Home Blog Page 579

ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा

योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।

विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी।

शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।

विश्वपट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।

“प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्मिक तेजाचे दीपप्रज्वलित करत संपूर्ण विश्वासाठी ‘पसायदान’रूपी विश्वप्रार्थना लिहिणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज अवघ्या विश्वाचे माऊली बनले. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाची चरित्रगाथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. माउलींचे समता, बंधुतेचे विचार आणि आचरण यांचे आदर्श उलगडून दाखवतानाच प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शनही अनुभवायास मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

नुकताच या चित्रपटाचा हृदय संगीत सोहळा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. ‘न भूतो न भविष्यती’ असा जिवंत संगीत सोहळा मी पहिल्यांदाच अनुभवाला प्रत्येकाच्या मनात संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असतेच त्या प्रतिमेला परत उजाळा देत   जिवंत करण्याचे काम या सुरेल सोहळ्याने केले असे सांगत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. 

रंगलेल्या या स्वरयज्ञात गायकांनी सुरेल आवाजात गीते सादर करून ज्ञानेश्वर चरित्राची अनुभूती दिली. शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात ज्ञानेश्वरीचा हा आनंद सोहळा रंगला. ज्ञानेश्वरीच्या सर्व गीतांच्या सादरीकरणांमध्ये श्रोते रममाण होऊन गेले होते. तर काही गीतांच्या सादरीकरणाच्या वेळी श्रोत्यांचे डोळे पाणावले. पसायदानाच्या अलौकिक अनुभूतीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या सुमधुर गीतांच्या सादरीकरणासोबतच  संत ज्ञानेश्वरांच्या गाथेतील काही प्रसंग ही यावेळी सादर करण्यात आला. एकाहून एक सरस एक अभंगांनी वातावरण भक्तिमय होत गेले. कार्यक्रम असा उत्तरोत्तर रंगत असताना मनावर विशेषत्वाने ठसा उमटला तो पसायदानाच्या अलौकिक अनुभूतीने. या सगळ्या अभंगांचं निरूपण करत असताना ज्ञानेश्वरांचं चरित्र,त्यांची शैली, तिचे अनेकविध पैलु  याबद्दल अतिशय मनमोकळा संवाद साधत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या सोहळ्यात वेगळंच  चैतन्य आणलं.

या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, यांनी तर  संगीत वितरणाची जबाबदारी झी म्युझिकने सांभाळली आहे.  

परस्परांशी आर्त जिव्हाळ्याने बांधलेल्या आणि जगण्याचे एकच प्रयोजन असलेल्या भावंडांचे नाते कसे असावे हे दाखवतानाच व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे रहस्य या भावंडांनी सहज उलगडून दाखविले. वैयक्तिक आत्मोद्धाराला लोकोद्धाराची जोड देऊन आत्मकल्याण आणि विश्वकल्याण साधावे हे सर्व तत्वज्ञान या भावंडांच्या पदोपदी प्रत्ययास येते. विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या या भावंडांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात. 

कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी वारसाना पाच लाख रुपये तर आत्महत्येच्या प्रकरणात एक लाख रुपये

मुंबई-राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास त्याच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या धोरणानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात कैद्याच्या वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू राहणार आहे. कैद्याचा मृत्यू वार्धक्य, दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करताना अपघातात, जामीनावर असताना, किंवा उपचार नाकारल्याने झाला असल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही.
नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मात्र शासनाच्या विद्यमान धोरणानुसार भरपाई मिळेल.
भरपाईसाठी संबंधित कारागृह अधीक्षकांनी प्राथमिक चौकशी, शवविच्छेदन, पंचनामा, वैद्यकीय अहवाल, न्यायालयीन व जिल्हाधिकाऱ्यांचा तपास आदी कागदपत्रांसह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल. यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यांच्या शिफारशींच्यानंतर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल आणि भरपाई दिली जाईल. मृत्युच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

350+ अब्जांहून अधिक पावले चालल्यानेआदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सच्या हेल्थ रिटर्न्स™ मॉडेलअंतर्गत1 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना बक्षिसे

मुंबई : भारतातील आघाडीची वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलची आरोग्य विमा शाखा आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, (“ABHICL”), ने जागतिक आरोग्य दिनानिमित्त घोषणा केली. आर्थिक वर्ष 2025 (एप्रिल 2024-मार्च 2025) मध्ये त्यांच्या हेल्दी हार्ट स्कोअर™ द्वारे देखरेख करण्यात आलेल्या आणि निरोगी जीवनशैलीची निवड करण्यासाठी तसेच हृदयाचे चांगले आरोग्य राखण्यासाठी त्यांच्या पहिल्याच HealthReturns™ मॉडेलचा 1 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना फायदा झाला आहे. HealthReturns™ मॉडेल प्रामुख्याने नियमित शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करते, ज्यामध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची उपलब्धता असते, जी ग्राहकांना सुधारित आरोग्य परिणाम प्रदान करण्यास मदत करते. आतापर्यंत 350 अब्जांपेक्षा जास्त पावले चालली आहेत, त्या ग्राहकांची आरोग्याप्रतीची ही वचनबद्धता त्यांच्या दैनंदिन सवयींमध्ये स्पष्ट होते.

