरते विषयी मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचे सांगितले.
प्रा.श्रुती मेहता यांनी पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान च्या कार्याची आणि भविष्यकालीन नियोजनाची माहिती यावेळी दिली.राष्ट्रीय एकात्मते बरोबर सामाजिक समरसता,पूर्वोत्तर सीमा भागाचा सर्वांगीण विकास आणि उत्तुंग कामगिरी करून राष्ट्रविकासात योगदान देणारी युवा घडविणे यासाठी प्रतिष्ठानला कार्य करायचे आहे.संस्थेच्या विस्तारित ध्येयपूर्तीसाठी शिक्षणा बरोबरच आरोग्य सुविधा, जैवविविधता आणि सांस्कृतिक संशोधन,क्रीडा संकुल असे विविध प्रकल्प नजीकच्या भविष्यात हाती घेण्याचे नियोजन केले आहे.आपल्या देशावर व संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या युवकांनी पूर्वोत्तर भारतातील राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.संस्थेच्या कार्यवाढीसाठी सहभाग आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रतिष्ठानच्या सक्षमीकरणासाठी भारत भवन, शुक्रवार पेठ, पुणे येथे कार्यालय कार्यरत आहे.
“केशव माधव विश्वस्त निधी”चे सचिव अरविंद देशपांडे यांनी केशव माधव संस्थेविषयी प्रास्ताविकात माहिती दिली.सूत्र संचलन दूरदर्शन कलाकार प्रशांत कुलकर्णी यांनी केले.आभार “केशव माधव” चे विश्वस्त योगेश कुलकर्णी यांनी मानले.उपस्थितांच्या प्रश्नांना जयवंत कोंडविलकर यांनी समर्पक उत्तरे दिली.
ह्या कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाबँक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन-भरतीच्या मागणीला विविध संघटनांचा जोरदार पाठिंबा; ६०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा ठिय्या; २० रोजी बँकचा देशव्यापी संप

पुणे, ता. १७:  शिपाई, क्लार्क यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करावी, बँक व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा, कर्मचार्‍यांशी केलेल्या करारांचे पालन व्हावे, ग्राहकांस चांगल्या व सुरक्षित सेवा द्याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सोमवारी बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय ‘लोकमंगल’समोर धरणे आंदोलन करण्यात आले. ५१ झोनल ऑफिसमधील सुमारे ६०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी निदर्शनेही केली.

या तीव्र निदर्शनांनंतर सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली. बँकिंग युनियन्सचे प्रतिनिधी कॉम्रेड कृष्णा बारूरकर (महासचिव, बीओएमओए) आणि संतोष गदादे (महासचिव, बीओएमओओ), ‘सीटु’चे अजित अभ्यंकर व इतर केंद्रीय कामगार संघटनांच्या नेत्यांनीही या आंदोलनाला साथ दिली. त्यांनी ठेका पद्धतीने नोकरभरती करण्यास तीव्र विरोध व्यक्त केला आणि आवश्यक असल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, पुणे चे संयोजक कॉम्रेड विठ्ठल माने व सहसंयोजक कॉम्रेड शिरीष राणे यांनी कायमस्वरूपी भरतीच्या सामूहिक मागणीवर भर दिला.

फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड देविदास तुळजापूरकर यांनी “सार्वजनिक क्षेत्रातील बँका नफ्यात आहेत, पण त्याचा फायदा नेमका कोणाला होतो, हे समजून घेतले पाहिजे. कंत्राटी व आउटसोर्स कर्मचाऱ्यांकडून कायमस्वरूपी बँकिंग कामे करवून घेतली जात आहेत. बँकेने सफाई कर्मचाऱ्यांची पदे पूर्णतः रद्द केली आहेत. ८०० हून अधिक शाखांमध्ये चपराशी नाहीत. ३०० हून अधिक शाखांमध्ये एकही लिपिक नाही. १,३०० हून अधिक शाखांमध्ये केवळ एकच कर्मचारी सर्व कामकाज हाताळतो, ही बाब गंभीर आहे.”

