Home Blog Page 605

जयवंत दळवी यांचा लेखनात कधीही तोल गेला नाही : संजय मोने

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजनअभिवाचन, दृकश्राव्य माध्यमातून उलगडले समग्र जयवंत दळवी

पुणे : जयवंत दळवी आयुष्यात कधीही माणसात रमले नाहीत; परंतु त्यांच्या लेखनातून मात्र ते कायम माणसातच रमलेले दिसतात. व्याकरणातील सगळे रस त्यांनी लेखनात वापरले त्यातील रौद्र, बिभत्स, शृंगार, क्रोध असे अनेक टोकाचे रस वापरताना देखील त्यांचा कधीही तोल गेला नाही. ढोल न पिटता स्त्रीवादी लेखकाची भूमिका जयवंत दळवी यांनी उत्तम रितीने पार पाडली, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी केले. कार्यक्रमाला पुणेकरांची गर्दी पाहता जयवंत दळवी यांची लोकप्रियता आजही टिकून आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

विख्यात लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‌‘कॅलिडोस्कोप : जयवंत दळवी‌’ या विशेष कार्यक्रमाचे आज (दि. 25) बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गिरीश जयवंत दळवी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी संजय मोने बोलत होते. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या जान्हवी जानकर, प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती चिटणीस, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, सतिश जकातदार, शैलेश दातार, राजेश दामले मंचावर होते. कार्यक्रमाची निर्मिती संवाद, पुणेचे सुनील महाजन यांची तर संहिता लेखन सतीश जकातदार यांनी केले. संयोजन निकिता मोघे यांनी केले. नाटक, चित्रपटातील दृश्ये, सशक्त अभिवाचनातून जयवंत दळवी यांचे समग्र दर्शन घडले.
रेखा इनामदार-साने, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, विजया मेहता, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे जयवंत दळवी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. ‌‘बॅरिस्टर‌’, ‌‘नातीगोती‌’, ‌‘सूर्यास्त‌’ या नाटकांमधील, ‌‘चक्र‌’, ‌‘रावसाहेब‌’, ‌‘महानंदा‌’, ‌‘उत्तरायण‌’, ‌‘पुढचं पाऊल‌’ चित्रपटांची झलक या निमित्ताने पाहायला मिळाली.
अभिवाचन कार्यक्रमात अभिनेत्री स्वाती चिटणीस (नातीगोती), शैलेश दातार (स्वगत), राजेश दामले (मोहिनी दिवाकर), अभिनेते संजय मोने (ठणठणपाळ) यांचा सहभाग होता.
जयवंत दळवी यांच्या नाट्यकलाकृती, त्यांच्या प्रत्यक्ष भेटी याविषयी संजय मोने यांनी आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण, शहरी पार्श्वभूमी, यांत्रिकीकरणामुळे झालेले बदल अशा विविध विषयांवरील उत्तम साहित्यकृतींची निर्मिती जयवंत दळवी यांनी केलेली दिसते. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता दळवी यांनी शांतपणे आणि तटस्थपणे लेखन केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

साहित्यिक कार्यक्रमाला झालेली पुणेकरांची गर्दी आनंददायक आहे, असे सांगून रामदास फुटाणे म्हणाले, जयवंत दळवी यांच्या सहवासातील अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये संवादचे सुनील महाजन अविरतपणे कार्यरत आहेत, याबद्दल त्यांनी कौतुक केले.

विजया मेहता म्हणाल्या, जयवंत दळवी हे मनस्वी दडपण घेऊन वावरणारे लेखक होते. त्यांच्या कलाकृतीत विषयाची मांडणी आणि पात्रे यांची चपखलता जाणवते.
रेखा इनामदार-साने म्हणाल्या, दळवी लोकप्रिय आणि गंभीर लेखक होते. त्यांच्या लिखाणात वास्तवाचे यथातथ्य चित्रणच नव्हे तर त्याला कल्पनेची जोडही होती. समकालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीची नस त्यांना उमगली होती.
विक्रम गोखले म्हणाले, मानवी मनाची गुंतागुंत सक्षमपणे मांडणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी होय. दिलीप प्रभावळकर म्हणाले, अभिनेता म्हणून दळवींची नाटके केल्याने माणूस म्हणून माझ्या व्यक्तीमत्त्वात खूप मोठा फरक पडला. माझ्या लिखाणावरही दळवी यांच्या लेखनाचा मोठा प्रभाव आहे.
शरद पोंक्षे म्हणाले, मनात आलेला प्रत्येक विचार सगळ्यांना बोलता येत नाही. ते विचार आपल्या लेखनातून मांडणे हे दळवी यांच्या नाटकातील व्यक्तिरेखेचे वैशिष्ट्य होय. दळवींनी लिहिलेली पात्रे अभिनित करताना व्यक्तिरेखांच्या आत शिरून विचार कसा करायचा हे मला उमगले. सुसंस्कृतपणाचा बुरखा फाडून लेखन ही दळवी यांची हातोटी होती.
प्रसाद ओक म्हणाले, माझ्या आयुष्यातील दळवी यांचे स्थान मोलाचे आहे. ते अस्सल नाटककार होते.

बिगर नंबर प्लेटच्या बाईकवर … माहिती मिळताच दोघांना पकडले अन ते निघाले बाईकचोर, ३ बाईक जप्त

