Home Blog Page 590

एकनाथ शिंदेंवरील विडंबन :कुणाल कामराला, मद्रास हायकोर्टाकडून अंतरिम संरक्षणात 17 एप्रिलपर्यंत वाढ

मुंबई-स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या एफआयआरमध्ये कुणाल कामराला देण्यात आलेले अंतरिम संरक्षण न्यायालयाने 17 एप्रिलपर्यंत वाढवले आहे. मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराविरोधात एफआयआर नोंदवला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार ‘ म्हटले होते. नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली. यावर संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तर आमदार मुरजी पटेल यांनी आक्षेप व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामरा यांना 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून आता कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात आले.

मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी कामराची मुंबई हायकोर्टात धाव

दरम्यान, कुणाल कामरा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. कामरा यांनी 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझ्याविरोधात नोंदवलेला एफआयआर हा संविधानाने दिलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस.व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती एस.एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर होईल.

दुसरीकडे कुणाल कामरा तिसऱ्यांदा समन्स बजावूनही मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही. गत 2 एप्रिल रोजी त्याला तिसरा समन्स पाठवण्यात आला होता. त्यात त्याला 5 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. याआधी 31 मार्च रोजी मुंबई पोलिस कॉमेडियन कुणाल कामराच्या घरी पोहोचले होते. यावर कामराने सोशल मीडियावर लिहिले होते – ‘तुम्ही अशा पत्त्यावर जात आहात जिथे मी गेल्या दहा वर्षांपासून राहत नाही. हा तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे.

मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहेत. 29 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली तक्रार जळगावच्या महापौरांनी दाखल केली आहे, तर उर्वरित प्रकरणे नाशिकमधील दोन वेगवेगळ्या व्यावसायिकांनी दाखल केली आहेत.

या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोन समन्स बजावले आहेत. त्याचप्रमाणे, कामरा यांच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस महाराष्ट्र विधान परिषदेतही स्वीकारण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे लिहिल्यानंतर वादात सापडलेल्या विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना पोलिसांनी 31 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्यांना दोन समन्स बजावले आहेत.

इंडिगो विमानात महिलेचा मृत्यू: छत्रपती संभाजीनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

मुंबई-मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला उत्तर प्रदेशातील मिर्झापूरची रहिवासी होती. तिचे नाव सुशीला देवी होते. ती मुंबईहून विमानात चढली. उड्डाणादरम्यान त्यांची तब्येत बिघडली.

मेडिकल इमर्जन्सीमुळे, ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता विमान चिकलठाणा विमानतळावर उतरवण्यात आले. वैद्यकीय पथकाने विमानतळावर त्यांची तपासणी केली, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

अधिकाऱ्याने सांगितले की, एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनने आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या आणि विमान वाराणसीला रवाना झाले. तर महिलेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.
गेल्या २० दिवसांत इंडिगोच्या विमानांमध्ये २ जणांचा मृत्यू
२९ मार्च: विमानात पत्नीसमोर पतीचा मृत्यू.
पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. विमानाचे लखनौमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्या प्रवाशासोबत त्याची पत्नी आणि चुलत भाऊ होते. या प्रवाशाची ओळख प्राध्यापक सतीश चंद्र बर्मन अशी झाली आहे, ते आसाममधील नलबारी येथील रहिवासी होते.

तो बराच काळ आजारी होता. इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 2163 मध्ये चढल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. ते त्यांची पत्नी कांचन आणि चुलत भाऊ केशव कुमार यांच्यासोबत प्रवास करत होते.

क्रू मेंबर्सनी पायलटला याची माहिती दिली. यानंतर, विमानाचे लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानतळावरील वैद्यकीय पथकाने प्रवाशाची तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले.
२१ मार्च: पाणी पिल्यानंतर प्रवासी बेशुद्ध झाला, काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.

२१ मार्च रोजी सकाळी लखनौ विमानतळावर एका प्रवाशाचा मृत्यू झाला. विमानात बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने आधी पाणी प्यायले आणि नंतर सीटवर बसून अचानक बेशुद्ध पडू लागला. त्यानंतर, सर्व प्रवासी उतरले, पण तो बसूनच राहिला. मग, विमानातील क्रू मेंबर्सनी ताबडतोब वैद्यकीय पथकाला बोलावले, परंतु तोपर्यंत प्रवाशाचा मृत्यू झाला होता.

एअर इंडियाच्या एआय-४८२५ या विमानात ही घटना घडली. दिल्लीहून येणारे हे विमान सकाळी ८.१० वाजता लखनौ विमानतळावर उतरले. मृत आसिफ अन्सारी दौला हा बिहारमधील गोपालगंज येथील रहिवासी होता. या घटनेनंतर विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांनी सांगितले की, जर क्रू मेंबर्सनी वेळीच लक्ष दिले असते तर आसिफचा जीव वाचू शकला असता.

उद्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ

नवी दिल्ली-घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. आज म्हणजेच सोमवार ७ एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या दिल्लीत गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. किमती वाढल्यानंतर ही किंमत ८५३ रुपये होईल. तर मुंबईत हीच किंमत आधी 802.50 रुपये होती, ती आता 852.50 रुपये होईल.