‘हेल्थ – फर्स्ट’ दृष्टिकोनातून कंपनी रिअ‍ॅक्टिव्ह कव्हरेजपासून प्रोअ‍ॅक्टिव्ह वेलनेसला जास्त प्राधान्य देताना दिसते आहे. उद्योगाची पुनर्परिभाषा करतानाच आपल्या ऑफरमध्ये वेलनेस आणि हेल्थ मॅनेजमेंटचा समावेश करते आहे. या उपक्रमाचा एक मुख्य घटक म्हणजे अ‍ॅक्टिव्ह डेझ™, जो ग्राहकांना 10,000 पावले चालणे, वर्कआउट सेशनमध्ये 300 कॅलरीज बर्न करणे यासारख्या फिटनेस ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून हेल्थ रिटर्न™ मिळवण्याची परवानगी देतो. एका वर्षात 325 अ‍ॅक्टिव्ह डेझ™ मिळवणारे आणि ग्रीन हेल्दी हार्ट स्कोअर™ राखणारे पॉलिसीधारक त्यांच्या वार्षिक प्रीमियम रकमेच्या 100% पर्यंत हेल्थ रिटर्न™ म्हणून परत मिळवू शकतात.

·    आर्थिक वर्ष 25 मध्ये, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सने 3.8 लाख लोकांचे आरोग्य मूल्यांकन केले आणि 18 लाख वैयक्तिकृत वेलबीइंग स्कोअर™ (एकूण आरोग्य आणि निरोगीपणाच्या स्थितीचा गतिमान ML-चालित निर्देशक) तयार केला आहे, यामुळे ग्राहकांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास मदत झाली आहे.

·    प्रतिबंधात्मक काळजीवर जास्त लक्ष केंद्रित करून, त्याच कालावधीत, 1 लाख+ ग्राहकांना आरोग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे, तर 1.6 लाख+ ग्राहकांना आरोग्य हस्तक्षेप देण्यात आले आहेत.

·    ABHICL च्या परिसंस्था प्रतिबंधात्मक काळजीशी संबंधित 81% ग्राहकांना HbA1C, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब यासारख्या प्रमुख आरोग्य निर्देशकांवर चांगले नियंत्रण मिळाले आहे, ज्यामुळे आर्थिक वर्ष 25 मध्ये ABHICL ची आरोग्य परिणामांसाठी वचनबद्धता मजबूत झाली आहे.

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे सीईओ श्री. मयंक बथवाल म्हणाले, आजच्या जगात आरोग्य विम्याची भूमिका ही आर्थिक संरक्षणाच्या पलीकडे जाऊन उत्तम जीवनमानाचे साधन बनते आहे. आज ग्राहक केवळ वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीपेक्षा प्रतिबंधात्मक काळजीला प्राधान्य देत आहेज्यामुळे अपेक्षांमध्ये मूलभूत बदल झाला आहे. आरोग्य विम्यात निरोगीपणा आणि प्रतिबंधात्मक काळजी एकत्रित करण्यात आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स आघाडीवर आहे. आमचे अग्रगण्य हेल्थ रिटर्न™ मॉडेल पॉलिसीधारकांना केवळ निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करत नाही तर कल्याणासाठी सक्रियआरोग्य-प्रथम दृष्टिकोन राबवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते. आमचे ध्येय आरोग्य-प्रथम परिसंस्था तयार करणे आहेजिथे पॉलिसीधारक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असतील आणि निरोगीदीर्घ आयुष्य जगण्यासाठी सक्षम असतील.”

हे वेगळे मॉडेल आणि 100% आरोग्य, 100% आरोग्य विम्याचे आश्वासन अ‍ॅक्टिव्ह हेल्थ अ‍ॅपच्या वैयक्तिकृत सहभागाद्वारे दिले जाते, जे प्रत्येक वापरकर्त्याच्या अद्वितीय गरजा आणि वर्तनानुसार तयार केले जाते. स्थापनेपासूनच, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सने चार-स्तरीय पाया रचला आहे, ज्यात विम्याची भूमिका केवळ आजार झाल्यावर त्यावर उपाय, त्याची तरतूद एवढीच नाही तर ग्राहकांना सक्रिय आरोग्य भागीदाराचेही महत्त्व पटवून देते आहे:

i.तुमचे आरोग्य जाणून घ्या – वेल-बीइंग स्कोअरलाइफस्टाइल स्कोअरडिजिटल हेल्थ असेसमेंट आणि मानसिक वेल-बीइंग मूल्यांकन यासारख्या साधनांद्वारे ग्राहकांना विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे.

i. तुमचे आरोग्य सुधारा – ग्राहकांना आरोग्य सेवा आणि आरोग्य व्यवस्थापन सेवा उपलब्ध आहेतज्यामध्ये ABHICL च्या आरोग्य प्रशिक्षकांचे नेटवर्क समाविष्ट आहेज्यांनी या सेवांद्वारे ग्राहकांना दीर्घकालीन आजार यशस्वीरित्या सुधारण्यास मदत केली आहे.

ii.बक्षीस मिळवा – हा पैलू ग्राहकांना HealthReturns™ सारख्या फायद्यांसह त्यांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करते. Active Dayz™ ट्रॅक करूनफिटनेस ऍक्टिव्हिटीत सहभागी होऊन तसेच नियमित आरोग्य तपासणी करूनग्राहक विशेष बक्षिसे अनलॉक करू शकतात जे केवळ त्यांची आर्थिक सुरक्षितता वाढवत नाहीत तर आयुष्यभर निरोगीपणाला प्रोत्साहन देतात.

iii.संरक्षित रहा – ABHICL व्यापक आरोग्य विमा योजना ऑफर करते ज्यामध्ये उद्योगातील आघाडीचे फायदे आहेत जसे की बिगर-वैद्यकीय खर्चासाठी 100% कव्हरेजखोली भाड्यावर कोणतीही उप-मर्यादा नाहीप्रसूती कव्हरविमा रकमेतील गुणक तसेच उत्पादन अटी आणि शर्तींनुसार बरेच काही.