पुणे- पोलिसांना दोघे जन नंबर प्लेट नसलेल्या बाईक वरून गेल्याची माहिती एकाने पोलिसांना दिली , पोलिसांनी माग काढला आणि त्यांना पकडले अन ते निघाले बाईक चोर , या दोघा चोरट्यांकडून ३ बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर, गुन्हा रजि नं ८४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यात गोपीनाथ नगर कोथरुड पुणे येथील दत्त मंदीराचे समोरुन मोपड चोरी झालेबाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यायातील चोरीस गेलेली मोपडेचा व अज्ञात चोरट्यांचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे दि.२३/०३/२०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस अमंलदार योगेश सुळ व हनुमंत माळी असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शास्त्रीनगर पोलीस चौकीचे चौकी अमंलदार योगेश सुळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मेघसृष्टी गोपनाथ नगर कोथरुड परीसरात दोन अनोळखी इसम हे संशयीतरीत्या एका काळ्या रंगाच्या बिगर नंबर प्लेटचे अॅक्टीव्हा स्कुटरवर फिरत आहेत. सदरच्या माहिती प्रमाणे मेघसृष्टी गोपीनाथनगर, कोथरुड येथे दोन अनोळखी इसम बिगर नंबर प्लेटचे अॅक्टीव्हा गाडीवर फिरताना मिळुन आले. सदर इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) आकाश सुरेश वाघिरे वय २१ वर्षे, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ कोकांडे वस्ती शिवमंदीरा जवळ शिवाजीनगर पुणे २) आदित्य भारत जाधव वय २१ वर्षे रा. मनोहर क्लासिक बिल्डींग फ्लॅट नं.१०, तिसरा माळा चंदननगर खराडी पुणे अशी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचेकडील मिळुन आलेली अॅक्टीव्हा स्कुटरचे मालकी हक्काबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची माहिती दिली त्यामुळे त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारले असता त्यांनी सदरची अॅक्टीव्हा ही बालाजीनगर, भारती विद्यापीठ कात्रज पुणे येथुन चोरी केल्याचे कबुल केले म्हणुन त्यांना लागलीच कोथरुड पोलीस ठाणेत आणुन त्यांचेकडे अधिकची चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन मोटर सायकली चोरी केल्याचे कबुल केले व सदर मोटर सायकली ह्या काढुन दिले आहेत. तपासादरम्यान आरोपीचे ताब्यातून एकूण ८४,०००/- रु. कि.च्या तीन मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या आरोपींनी कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नं.८४/२०२५, लोणी काळभोर पोलीस ठाणे गु.र.नं.१२६/२०२५ व भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं.१७६/२०२५ मधील मोटर सायकल चोरीचे तीन गुन्हे कोथरुड पोलीस ठाणे पुणे शहर पोलीसांनी उघड केले आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परि ३ श्री. संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, भाऊसाहेब पठारे यांचे मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, पोलीस उप निरीक्षक बसवराज माळी, पोलीस अमंलदार योगेश सुळ, हनुमंत माळी यांचे पथकाने केली आहे.

स्टार्टअप्स च्या माध्यमातून भारत महासत्ता बनेल-डॉ. पंकज जैन 

ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ चे उद्घाटन

पुणे, दि.२६ मार्च : “अभिनव कल्पना, नवनिर्मिती, प्रतिभा, चौकटीबाहेरील विचार यांची सांगड ही यशस्वी स्टार्टअप होण्यासाठी महत्वाची आहे. यातूनच भारत भविष्यातील महासत्ता बनेल. जगामध्ये भारतीय बाजारपेठ खूप मोठी असल्याने येथे लाखो स्टार्टअप सुरू होण्याची गरज आहे.” असे विचार डॉ. पंकज जैन यांनी व्यक्त केले.
इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्याच्या दृष्टिने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ या तीन दिवसीय स्पर्धांचे उद्घाटन युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी ब्लू ओशन स्टील्स चे सीईओ डॉ. पंकज जैन, नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर, यूएसएचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश कोरडे आणि अ‍ॅसेंच्यूअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहरोत्रा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटीचे संस्थापक विश्वस्त व एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र-कुलगुरू व कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. मिलिंद पांडे, डॉ. कृष्णा वर्‍हाडे, डॉ. कृष्णप्रसाद गुणाले, डॉ. अंजली साने, डॉ. मंगेश बेडेकर, डॉ.अक्षय मल्होत्रा व डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती उपस्थित होते.  
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर आधारित ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ या स्टार्टअप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. पंकज जैन म्हणाले,“विद्यार्थ्यांमध्ये अद्वितीय गुण असतात, जे त्यांना उत्तम उद्योजक बनवू शकतात, ते चौकटीबाहेर विचार करू शकतात, नवीन परिस्थितींशी लवकर जुळवून घेतात. तंत्रज्ञानावरील त्यांचे प्रेम त्यांना उद्योन्मुख ट्रेंड ओळखण्यास व त्यांचा फायदा घेण्यास मदत करते. याच गोष्टींच्या आधारावर स्टार्टअपच्या माध्यमातून देश महासत्ता बनेल.”
राजेश कोरडे म्हणाले,“ युवकांमध्ये असलेल्या उर्जेचा उपयोग स्टार्टअपमध्ये परिवर्तन करण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांनी सहकार्याची भावना ठेऊन नव कल्पनांना भरारी दयावी. देशात वाढत जाणार्‍या लोकसंख्येला पाहता येथे लाखो स्टार्टअप उभे करण्याची गरज आहे. अशा वेळेस युवकांनी आपली क्षमता ओळखून स्टार्टअप्स्मध्ये रचनात्मक काम करावे.”
भूपेश गहरोत्रा म्हणाले,“देशातील सर्व समस्यांवरील समाधान शोधण्याचे एकमेव साधन म्हणजे हॅकेथॉन होय.तसेच विद्यार्थ्यांनी अपयशातून शिकत राहावे. हॅकेथॉन हे मुलांचे ट्रेनिंग सेंटर असून एआय चा वापर करून नवे स्टार्टअप्स् सुरू करावेत. प्रत्येकाला गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.”
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,“ स्टार्टअपमधून उद्याचा भारत सक्षम होऊ शकतो. अशावेळी आम्ही कोणतेही स्टार्टअप उभे करण्यासाठी टीबीआयच्या माध्यमातून सर्वतोपरी कार्यरत आहोत. आंत्रप्रेन्युअरशीपसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे.”
डॉ.आर.एम.चिटणीस म्हणाले,“हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू मधून नवे उद्योजक निर्माण होऊन देश प्रगतीपथावर जाईल. यातून सृजनात्मकता समोर येऊन विद्यार्थी स्वःताचे स्टार्टअप सुरू करू शकतील. उद्योजक बनण्यासाठी कोणत्याही डिग्रीची आवश्यकता नसते. हॅकॅथॉन या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना सतत नवी दिशा मिळत असते. देशाचे भवितव्य घडविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,“ रोजगार, ऊर्जा आणि पर्यावरण या जागतिक समस्या केवळ आंत्रप्रेन्युअरशिपच्या माध्यमातून सोडविता येईल. तसेच महिला उद्योजकांची वृद्धि होण्यासाठी एमआयटी टीबीआय अधिक प्रयत्नशील आहे. ‘माइंड टू मार्केट’ आणि ‘पेपर टू प्रोडक्ट’ ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे खूप महत्वाचे आहे. त्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्यांना चालना द्यावी व त्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करून त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षात आणण्याच्या हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येते. जागतिक शांतताप्रिय समाजाची मानसिकता ठेऊन विद्यार्थ्यांनी नवकल्पनांना भरारी द्यावी.”
पार्थ आणि गौरव या विद्यार्थ्यांनी प्रास्ताविक केले. पियुष मोटवानी आणि अल्फिया सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कृष्णप्रसाद गुणाले यांनी आभार मानले.