या भीषण कर्मचारी तुटवड्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक व शारीरिक ताण आहे, तसेच ग्राहक सेवा आणि बँकिंग कार्यक्षमतेवरही मोठा परिणाम होत आहे. मात्र, बँक व्यवस्थापन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. याशिवाय, व्यवस्थापनाने उच्च न्यायालयाचे आदेश, कामगार कायदे आणि द्विपक्षीय करारांकडे दुर्लक्ष करून मनमानी निर्णय घेतले आहेत. हा मनमानी कारभार थांबवला पाहिजे, असे तुळजापूरकर यांनी ठणकावून सांगितले.

या आंदोलनात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आंदोलन यशस्वी होण्यासाठी संयोजन सचिव कॉम्रेड शैलेश टिळेकर, सचिव धनंजय कुलकर्णी, महेश पारखी आणि पुण्यातील इतर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

देशव्यापी संपाची घोषणा
या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ महाबँकेचे कर्मचारी २० मार्च रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. २१ मार्च रोजी बँकिंग सेवा पूर्ववत होईल. त्यानंतर २२ आणि २३ मार्च या शनिवार-रविवारच्या नियमित सुट्यांनंतर २४ आणि २५ मार्च रोजी दोन दिवसांचा संप पुकारण्यात येईल, त्यामुळे बँकिंग सेवा पूर्णतः ठप्प राहील, असा निर्णय या सभेत घेण्यात आला.

दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा-२१ मार्च रोजी उद्घाटन


युवक व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

पुणे, दि. १७ मार्च: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती प्रीत्यर्थ संत एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून लातूर येथील रामेश्वर (रुई) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार,२१ मार्च २०२५ रोजी होणार आहे. स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास रोख रूपये १,२५,०००/-चांदीची गदा, मेडल व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाचे संचालक प्रा. विलास कुथुरे, डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेचे उद्घाटन २१ मार्च रोजी स. ९ वा होईल. तसेच, पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायं. ७ वा. होईल. कार्यक्रमास राज्याचे युवक व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख पाहुणे असतील. हिंद केसरी पै. जगदीश कालीरमण हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील. तसेच हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी पै. रावसाहेब मगर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. रामेश्वर (रुई)चे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड हे प्रमुख मार्गदर्शक असतील.
‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे ॥’ या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या तत्त्वावर आधारित थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय कीर्तनकार, आरोग्य शास्त्रातील एक महान चमत्कार, योग महर्षि शतायुषी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरूस्त अशा पंच्चाहत्तर वर्षे वयाच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळी वेगळी कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना योग महर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा स्मृती सुवर्ण, रोप्य, कांस्य गौरव पदक बहाल करण्यात येईल.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे १८वे वर्ष आहे. यासाठी महाराष्ट्रातील नामवंतांसह देशभरातील मल्लांना निमंत्रित केले आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास महाराष्ट्र कुस्ती महावीर हा अत्यंत बहुमानाचा किताब, रोख १,२५,०००/- चांदीची गदा व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकास रोख १,००,०००/-, तृतीय क्रमांक ५० हजार आणि चतुर्थ क्रमांकास २५ हजार रूपयां सह वजनगट ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ८६+ ते १२५ किलो वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय हजारो रूपयांची पारितोषिके, सुवर्ण, रौप्य, कास्यं पदक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व कुस्तीगीरांना मानधन देण्यात येईल.
 सर्व मल्लांची वजने गुरुवार दि. २० मार्च पर्यंत सायं. ४ ते ८ पर्यंत घेण्यात येईल. सर्व कुस्तीगीरांनी आधारकार्डची मूळ प्रत व त्याची झेरॉस प्रत आणणे बंधनकारक आहे. स्पर्धा राज्य संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. स्पर्धेसाठी येणार्‍या निवडक कुस्तीगीरांच्या जाण्या येण्याचे एस.टी.भाडे, निवासाची व भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रा. विलास कथुरे (मो.९८५०२११४०४), राहूल हरिश्वचंद्र बिराजदार (मो.८००७५९३४३४) व निखील वणवे (मो. ७२७६३३७६७०)  यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेत जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे. त्याच बरोबर क्रीडाप्रेमींनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन स्पर्धेच्या संयोजन समितीने केले आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा संचालक डॉ. वाघ, प्रा. अभय कचरे आणि डॉ महेश थोरवे उपस्थित होते.

‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठ पुन्हा ‘क्यूएस’ रँकिंगमध्ये

 पुणेः विद्यार्थ्यांना कायमच गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने नुकतीच आपली शैक्षणिक कटिबद्दता सिद्ध करताना पुन्हा क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-२०२५ (

वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग) च्या प्रतिष्ठित कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५१-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळवले आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाने राष्ट्रीय कला अकादमी (एनआयडी), अहमदाबादच्या बरोबरीने ही क्रमवारी प्रात्प केली आहे. संपूर्ण भारतात केवळ एमआयटी एडीटी, आयआयटी मुंबई आणि एनआयडी या तीनच संस्थांनी या श्रेणीत स्थान मिळवले आहे. या यशामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाने जागतिक स्तरावर उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे. क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे शैक्षणिक गुणवत्तेचे आणि संस्थात्मक कार्यक्षमतेचे महत्त्वपूर्ण मापदंड म्हणून ओळखले जाते, जे शिक्षणातील उत्कृष्टतेचे मूल्यांकन आणि प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण काम करते.
एमआयटी एडीटी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि कार्यकारी संचालिका प्रा.डॉ.सुनिता कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी या शाखांत जागतिक दर्जाचे नाविण्यपूर्ण शिक्षण पुरवत आहे. त्यामुळे विद्यापीठाला या रँकिंगमध्ये स्थान मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसह राज्यभरातून एमआयटी एडीटी विद्यापीठावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


एमआयटी एडीटी विद्यापीठाला गतवर्षी प्रमाणे याही वर्षी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५१-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असून ती सर्वांच्या कष्टाची पावती आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय कला अकादमी (एनआयडी), अहमदाबादच्या बरोबरीने ही क्रमवारी प्रात्प केली असून, संपूर्ण भारतात केवळ एमआयटी एडीटी, आयआयटी मुंबई आणि एनआयटी या संस्थांनी या श्रेणीत स्थान मिळवले आहे. 
-प्रा.डॉ.मंगेश कराड,
कार्यकारी अध्यक्ष,
एमआयटी एडीटी, विद्यापीठ, पुणे.

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी पुण्यातून कोणी नाही … महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर

मुंबई- महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. विधानपरिषदेच्या पाच पैकी तीन जागांसाठी भाजपनं काल उमेदवार जाहीर केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेनं चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या पाच जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.पुण्यातून राष्ट्रवादी दीपक मानकर यांना उमेदवारी देईल अशी अपेक्षा आणि मागणी होती तर भाजपा जगदीश मुळीक यांना उमेदवारी देईल अशी अपेक्षा होती मात्र या दोहोंना पुन्हा डावलले गेले आहे. एवढेच काय भाजपने जेष्ठ नेते माधव भंडारींनाही पुन्हा डावललं, दरम्यान, विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असली तर विरोधी पक्षांनी मात्र उमेदवार देण्याचं धाडस दाखवलेलं नाही. याचं कारण विधानसभेत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळं उमेदवार दिला तरी यश मिळणार नसल्याची खात्री असल्यानं महाविकास आघाडीनं या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.

भाजप 
1) दादाराव केचे
2) संजय केणेकर
3) संदीप जोशी

शिवसेना  
1) चंद्रकांत रघुवंशी

राष्ट्रवादी 

1)संजय खोडके

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं त्या जागा रिक्त झाल्या होत्या. शिवसेनेचे आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं त्यांचं परिषेदतील सदस्यत्व संपुष्टात आलं होतं. या रिक्त जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या (18 मार्च) ला अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 20 मार्चपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत आहे. तर, मतदानाची तारीख 27 मार्च आहे. मात्र, पाचपेक्षा अधिक अर्ज आले नाहीत तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या 78 इतकी आहे. विधानसभेप्रमाणं परिषद दर 5 वर्षांनी भंग होत नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. 78 सदस्यांपैकी 30 सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तर, शिक्षकांमधून 7 आमदार, पदवीधरांमधून 7 आमदार निवडले जातात. तर, राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा यातून 12 आमदारांची नियुक्ती करतात.विधानपरिषदेत पाच जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी 78 पैकी 52 सदस्य आहेत. यामध्ये 32 आमदार महायुतीचे आहेत. तर, महाविकास आघाडीकडे 17 आमदार आहेत. भाजपचे 19, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 6 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत. तर, महाविकास आघाडीच्या 17 मध्ये काँग्रेसचे 7, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 3 आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 7 आमदार आहेत.तर, तीन अपक्ष आमदार आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी,शीतल म्हात्रे म्हणाल्या,मंज़िलें अभी और भी हैं…