सरकारने शेवटच्या वेळी ८ मार्च २०२४ रोजी महिला दिनी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. त्यावेळी दिल्लीत सिलिंडरची किंमत ९०३ रुपये होती

गिर्यारोहण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे 

ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ उमेश झिरपे जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात गिर्यारोहण आणि माउंट एव्हरेस्ट या विषयावर व्याख्यान

पुणे: केवळ भटकंती करणे म्हणजे पर्यटन, असा सर्वसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे. भटकंती कोणीही करू शकतो, परंतु गिर्यारोहणासाठी ठराविक प्रशिक्षण आणि त्याचा सराव असणे गरजेचे असते. गिर्यारोहण हे आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गिर्यारोहण करणे गरजेचे असून, त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे मत ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ आणि ‘गिरीप्रेमी’ संस्थेचे प्रमुख उमेश झिरपे यांनी व्यक्त केले.

सद्गुरु श्री जंगली महाराज मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५व्या पुण्यतिथी महोत्सवात उमेश झिरपे यांचे “एव्हरेस्ट आणि गिर्यारोहण” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष  राजेंद्र तांबेकर यांच्या हस्ते उमेश झिरपे यांचा सत्कार करण्यात आला.

उमेश झिरपे म्हणाले, एव्हरेस्ट सर करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु प्रत्येक गिर्यारोहकाने एव्हरेस्ट सर केलेच पाहिजे, असे नाही. मात्र गिर्यारोहण करताना आयुष्यामध्ये जे सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळतात, ते अनुभवण्यासाठी प्रत्येकाने गिर्यारोहण करणे गरजेचे आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेनुसार आपण जर गिर्यारोहण केले, तर त्याचा उपयोग आपल्याला आरोग्य चांगले राहण्यासाठी होऊ शकतो.

शारीरिक आणि मानसिक क्षमतेमध्ये वाढ होणे, आपल्या क्षमतांची जाणीव होणे, तसेच संकटांना सहज तोंड देण्यासाठी प्रेरणा मिळणे, असे महत्त्वाचे बदल आपल्या आयुष्यात गिर्यारोहणाच्या माध्यमातून होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्यामध्ये गिर्यारोहणाचा छंद जोपासला पाहिजे,असेही उमेश झिरपे यांनी यावेळी सांगितले.

यशप्राप्तीसाठी मेहनत, जिद्द आणि सुहृदांचे आशीर्वाद महत्त्वाचे : अंजली भागवत

पुणे : माझ्यातील खिलाडू वृत्तीला मुंबईतील गणेश मंडळात चालना मिळाल्याने खेळाडू म्हणून जडण-घडण झाली. पदकमंचापर्यंत पोहोचणारा एकच खेळाडू असतो. त्याच्या यशप्राप्तीसाठी मेहनत, जिद्द या बरोबरीनेच सुहृदांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद महत्त्वाचे असतात, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत यांनी केले. आजच्या काळात समाज एकत्र राहण्यासाठी हिंदुत्व टिकविण्याची गरज आहे. ते कार्य गणेश मंडळांमार्फत घडावे. कारण गणेश मंडळे फक्त सामाजिक कामच नाही तर वैचारिक देवाणघेवाणीचे कार्यही मोठ्या प्रमाणात करतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत यांचा साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे साई पुरस्काराने आज (दि. 6) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण आमदार हेमंत रासने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार, अर्जुन आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त रेखा भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने मंचावर होते. बुधवार पेठेतील श्री साईबाबा मंदिरच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगी पुणेरी पगडी, शाल, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे 18वे वर्ष आहे. सुरुवातीस सुवासिनींनी मान्यवरांचे औक्षण केले.

साईंच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझा भाग्ययोग आहे, असे सांगून अंजली भागवत म्हणाल्या, पुरस्कार कुठले आणि कुठे मिळतात याचे महत्त्व आहे. श्री साई पुरस्कार हा माझ्यासाठी बहुमूल्य आहे. सिडनी ऑलिंपिकमध्ये माझी निवड होण्याकरीता बरीच वाट बघावी लागली. त्यावेळी माझ्या वडिलांना शिर्डीला जाऊन साईंकडे प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी निवड झाल्याचे समजले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पुण्यातील गणेश मंडळांना खूप मोठी परंपरा आहे. गणेश उत्सवातच नव्हे तर वर्षभर गणेश मंडळे आदर्शवत काम करीत असतात. अंजली भागवत यांना रेखा भिडे यांच्या हस्ते साई पुरस्काराचे वितरण होत आहे हा मणिकांचन योग आहे, असे सांगून डॉ. मोरे पुढे म्हणाले, साई म्हणजे सावली किंवा छाया. या पुरस्काराच्या माध्यमातून साईंच्या कृपेची सावली लाभली आहे.