आता नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार:राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; नगर परिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी कायद्यात करणार सुधारणा

स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्ट्यांच्या नियमांत बदल, नवीन दराबाबत अधिसूचना

नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करासाठी अभय योजना

मुंबई-राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

यापुर्वी नगराध्यक्षांना पदावरुन दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यानंतर शासनस्तरावर कार्यवाही अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जात असे. त्याऐवजी आता अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत. त्यानुसार निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव पाठवला जाईल. ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांना दहा दिवसांच्या आता विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास तसेच त्यासाठीचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली.

नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्ट्यांच्या नियमांत बदल, नवीन दराबाबत अधिसूचना काढणार

राज्यातील महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता व नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्याच्या नियमांमध्ये एकवाक्यता आणण्यात येणार हे. त्याकरिता नवीन दरांबाबत अधिसूचना काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्यातील महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता भाडेपट्टयाने देणे, त्यांचे नूतनीकरण व हस्तांतरण याबाबत ६ नोव्हेंबर २०२३ रोजी नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यालाच अनुसरून आता राज्यातील सर्व नागरी स्थानिक संस्थांतील मालमत्तांच्या हस्तांतरणांत एकवाक्यता आणण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिका मालमत्ता हस्तांतरण नियमावलीच्या धर्तीवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी (स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण) (सुधारणा) नियम २०२५ निश्चित करण्यात येणार आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरी यांच्या मालमत्तांचे निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक, व्यावसायिक व औद्योगिक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात सुधारित नियमानुसार निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक वापरासाठीच्या मालमत्तांचा भाडेपट्टा दर हा वर्तमान बाजारमूल्याच्या (रेडी रेकनर) ०.५ टक्के पेक्षा कमी असणार नाही. तसेच व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठीच्या मालमत्तेचा बाजारमूल्याच्या ०.७ टक्के पेक्षा कमी असणार अशी तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या मालमत्तांचे अधिमुल्य, भाडेपट्टा दर व सुरक्षा ठेव निश्चिती ही संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती करेल.
सदर नियमांबाबत हरकती व सूचना मागविण्यात येतील व त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करासाठी अभय योजना

राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसूलीकरीता दंड माफ करून वसूली वाढविण्यासाठी अभय योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्तांच्या थकीत करांवर दरमहा २% दंड लावण्याची तरतूद आहे. यामुळे मालमत्ता धारकाच्या एकूण थकबाकीमध्ये वाढ होऊन दंडाची ही रक्कम अनेकदा मूळ कराच्या रकमेपेक्षा अधिक होते. मूळ कराच्या रकमेपेक्षा दंडाची रक्कम अधिक झाल्याने मालमत्ताधारक कर भरण्यास टाळाटाळ करतात. यावर उपाय म्हणून थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करून अभय योजना लागू करण्यात येणार आहे. यापुर्वीच्या अधिनियमात अशा अशा दंड माफीची तरतूद नाही. तशी तरतूद अधिनियमात करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

डॉ. आंबेडकर यांनी देशाला नवी दिशा देण्याचे कार्य केले-प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड

पुणे, दि.१४ एप्रिल : ” भारत देशाला नवी दिशा देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांनी केले आहे. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचा धागा पकडून त्यांनी संपूर्ण मानव जातीचा उद्धार केला आहे. सदगुणांची पूजा हीच ईश्वर पूजा आहे.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
प्रबुद्धनायक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वीं जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरूड येथील विद्यापीठाच्या परिसरात साजरी केली. या वेळी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. विश्वजीत नागरगोजे, प्रा.डॉ. दत्ता दंडगे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” संपूर्ण जगात भारताची ओळख ही म. गांधी, भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचशील जीवनात उतरावे.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” युगपुरूष डॉ. आंबेडकर यांना केवळ ६५ वर्षांचे जीवन लाभले खरे परंतू त्यांचे कार्य अद्वितीय आहे. यातील ३५ वर्ष शिक्षणात गेले. त्यांना केवळ २५ वर्षे काम करण्यासाठी मिळाले. त्यात काळात त्यांनी शिक्षण संस्थेंची स्थापना, सत्याग्रह, नियतकालिकांची निर्मिती, पक्ष काढणे तसेच विपूल लेखन आणि सर्वात महत्वाचे २३ ग्रंथांचे लिखान केले आहे. शिक्षणा शिवाय पर्याय नाही त्यांचा हा संदेशच मानव जातीच्या उध्दारासाठी अत्यंत महत्वाचा आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” डॉ. आंबेडकर यांनी ३२ विषयांमध्ये पदव्या घेतल्या होत्या. ९ भाषा अवगत असणारे युगपुरूष डॉ. बाबासाहेब यांनी सतत कठोर परिश्रम, समर्पण, सतत शिकत राहणे या गुणांचा विसर होऊ दिला नाही.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,” शिक्षण हे शस्त्रा प्रमाणे आहे. त्याचा उपयोग कसा करावे हे ज्याने त्याने ठरवावे. प्रगती करावयाची असेल तर जुन्या गोष्टींचे विस्मरण हे उच्चत्तम बुद्धीमत्तेचे लक्षण आहे.”
डॉ. दत्ता दंडगे म्हणाले,” डॉ. आंबेडकर यांनी समतेसाठी चळवळ उभी केली होती. तसेच त्यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला. १४ तळ्यांची चळचळ ही इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. समाजातील दांभिकतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पीत केले होते.”
यानंतर प्रा. गणेश पोकळे, डॉ. जोशी आणि प्रदिप चाफेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला तसेच कवितेचे वाचन केले.
प्रा. विनोद जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

देशाची वाटचाल, संविधान आधारित होण्याकडे लक्ष देणे, विरोधी पक्षांचे कर्तव्य…!