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त पोलिसांना न्यायालयाचा दिलासा:एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय

एस-१४ वेतनश्रेणीबाबत ऐतिहासिक निर्णय
पुणे : महाराष्ट्र राज्यातील एकूण १,७२४ सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-यांनी दहा-वीस-तीस अंतर्गत एस-१४ वेतनश्रेणी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. पोलीस महासंचालक यांनी ६ आॅगस्ट २०२४ रोजी गृह विभागाला पाठवलेल्या प्रस्तावावर तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा आणि याचिकाकर्त्यांना १ जानेवारी २०१६ पासून वेतनवाढीचे फायदे  शासन निर्णय  २/३/ २०१९ व  २५/२/२०२२ चे शासन आदेशानुसार देण्याची शिफारस करावी, असे निर्देश न्यायालयाने  दिले आहेत.

शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास, थकीत रकमेची गणना करून नवीन वेतन निश्चितीची कार्यवाही त्वरित करावी. या निर्णयामुळे सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-यांना न्याय मिळाला असून, त्यांच्या वेतनातील तफावत दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. संपत महादेव जाधव आणि विनायक महादेव खंदारे यांनी केलेल्या या याचिकांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  रवींद्र व्ही. घुगे आणि अश्विन डी. भोबे यांनी हा निर्णय दिला, अशी माहिती संपत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सदाशिव भगत (उपाध्यक्ष  पुणे), हनुमंत घाडगे (उपाध्यक्ष पुणे ग्रामिण), गिरी,  शरद बोंगाळे (खजिनदार) उपस्थित होते. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पोलिस बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पोलिस नाईक पद रद्द केलेने पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार यांच्या मूळ वेतन स्तरात फक्त १०० रुपयांच्या ग्रेड पे फरकामुळे झालेल्या अन्यायाचे निराकरण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

संपत जाधव म्हणाले,  न्यायालयाच्या आदेशानुसार, ९० दिवसांच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे. मुख्य गृह सचिवांनी आदेशांच्या पालनार्थ त्वरित कार्यवाही करावी, यासाठी संपत जाधव यांनी  सर्व संबंधितांना लेखी पत्रव्यवहार केला आहे आणि सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे केव्हेटही दाखल केली आहे. सध्याच्या अधिवेशनानंतर,  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री अजित पवार हे उच्च न्यायालयाच्या निर्णयांचे पालनार्थ लवकरात लवकर आदेश पारित करतील. जर १५ दिवसांच्या आत आदेश निर्गमित झाले नाहीत, तर मुख्य गृह सचिवांना नोटीस देऊन उच्च न्यायालय, मुंबई येथे अवमान याचिका दाखल केली जाईल.

सरकारी वकिलांनी ६ मार्च २०२५ रोजीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले की, ९ डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेशाच्या पालनार्थ वित्त सचिवांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आणि लवकरच कार्यवाही होईल. त्यामुळे, न्यायालयाने ६ मार्च २०२५ रोजीच्या ६९३ याचिकाकर्त्यांच्या याचिकेतही ९ डिसेंबर २०२४ च्या आदेशाप्रमाणेच निर्णय दिला आहे, ज्यामध्ये १ जानेवारी २०१६ पासून लाभ देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार, नाईक पद भूतलक्षी प्रभावाने रद्द करून, सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनुसार अनुक्रमे पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस फौजदार आणि पोलीस उपनिरीक्षक पदांची एस-१४ वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊन वेतनातील तफावत दूर होईल.

पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली निखिल गुप्ता यांनी ६ आॅगस्ट २०२४ रोजी शासनास प्रस्ताव पाठवला आहे. पहिल्या पदोन्नत्या काढून घेतल्याशिवाय सुधारित पदोन्नती देणे संयुक्तिक नसल्याने, गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याचिकाकर्ते संपत जाधव यांनी पोलीस महासंचालक, स्वीय सहाय्यक आणि कार्यालयीन प्रशासकीय अधिका?्यांचे आभार मानले आहेत.  याचिकाकर्त्यांच्या वतीने  उच्च न्यायालयात विष्णू मदन पाटील यांनी काम पाहिले आहे.

स्वतःच्या मावशीच्या घरात केली चोरी पण पोलिसांनी अवघ्या तीनच तासातच घातल्या बेड्या

पुणे-स्वताच्या मावशीच्या घरी चोरी केली खरी त्याने , पण पुणे पोलिसांनी त्याला अवघ्या ३ तासात हुडकला आणि १ लाख २२ हजाराच्या चोरीच्या मुद्देमालासह गजाआड केला .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’फिर्यादी मावशी या ह्या त्यांचे राहते घराचा दरवाजा ओढुन घेवुन त्यांचे मुलीच्या घरी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा १,२२,०००/- चा ऐवज चोरून नेला म्हणुन यातील त्यांनी लष्कर पोलीस स्टेशन, येथे तक्रार दिल्याने अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा रजिस्टर क्र. ५३/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना, फिर्यादी यांचे घराजवळील बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी किरण राजेश कुंटे वय २८ वर्षे धोबी घाट कॅम्प पुणे याच्याकडे त्यास विश्वासात घेवुन तपास केला .. तेव्हा त्याने त्याची मावशी फिर्यादी यांच्या घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने आला असता, त्याला त्याच्या मावशीचे घराचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. त्याने गुपचुप चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट उघडुन त्याच्या ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले वरीलप्रमाणे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १०,०००/-रू. चोरल्याने तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडुन चोरी केलेली सर्व सोन्याचे दागिने रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील ,पोलीस उप आयुक्त, परि-२, श्रीमती स्मार्तना पाटील , सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग दिपक निकम, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकगिरीश कुमार दिगांवकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे), प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे, पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, लोकेश कदम, सागर हराळ, महिला पोलीस अंमलदार अलका ब्राम्हणे यांनी केली आहे.