रेखा भिडे म्हणाल्या, मी साईभक्त असून लहानपणापासून अनेकदा शिर्डीला गेले आहे. साईनाथ मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत उत्स्फूर्ततेने सामाजिक कार्य करत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी असणे अत्यंत आवश्यक आहे. अंजली भागवत या अतिशय निष्ठावान खेळाडू असून युवा पिढीला मार्गदर्शन करीत आहेत, याचे कौतुक आहे.

आमदार हेमंत रासने म्हणाले, नेमबाजीत उच्च यश प्राप्त केलेल्या अंजली भागवत यांना हॉकी या क्रीडा प्रकारातील महनीय खेळाडू रेखा भिडे यांच्या हस्ते साई पुरस्काराने सन्मानित केले ही गौरवास्पद बाब आहे. या निमित्ताने व्यासपीठावर क्रीडा क्षेत्रातील रणरागिणी उपस्थित आहेत.

साईनाथ मंडळ ट्रस्टच्या कार्याची माहिती देताना प्रास्ताविकात पियूष शहा म्हणाले, पुण्यात सामाजिक क्षेत्रात गणपती मंडळांचे काम मोठे असून ही मंडळे म्हणजे पुण्याच्या रक्तवाहिन्याच आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत जाण्यासाठी गौरव सोहळा आयोजित केला जातो.

मान्यवरांचे स्वागत पियूष शहा, प्रविण गोळवडेकर, प्रशांत पंडित, प्रसाद भोयरेकर यांनी केले. सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन जतीन पांडे यांनी केले. अमर राव, नरेंद्र व्यास, प्रवीण वळवडेकर, शंकर निंबाळकर, प्रसाद भोयरेकर, अमित दासानी, संकेत निंबाळकर, प्रशांत पंडित यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आभार पियूष शहा यांनी मानले.

गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध:एकनाथ खडसेंचा आरोप,महाजनांचाही जोरदार पलटवार

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सनसनाटी आरोप केला आहे. गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे एकनाथ खडसे म्हणालेत. यासंदर्भात अमित शहा यांच्याकडे कॉल रेकॉर्ड असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आत एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराने व्हायरल केलेल्या क्लीपच्या आधारावर गिरीश महाजन यांच्यावर उपरोक्त गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर गिरीश महाजन यांनीही प्रत्युत्तर दिले. एकनाथ खडसे यांनी यांच्याकडील एक पुरावा तरी लोकांना दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिले.

एकनाथ खडसे म्हणाले की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली एक क्लिप प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगला रात्री अशा’, त्यात त्यांनी डिटेल सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणे उचित होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमित शहा यांच्याकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली. त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते. त्यांना सांगितले की, महिला आयएएस अधिकाऱ्यांशी तुझे संबंध आहे. यावेळी महाजनांनी सांगितले की, नाही, माझे अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो. अमित शाह यांनी त्यांना सांगितले की, तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे. रात्री एक वाजेनंतर दिवसभरात शंभर शंभर कॉल तुझे झालेले आहेत. त्यामुळे तू आता काहीही सांग. पण, तुझे सीडीआर खरे बोलतो. रोज बोलण्याचे काय कारण आहे? असे प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

मला वाटते की, खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल, असेही एकनाथ खडसे म्हणाले. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शहांना भेटणार आहे. अमित शहा आणि माझी भेट होतच राहते. त्यावेळी मी त्यांना हे खाली जे चालले आहे ते काय आहे? याबाबत विचारणा करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

खडसेंचे सगळे संपले, त्यामुळेच ते असे बरळतात – महाजन

दरम्यान, भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरे काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलायचे असेल तर त्यांना बाहेर पडणे मुश्किल होईल. त्यांचे सगळे संपलेले आहे. त्यांचे दुकान बंद झालेले आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात, असा पलटवार गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केला.

ते ज्येष्ठ आहेत, वयाने मोठे आहेत. बोलताना त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावे, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावे. जे सत्य असेल ते बोला. मात्र काही नसताना लोकांना खोट्या बातम्या द्यायच्या. वारंवार ते म्हणतात, त्यांच्याकडे हे आहे, ते आहे. मात्र कशासाठी ते असे करतात? ते लोकांची दिशाभूल करतात. मात्र मी जर काही सांगितले तर लोक त्यांना जोड्याने मारतील. मी त्यांच्या प्रमाणे खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला कमरेखालची भाषा शोभत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घाणेरडी भाषा करायची. काही सिद्ध करता येत नाही. काहीतरी चरित्रहणन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेले नाही. त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. अमित शहा यांना काय पुरावा दाखवता? तुमच्याकडे पुरावा असेल तर तो लोकांना दाखवा. यांना दिले, त्यांना दिले माझ्या मोबाईलमध्ये होते, डिलिट झाले, मोबाईल हरवला हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का? माझे आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा अंत बघू नका, असा इशाराही महाजन यांनी खडसेंना दिला.