0

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. विधान परिषदेतील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे. रविवारी भाजपने 3 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. या नेत्याला राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली होती. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या यादीला मंजुरी दिली नव्हती.अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असलेल्या शीतल म्हात्रे काहीशा नाराज झाल्या.

महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने या पाचही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होण्याइतके संख्याबळ आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा अर्ज आहे. विधानपरिषदेचे सदस्य असलेले आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या.आमश्या पाडवी यांनी वर्षभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा नंदूरबार-धुळेमधील नेतृत्वाला संधी दिली आहे.

रघुवंशी यांचे नाव जाहीर झाल्यामुळे विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असलेल्या शीतल म्हात्रे मात्र काहीशा नाराज झाल्या.शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर स्टेटस शेअर करुन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर एक शायरी शेअर केली आहे. या शायरीतून शीतल म्हात्रे विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे काहीशा निराश झाल्याचे दिसत आहे. मात्र, राजकीय जीवनात आणखी संघर्ष करण्याची आपली तयारी असल्याचे संकेतही शीतल म्हात्रे यांनी दिले आहेत.

मंज़िलें अभी और भी हैं
चलना अभी दूर तक और भी है।

जो चाह थी मेरी
वो मुझे नहीं मिली,
पर जो कुछ भी मिला
वो किसी स्वपन देखी चाह
से कम भी नहीं…

‘बरे झाले पक्ष फुटला’:अशा व्यक्तीसोबत काम करू शकत नाही- सुप्रिया सुळेंची टीका; मुंडेंनंतर आणखी एक विकेट जाणार असल्याचा दावा

पुणे-बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा आकाचा आका हा एकच व्यक्ती आहे. हाच व्यक्ती संतोष देशमुख यांची हत्या होत असताना फोनवरून विकृतपणे या सगळ्याची मजा घेत होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पक्षाच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत बोलताना सुळे यांनी हा आरोप केला असल्याचा दावा केला जात आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणासह मंत्र्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे लवकरच आणखी एकाची विकेट जाणार असल्याचा दावा देखील केला आहे. मात्र, त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ती व्यक्ती कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आवादा कंपनी विरोधात केंद्र सरकारला पत्र पाठवणारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात व्हिडिओ पाहणारी ती व्यक्ती कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

या संबंधात मला मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना तिकडे एका व्यक्तीने फोन केला होता. ही व्यक्ती त्याची गंमत पाहत होती. हे किती विकृती आहे? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. ही व्यक्ती खंडणी, सत्ता आणि पैशाच्या जीवावर हे सगळे करत होती. इतकेच नाही तर आवादा कंपनीच्या विरोधात केंद्र सरकारला तीन पत्रे पाठवली होती, असा दावा त्यांनी केला आहे. यामध्ये आवादा कंपनी ही वाईट आहे, त्यांच्याकडे चांगले काम होत नाही. त्यांना बीड मधून बाहेर काढून टाका, असा उल्लेख या पत्रात केला होता. तर दुसरीकडे कंपनीवर आरोप करणारा तोच व्यक्ती दुसरीकडे त्यांना खंडणी मागायचा. असे प्रकार होत असल्याचा आरोप देखील सुळे यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची नुकतीच विकेट गेली आहे. मात्र, मंत्रिमंडळातील आणखी एका नेत्याची विकेट जाणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आणखी सहा महिने थांबा, आणखी एका व्यक्तीची विकेट जाणार आहे. हा व्यक्ती बायकोच्या आड सर्व उद्योग करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन लढावे, असे आव्हान देखील सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. त्यामुळे आता तो मंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते आमच्यासोबत पक्षात असताना देखील लढाई सुरू होती, असा दावा सुळे यांनी केला आहे. मात्र बरे झाले पक्ष फुटला. बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकले नसते, अशा शब्दात सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. जो व्यक्ती स्वतःची पत्नी, मुलांची आई असलेल्या महिलेच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषासोबत मी काम करू शकत नाही. मी याबाबत आज पहिल्यांदा बोलत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मी विरोधी पक्षात आयुष्य काढेल. मात्र नैतिकता तोडणार नाही. माझे घर कंत्राटदारांच्या पैशावर चालत नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