१० लाखाची रोकड जबरीने हिसकावुन पळाले पण .. पोलिसांनी ६ तासात पकडले

पुणे- खडकी पोलीस स्टेशन च्या हद्दीत खडकी बाजारातील महालक्ष्मी ज्वेलर्स येथे विना नंबर ची स्कूटर घेऊन तोंडास रुमाल लावून आलेल्या दोघांनी एकाच्या हातातील १० लाखाची रोकड हिसकावून पोबारा तर केला. पण … पुणे पोलिसांनी त्यांना ६ तासात हुडकून हि रोकड आणि स्कूटर सह या दोघा भामट्यांना गजा आड केले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’.२५/०३/२०२५ रोजी खडकी पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मी ज्वेलर्स, खडकी बाजार, येथे फिर्यादी यांचे हातातील १०,००,०००/- रु ची रोकड असलेली बॅग…. पाठीमागे व पुढे नंबर प्लेट न लावलेल्या व्हेस्पा कंपनीचे मोटर स्कुटरवरुन आलेल्या व तोंडास रुमाल बांधलेल्या चोरट्यांनी रोकड असलेली पिशवी जबरीने हिसकावुन खडकी बाजारातुन अज्ञात ठिकाणी पलायन केले होते.
ही माहीती मिळताच सदर ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देवुन सदर घटनेचे तपासाबाबत मार्गदर्शन केले. चोरट्यांच्या विरोधात खडकी पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीच्या बी.एन.एस. कलम. ३०९ (४) प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास चालु करण्यात आला .
खडकी पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले, तपास पथकाचे प्रमुख दिग्विजय चौगले, व स्टाफ यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन करुन तांत्रीक विश्लेषण व सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे अनोळखी आरोपीचा गुन्हा करण्यापुर्वीचा माग काढुन ०६ तासाचे आत चाकण, पुणे येथुन यातील आरोपी चेतन मंगेश गोडसे, वय २८ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे, आणि आकाश कैलास माळी, वय २५ वर्षे, रा.चक्रपाणी वसाहत, भोसरी, यांना गुन्ह्यातील जबरीने चोरण्यात आलेले रु. १० लाख रु रोकडसह व गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार , पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील,पोलीस उप आयुक्त परि.४, हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त खडकी विभागविठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांचे मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गजानन चोरमले, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस अंमलदार संदेश निकाळजे, आशिष पवार, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, सुधाकर राठोड सुधाकर तागड, दिनेश भोये, शशांक डोगरे, प्रताप केदारी, यांनी केली आहे.

येरवड्यात पुन्हा पकडला १३ किलो गांजा

पुणे-गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ यांनी येरवडा भागात २,८१,०००/- रु किं.चा गांजा जप्त केला तसेच कोंढवा मंडई येथे एन डी.पी.एस गुन्हयातील wanted आरोपीला देखील पकडले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना मिळालेले बातमीवरुन जगदिश भवानसिंग बारेला, वय १८ वर्षे, रा. मु.पो दहिवत अंमळनेर जिल्हा जळगांव तसेच पवन सुभाष बारेला वय २२ वर्षे, मु.पो कलकुंटी ता वारला जिल्हा बरवानी मध्य प्रदेश यांच्या ताब्यात एकुण २,८१,०००/- रु.कि.चा १३ किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द येरवडा पोस्टे गु.र.नं.२०८/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ०८/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ मधिल wanted आरोपी नदिम मेमन हा कोंढवा मंडई जवळ पुणे येथे येणार असल्याची बातमी पोलीस अंमलदार साहिल शेख यांना मिळाल्याने सदर बातमीचे अनुषंगाने कोढवा मंडई जवळ येथे सापळा रचुन wanted आरोपी नदिम मेमन ऊर्फ इब्राहिम अल्ताफ कच्ची वय २५ वर्षे रा भाग्योदय नगर, किर्ती बिल्डींग, डि विंग प्लॅट नं ३ कोंढवा पुणे यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही कामी अंमली पदार्थ विरोधी पथक. १ गुन्हे शाखा, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे . शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे , सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार संदिप शेळके, साहिल शेख, प्रशांत बोमादंड्डी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

न्यूमेरोस मोटर्सने पुण्यात त्यांची बहुउद्देशीय ई-स्कूटर, डिप्लोस मॅक्स लाँच केली

~ विविध अनुप्रयोगांसाठी डिझाइन केलेले सुरक्षित , विश्वासार्ह आणि टिकाऊ ई-स्कूटर ~

~विविध भौगोलिक परिस्थितीत १३.९ दशलक्ष किमी पेक्षा जास्त अंतर व्यापणारी सर्वात मोठी पायलट चाचणी घेणारी पहिली भारतीय OEM~

पुणे, २६ मार्च २०२५: स्वदेशी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये विशेषज्ञता असलेल्या न्यूमेरोस मोटर्स या नवीन काळातील मूळ उपकरण उत्पादक कंपनीने आज पुण्यात त्यांची मल्टी युटिलिटी ई-स्कूटर, डिप्लोस मॅक्स सादर केली. स्वच्छ गतिशीलतेची पुनर्परिभाषा करण्यासाठी डिझाइन केलेले, डिप्लोस मॅक्स कंपनीच्या प्रमुख डिप्लोस प्लॅटफॉर्म अंतर्गत विविध अनुप्रयोगांसाठी वैयक्तिक गतिशीलता विभागात प्रवेश करत आहे .या वाहनांमध्ये सुरक्षितता, विश्वासार्हता आणि टिकाऊपणाची तत्त्वे समाविष्ट आहेत आणि त्यामुळे ग्राहकांच्या विविध गरजांसाठी ते आदर्श आहेत. डिप्लोस मॅक्स पुण्यातील एक्स-शोरूम किमतीत फक्त १,१३,३९९ रुपये उपलब्ध आहे.