चव्हाण श्रीराम मंदिरातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा श्रीराम सन्मान पुरस्काराने गौरव

पुणे : कसबा पेठेतील चव्हाण श्रीराम मंदिर येथे आज (दि.6) श्रीराम जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने, भक्तीभावाने आणि जनसेवा फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमातील वृद्ध आणि अनाथाश्रमातील लहान मुलांसमवेत साजरा करण्यात आला. समाजभान जपत चव्हाण परिवारातर्फे दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने रामजन्मोत्सवाचे आयोजन केले जाते.
या सोहळ्यानिमित्त सामाजिक जाणिवेच्या बांधिलकीतून नागरिकांची मोफत आरोग्य तपसाणी करण्यात आली. सामाजिक, शैक्षिणक, क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा श्रीराम सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अतुलनिय कामगिरी केल्याबद्दल डॉ. विनोद शहा यांचा विशेष सत्कार डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी स्थापन केलेल्या जनसेवा फाऊंडेशनमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता चव्हाण परिवाराच्या वतीने 21 हजार रुपयांची मदत देण्यात आली. शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
श्रीराम चव्हाण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चव्हाण, बापू गायकवाड, दत्ता सागरे, डॉ. नितीन भालेराव, मारुतराव देशमुख, अप्पासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भोला वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय खो-खो संघाचे कर्णधार प्रतिक वाईकर, उपकर्णधार सुयश गरगटे, खो-खो खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदित्य गणपुले तसेच भारतीय खो-खो पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, भारतीय खो-खो महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर यांचा श्रीराम सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा 260 नागरिकांनी लाभ घेतला.

श्रीराम जन्मसोहळ्यानिमित्त विद्या यंदे यांनी कीर्तनसेवा सादर केली. त्यांना अशोक मोरे (तबला), प्रणव तळवलकर (संवादिनी), धनंजय साळुंके (तालवाद्य), डॉ. अनघा धायगुडे, कल्याण हुद्दार (सहगायन) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनघा धायगुडे यांनी केले.

स्मार्ट सिटी च्या नावाने पुणेकरांची फसवणूकच -माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना बंद पडली असून या योजनेचे आमीष दाखवत भाजपने पुणेकरांना फसविले आहे, अशी टीका माजी आमदार, काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी योजना पुण्यासह सर्व शहरात अपयशी ठरत आहे, अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. स्मार्ट सिटी योजना मोदी सरकार अचानक गुंडाळून टाकेल आणि पळ काढेल, असे मी दोन वर्षांपूर्वीच सांगितले होते आणि नेमके तेच घडले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

देशातील शंभर शहरे स्मार्ट केली जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. स्मार्ट सिटी योजनेत २०१६ साली शंभर शहरांमध्ये पुण्याचा समावेश केला. पहिल्या टप्प्यासाठी बाणेर, बालेवाडी भागाची निवड करण्यात आली. मात्र विकसित असलेल्या या परिसरातही स्मार्ट सिटी योजना अपयशी ठरली. संपूर्ण शहर स्मार्ट करणे दूरच राहिले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे नेते आश्वासनं देत राहिले आणि पुणेकरांनी भाजपला मते दिली. प्रत्यक्षात मात्र पुणेकरांची फसगत झाली, पारदर्शी प्रशासन, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा, शैक्षणिक सुविधा, आधुनिक आरोग्य केंद्रे, कार्यक्षम पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प अशी उद्दिष्टे स्मार्ट सिटी योजनेची सांगण्यात आली. मात्र, १० टक्केही सुधारणा झालेल्या नाहीत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

काँग्रेस आघाडी सरकारने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली शहरांच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण मिशन (जेएनयूआरएम) हाती घेतले. या योजनेतून पुण्यात सुमारे ४ हजार कोटींची विकास कामे झाली. सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेऊन जेएनयूआरएम योजना रद्द केली आणि स्मार्ट सिटीचे ‘गाजर ‘ भारतीयांना दाखविले. या राजकारणात पुणे आणि महानगरे विकासकामांपासून वंचित राहिली. ही बाब संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात अकराशे कोटींचा खर्च झाला. यात भ्रष्टाचारच झालेला आहे. ४५ प्रकल्प पूर्ण झाले, असा दावा सरकारकडून केला जातो. त्याचा हिशेब आणि तपशील केंद्र सरकारने द्यावा आणि पुणेकरांसमोर वस्तूस्थिती मांडावी. जनतेनेही सरकारला जाब विचारावा, स्मार्ट सिटी योजनेबाबत मोदी सरकार दिशाभूल करीत आहे, याकडे काँग्रेसने सातत्याने लक्ष वेधले होते, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

सुट्टीच्या काळात प्रवाश्यांची लूट करणाऱ्या खासगी बस मालकांवर कारवाई करा -परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे- सुट्टीच्या काळात प्रवाश्यांची लूट करणाऱ्या खासगी बस मालकांच्या वर कडक कारवाई करा असे आदेश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी RTO आणि पोलीस या दोहोंना दिले आहेत .