सत्ताधारी व विरोधकांची ‘संविधानीक कर्तव्यपुर्ती’ हीच बाबासाहेबांना आदरांजली..!
⁃ काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे दि १४ –
प्रत्येकास समान मताचा अधिकार देणारे संविधान हीच भारताची ओळख असुन, संविधानाचे मुल्य जपले तरच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत होऊ शकतो.
संविधानीक मुल्यांची व देशाच्या स्वायत्त संस्थांची पायमल्ली रोखत देशाची वाटचाल ‘संविधान आधारित’ होण्याकडे लक्ष ठेवणे, हे विरोधी पक्षांचे कर्तव्य असुन विरोधी पक्षांची संविधानीक कर्तव्यपुर्ती ही डॅा बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी अभिवादनपर कार्यक्रमात बोलतांना केले.
“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लिगल विभागा”च्या वतीने
महामानव, भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी, पुणे मनपा येथील डॅा आंबेडकरांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रमात बोलतांना त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजक सरचिटणीस ॲड फैयाझ शेख यांनी स्वागत – प्रास्ताविक केले. ऊपध्यक्ष ॲड शहीद अख्तर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ॲड श्रीकांत पाटील, ॲड सुरेश नांगरे, ॲड बाळासाहेब बामणे, ॲड विजय तिकोणे, ॲड अतुल गुंड पाटील, ॲड राजाभाऊ चांदेरे, ॲड इराफन शेख, ॲड सुरेश देवकर, ॲड आलीस सय्यद, इंटकचे मनोहर गाडेकर, जेष्ठ काँग्रेसजन सुरेश नांगरे, सुभाष जेधे, गणेश शिंदे, धनंजय भिलारे, विना कदम, अनिल धिमधीमे, विक्रांत धोत्रे इ उपस्थित होते…
या प्रसंगी संविधान प्रतींचे वाटप व सामुहीक वाचन करण्यात आले.
विविध धर्मिय स्वातंत्र्य सेनानींच्या प्रदीर्घ ब्रिटीश विरोधी लढ्यामुळे, बलीदानामुळे भारत लोकशाही प्रणीत प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर ऊभा राहिला. स्वातंत्र्या करीता वाहीलेल्या बलिदानाचे महत्व लक्षांत घेता, भविष्याची काळजी वहात ‘भारतिय संविधाना प्रती’ जागरूक राहून, भारतीय घटनेचे रक्षण करणे हे भारतीय नागरिकाचे देशाप्रती कर्तव्य ठरणार आहे. संविधानीक लोकशाहीत जागरुक नागरिकच् त्याच्या भविष्याचा शिल्पकार असून, भारताची संविधान आधारीत वाटचालीवर पहारा ठेवणे हीच खऱ्या अर्थाने डॅा बाबासाहेबांना आदरांजली ठरेल” अशा भावना उपस्थितींनी व्यक्त केल्या. ॲड राजेंद्र काळेबेरे यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.

मोदीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार?

काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल.

मोदींनी ११ वर्षात देशाचे काय भले केले? हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष पसरवणे ही मोदींची कामागिरी !

मुंबई, दि. १४ एप्रिल २०२५
संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे, या विधानाचा मी जाहीर निषेध करतो. काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखीत झालेले आहे, काँग्रेसला जाज्वल्य इतिहास आहे, हे मोदीच काय कोणीही नाकारू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात साक्षरतेपासून अंतराळापर्यंत प्रगती केलेली आहे. नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून सत्तेत आहेत, या ११ वर्षांत त्यांनी देशाचे काय भले केले, हे त्यांनी जाहीर करावे. नरेंद्र मोदी यांनी हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण करण्याचेच काम केले आहे. तीन तलाक, वक्ख बोर्ड सारखे मुद्दे उपस्थित करून मोदीजींनी मुस्लीम महिलांबद्दलची आपली खोटी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न केला पण मोदींनी गेल्या ११ वर्षात एकाही मुस्लीम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही. मोदींनी गेल्या ११ वर्षात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लीम आणि दलितांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांचे लिंचिंग केले जात आहे ते रोखण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नाही.

देशात शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, देशातील बहुजन समाज अस्वस्थ आहे. या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे पण मोदी मात्र स्वतःची आरती करून घेत आहेत. कोराना काळात टाळी, थाळी वाजवायला लावली आता अमेरिकेच्या टेरिफवर काय भूमिका आहे ते स्पष्ट करावे. देशातील गरिबांची संख्या मोदींच्या काळात वाढत आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, लाखोंच्या संख्येने लोक देश सोडून चालले आहेत हेच मोदींनी देशाचे भले केले आहे का. भाजपा सरकार मध्ये दलित अत्याचार वाढले आहेत, मॉब लिंचिग सारखे प्रकार दलितांबाबत झाले आहेत, ते थांबावे यासाठी मोदींनी काहीही प्रयत्न केले नाहीत. सातत्याने काँग्रेसवर टीका करणे हेच त्यांचे काम राहिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपा, रा. स्व. संघ यांना किती प्रेम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, याच विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला रा. स्व. संघ पहिल्यापासूनच मानत नाही. रामलीला मैदानावर बाबासाहेबांचे संविधान कोणी जाळले, हे मोदींना माहित नाही का? परंतु खोटा इतिहास सांगून दिशाभूल करणे ही संघाची शिकवण आहे, तेच मोदी करत आहेत. पण त्यांच्या अशा विधानाने खरा इतिहास झाकला जाणार नाही व रा. स्व. संघ, भाजपा व मोदींनी केलेली पापं धूवून निघणार नाहीत. प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीवर प्रेम असले पाहिजे हे संविधान सांगते, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही भारताची परंपरा आहे, ‘आतां विश्वात्मके देवे’, हे ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे तत्वज्ञान आहे, तेच तत्वज्ञान काँग्रेसचे आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे

डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात अढळ योगदान – अविनाश बागवे

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘भीम फेस्टिव्हल’

पुणे- ज्यांनी आपल्याला सामाजिक गुलामीतून मुक्त करून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हिरावून घेण्यात आलेला हक्क मिळवून दिला अशा पद्धतीने मिळवून दिला कि त्यांच्या जीवनाचा हा आदर्श पिढ्यानपिढ्या पुढे चालणार आहे, आणि पिढ्यानपिढ्याच्या जीवनात या महापुरुषाच्या कार्याचे योगदान अढळ राहणार आहे असे सांगत काँग्रेस पक्षाचे ख्यातनाम ,आणि अभ्यासू नगरसेवक असा लौकिक प्राप्त नेते अविनाश बागवे यांनी येथे वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ‘भीम फेस्टिव्हल’ चे उद्घाटन केले.

यावेळी ते म्हणाले,’ डॉ आंबेडकरांच्या कार्यामुळेच आपल्या संविधानात न्याय, समानता आणि स्वतंत्रतेचे सिद्धांत समाविष्ट केले गेले. बाबासाहेबांच्या विचारांनी लाखो लोकांना हक्क दिले, त्यांच्या कष्टामुळेच शिक्षण, समानता, कष्ट याची जाणीव झाली. त्यांच्या जीवनाचा आदर्श पिढ्यानपिढ्या पुढे चालणार आहे. आज त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करतो. यानिमित्ताने पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघातील मंगळवार पेठेतील भीमनगर येथे वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ‘भीम फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी याचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे नेते अविनाश बागवे, व अल्पसंख्यांक विभागाचे पुणे शहराचे पदाधिकारी, माजी नगरसेवक मुक्तार शेख, तसेच या फेस्टिव्हल चे आयोजक किशोर भोसले, रवींद्र भिंगारे या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी अत्यंत सुंदर पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जेष्ठ नागरिक जे प्रत्येक परिसराचा आधारस्तंभ असतात, अशा जेष्ठ नागरिक ज्यांच्या लग्नाला २५ वर्ष होऊन गेली आहेत अशा नागरिकांचा जोडीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली व या कार्यक्रमाचे कौतुकही केले. यावेळी नागरिकांशी संवाद साधत वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

तकलादू देशभक्तांच्या काळात बाबासाहेबांचेच विचार दिशादर्शक ठरतील-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – द्वेषावर आधारित राजकारण करून मिरवणाऱ्या तकलादू देशभक्तांच्या काळात सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधान देशाला योग्य दिशेला नेईल, असे प्रतिपादन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. डॉ बाबासाहेब यांनी क्रांतीकारी आणि दूरदृष्टीचे विचार मांडले. त्यातूनच लोकशाहीला बळकटी आली, असे या कार्यक्रमात बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले.

या प्रसंगी सुनिल मलके, प्रशांत सुरसे, सुरेश कांबळे, प्रथमेश अबनावे, चेतन आग्रवाल, स्वाती शिंदे, साजीद शेख, विकास माने, पंकज बनसोडे, विक्रांत दिवेकर, व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

विमानतळावरील महागड्या खाद्यपदार्थांवर उपाय:पुण्यात उडान यात्री कॅफे सुरू करण्यासाठी खर्डेकरांचे केंद्रीय मंत्री मोहोळांना पत्र

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्यांना केंद्रस्थानी ठेऊन विविध योजनांची आखणी करत असतात. त्यांच्या ह्या दृष्टिकोणामुळेच ते लोकप्रिय झाले आहेत.विमानप्रवास हा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात यावा यासाठीच्या प्रयत्नांना यश आले आहे. मात्र ,विमानतळावर मिळणारे खाद्यपदार्थ खूप महागडे विक्री केले जात असून त्याचे दर सामान्य ठेवण्यासाठी विमानतळावर स्वस्त दरातील उडान यात्री कॅफे सुरु करावेत अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.तसेच विमानतळावरील प्रतीक्षा काळ कमी करणेसाठी नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र देखील पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

खर्डेकर म्हणाले, विमानतळावर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. नुकतेच पुणे ते हैद्राबाद ह्या विमानप्रवासात ते प्रकर्षाने जाणवले. पुणे विमानतळावर वडापाव 120 रुपये, सामोसा 130 रुपये तर ब्रेड पॅटिस 150 रुपये ह्या हवाई दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चहा तर 200 रुपये च्या घरात आहे. ब्रँडेड दुकानामध्ये तर दर गगनाला भिडलेलेच आहेत. अगदी चितळेची बाकरवडी 800 रुपये किलो तर लक्ष्मीनारायण चिवडा 900 रुपये किलोने उपलब्ध होता.आपण ,नुकतेच कोलकाता विमानतळावरील उडान कॉफी शॉपला भेट दिली होती.जेथे स्वस्त दरात चहा,कॉफी, पाणी व इतर पदार्थ उपलब्ध आहेत. याच धर्तीवर सर्वच विमानतळावर उडान यात्री कॅफे सुरु केल्यास सामान्य प्रवासी यांना दिलासा मिळेल. किमान केंद्रीय हवाई नागरी राज्यमंत्री यांनी गृहनगर पुणे येथून ही सुविधा त्वरित सुरु करावी अशी मागणी करण्यात आली.