कंपनीने भारतातील सर्वात मोठी पायलट चाचणी घेतली आहे, ज्यामध्ये १३.९ दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले गेले आहे – कोणत्याही भारतीय OEM साठी ही पहिलीच चाचणी आहे . अतुलनीय सुरक्षा, विश्वासार्हता आणि टिकाऊपणाचे प्रदर्शन करून, डिप्लोस स्कूटर्सच्या श्रेणीने विविध भौगोलिक भूप्रदेशांमधून प्रवास केला, इलेक्ट्रिक वाहनांच्या नवोपक्रमासाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आणि भारतातील ईव्ही स्कूटर्सचे भविष्य पुन्हा परिभाषित केले.

डिप्लोस प्लॅटफॉर्म अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि नाविन्यपूर्ण डिझाइनवर बांधलेला आहे, जो त्याच्या तीन मुख्य तत्त्वांचे पालन करत पूर्णपणे कनेक्टेड आणि अखंड वापरकर्ता अनुभव देतो.

·         सुरक्षितता: डिप्लोस प्लॅटफॉर्ममध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, उच्च-कार्यक्षमता एलईडी लाइटिंग आणि चोरीच्या सूचना, जिओफेन्सिंग आणि वाहन ट्रॅकिंग सारख्या प्रगत स्मार्ट वैशिष्ट्यांचा समावेश आहे ज्यामुळे उच्च दर्जाची सुरक्षितता सुनिश्चित होते.

·         विश्वासार्हता : चेसिस, बॅटरी, मोटर, कंट्रोलर यासारख्या वाहन प्रणालींची रचना, इंजिनिअरिंग आणि एकत्रित रचना केली जाते जेणेकरून त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण आणि दीर्घकाळ टिकेल.

·         टिकाऊपणा : मजबूत चौकोनी चेसिस आणि रुंद टायर्स दीर्घकाळ टिकणाऱ्या टिकाऊपणासाठी डिझाइन केलेले आहेत, जे विविध भूप्रदेशांवर उत्तम पकड आणि दीर्घ आयुष्य देतात.

न्यूमेरोस मोटर्सचे संस्थापक आणि सीईओ श्री श्रेयस शिबुलाल म्हणाले: “ न्यूमेरोस मोटर्समध्ये, आम्ही शाश्वत परिसंस्थेचा पाया म्हणून स्वच्छ आणि कार्यक्षम गतिशीलता उपायांची कल्पना करतो. डिप्लोस प्लॅटफॉर्म हे नवोन्मेष, सुरक्षितता आणि पर्यावरणीय जबाबदारीप्रती आमच्या वचनबद्धतेचे प्रमाण आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि टिकाऊ असलेले भारतात बनवलेले वाहन देऊन आम्ही भारत आणि जगभरातील ग्रीन मोबिलिटी सोल्यूशन्समध्ये सक्रियपणे योगदान देत आमच्या वापरकर्त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. हे लाँच ‘गेट्स इट डन’ आणि जगाला ‘नेहमी हालचाल’ करणारे वाहतुकीचे भविष्य घडवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि व्यावहारिक डिझाइनचे संयोजन करण्यावर आमचे लक्ष प्रतिबिंबित करते.”

ग्राहकांच्या सोयीसाठी न्यूमेरोस मोटर्स त्यांचे विक्री आणि सेवा नेटवर्क सक्रियपणे वाढवत आहे. सध्या, ते १४ शहरांमध्ये कार्यरत आहे आणि आर्थिक वर्ष २६-२७ च्या अखेरीस ५० शहरांमध्ये किमान १०० डीलर्सना सामील करण्याची योजना आहे.

वर्सोवा-बांद्रा सी लिंक साठी शाश्वत टिकाऊ उपायांसह;गोदरेजने बळकटी दिली मुंबईच्या पायाभूत सुविधांना

मुंबई: गोदरेज एन्टरप्राइजेस समूहाच्या बांधकाम व्यवसायाने मुंबईच्या अंतर्गत शहर
वाहतूक नेटवर्कच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कंपनीने Temporary Access
Bridge (TAB) साठी 3,500 हून अधिक प्रीकास्ट काँक्रीट सॅक्रिफिशियल स्लॅब आणि सॅक्रिफिशियल
फॉर्मवर्कसाठी 500 प्रीकास्ट काँक्रीट टब घटकांचे उत्पादन आणि पुरवठा केला आहे. प्रत्येक प्रीकास्ट काँक्रीट
सॅक्रिफिशियल स्लॅब उच्च सामर्थ्य आणि टिकाऊपणाच्या मानकांनुसार डिझाइन करण्यात आले आहे.
या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी गोदरेजच्या नाविन्यपूर्ण आणि शाश्वत
उपाय सुविधांवरील विश्वासार्ह कौशल्य दिसून येते. मुख्य अभियांत्रिकी प्रक्रियेत पर्यावरणपूरक पद्धतींचा
समावेश करून गोदरेज भारताच्या शहरी भविष्याला प्रगती आणि पर्यावरणीय जबाबदारी यांच्यात
समतोल साधणाऱ्या शाश्वत पर्यायांनी आकार देत आहे.
गोदरेज एन्टरप्राइजेस ग्रुपच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अनुप
मॅथ्यू म्हणाले, “आम्ही नाविन्यपूर्ण आणि शाश्वत बांधकाम उपायांसह भारताच्या पायाभूत सुविधांच्या
विकासाला गती देण्यासाठी वचनबद्ध आहोत. पर्यावरणावर कमी परिणामकारक बांधकाम साहित्य आणि
चक्रिय बांधकाम पद्धती अंगीकारून आम्ही भारताच्या हरित पायाभूत सुविधांच्या विकासाच्या भविष्यात
महत्त्वपूर्ण योगदान देत आहोत. आमच्या वर्सोवा-बांद्रा सी लिंक प्रकल्पातील सहभागामुळे या बांधिलकीला
बळकटी मिळाली आहे. अधिक टिकाऊ बांधकाम साहित्य आणि स्त्रोत कार्यक्षम प्रक्रिया वापरून, आम्ही
प्रकल्पाच्या पर्यावरणीय प्रभावात घट करत आहोत. तसेच संरचनात्मक मजबुती आणि इच्छित टिकाऊपणा
सुनिश्चित करत आहोत. आपल्या अभियांत्रिकी उपायांच्या केंद्रस्थानी शाश्वततेला स्थान देत भारताच्या
पायाभूत सुविधा विकासासाठी असलेली बांधिलकी गोदरेज किती जबाबदारीने पार पाडत आहे हे यातून
अधोरेखित होते.”
गोदरेजच्या प्रीकास्ट काँक्रीट घटकांमध्ये 10% Recycled Concrete Aggregates (RCA) चा वापर
समाविष्ट असून हे काँक्रीट मिक्स डिझाईन विक्रोळी मुंबई येथील अत्याधुनिक काँक्रीट कचरा पुनर्वापर
सुविधाकेंद्र येथे तयार केले जाते. संपूर्णपणे हरित ऊर्जा वापरून चालवल्या जाणाऱ्या या सुविधा केंद्राने
आपल्या प्रगत उत्पादन कार्यक्षमता आणि पर्यावरणीय मानकांसाठी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल
(IGBC) ‘ग्रीनको गोल्ड’ प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. गोदरेज बांधकाम आणि ते पाडून झालेल्या कचऱ्याचे
मौल्यवान इमारती आणि बांधकाम साहित्यामध्ये रूपांतर करून गोदरेज स्थावर मालमत्ता आणि बांधकाम
क्षेत्रात चक्रिय अर्थव्यवस्थेला चालना देत आहे.