या संदर्भात भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले कि,’दिनांक 1 एप्रिल रोजी खासगी बस ने प्रवासासाठी ऑनलाईन वेबसाईट ची तपासणी केली असता आजचे दर आणि मे महिन्यातील सुट्टीतील दर यात मोठी तफावत असल्याचे दिसून आले. ह्या अन्यायाविरुद्ध आणि ग्राहकांच्या लुटी विरुद्ध कारवाई करण्याबाबतचे पत्र सप्रमाण परिवहन राज्यमंत्री ना. माधुरी मिसाळ यांना सादर केले.त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार रांजेकर यांनी अत्यन्त सौजन्याने संवाद साधून नेमका प्रश्न समजून घेतला. त्यानंतर मंत्री महोदयांचे ओ एस डी संजय शिंदे यांनी तत्परतेने हालचाल करून ना. माधुरी मिसाळ यांच्याशी चर्चा करून परिवहन आयुक्तांना प्रवाश्यांची लूट करणाऱ्या खासगी बस चालकांवर कारवाई चे निर्देश दिले.माधुरीताईंच्या कार्यालयातील लिपिक उत्तम आव्हाड यांनी ते पत्र मला प्रेषित केले. गतिमान प्रशासनाचे हे उत्तम उदाहरण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील टीम किती संवेदनशीलतेने सर्व प्रश्न हाताळते हे ह्यावरून दिसून येते.
आता प्रत्यक्ष कारवाई ची प्रतीक्षा असून ह्या कार्यतत्परते बद्दल माधुरी मिसाळ यांचे अभिनंदन व आभार.
खर्डेकर म्हणाले कि,’ उन्हाळ्याची सुट्टी असो व सणासुदीची, ह्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. मूळ गावी जाणे असो नातेवाईकांना भेटण्यासाठीचा प्रवास असो अथवा सहलीला जाण्याचे नियोजन करतात अशा वेळी रेल्वे, राज्य परिवहन अश्या सर्वच ठिकाणी बुकिंग फुल्ल असते. अश्या वेळी बहुतांश नागरिक प्रवासासाठी खासगी बस चा वापर करतात.त्या काळात दुप्पट टिप्पट दर आकारून ग्राहकांची लूट केली जाते.

रामनवमी निमित्त कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात जनजागृती व स्वच्छता अभियान

पुणे-आज रामनवमीचे औचित्य साधून मुख्यमंत्री महोदय १०० दिवस ७ कलमी उपक्रमाच्या अनुषंगाने ,उप आयुक्त , परिमंडळ क्र. ४ व उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका यांचे मार्गदर्शनाखाली विक्रांत सिंह , ब्रँड अँबेसिडर , पुणे महानगरपालिका व VIIT कॉलेज – कोंढवा यांच्या माध्यमातून सकाळी ७ ते १० या वेळेत ऐतिहासिक पेशवे तलाव व परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन कण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास २५० विद्यार्थी तसेच क्षेत्रिय कार्यालय कडील ४० अधिकारी / कर्मचारी यांचे मार्फत परिसर स्वच्छ करणेत आला. १ कॉम्पॅक्टर व २ छोटा हत्ती या वाहनामार्फत अंदाजे २ टन १५० किलो कचरा गोळा करण्यात आला.
स्वच्छता अभियान दरम्यान नागरिकांमध्ये उघड्यावर्ती कचरा न टाकने , सिंगल use प्लास्टिक वापर न करणे , सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इत्यादी बाबत विक्रांत सिंह व राजू दुल्लम यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सहाय केले
सदर स्वच्छता मोहिमेदरम्यान महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी स्वच्छतेबाबत माहिती देवून या वर्षी संपूर्ण देशात अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करणेत येत असून त्याबाबत मार्गदर्शन करुन संविधान उद्देशिकाचे वाचन करणेत आले. सदर अभियाना दरम्यान कोंढवा येवलेवाडी कार्यालयातील प्रशासन अधिकारी सुनिल मोरे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम व अधिकारीकर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

कोंढव्यात श्रीराम नवमी व जन्मोत्सव साजरा

श्रीराम सेवक पवन बन्सल व परिवारातर्फे उपक्रमाचे आयोजन

पुणे – कोंढवा खुर्दच्या एनआयबीएम रोडवरील संकट मोचन महादेव मंदिर परिसरातील राम मंदिरातै रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमी व जन्मोत्सवाचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर राममय झाल्याचे पहायला मिळाले. या उपक्रमासाठी श्रीराम सेवक पवन बन्सल व परिवारातर्फे पुढाकार घेण्यात आला, तसेच माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांचे या सोहळ्याला मोठे सहकार्य लाभले.