अंतर्वस्त्रांमध्ये लपवून सोन्याची तस्करी:मुंबई विमानतळावर 8.47 कोटी रुपयांचे सोने जप्त

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने १० किलो सोने जप्त केले आहे. त्याची बाजारभाव किंमत ८.४७ कोटी रुपये आहे. विमानतळाच्या तीन खासगी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.विमानतळ कर्मचाऱ्यांना हे सोने त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून विमानतळाबाहेर न्यायचे होते. सीमाशुल्क विभागाने १३ ते १५ मार्च दरम्यान हे जप्त केले. सोमवारी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली.

पहिल्या जप्तीमध्ये, विमानतळावरील एका खाजगी कर्मचाऱ्याच्या पँटच्या खिशात 6 कॅप्सूल आढळून आले. यामध्ये २४ कॅरेट सोन्याच्या पावडरचे वजन २.८ किलो भरले होते. त्याची बाजारभाव किंमत २.२७ कोटी रुपये एवढी आहे.दुसऱ्या एका जप्तीमध्ये, अधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका वैयक्तिक कर्मचाऱ्याकडून २.३६ कोटी रुपये किमतीचे २.९ किलो २४ कॅरेट सोन्याचे पावडर जप्त केले. हे सोने सात कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आले होते.

तिसऱ्या जप्तीमध्ये, आणखी एका कर्मचाऱ्याला पकडण्यात आले. त्याच्या अंतर्वस्त्रांमधून १.३१ कोटी रुपये किमतीचे १.६ किलो २४ कॅरेट सोन्याचे पावडर असलेले दोन पाउच जप्त करण्यात आले.

कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये ३.१ ग्रॅम सोन्याची पावडर आढळली
इतर दोन प्रकरणांमध्ये, विमानाच्या शौचालय आणि पेंट्रीमधून कचऱ्याच्या पिशव्यांची तपासणी करताना कस्टम अधिकाऱ्यांना दोन काळ्या पिशव्यांमध्ये ३.१ ग्रॅम सोन्याची पावडर सापडली. त्याची किंमत २.५३ कोटी रुपये आहे.

माधव भंडारींना पुन्हा डावलले …विधान परिषदेसाठी भाजपचे ३ उमेदवार जाहीर

मुंबई-संघ परिवारातील निष्ठावंत असा लौकिक प्राप्त असलेल्या माधव भंडारींना विधानपरिषद उमेदवारी देताना पुन्हा डावलले आहे. भाजपने ३ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी दिली गेली आहे.भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे, यामुळे पुरेशी मते असल्याने हे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत.

विधान परिषदेवर आमश्या पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत आहे. भाजप नेते प्रवीण दटके यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ पर्यंत असून आमदार रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ १३ मे २०२६ पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे सर्व आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या . निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे.विधानपरिषदेच्या या ५ जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या या ५ जागांवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून २७ मार्च रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. यासाठी भाजपाने ३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना पुन्हा डावलण्यात आले आहे.महायुतीत भाजपकडून ५ पैकी ३ जागांवर उमेदवार देण्यात येणार होते. तर एकनाथ शिंदे गट १ व अजित पवार गट १ अशा ५ जागा वाटून घेण्यात आल्या होत्या. दरम्यान १० मार्च ते १७ मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया असणार आहे. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्यासह दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांची नावे प्रदेश पातळीवरून केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आली होती.

माधव भंडारी यांचे नाव यापूर्वीही अनेकदा विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले होते. मात्र वारंवार चर्चा होऊनही अद्याप त्यांना विधिमंडळात संधी मिळालेली नव्हती. आता त्यांना संधी देऊन ज्येष्ठ नेत्यांना न्याय देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र या निवडणुकीतही भाजपाने भंडारींना स्थान दिलेले नाही. भाजपने ३ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांची वर्णी लागली आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे, यामुळे पुरेशी मते असल्याने हे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत.