तसेच प्रवाश्यांना विनाकारण तीन तीन तास आधीच विमानतळावर येण्यास सांगितलं जातं.त्यासाठी घरून विमानतळापर्यंतचा एक तास प्रवासाचा धरला तर अवघ्या अर्धा तास, किंवा 50 मिनिटांच्या प्रवासासाठी 4 तास प्रतीक्षा करावी लागते. हा कालावधी कमी करता आला तर योग्य होईल. त्यासाठी अधिकचे बॅगेज चेक इन कॉऊंटर व सुरक्षा तपासणी कॉऊंटर केल्यास लांबलचक रांगा व उड्डाणापूर्वीचा प्रतीक्षा कालावधी कमी करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उत्साहात साजरी

पुणे-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे स्टेशन येथील पुतळ्यास प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.
मानवंदना देण्यास येणाऱ्या भीम अनुया्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पंधराशे किलो व्हेज पुलाव, पाचशे किलो लाडू, पाणी बॉटल व देशी झाडाची रोप वाटप करण्यात आली. राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, मंत्री मा. माधुरी ताई मिसाळ, मा. आमदार जयदेव रंधवे व अनेक पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, रोहिदास गायकवाड, संघमित्रा गायकवाड, बाबूराव घाडगे, शाम सदाफुले, वसंत बनसोडे, महेंद्र कांबळे, महीपाल वाघमारे, शोभा झेंडे, निलेश रोकडे, सुन्नाबी शेख, रावसाहेब झेंडे, अतुल भालेराव, रमेश तेलवडे, अयुब जाहगीरदार, लियाकत शेख, भगवान गायकवाड, चिंतामन जगताप, शशिकांत मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे हे सातवे वर्ष असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संजय सोनवणे, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, शाम सदाफुले, निलेश रोकडे यांनी प्रयत्न केले.

आंबेडकर जयंती हा उत्सवाचा, गाणी लावून नाचायचा दिवस नाही,आंबेडकरी विचारातून आत्मशोध घेणे गरजेचे : डॉ. मनोहर जाधव

नू. म. वि. प्रशाला, जय गणेश व्यासपीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा उत्सवाचा, गाणी लावून नाचायचा दिवस नाही. कारण डॉ. आंबेडकर यांचे नाव मनात आले की, नैतिकता व बौद्धिकतेतून येणारा विवेकच समोर येतो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेण्यासाठी आत्मशोध घेणे आणि त्यातून आत्मसन्मान जागृत करणे आवश्यक आहे, असे परखड मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख व प्रसिद्ध लेखक, समीक्षक, वक्ते डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केले.
नू. म. वि. प्रशाला आणि जय गणेश व्यासपीठ आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त आज (दि. १४) नू. म. वि. प्रशालेतील केसकर सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. आंबेडकर यांच्या भव्य रांगोळीभोवती गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच प्राध्यापक व शिक्षक यांनी संविधानातील भागाचे वाचन केले. त्या वेळी डॉ. मनोहर जाधव बोलत होते. नू. म. वि. प्रशाला शाला समितीचे अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शि. प्र. मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, रुग्णहक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, सदस्य राजेंद्र कदम, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, जय गणेश व्यासपीठ चे समन्वयक पियूष शहा, नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माया सोयाम, संगीता काळे, राजेश्री हेंद्रे, स्मिता कांगुणे आदी उपस्थित होते.
जय गणेश व्यासपीठ मधील साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ, वीर शिवराज मित्र मंडळ, गुरुवार पेठ, एकता मित्र मंडळ, अरण्येश्र्वर, नवज्योत मित्र मंडळ, येरवडा, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ, कसबा पेठ, पोटसुळ्या मारुती मित्र मंडळ, गणेश पेठ, श्री शनि-मारुती बाल गणेश मंडळ, एरंडवणा, अष्टविनायक मित्र मंडळ, नवी पेठ, त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट, सोमवार पेठ, संयुक्त मित्र मंडळ, सदाशिव पेठ आणि संजीवनी मित्र मंडळ, सहकार नगर यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. मनोहर जाधव पुढे म्हणाले, अनेक आघाड्यांवर संघर्ष करत समाजव्यवस्था मार्गी लावण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी महान कार्य केले. त्यांनी शिक्षण घ्या एवढाच उपदेश न करता प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. महापुरुषांना जातीमध्ये बंदिस्त करणे अयोग्य आहे. जात हे समाजातील वास्तव असले तरी भेदभाव करणे अयोग्य आहे.
उमेश चव्हाण म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धर्मनिरपेक्षता दाखवत गणेश मंडळे एकत्र येऊन अभिवादन करत आहेत हे मोठे योगदान आहे. त्याग आणि समर्पणाच्या प्रत्येक व्याख्येत डॉ. बाबासाहेब यांचे नाव प्रकर्षाने पुढे येते.
पराग ठाकूर, महेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. नील महाजन, नेहा भिसे, श्रेया कदम या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तर बाळासाहेब खरात यांनी बुद्धवंदना सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या चाकणकर यांनी केले तर आभार पियूष शहा यांनी मानले.

सलमान खानला पुन्हा धमकी:म्हटले- घरात घुसून मारू

मुंबई-सलमान खानला घरात घुसून मारणार अशी धमकी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्याची गाडी बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्स्अप ग्रुपवर सलमान खानसाठी धमकीचा मेसेज आला आहे. गेल्या वर्षी 14 एप्रिललाच सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला होता.