या प्रकल्पातून शाश्वत बांधकाम साहित्य वापरण्यात असलेली गोदरेजची अग्रेसरता दिसून येते. त्यामुळे
कंपनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एक विश्वासार्ह भागीदार ठरली आहे. स्थावर मालमत्ता आणि
बांधकाम क्षेत्रावर पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याचा दबाव वाढत असताना, गोदरेज नाविन्य, कार्यक्षमता
आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल राखण्याचे नवे मापदंड निर्माण करत आहे. जबाबदार
पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारल्याने भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला योग्य दिशेने गती मिळू
शकते हे गोदरेजने सिद्ध केले आहे.

तुळशीबागेतील २६४ व्या श्रीरामनवमी उत्सवास गुढीपाडव्याला प्रारंभ

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने दि. ३० मार्च  ते १६ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे :श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात  दि. ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे.

गुढीपाडव्याला रविवार, दिनांक ३० मार्च रोजी श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार असून त्यादिवशी सकाळी ७ पासून श्रीरामास पवमान अभिषेक, श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण होणार आहे. तसेच दि. ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ९ वाजता श्री गणेश्वर शास्त्री पारखी हे रामायण वाचन, दुपारी १२ वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक व आरती महापूजा होणार आहे. तर, दि. ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांचे श्रीमत् रामायण प्रवचन होणार आहे.  

शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्री कौसल्या माता डोहाळजेवण होणार आहे.
श्रीराम जन्मानिमित्त रविवार, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे.

मंगळवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीरामजन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे.

* सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नवोदितांसह दिग्गज कलाकारांची गायनसेवा
उत्सवादरम्यान रविवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता हिमांशु बक्षी यांचे बासरीवादन कार्यक्रम होणार आहे. तर, सोमवार, दि. ३१ मार्च रोजी मंजिरी आलेगांवकर यांचे सुश्राव्य गायन, मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी दीप्ती कुलकर्णी यांचा सोलो हार्मोनियम वादन कार्यक्रम, बुधवार, दि. २ एप्रिल रोजी वृषाली मावळंकर यांचे गायन आणि शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हे कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन भरत तुळशीबागवाले यांनी केले आहे.

मुंबईत 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होणाऱ्या वेव्हज पदार्पण शिखर परिषदेत मनोरंजन क्षेत्रातील भविष्याचा अनुभुती घ्या!

मुंबई, 26 मार्च 2025

मुंबईत 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणारी पहिली वाहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) ही जागतिक माध्यमे आणि मनोरंजन (एम आणि ई) उद्योगात लाटा निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना आता परिषदेच्या वृत्तांकनासाठी येवू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीला 25 मार्च 2025 पासून प्रारंभ झाला आहे. या नोंदणीच्या माध्यमातून  कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार, छायाचित्रकार, आशय निर्माते आणि माध्यम विश्वातील तज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. नोंदणी करा  आणि प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार दर्शवणारे वृत्तांकन करून जगातील आशयनिर्मात्यांना जोडण्यासाठी  आणि भारतातील माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राला अधिक समृद्ध करण्यासाठी सज्ज  व्हा.  तुमचे वार्तांकन खरोखर वेव्हज अर्थात माहितीविषयक तरंग निर्मिती करेल.

जर तुम्हाला पत्रकारिता, माध्यम उद्योग  किंवा  आशय कथनाची  आवड असेल, तुम्ही  पत्रकार असाल , कॅमेरापर्सन, आशय निर्माते  किंवा समाज माध्यमातील व्यावसायिक असाल,  तर तुम्ही वेव्हज  2025 चुकवू शकत नाही! येथे होणाऱ्या चर्चासत्रात सहभागी व्हा, उद्योगधुरीणांकडून शिका     आणि उदयोन्मुख क्रिएटर्सना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सहाय्य करा. वेव्हज शिखर परिषद 2025 हे  तुमच्यासाठी उद्योगांची अंतर्दृष्टी प्रदान करणारे, जागतिक नेटवर्किंग तसेच  माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील अभूतपूर्व नाविन्यपूर्ण कल्पनांचा वेध घेण्यासाठी एक खुले प्रवेशद्वार ठरेल.

माध्यम प्रतिनिधींची नोंदणी प्रक्रिया

वेव्हज माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी, अर्जदारांनी हे करणे आवश्यक आहे:

✅ 1 जानेवारी 2025 पर्यंत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असावे.