वाचनीय वैचारिक लेखनाकडे वळायला हवे-डॉ. सदानंद मोरे

पुणे –
“दर्जेदार वैचारिक लेखन हे इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत रटाळ व रुक्ष असते, असा आपल्याकडचा प्रचलित समज आहे. मात्र, वैचारिक लेखनामध्ये नाट्यमयता नसेल, तर ते सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरत नाही. त्यामुळे वैचारिक वा संशोधनपर लेखन करणाऱ्यांनी आपल्या कसदार शैलीद्वारे दर्जेदार व तितक्याच वाचनीय वैचारिक लेखनाकडे वळायला हवे,” असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे पुणे विद्यापीठात आयोजित ‘मी लेखक होणारच’ या कार्यशाळेमध्ये डॉ. मोरे बोलत होते. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, न्यासाचे संचालक राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये डॉ. मोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘वैचारिक, संशोधन आणि सामाजिक लेखन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. मोरे म्हणाले, “वैचारिक लेखनामध्ये नाट्यमयता आणण्याची गरज लक्षात घेताना, लेखकांना आपला तोल जपता यायला हवा. आपल्या लेखनामधून आपण नेमके कोणत्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत, याची स्पष्टता हवी. वैचारिक लेखनासाठी आपल्याला पडणारे प्रश्न हे व्यापक असावेत. त्यासाठी लेखक-संशोधकांनी आपले कुतूहल जागृत ठेवायला हवे.” उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चांगले प्रश्न विचारणारे व्हा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. पांडे यांनी डॉ. मोरे यांचे स्वागत केले. डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

आयोजकांचे अभिनंदन…
डॉ. मोरे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना लेखनाकडे वळविण्यासाठी आयोजकांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. मोरे म्हणाले, “राजेश पांडे पुण्यामध्ये सध्या त्यांच्या संस्कृतीकारणाच्या माध्यमातून खूप मोठे योगदान देत आहेत. पुस्तक महोत्सवाद्वारे ते खूप महत्त्वाचे कार्य करत आहेत. डिजिटल माध्यमांच्या काळामध्ये नव्या पिढीला पुस्तकांकडे आणि लेखनाकडे वळविण्याचे हे काम महत्त्वाचे आहे.”

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित इतर सत्रांमधून रविवारी विद्यार्थ्यांना प्रसाद मिरासदार, राजेंद्र खेर आणि योगेश सोमण यांनीही मार्गदर्शन करत आपले अनुभव सांगितले. मिरासदार यांनी ‘कथा बीज ते कथा रचना’ विषयावर बोलताना दर्जेदार कथानिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करून सांगितली. त्यासाठी गरजेचे निरीक्षण, तपशील व बारकावे टिपण्याची सवय, कथांमधील पात्रे व त्यांच्या व्यक्तिरेखांची निर्मिती प्रक्रिया आदी बाबींची माहिती दिली. खेर यांनी कादंबरी लेखनाविषयी माहिती देताना आपले लेखन अधिकाधिक सखोल, तसेच वाचकांसाठी विश्वासपात्र ठरण्यासाठी महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला. तर सोमण यांनी संहिता लेखन या विषयी मार्गदर्शन करताना कथेचा सार, कथानक, पात्रांचे नियोजन, शेवट आदी बाबी विचारात घेत गरजेची असणारी संवाद रचना आदी बाबींमधील तांत्रिकता सहजसोप्या मांडणीतून स्पष्ट करून सांगितली.

औरंगजेब समजून बहादूर शाह जफरांचा फोटो जाळला:पुण्यात ‘पतित पावन संघटने’कडून मोठी गफलत

बहादूर शाह जफर हे मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट होते. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी ब्रिटिशांविरोधात मोठी भूमिका बजावली होती. ब्रिटिशांनी त्यांना कैद करून रंगून येथे पाठवले होते. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य रंगून येथेच काढले आणि तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांचा औरंगजेबाशी कोणताही संबंध नव्हता.