यानंतर वरळी पोलिस ठाण्यात धमकीचा मेसेज करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. 5 महिन्यांपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांना असा मेसेज आला होता. त्यावेळी दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही तर सलमान खानची जीव घेतला जाईल अशी धमकी देण्यात आली होती.सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार झाला. लॉरेन्स ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर सलमानने मुंबई पोलिसांना निवेदन दिले. तो म्हणाला होता, ‘मी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लोकांकडून टार्गेट होऊन कंटाळलो आहे. यापूर्वीही अनेकवेळा धमक्या आल्या असून दंडही ठोठावण्यात आला आहे. मी अनेक प्रकरणांमध्ये अडकलो आहे.

2023 मध्ये लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाल्यानंतरच सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याला महाराष्ट्र सरकारकडून Y+ श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षा वर्तुळात 11 सैनिक नेहमीच सलमानसोबत राहतात, ज्यात एक किंवा दोन कमांडो आणि 2 पीएसओ देखील असतात. सलमानच्या गाडीला पुढे आणि मागे नेण्यासाठी नेहमी दोन वाहने असतात. यासोबतच सलमानची कारही पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे.

सलमानला किती वेळा धमक्या आल्या?

जानेवारी 2024: दोन अज्ञात लोकांनी सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये कुंपणाची तार तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पकडल्यावर दोघांनी स्वतःला सलमानचे चाहते घोषित केले. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले. या कारणास्तव या दोघांविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला होता.

एप्रिल 2023: एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने मुंबई पोलिसांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याने मुंबई पोलिसांना आपले नाव रॉकी भाई असल्याचे सांगितले. तो म्हणाला होता की तो जोधपूरचा रहिवासी आहे आणि 30 एप्रिल 2023 ला सलमानला मारणार आहे.
मार्च 2023: जोधपूरचा रहिवासी असलेल्या धाकद्रमने सलमानच्या अधिकृत मेलवर 3 ई-मेल पाठवले होते. त्यात लिहिले होते की, सलमान खान तुझा पुढचा नंबर आहे, तू जोधपूरला येताच तुला सिद्धू मूसेवालाप्रमाणे मारले जाईल.
जून 2022: सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकवरून घरी परतले तेव्हा त्यांना एक अज्ञात पत्र मिळाले ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पत्रात लिहिलं होतं- ‘सलमान खान तुमची अवस्था मूसेवालासारखी करेल.’ यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला आणि याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वक्फ कायद्यावरून हिंसाचार- 24 परगण्यात पोलिसांची वाहने जाळली:आंदोलकांनी महामार्ग रोखला

19 विस्थापित कुटुंबे परतली

मुशिदाबाद -वक्फ (दुरुस्ती) विधेयकाविरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता २४ परगण्यात निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू आहे. बसंती महामार्गावरील बारामपूर येथे पोलिसांनी इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) कार्यकर्त्यांना घेऊन जाणारे वाहन थांबवल्यानंतर ही दंगल उसळली.

खरं तर, निषेधादरम्यान सकाळी १० वाजता भांगर, मिनाखा, संदेशखली येथील आयएसएफ कार्यकर्ते आणि स्थानिकांनी महामार्ग रोखला होता. रामलीला मैदानात जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेरले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.महामार्गावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली, परंतु संतप्त जमावाने शोनपूरमध्ये पाच पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड केली आणि त्यांना आग लावली. कैद्यांना घेऊन जाणारी व्हॅन उलटून तोडफोड करण्यात आली.

इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) चे आमदार नौशाद सिद्दीकी यांच्या आदेशानुसार हे कार्यकर्ते कोलकात्यातील रामलीला मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेला उपस्थित राहणार होते.जाहीर सभेदरम्यान नौशाद यांनी आरोप केला की, भाजप आणि तृणमूल काँग्रेस दोघेही पश्चिम बंगालमध्ये मतपेढीच्या राजकारणासाठी धर्माशी खेळत आहेत. त्यांना आर्थिक विकासाची चिंता नाही.

मुर्शिदाबादमध्ये सैन्य तैनात केल्यानंतर परिस्थिती सुधारली, १९ कुटुंबे परतली

येथे, मुर्शिदाबादमध्ये १०-१२ एप्रिल दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर, परिस्थिती आता हळूहळू सामान्य होत आहे. सोमवारी एडीजी कायदा आणि सुव्यवस्था जावेद शमीम म्हणाले की, दुकाने उघडण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १९ विस्थापित कुटुंबे त्यांच्या घरी परतली आहेत. मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्हा प्रशासन संयुक्तपणे लोकांना सुरक्षित परत आणण्याची खात्री करत आहेत.शमीम म्हणाले – आतापर्यंत २१० लोकांना अटक करण्यात आली आहे. वडील आणि मुलाच्या हत्येप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही. त्याच वेळी, केंद्र सरकारने हिंसाचारग्रस्त भागात १६०० सैनिक तैनात केले आहेत. हिंसाचारग्रस्त भागात इंटरनेटवर बंदी आहे. BNS चे कलम १६३ देखील लागू आहे.

१४ एप्रिलचे अपडेट्स

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची एनआयए चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, जमियत उलेमा-ए-हिंदने दिल्लीत एक बैठक घेतली. देशभरातील अनेक मुस्लिम संघटनांचे सदस्य त्यात सहभागी झाले होते. भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका राष्ट्रपती राजवटीत घेण्याची मागणी केली आहे.
१३ एप्रिल रोजी कछारमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात आसाम पोलिसांनी सोमवारी एफआयआर नोंदवला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. रविवारी, कछारमध्ये ३००-४०० लोकांनी परवानगीशिवाय रॅली काढली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निदर्शकांनी दगडफेक सुरू केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी लाठीचार्ज केला.
वक्फ कायदा २०२५ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये पक्षकार बनवण्यासाठी राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आवाहन केले आहे. वक्फ कायदा लागू करण्याची मुख्य जबाबदारी राज्य सरकारची आहे, त्यामुळे या प्रकरणात त्यांचा थेट आणि मोठा कायदेशीर हितसंबंध आहे, असे सरकारने म्हटले आहे.
कलकत्ता उच्च न्यायालय १७ एप्रिल रोजी हिंसाचाराबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये केंद्रीय दल तैनात करण्याची आणि हिंसाचाराची चौकशी एनआयएकडून करण्याची मागणी करण्यात आली. १२ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले होते.न्यायमूर्ती सौमेन सेन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले होते – बाहेर आलेल्या अहवालांकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. यामध्ये, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये क्रूरता दिसून येते. मुर्शिदाबाद वगळता जिथे जिथे हिंसाचार दिसून येईल, तिथे केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावे. या प्रकरणाची सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे.

१२ एप्रिल रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार उसळला. हिंसक जमावाने वडील आणि मुलाला मारहाण करून ठार मारले. त्यांची ओळख हरगोविंद दास (वडील) आणि चंदन दास (मुलगा) अशी झाली आहे. दोघेही हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती बनवत असत.

त्याच वेळी, ११ एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा १२ एप्रिल रोजी रुग्णालयात मृत्यू झाला. अशाप्रकारे, मुर्शिदाबाद हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात १५ पोलिसही जखमी झाले आहेत. १५० जणांना अटक करण्यात आली आहे.

ममता म्हणाल्या- दंगा करू नका, प्रत्येकाचे जीवन मौल्यवान आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सांगितले की, राज्यात वक्फ कायदा लागू केला जाणार नाही. हा कायदा केंद्राने बनवला आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही उत्तर हवे असेल, ते केंद्राकडून मागितले पाहिजे. माझे आवाहन आहे की शांत राहा. प्रत्येकाचे जीवन मौल्यवान आहे, राजकारणासाठी दंगली भडकावू नका.

११ एप्रिल रोजी मुर्शिदाबाद, मालदा, दक्षिण २४ परगणा आणि हुगळी जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला. निदर्शकांनी वाहने जाळली आणि पोलिसांवर दगडफेक केली. सुईटी पोलिस स्टेशन परिसरातील साजूर क्रॉसिंग येथेही पोलिसांवर कच्चे बॉम्ब फेकण्यात आले. यावेळी १० पोलिस जखमी झाले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी चार राउंड गोळीबार केला. या गोळीबारात दोन जण जखमी झाले. दोघांवरही उपचार सुरू आहेत.

ह.भ.प. रामदास महाराज देसाई देतात १५० मुलांना मोफत शालेय शिक्षण.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ मिळून देणारा हा मंच आणि सहभागी स्पर्धक यांची चर्चा चांगलीच रंगली आहे. सामाजिक कुप्रथांवर आसूड ओढणारी आणि सामाजिक सौहार्दाची संस्कृती रुजवणारी कीर्तनकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. कीर्तनातून समाजप्रबोधन करण्याचं काम आजवर अनेक संतांनी आणि कीर्तनकारांनी केलं. आजच्या काळातही कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा हा वसा जपण्यासाठी साताऱ्याचे ह. भ. प. रामदास महाराज देसाई आपल्या कीर्तनातून समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं मोलाचं कार्य अखंडितपणे करतायेत.

सातारा जिल्ह्यातल्या वाघोली गावात वारकरी संप्रदायाचा इतका प्रसार झाला नव्हता. कीर्तनाचे कार्यक्रमसुद्धा फार कमी प्रमाणात व्हायचे. मोकळेपणानं बाहेर पडण्यासाठी महिलापण घाबरत असत. या गावात कीर्तनातून ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सांगून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या एक वर्षात वाघोली गावात परिवर्तन घडून आलं. कीर्तनामुळे हे शक्य झालं. २०१९मध्ये ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांनी श्रीराम वारकरी शिक्षणसंस्था उघडली. आज तिथे दीडशे मुलांचं शिक्षण ते स्वखर्चानं करतात. कीर्तन करून जे काही पैसे जमवता येतील त्यातून ते या मुलांचा सगळा खर्च करतात.

भगवान मामा कऱ्हाडकर यांच्याकडून कीर्तनाचे धडे घेणारं ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांचं संपूर्ण कुटुंब कीर्तनात आणि  श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांच्या सेवेत मग्न आहे. आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या सहकार्यानं मी ही जबाबदारी पेलू शकतो असं ह. भ. प. रामदास महाराज देसाई सांगतात. त्यांची मुलगी संस्थेत संस्कृतचे पाठ शिकवते. मुलगा उत्तमरीत्या मृदंग वाजवतो. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची पूर्तता होणं आवश्यक आहे. माझे वर्षातून तीनशे ते चारशे कार्यक्रम होतात. माझ्या कीर्तनकलेची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते. यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं असं ह. भ. प. रामदास महाराज देसाई म्हणतात.

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा त्यांना अभिमान वाटतो आहे. त्यांची कीर्तनसेवा बुधवारच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पाहायला विसरू नका साताऱ्यामधल्या वाघोली गावातल्या ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांची कीर्तनसेवा ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात सोमवार ते बुधवार, रात्री ८ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर…!