✅ मान्यताप्राप्त प्रसार माध्यमांवर  वार्ताहर, छायाचित्रकार, कॅमेरा पर्सन किंवा डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून काम केलेले असावे.

✅ वरील निकष पूर्ण करणारे फ्रीलांस पत्रकार देखील पात्र आहेत.

✅ ऑनलाइन नोंदणी करा: https://app.wavesindia.org/register/media

✅ नोंदणी कधी सुरु होणार : 26 मार्च 2025

✅ नोंदणी अंतिम तारीख: 10 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:59 (IST)

✅ माध्यम प्रतिनिधी पास संकलन: मान्यता मिळालेल्या माध्यम प्रतिनिधींना माध्यम प्रतिनिधी पास संकलन करण्यासंदर्भातील तपशीलांची माहिती योग्य वेळी दिली जाईल.

✅ माध्यम प्रतिनिधी नोंदणी धोरणाविषयीच्या माहितीसाठी येथे पहा.

✅ परिशिष्ट ब नुसार माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी येथे शोधा.

✅ काही प्रश्न किंवा शंका असल्यास ‘WAVES Media Accreditation Query’. या शीर्षकासह pibwaves.media[at]gmail[dot]com वर ईमेलद्वारा संपर्क करा.

नोंदणी प्रक्रियेच्या वेळी सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड केले आहेत याची कृपया खात्री करून घ्या. सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतर मीडिया अ‍ॅक्रिडिटेशनची मंजुरी ईमेलद्वारे कळवली जाईल.  फक्त पीआयबी-मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधीच, माध्यम प्रतिनिधी  पाससाठी पात्र असतील. याविषयीची मान्यता, माध्यम संस्थेचा आवाका, पुनरावृत्ती, मनोरंजन क्षेत्राला दिलेले प्राधान्य आणि वेव्हज च्या अपेक्षित वृत्तांकनावर आधारित असेल.

वेव्हज का?

तुम्ही या उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक असा अथवा, गुंतवणूकदार, सर्जक अथवा नाविन्यपूर्ण निर्मिती करणारे असा, या शिखर परिषदेत तुम्हाला इतरांशी जोडले जाण्यासाठी, सहयोगासाठी, नव्या संशोधनासाठी तसेच  माध्यम आणि मनोरंजन  क्षेत्राच्या परीदृश्यात योगदान देण्यासाठी अनोखा जागतिक मंच उपलब्ध होईल.

वेव्हज हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच जागतिक व्यासपीठ आहे जे आशय  सामग्री निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेष यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावत देशाच्या  सर्जनशील क्षमतेला बळकटी देईल. हा कार्यक्रम उद्योगातील आघाडीच्या व्यावसायिकांना एकत्र आणेल : प्रसारण, मुद्रित माध्यमे, दूरदर्शन, आकाशवाणी, चित्रपट, ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यम, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता,  वर्धित वास्तव  (अग्युमेन्तेड रियालिटी), आभासी वास्तव (व्हीआर) आणि विस्तारित वास्तव (एक्सआर).

प्रमुख ठळक कार्यक्रम जे तुम्ही चुकवू शकत नाही

  • ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज –  जगभरातील नवोदित निर्मात्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साजरा करणारा एक अभूतपूर्व उपक्रम, अर्थात मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवण्यासाठी  ‘वेव्हज’ हे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.
  • वेव्हेक्स 2025 – हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरणारा असून यामाध्यमातून मीडिया-टेक स्टार्टअप्स त्यांच्या नवकल्पना आघाडीच्या उद्योग धुरिणांसमोर आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांसमोर सादर करतील, ज्यामुळे  भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवीन दिशा मिळेल.
  • वेव्हज बाजार: चित्रपट, गेमिंग, संगीत, जाहिरात आणि एक्सआर, निर्माते, गुंतवणूकदार आणि इतर व्यवसायांना जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ. यातूनच उद्योग व्यावसायिकांना  उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याच्या संधी देखील देते.
  • मास्टरक्लासेस आणि परस्परसंवादी सत्रे – उद्योगातील दिग्गज आणि जागतिक नेत्यांकडून शिकण्याची, माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्याची एक दुर्मिळ संधी.

या आमच्याबरोबर या लाटांवर स्वार व्हा, जर तुम्ही अभ्यागत असाल तर येथे नोंदणी करा; आणि जर विद्यार्थी असाल तर येथे नोंदणी करा

पीआयबीच्या टीम वेव्हज कडून येणाऱ्या नवीनतम घोषणांसह अपडेट राहा.

तुम्हाला काही प्रश्न आहेत का ? येथे त्यांची उत्तरे मिळावा.

निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी

‘बंजारा’चा टीझर प्रदर्शित

मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उलगडून भावनिक प्रवास घडवून आणणारा ‘बंजारा’ चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘बंजारा’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण सिक्कीमसारख्या निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे. सिक्कीमच्या १४ हजार फूट उंच पर्वतरांगांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून, हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांनी केले आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

नुकत्याच झळकलेल्या टीझरमध्ये तीन मित्रांची मोटरसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे. मात्र यात दोन वेगळ्या जनरेशन्सच्या मित्रांचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे. विशेष म्हणजे, शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडी लुक यात दिसत आहे. सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षित करणारी ठरेल. या मित्रांचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार, हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात,” ‘बंजारा’ हा माझ्या अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे. या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे, ते प्रत्येकाला भावेल, असा विश्वास आहे. सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशन्सवर शूटिंग करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्कीच अनुभवता येतील. ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल. कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टेल्जिक बनून अशा सहलीचे आयोजनही करतील.”

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतात,” ‘बंजारा’ ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आपल्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे. या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उलगडणारे जीवन यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल, अशी आशा आहे. प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो, हेच ‘बंजारा’चे वेगळेपण आहे. जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहाण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणारा आहे.”

राज्य सरकारकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ, १४.५२ टक्के सेलेनियम असलेल्या गव्हाचे रेशनमधून वितरण.

केस गळतीवरील पद्मश्री हिम्मतराव बावस्करांच्या संशोधन अहवालाला सरकारने केराची टोपली दाखवली का?