पुणे-औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात आंदोलनकर्त्यांकडून मोठी चूक झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाऐवजी चक्कत मुघल बादशहा बहादूर शाह यांचा फोटो जाळला. ‘पतित पावन’च्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.दरम्यान, आमच्या कार्यकर्त्याने चुकून चुकीचा फोटो छापून आणला. आम्हाला औरंगजेबाच्या उदात्तीकरण करणाऱ्यांचा विरोध करायचा होता आणि औरंगजेबाचा फोटो जाळायचा होता, असे स्पष्टीकरण पतीत पावन संघटनेने दिले आहे. तसेच, आपल्याकडून अनवधानाने ही चूक झाल्याचेही आंदोलकांनी मान्य केले आहे.

राज्यात छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर औरंगजेबावर मोठा वाद सुरू झाला असून वातावरण तापले आहे. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान गायल्यानंतर विविध संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. औरंगजेब एक क्रूर शासक होता आणि हिंदू धर्मीयांवर अत्याचार करणारा बादशहा होता, असे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या वक्तव्यांवर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात पतीत पावन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी औरंगजेबाऐवजी बहादूर शाह जफार यांचा फोटो जाळण्याची चूक घडली.

पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून मोठी गफलत घडली. आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तो जाळला. या चुकीमुळे आता या आंदोलनाची चर्चा रंगली आहे.

पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल महाल चौकात औरंगजेबविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परकीय आक्रमक आणि क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आंदोलकांकडून मोठी चूक झाली आणि त्यांनी औरंगजेबाऐवजी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याचा फोटो जाळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून, अनेक जण यावर टीका करत आहेत. तर काहींनी हा प्रकार अज्ञानातून झाल्याचे सांगितले.

महापालिकेची उद्याने आता रात्री नऊ वाजेपर्यंत खुली-उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे

पुणे- उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या सुरू असल्याने पुणे महापालिकेने सार्वजनिक उद्यानांची वेळ एक तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पूर्वी रात्री आठ वाजता बंद होणारी उद्याने आता रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी ही माहिती दिली.

पुणे महापालिकेने प्रत्येक उद्यानाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केली आहे. यामध्ये खराब झालेल्या खेळण्यांची नोंद घेतली जात आहे. तसेच उद्यानांमध्ये सुरक्षेसाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतेवरही भर दिला जात आहे. संध्याकाळच्या वाढीव वेळेत उद्याने अधिक प्रकाशमान राहावीत, यासाठी अतिरिक्त स्ट्रीटलाइट्स आणि दिवे बसवण्यात येत आहेत. स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबवून उद्यानांचे सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या तक्रारी व निरीक्षण अहवालाच्या आधारे तत्काळ दुरुस्ती केली जात आहे, जेणेकरून मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही असे अशोक घोरपडे यांनी सांगितले.

पुणे शहरात महापालिकेची २२० हून अधिक सार्वजनिक उद्याने आहेत. ही उद्याने नागरिकांसाठी आवश्यक विश्रांती आणि आरोग्यवर्धक ठिकाणे आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.उन्हाळ्यात तापमान वाढल्याने बहुतांश नागरिक संध्याकाळी पाचनंतर उद्यानांकडे वळतात. पूर्वीच्या वेळेनुसार सकाळी सहा ते अकरा आणि संध्याकाळी चार ते आठ या वेळेत बागा उघड्या असत. मात्र नागरिकांना संध्याकाळचा अधिक वेळ मिळावा म्हणून आता रात्री नऊ वाजेपर्यंत उद्याने खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून बाहेर पडून थोडा वेळ उद्यानांमध्ये घालवण्याची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही संध्याकाळी अधिक वेळ फिरण्याचा पर्याय मिळणार असल्याने त्यांनी महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुणे महापालिका पुढील काळात उद्यानांचे आणखी नूतनीकरण करण्याचा विचार करत आहे. वार्षिक देखभाल निधीतून उद्याने सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा मानस महापालिकेचा आहे. बसण्याची अतिरिक्त सोय, पाण्याच्या सुविधा आणि लँडस्केपिंगसाठीही योजना आखण्यात येत आहे, असे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.पुणे महापालिकेकडून उद्यानांची देखभाल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः मुलांच्या खेळाच्या ठिकाणी अधिक लक्ष दिले जात आहे. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ही ठिकाणे अधिक वापरली जातात.