रामनवनमी निमित्ताने मंदिर परिसरात भव्य अशी सजावट करण्यात आली होती. दुपारी ठीक १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळ्याला सुरवात झाली. या वेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम व सीता माता यांची मनोभावे पूजा व  आरती करण्यात आली. तत्पूर्वी मंदिर परिसरात रामनाम व सीतानामाचा जप तसेच भजन कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला पवन बन्सल यांच्यासह पुणे अग्रवाल समाज के अध्यक्ष ईश्वर गोयल,  पवन बन्सल, सुनीता बन्सल, अनिता रिषभ बन्सल, असीम बन्सल, जयभगवान गोयल, नरेंद्र गोयल, गुंजन नवल, संजय बन्सल, जीतेश बन्सल, संजय बन्सल, जीतेश अग्रवाल, शैलेश खंडेलवाल, योगेश जैन, पवन चमाडिया, सागर अग्रवाल रमेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने कोंढवा परिसर व शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमासंदर्भात बोलताना पवन बन्सल म्हणाले की, आज या ठिकाणी राम नवमीनिमित्ताने हजारोंच्या संख्येत रामभक्तांनी येऊन प्रभू श्रीराम व माता सीतेचे दर्शन घेतले. या शिवाय या ठिकाणी रामायण मन का पाठ, महाअभिषेक, महाआरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बन्सल यांनी सांगितले की, ब्रदरहूडच्या वतीने राम नवमी निमित्ताने सोमवार ७ एप्रिल रोजी अल्पबचत भवन येथे संध्या काळी ५ वाजता भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गायक आदित्य गोयल आणि रितु पांचाल रामाची भजने सादर करणार आहेत. या भक्तिमयपूर्ण कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

वक्फ सुधारणा कायद्यानंतर भाजपा सरकारचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव.

हर्षवर्धन सपकाळांचा संविधान हाती घेऊन सहकाऱ्यांसह ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रवेश.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम हे सर्वांचे, भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग.

“समतेचा, बंधुत्वाचा, संविधानाचा विचार नांदू दे”, अशी प्रभू रामाच्या चरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कामना.

नाशिक, दि, ६ एप्रिल २०२५

नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकराला होता. आज रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, खा. शोभा बच्छाव व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले.

आज राम नवमी निमित्त कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे महंत सुधीरदास तसेच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात डॉ आंबेडकर यांच्या सोबत असलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड देखील उपस्थित होते. यावेळी महंत सुधीरदास यांनी १९३० साली मंदिरात प्रवेशापासून अडवणारे महंत हे माझे आजोबाच असल्याचे सांगून त्याबद्दल माफी मागून कुणाल गायकवाड यांचे मंदिरात स्वागत केले. यावेळी सपकाळ यांनी महंत सुधीरदास यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम हे सर्वांचे आहेत, ते भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. आज राम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले व “देशात व राज्यात समतेचा, बंधुत्वाचा व संविधनाचा विचार नांदावा”, अशी कामना व्यक्त केली. या काळाराम मंदिराला मोठा इतिहास आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी १९३० ते १९३५ अशी पाच वर्ष १७ दिवस सत्याग्रह केला पण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले होते. यावेळी दंगल होऊन त्यात बाबासाहेब आंबेडकर जखमी झाले होते. दुसऱ्या वर्षी ते गोलमेज परिषदेला गेले असता दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी यांनी सत्याग्रहाची धुरा सांभाळली पण पाच वर्ष सत्याग्रह करूनही त्यावेळच्या व्यवस्थेने त्यांना प्रवेश दिला नव्हता. पण आज दादासाहेबांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांच्यासह आम्ही आज प्रभू रामाचे दर्शन घेतले आणि मंदिरात महंतांनी आमचे स्वागत केले.

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा..
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला, यावेळी मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, रोजगार नाहीत पण केंद्र सरकारने एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पहात बसलो आहोत ते म्हणजे वक्फ बोर्ड… इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भू संपादन करताना प्रार्थना स्थळे सुरक्षित रहावित अशी मागणी झाली, त्यासाठी १९१३ साली पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ बोर्ड बनले. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावित यासाठी ते बनवले होते, त्यात मंदिर, मशिद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते. वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला तरी याच्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे आणि त्यासाठीच हा सर्व खेळ सुरु आहे, असे सपकाळ म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापुरकरच्या घराला पोलीस संरक्षण दिले जाते, प्रशांत कोरटकरनेही महाराजांचा अपमान केला आता त्याच्यावर कारवाईचे नाटक सुरु आहे पण या प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे ते सर्वांना माहित आहे. गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकातही छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावरील लिखाण केलेले आहे. आता भाजपाचा कोणी केंद्रीय मंत्री रायजगडाला भेट देणार आहे असे समजले. भाजपाला जर खऱेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर कोरटकर, सोलापुरकरवर कठोर कारवाई करा आणि ‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत खा. डॉ. शोभाताई बच्छाव, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, माजी आ. शिरीष कोतवाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व नाशिकचे प्रभारी ब्रीज दत्त यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळशीबागेत २६४ व्या श्रीरामनवमी उत्सवात श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन

पुणे : बाळा जो जो रे… कुलभूषणा दशरथ नंदना… बाळा जो जो रे… चे स्वर पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात निनादले आणि रविवारी दुपारी १२.४० वाजता श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा झाला. यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने मंदिराला फुलांच्या आकर्षक आरास आणि विद्युतरोषणाई देखील करण्यात आली.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात श्रीरामजन्म सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली हे देखणे मंदिर स्थापन केले आहे.

मुख्य पूजेनंतर रविवारी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा झाल्यानंतर पागोट्याचा प्रसाद घेण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. त्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

श्रीरामराज्याभिषेक सोहळा मंगळवारी (दि.८)
मंगळवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. तर, शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीराम जन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन भरत तुळशीबागवाले यांनी केले आहे.

सरकारी नौकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लुटणाऱ्या तोतया महसूल सचिवाबरोबर त्याला सहाय्य करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यालाही पुणे पोलिसांनी पकडले

पुणे-महाराष्ट्र शासनाचे महसुल, वन विभाग व पोलीस खात्यामध्ये वर्ग १ व वर्ग २ नोकरीचे अमिष दाखवून अनेक नागरीकांना लुटणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखा युनिट २ ने पकडून गजाआड केले आहे. महादेव बाबूराव दराडे वय ३२ वर्ष रा फॅलट क्रमांक ५०५ व्हाईट फिल्ड सोसायटी काळा खडक वाकड,पुणे असे या भामट्याचे नाव आहे. लोकांना तो महसूल सचिव म्हणून त्याची ओळख करुन देत महसुल विभागात सहायक क्लर्क म्हणून काम करणारा रणजीत लक्ष्मण चौरे वय ३५ वर्ष रा. धायरी पुणे हा या तोतयाला गुन्हयात नियुक्तीपत्र बनवून देणे , अन्य कागदपत्रे याबाबत सहाय्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यालाही पकडले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रंमाक १०६/२०२५ बी एन एस कलम ३१६/२,३१८,३१९, मधील फिर्यादी रा.मुं पो काष्टी स्टेशन गाव तालुका श्रीगोंदा जि. अहमदनगर याचे तक्रारीवरुन इसम नामे महादेव बाबूराव दराडे वय ३२ वर्ष रा फॅलट क्रमांक ५०५ व्हाईट फिल्ड सोसायटी काळा खडक वाकड पुणे याने तो स्वता महसुल सचिव असल्याचे भासवून सन २०२२ ते २०२५ दरम्यान पुणे शहर व परिसरात पोलीस उप निरीक्षक पदावर नियुक्ती देतो म्हणून विश्वास संपादन करुन १० लाख रु घेवुन फसवणुक केले बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
हा आरोपी हा रियल इस्टेट एजंट म्हणून काम करीत असताना कामानिमीत्त शासकीय ऑफीसेस मध्ये जाणे येणे असल्याने त्याला शासकीय कामकाज व नोकरी व त्याच्या नियुक्तीबाबत ज्ञान झाल्याने सदर शासकीय कार्यालयातील त्याच्या नियमीतच्या वावराने तेथील येणा-या जाणा-या लोकांना तो महसूल सचिव म्हणून त्याची ओळख करुन देवू लागला त्यामध्ये तो ब-याच लोकांना शासकीय अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग पदावर नियुक्ती व नेमणुका करुन दिली आहेत असे भासवून आरोपीने सन २०२२ ते २०२५ दरम्यान महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील सुमारे २० ते ३० नागरीकांकडून १ लाख रु पासून २० लाख रु. पर्यंत वेगवेगळ्या रक्कमा घेवुन महसुल पोलीस व वन विभागात नोक-या देण्याचे अमिष दाखवून त्यांची फसवणुक केल्याची शक्यता असून त्याचेकडून महाराष्ट्र शासनाचे शिक्क्यांचे वापर करुन लेटर पॅडवर महसुल, पोलीस व वन विभागात विविध उमेदवार यांना नेमणुका बाबत पत्रे ओळखपत्रे, विविध शासनाच्या शिक्यांचे पत्रे, शासकिय चिन्हांचा वापर करुन स्वताचे नावाने शासकिय अधिकारी असल्याचे भासवणा-या डाय-या, शासनाचे सेवापुस्तके, शासनाचे ओळखपत्रे, विविध बँकांचे चेक्स बुक्स व कार्ड शासकिय शिक्के असा दस्ताऐवज हस्तगत करण्यात आलेला आह. यामध्ये अनेक नागरीकांना नोकरीचे अमिष दाखवुन फसवणुक केल्याची शक्यता दिसून येते तसेच सदर गुन्हयाचे तपासामध्ये महसुल विभागात सहायक क्लर्क म्हणून काम करणारे रणजीत लक्ष्मण चौरे वय ३५ वर्ष रा. धायरी पुणे याचा गुन्हयात उमेदवारांची नियुक्तीपत्र बनवून देण्यामध्ये सहभाग असलेबाबत निष्पन्न झाले असून त्यासदेखील ताब्यात घेण्यात आले आहे गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.
अशाप्रकारे वरील दोन्मही आरोपींनी म हाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील नागरिकांना नोकरीचे अमीष दाखवून गंडा घातला असण्याची शक्यता असल्याने त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ट्रम्प कर : भारताची निर्यात घटणार,त्यामुळे टीव्ही-खाद्यतेलासह बरेच काही स्वस्त होणार:थायलंड-व्हिएतनामसारखे देशात माल पाठवतील

अमेरिकेचे नागरिक महागाईने आणखी हैराण होतील

मुंबई-ट्रम्प यांच्या आयात करामुळे २०२५-२६ मध्ये भारतीय उत्पादनांची अमेरिकेची वार्षिक निर्यात ८५ हजार कोटी रुपयांपर्यंत घटू शकते. भारताच्या जीडीपीवर ०.२ टक्के परिणाम होईल, परंतु भारतात एक वर्षात खाद्यतेल, यंत्रे-इलेक्ट्रॉनिक सामानाच्या किमती घटू शकतात. हे सामान ट्रम्प यांच्या कराचा मारा सोसणाऱ्या देशांतून येते.

एसबीआयच्या ताज्या अहवालानुसार चीन, व्हिएतनाम, थायलंड, तैवानसारख्या देशांतून आयात सामान स्वस्त होईल. हे देश अमेरिकेला पाठवले जाणारे सामान भारतात पाठवू शकतात. कर युद्धामुळे अमेरिकेत महागाई दर २.२ टक्के वाढू शकतो. अमेरिकन अर्थव्यवस्था व बाजारातील घसरण पुढच्या काळात आणखी वाढू शकते. त्यामुळे अमेरिकेला नजीकच्या काळात दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

भारताच्या रत्ने अलंकार क्षेत्राला सर्वात जास्त फटका बसणार

अभियांत्रिकी साहित्य : इंजिनिअरिंग गुड्स क्षेत्रावर कराचा परिणाम दिसेल. यातून पुरवठादार व्यवस्थेला फटका बसेल. निर्यात महसूल घटेल.
रत्ने-दागिने : जेम अँड ज्वेलरी क्षेत्राला कराचा जास्त परिणाम दिसू शकतो. या क्षेत्राचा कर शून्यावरून २० टक्के केला आहे. अमेरिकेला दरवर्षी भारतात १० अब्ज डॉलर्सचे रत्न व दागिन्यांची निर्यात होते.
कृषी क्षेत्र : या क्षेत्रात भारताची अमेरिकेला निर्यात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान १.५ अब्ज डॉलर होती. एकूण निर्यातीपैकी ३ टक्के एवढा वाटा आहे. त्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.
यंदा जगातील निर्यात १.३ टक्क्यापर्यंत घटण्याचा अंदाज

एसबीआयनुसार करामुळे भारताच्या जीडीपीमध्ये ६६ हजार कोटी रुपये (०.२ टक्के) घट. ३ वर्षांत जीडीपीवर ०.५% परिणाम झाला.
जगभरात निर्यात २०२४ मध्ये २.९ टक्के घटली होती. २०२५-२६ ही घसरण १.३ टक्के राहू शकते.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कर लावण्याची घोषणा केल्यानंतर पहिल्याच दिवशी शेअर निर्देशांक डाऊ जोन्स ३.९८ टक्के घसरला. एसअँडपी ४.८४ टक्के, नॅस्डॅक-५.९७ टक्के अंकांनी घसरला. जपान, कोरिया, स्वतंत्रपणे हाँगकाँगचा बाजार कोसळला.
डॉलर निर्देशांक १.७ टक्के ​​घसरून १०२ अंकांवर आला. रुपयाची मोठी घसरण झाली.
कोणत्या देशातून येणारा माल स्वस्त हे जाणून घेऊया

चीनवर अमेरिकेने ३४ टक्के कर लादला. भारत खनिज इंधन-तेल आयात चीनमधून करतो. त्याचे दर घटू शकतात.
अहवालानुसार व्हिएतनामवर ४६ टक्के कर लावला. तेथून भारतात मोती, रत्नांसह इतर गोष्टींची आयात होते. त्याचे दर कमी होण्याची शक्यता सांगितली जाते.
तैवानवर अमेरिकेने ३२ टक्के कर लावला आहे. या देशातून भारतात इलेक्ट्रिकल यंत्रे, टीव्ही, साउंड रेकॉर्डरची आयात केली जाते.
स्वित्झर्लंडवर ३२ टक्के कर लावला आहे. तेथून भारतात मेकॅनिकल सामान आयात होते. त्याच्या किमतीही कमी होऊ शकतात.
थायलंडवर ३७ टक्के कर लावला आहे. तेथून भारतात तेलाची आयात केली जाते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला १० टक्के बेसलाइन कर भारतासह ६० देशांत शनिवारी लागू झाला. त्यावरून अमेरिका व युरोपात ट्रम्पविरोधी निदर्शने केली जात आहेत. व्यापार युद्धामुळे कोणाचेही भले होणार नाही, असे लोक म्हणून लागले आहेत. अमेरिकेचे नागरिक आधीच महागाईने हैराण झाले आहेत.

ट्रम्प यांनी शनिवारी पुन्हा घोषणा केली. कराला मागे घेणार नाही. ते म्हणाले, अमेरिका आपल्या आर्थिक हितांचे संरक्षण करेल.
त्याच्या उत्तरात चीनने कठोर शब्द वापरले. ट्रम्प कराच्या आडून दादागिरी करत आहेत. आम्ही मागे हटणार नाहीत.