मुंबई, दि. २६ मार्च २०२५

बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे पण तीन महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर केलेला नाही. सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? सरकार काय लपवाछपवी करत आहे ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डिसेंबरच्या पंधरवाड्यात बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १९ गावात केस गळून टक्कल पडण्याचे प्रकार झाले. ही टक्कल का पडत आहेत? याचे शास्त्रीय कारण सरकारने अजून दिले नाही. सरकार आता टकलावर केस येत आहेत हे सांगत आहे, यासाठी कोणते तेल वापरले असे सरकारला विचारावे का? असे म्हणत केस गळती का झाली? याचे शास्त्रीय कारण मात्र देत नाहीत. ज्या भागात केस गळती झाली तो खारपाण पट्टा आहे. केस गळतीच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने त्याची चौकशी केली पण त्यासंदर्भातला ICMR चा अहवाल अजून आलेला नाही असे सरकार सांगत आहे. मग सरकराने त्यांचा माणूस त्या संस्थेकडे पाठवावा, ही संस्था काय चंद्रावर आहे का? पण सरकार हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न करत आहे किंवा अहवाल बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असे सपकाळ म्हणाले.

राज्य सरकारचा अहवाल आला नसला तरी दुसरीकडे प्रख्यात डॉक्टर आणि संशोधक पद्मश्री हिम्मतराव साळुबा बावस्कर यांनी मात्र त्या भागातील त्वचेचे, नखाचे, मातीचे व रेशनवर वितरीत करण्यात आलेल्या गव्हाचे सॅम्पल गोळा करून, त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचा अहवाल सरकारला दिला. हा सर्व प्रकार सार्वजनिक वितरण प्रणालीतील गव्हामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गव्हात मोठ्या प्रमाणात सेलेनियम आढळून आले आहे ते तब्बल १४ टक्के पेक्षा जास्त आहे. सेलेनियम १.९ टक्के पर्यंत हानीकारक नाही पण सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे मळमळ येणे, खाज येणे, मधुमेहाच्या तक्रारी येतात हे संशोधन आहे आणि यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोहचले व तसा पत्रव्यवहार बावस्कर यांनी शासनाशी केला पण सरकारने त्यांच्या अहवालाला केराची टोपली दाखवली.

हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री देण्याची शिफारस ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केली होती व नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना पद्मश्रीचा सन्मान दिला आहे. अशा सन्माननीय बावस्कर यांना काय घंटा कळते का? असे उद्दाम वक्तव्य जिल्हाधिकारी करतात आणि आम्ही येथे कशासाठी बसलो आहोत? ही भाषा ते करतात. जिल्हाधिकारी हे सरकारी नोकरी करत आहेत त्यांना हे शोभत नाही. या कलेक्टराचा बोलवता धनी सरकार आहे, त्यांना राज्य मंत्र्यांनी याबद्दल काही मोठे पद देण्याचे आमिष दाखवले आहे काय, असा सवाल करत बावस्करांच्या संशोधनावर सरकार काय कार्यवाही करणार, हा गहू कोणत्या भागातून आला होता, याची वस्तुनिष्ठ माहिती द्यावी किंवा बावस्कर यांचे संशोधन चुकीचे आहे हे तरी जाहीर करावे, त्यांच्या संशोधनाची टिंगळटवाळी करु नये. असे सपकाळ म्हणाले.

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचा प्रश्न विधान परिषदेत मांडला असता मंत्री महोदयांनी दिशाभूल करणारी माहिती दिली. हा राजकीय विषय नाही तर लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. यामागे कोणीतरी मोठा माणूस असून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सरकारने लोकांच्या जीवाशी खेळू नये असेही काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

संविधानामुळे सामान्य माणसाला संधीची समानता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

मुंबईदि. २६: मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या विधानमंडळाला मोठी गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अण्णा बनसोडे उपाध्यक्ष झाले, ही घटना केवळ त्यांचा गौरव नसून राज्यातील १३ कोटी जनतेचा अभिमान आहे. संविधानाने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळेच आज सामान्य माणूसही उच्चपदावर पोहोचू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना त्यांचा राजकीय प्रवास आणि अनुभव यांची प्रशंसा केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळ देशातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या सभागृहांपैकी एक आहे. या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी समन्वयाने काम करून या सभागृहाचा अधिक लौकिक वाढवूया. उपाध्यक्ष पद हे महाराष्ट्र विधानसभेतील सन्मानाचे पद आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाचा गौरव वाढविला आहे.अण्णा बनसोडे यांची या पदासाठी निवड त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. पिंपरीचे आमदार म्हणून ते तिसऱ्यांदा निवडून आले असून, त्याआधी महानगरपालिकेत नगरसेवक पदाची हॅटट्रिक त्यांनी केली आहे. तसेच, स्थायी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार आणि आता उपाध्यक्ष असा चढता राहिला आहे. त्यांच्या निवडीने विधानसभेला सक्षम उपाध्यक्ष मिळाला असून त्यांनी या जबाबदारीतून संविधानिक परंपरेचा सन्मान वाढवावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

अध्यक्ष पदावर विधीतज्ज्ञ ॲड. राहुल नार्वेकर आणि त्यांच्यासोबत सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण असलेला सदस्य हे उपाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. आपल्या या अनुभवातून विधानमंडळाचा बहुमान उंचावेल. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

विदर्भाच्या रणजी संघाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, दि. २६ – रणजी ट्रॉफी ही देशातील सर्वात प्रतिष्ठेची आणि मोठी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे मुंबई, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा तीन वेगवेगळ्या संघांचा समावेश असून यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाने शानदार कामगिरी करत जेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ संघाचे विधान परिषदेत मनःपूर्वक अभिनंदन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, क्रिकेट विश्वचषक जिंकणारा आपला संघ असो, किंवा देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू असोत त्यांचा उचित सन्मान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आम्ही खेळाडूंसाठी नियम आखले असून, त्यानुसार योग्य पातळीवरील खेळाडूंना योग्य सन्मान व पुरस्कार देण्याचे काम राज्य सरकार करेल. राज्य शासनाकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले.