शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे दृष्टीहिन जोडप्याचा विवाह सोहळा पुणे : सनईचे मंगलमय सूर…कार्यकर्त्यांची सुरु असलेली लगबग….वाजत गाजत काढलेली वरात…भांड्यांपासून कपाट आणि सोफ्यापर्यंत विविध वस्तूंनी सजलेले रुखवत… वाद्यांचा गजर आणि वैदीक मंत्रोच्चाराचे सूर अशा मंगलमय वातावरणात गायिका असणारी शितल केंद्रे आणि सुनील पवार या दृष्टीहिन जोडप्याचा विवाह सोहळा संपन्न झाला. गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या साक्षीने शितल आणि सुनील यांनी प्रेमाची व नव्या स्वप्नाची गाठ बांधली.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे या अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, कर्नल भार्गव, किशोर सरपोतदार, सुभाष सरपाले, मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, अमर लांडे, सचिन ससाणे, रोहिणी चेन्नूर, सुनेत्रा राचेल्ला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शितल केंद्रे ही मूळची नांदेडची तर सुनील पवार हा संगमनेरचा आहे. दोघेही वाघोलीच्या लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेत असतात. शितल ही संस्थेच्या ऑर्केस्ट्रा मध्ये गायिका असून दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. विवाह सोहळ्यात साखरपुडा, हळदी समारंभ विवाहाचे धार्मिक विधी पार पडले. लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या सहयोगाने दरवर्षी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला.
पुणे- धनकवडी आणि कोंढवा अशा २ ठिकाणी प्रत्येकी ९/९ वर्षे वयाच्या २ मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी सहकारनगर आणि कोंढवा पोलिसांनी दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.
एका नऊ वर्षाच्या चिमुरडीसाेबत एका तरुणाने अश्लील वर्तन करुन तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. घडलेला प्रकार पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर मुलीच्या 34 वर्षीय आईने पोलिसांकडे धाव घेत आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी आराेपी राहुल राम कुमार (वय- 21,रा. धनकवडी,पुणे) या आराेपी विराेधात सहकारनगर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार 2/5/2025 ते 3/5/2025 यादरम्यान झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी राहुल कुमार हा पीडित मुलीच्या घराच्या जवळ रहाण्यासाठी आहे. पीडित मुलगी हीचा पाठलाग करुन ती एकटी असताना तिच्या साेबत आराेपी तरुणाने अश्लील वर्तन केले. त्यानंतर तिला झालेला प्रकार काेणाला सांगू नकाे असा दबाव टाकत, घडलेला प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस काळे पुढील तपास करत आहे.
काेंढवा परिसरात रहाणाऱ्या एका कुटुंबातील नऊ वर्षीय मुलीस बाथरुमला जात असताना, साहिल अन्वर शेख (रा.काेंढवा,पुणे) या तरुणाने तिला बाथरुम मध्ये बळजबरीने ताेंड दाबून ओढून नेले. त्यानंतर दरवाजा लावून मुलीचे कपडे काढून त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. तसेच मुलगी याप्रकाराने घाबरुन ओरडल्यानंतर आराेपीने तिला ही गाेष्ट काेणाला सांगू नकाे नाहीतर तुला मी जीवे ठार मारुन टाकेन. त्यामुळे मुलगी बाथरुमचा दरवाजा उघडल्यानंतर पळतच तिच्या आईकडे जाऊन तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या 26 वर्षीय आईने याबाबत काेंढवा पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.
कोकणचा सर्वाधिक अव्वल तर लातूरचा सर्वात कमी निकाल पुणे-सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.७४%). सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा (८९.४६ %) आहे.
एचएससी बोर्डाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे. यंदा तब्बल 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले की, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत झालेल्या या परीक्षेचा निकाल विषयनिहाय गुणांसह 9 विविध संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.
यंदा राज्यात बारावी परीक्षा निकाल 91.88%टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के होता. फेब्रुवारी-मार्च 2024 च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल 1.49 टक्केने कमी आहे.परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी एकूण 91.88%विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाने सर्वाधिक 97.99% निकालासह अव्वल स्थान पटकावले. मुलींनी यंदाही मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. निकाल mahresult.nic.in, mahahsscboard.in आणि इतर अधिकृत वेबसाइट्सवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना रोल नंबर व आईचे नाव वापरून निकाल पाहता येईल.
कोणत्या विभागाचा किती निकाल?
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.७४%). सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा (८९.४६ %) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ % आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७% ने जास्त आहे. एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १००% आहे.
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा. होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता. ICSE, ISC बोर्डाचे निकाल जाहीर
दरम्यान, भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने म्हणजेच CISCE ने 30 एप्रिल रोजी ISC आणि ICSE बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. यामध्ये 99.64 टक्के मुले आणि 99.45 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आयएससी बारावीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत झाल्या होत्या, तर आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च 2025 या कालावधीत झाल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत 1.06 लाख विद्यार्थी बसले होते तर दहावीच्या परीक्षेत 2.53 लाख विद्यार्थी बसले होते.
निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती:
रोल नंबर आईचे पहिले नाव निकाल पाहण्याची पद्धत:
वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ‘HSC Result 2025’ लिंकवर क्लिक करा. आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाका. ‘View Result’ किंवा ‘Submit’ बटणावर क्लिक करा. आपला निकाल स्क्रीनवर दिसेल; तो डाउनलोड करून प्रिंट काढा
गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुबद्ध संगीत समारोहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या रागांचे प्रतिथयश कलाकारांनी सादरीकरण केले. शुद्ध सारंग, झिंझोटी, अल्हैया बिलावल, खमाज, मुलतानी, मारवा, अहिरभैरव, शामकल्याण, रागेश्री, हंसध्वनी, शंकरा, पुरिया धनाश्री, गावती अशा विविध रागांचे सादरीकरण तीन दिवसीय समारोहात झाले. दि. 1 ते 3 मे या कालावधीत गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात सुबद्ध संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्तसुरांमध्ये रंगलेला समारोह रसिकांसाठी पर्वणी ठरला. समारोहाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राजश्री महाजनी यांनी शुद्ध सारंग रागातील ‘आयी सब मिल देवो मुबारक बतिया’ ही बंदिशीने केली. त्यानंतर झिंझोटी रागातील दोन बंदिशी सादर करून शुद्ध सारंगमधील ‘अब मोरी बात मानले पिहरवा’ या बंदिशीने सांगता केली. यानंतर स्वानंदी सडोलीकर यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी अल्हैया बिलावल रागातील ‘माई इक तो कथा’ ही बंदिश सादर करून हिंडोल रागातील ‘पैंजनिया मोरी बाजन लागी’ आणि ‘सजनवा आ मोरे ’ या बंदिशी सादर केल्या. लहान मुलांना शास्त्रीय संगीताची गोडी लागावी या हेतूने कार्यरत असणाऱ्या सडोलीकर यांनी दीपचंदी रागात ‘कितना मजा आता होगा, सायकल जब वो चलाता होगा’ या कवितेचे सादरीकरण करून रसिकांना चकित केले. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात सूरमणी धनंजय जोशी यांचे सुरेल गायन झाले. सुरुवातीस त्यांनी रागेश्री रागातील ‘राखो पत मोरी’ ही रचनासादर केली. समारोहाच्या दुसऱ्या दिवशी हर्षद डोंगरे यांनी राग मुलतानीमधील दोन पारंपरिक रचना सादर केल्या. यासह मारवा रागातील गुणीदास रचित ‘हो गुणियन मिल गावो बजावो’ तसेच जयजयवंती रागातील ‘माने ना मोरा जियरा’ ही स्वरचित बंदिश सादर केली. त्यानंतर सवाई गंधर्व यांच्या पणतसून श्रुती देशपांडे यांचे सुमधूर गायन झाले. त्यांनी अहिरभैरव रागातील ‘ए रसिया म्हारा’ ही रचना सादर करून गुरू पद्माताई देशपांडे यांनी रचलेली श्यामकल्याण रागातील ‘रघुनंदन खेलन मांगे चांद’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. दुसऱ्या दिवसाची सांगता डॉ. रवी फडके यांच्या गायनाने झाली. त्यांनी रागेश्री रागातील छोटे ख्याल आणि राग हंसध्वनी सादर करून आपल्या मैफलीची सांगता मेहंदी हसन यांनी सुप्रसिद्ध केलेल्या ‘तनहा तनहा मत सोचा कर’ या गझल सादरीकरणाने केली. समारोहाचा सुरेल समारोप शुभदा देशपांडे, शिल्पा आठले, राधिका ताम्हनकर, सावनी गोगटे यांच्या गायनाने झाला. शुभदा देशपांडे यांनी शंकरा रागातील विलंबित ख्यालातील रचनेने सादरीकरणाची सुरुवात केली. मिश्र पिलू रागातील रचना सादर करून होरी ऐकविली. अखेरीस मास्टर दिनानाथ यांचे ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला’ नाट्यगीत सादर केले. त्यानंतर शिल्पा आठले यांनी पूरिया धनाश्री रागातील ‘पायलिया झनकार मोरी’ ही पारंपरिक बंदिश ऐकविली. त्यानंतर कलावती रागातील विलंबित रूपक आणि तराणा सादर केला. राधिका ताम्हनकर यांनी मैफलीची सुरुवात राग गावतीने केली. त्यानंतर तराणा सादर केला. गुरू पंडित हेमंत पेंडसे यांच्या ‘यदुवर लागत हे मोहे प्यारो’ या उपशास्त्रीय गायकीतील बंदिश सादर करून रसिकांची मने जिंकली. तीन दिवसीय सांगीतिक समारोहाचा समारोप सावनी गोगटे यांच्या गायनाने झाला. राग हमीरमधील पारंपरिक बंदिश सादर करून ‘पनघट पे जल भरन रे मै कैसे जाऊ’ या राग बहारमधील बंदिशीने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. कलाकारांना अभिजित बारटक्के, ऋषिकेश जगताप, संजय करंदीकर (तबला), पंडित प्रमोद मराठे, निलय साळवी, अमेय बिचू, अंशुला मोरे (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत पंडित प्रमोद मराठे, डॉ. माधुरी डोंगरे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, पंडित हेमंत पेंडसे यांनी केले.
नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे जागतिक हास्ययोग दिन साजरा पुणे: “नवचैतन्य हास्ययोग परिवार ही समाज सकारात्मक करणारी आरोग्याची चळवळ आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच हास्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. जगामध्ये आज १२० देशात जागतिक हास्यदिन साजरा होत आहे. हास्यामुळे सकारात्मकता येते. सकारात्मक विचारांची माणसे समाजात चांगला बदल घडवतात. मनाने प्रसन्न असणारी माणसे दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच ज्येष्ठांबरोबरच तरुण माणसेही या पद्धतीचा उपयोग करत आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जागतिक हास्ययोग दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या विशेष हास्ययोग कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यान झाले. प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जयराज ग्रुपचे राजेश शहा, प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश धोका, पितांबरी प्रोडक्ट्सचे महेश जोशी, किरण दगडे पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे (व्हर्च्युअली), हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, विश्वस्त जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे, दत्तात्रय कुंदेन, ऍड. एकनाथ सुगावकर, सुनील देशपांडे, अतुल सलाग्रे, हरीश पाठक आदी उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जीवन सकारात्मक असेल, तर शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. आनंदी व सुदृढ समाजासाठी ही चळवळ मोलाचे योगदान देत आहे. ताणतणावापासून दूर राहण्यास हास्ययोगाचा उपयोग होतो. एखाद्या चिकित्सेप्रमाणे आज हास्ययोग काम करत असून, जागतिक स्तरावर याला मान्यता आहे. विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू यांच्या पुढाकाराने एक लाख लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचणार, यात काही शंका नाही. पुण्यात सुरु झालेली ही चळवळ नागपुरातही सुरु व्हावी.”
‘आनंद वाटा’वर विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. संजय कळमकर म्हणाले, “आपण जीवन जगताना आनंदातही चुका शोधत बसतो. तसे न चुकांमध्येही आनंद शोधण्याची सवय लावून घ्यायला हवी. सकारात्मक वृत्तीने आनंदाचा शोध घेत वाटचाल करत राहिलो, तर जीवन अधिक आनंदी होते. हास्ययोग ही सकारात्मक जीवन जगण्यासाठीची संजीवनी आहे.”
राजेश शहा यांनी हास्ययोग समाजात सकारात्मकता पेरत असल्याचे सांगितले. आगामी काळात एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून पुण्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचा उपक्रम राबवणार आहोत. अधिकाधिक नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. देसाई रुग्णालयात मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे शहा यांनी नमूद केले.
गेल्या २८ वर्षांपासून नियमित हास्ययोग करत असल्याने आजवर कोणताही आजार झाला नाही. त्यामुळे हास्ययोग खूप महत्वाचा असल्याचे प्रकाश धोका म्हणाले. महेश जोशी यांनी हास्ययोग चळवळ अधिक व्यापक व्हावी. ती घराघरात पोहोचावी. सध्याच्या धकाधकीच्या काळात लोकांच्या चेहऱ्यावर हसू परत आणण्याचे काम ही चळवळ करत असल्याचे ते म्हणाले.
मकरंद टिल्लू म्हणाले, “जगामध्ये हास्य क्लब ही चळवळ सुरू होण्याचे हे तिसावे वर्ष आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवार २३५ शाखांच्या माध्यमातून २५ हजार लोकांना रोज हास्ययोग करायला लावते. एक लाख लोकांना या हास्य चळवळीत जोडून घेण्याचे उद्दिष्ट्य आहे.”
यानिमित्ताने हास्ययोगाचे प्रकार, मनोगते, मान्यवरांचे सत्कार झाले. बालगंधर्व रंगमंदिर खचाखच भरून गेले होते. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हास्ययोग केला. विजय भोसले यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. हर्षदा टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. एकनाथ सुगावकर यांनी आभार मानले.
पुणे, दि.५: केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देत विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, आगामी काळात या समाजाच्या कल्याणासोबतच त्यांना न्याय मिळवून देण्याकरीता राज्यशासन समर्पित भावनेने काम करेल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्य शासनाच्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महसूल विभाग व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना दाखले वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सामाजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आमदार विजय शिवतारे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, हवेलीचे तहसीलदार किरण सूर्यवंशी, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी आदी उपस्थित होते.
श्री. बावनकुळे म्हणाले, राज्यशासनाच्यावतीने विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या कल्याणाकरिता लोकाभिमुख निर्णय घेऊन त्यांच्याकरीता विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ देऊन नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याकरीता प्रशासनाने काम करावे. आजही या जाती-जमातीतील नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यामुळे येत्या दोन वर्षात विमुक्त जाती व भटक्या जमातीतील एकही नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहाच्याबाहेर राहणार नाही, त्यांच्या न्याय व हक्काचे उल्लघंन तसेच त्यांच्यावर अन्याय होणार नाही, यादृष्टीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरिता प्रशासनाने काम करावे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलाकरिता गायरान जमिनी उपलब्ध करुन दिल्या आहेत, हे काम राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक प्रारूप म्हणून पुढे आणावे, याप्रमाणे राज्यातील इतर जिल्हाधिकाऱ्यांनीही जमिनी उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाकरिता महसूल विभागाकडून जी प्रमाणपत्र लागतील त्याकरिता लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अर्ज केल्यापासून ४८ तासात दाखले उपलब्ध करुन द्यावेत. ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाअंतर्गत महसूल प्रशासनाने प्रत्येक महसुली मंडळात वर्षातून चार शिबिराचे आयोजन करुन लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे काम करावे. याबाबत केलेली कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. याकामी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’ तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र’ निर्माण करण्याचा संकल्प केला आहे, याकरिता सर्वांनी मिळून काम करायचे आहे. नागरिकांच्या कल्याणकरीता प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी. प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या राज्यशासन पाठीशी भक्कमपणे उभे राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे सामाजिक व आर्थिक समतोल साधण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, मुख्यमंत्री यांनी १०० दिवस कार्यालयातील सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत महसूल विभागाने भटके विमुक्त विकास परिषदेच्यामदतीने जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या ३ हजार ९६२ नागरिकांना जातीचे दाखले उपलब्ध करुन दिले आहेत. जिल्ह्यात सुमारे १८ हजार कातकरी समाजाचे नागरिक राहत असून त्यापैकी १५ हजार नागरिकांना जातीचे दाखले, १६ हजार आधार कार्ड व आयुष्यमान कार्ड, ७०० कुटबांना पीएम सन्मान निधीचा लाभ, तसेच त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या शासकीय गायरान जमिनीतून ७५० कुटुंबाना जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या अंगी असलेल्या कौशल्याच्याआधारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आगामी काळात केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरीता जातीचे दाखले, आधारकार्ड,आयुष्यमान भारत कार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करुन देण्याकरीता प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी काळातही भटके विमुक्त विकास परिषदेने असेच सहकार्य करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले.
श्री. काळे म्हणाले, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलांना शाळेच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी ‘पालावरची शाळा’ उपक्रम सुरु करून शिक्षणाची व्यवस्था केली आहे. शासकीय योजनेचे लाभ मिळण्याकरिता लागणारे दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी परिषद प्रयत्नशील आहे, याकरिता शासनाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात सर्वंकष मोहीम राबवावी, अशी सूचना श्री. काळे यांनी केली.
यावेळी डॉ. पुरी यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमात जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या १ हजार ७० नागरिकांना जातीच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक कांचन जगताप यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. 0000
परभणी, दि. ४ मे २०२५ भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सामाजिक सलोखा व सद्भाव वाढीस जावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणीत आज सद्भावना पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री नितीन राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खा. डॅा. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, रमेश बागवे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, परभणी शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी, तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, रामचंद्र दळवी, मुजाहिद खान, केदार साळुंके, बाळासाहेब देशमुख, अभय देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी पोखर्णी येथे नृसिंहाचे दर्शन घेऊन सद्भावना पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. परभणीतही अशाच एका घटनेने या भागात सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार झाला. राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूने व सद्भावना आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी ही काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रा आयोजित केली आहे. याआधी बीड जिल्ह्यात मस्साजोग ते बीड, नागपूर आणि नाशिकमध्ये सद्भावना पदयात्रा काढण्यात आली तर काल परळीत सद्भावना सत्याग्रह करण्यात आला आणि आज परभणीत सद्भावना यात्रा काढली आहे.
यावेळी बोलताना विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की सत्ताधारी लोक राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवत असताना काँग्रेस पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सद्भावना व सौहार्द वाढवण्याचे काम करत आहे. जनतेला लुबाडून उद्योगपती आणि ठेकेदारांची घरे भरण्याचे काम सुरु आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्ताने शेतक-यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा सरकारी डाव आहे पण काँग्रेस तो यशस्वी होऊ देणार नाही.
आज सद्भावना यात्रेच्या सकाळच्या सत्रात ८ किलोमीटर तर दुपारच्या सत्रात ८ किलोमिटर पदयात्रेचा कार्यक्रम असून संध्याकाळी माहेर मंगल कार्यालय येथे मुक्काम होईल व उद्या सोमवारी ५ मे रोजी परभणी शहरात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथली यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाव यात्रा व अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलन संपन्न होणार आहे
आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची भेट.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूनंतर पुकारलेल्या आंदोलनात मृत्यू पावलेले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत माजी खा. प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, परभणी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नदीम इमानदार, ॲड. मुजाहिद खान, नागसेन भेर्जे, तौफिक मुलाणी आदी उपस्थित होते.
परभणी, दि. ४ मे २०२५ भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सामाजिक सलोखा व सद्भाव वाढीस जावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणीत आज सद्भावना पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री नितीन राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खा. डॅा. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, रमेश बागवे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, परभणी शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी, तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, रामचंद्र दळवी, मुजाहिद खान, केदार साळुंके, बाळासाहेब देशमुख, अभय देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी पोखर्णी येथे नृसिंहाचे दर्शन घेऊन सद्भावना पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. परभणीतही अशाच एका घटनेने या भागात सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार झाला. राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूने व सद्भावना आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी ही काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रा आयोजित केली आहे. याआधी बीड जिल्ह्यात मस्साजोग ते बीड, नागपूर आणि नाशिकमध्ये सद्भावना पदयात्रा काढण्यात आली तर काल परळीत सद्भावना सत्याग्रह करण्यात आला आणि आज परभणीत सद्भावना यात्रा काढली आहे.
यावेळी बोलताना विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की सत्ताधारी लोक राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवत असताना काँग्रेस पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सद्भावना व सौहार्द वाढवण्याचे काम करत आहे. जनतेला लुबाडून उद्योगपती आणि ठेकेदारांची घरे भरण्याचे काम सुरु आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्ताने शेतक-यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा सरकारी डाव आहे पण काँग्रेस तो यशस्वी होऊ देणार नाही.
आज सद्भावना यात्रेच्या सकाळच्या सत्रात ८ किलोमीटर तर दुपारच्या सत्रात ८ किलोमिटर पदयात्रेचा कार्यक्रम असून संध्याकाळी माहेर मंगल कार्यालय येथे मुक्काम होईल व उद्या सोमवारी ५ मे रोजी परभणी शहरात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथली यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाव यात्रा व अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलन संपन्न होणार आहे
आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची भेट.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूनंतर पुकारलेल्या आंदोलनात मृत्यू पावलेले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत माजी खा. प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, परभणी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नदीम इमानदार, ॲड. मुजाहिद खान, नागसेन भेर्जे, तौफिक मुलाणी आदी उपस्थित होते.
गायन-वादन-नृत्याच्या मिलाफाने रंगला ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव’अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमीतर्फे आयोजन
पुणे : युवा व्हायोलिनवादक राजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन, प्रसिद्ध गायक धनंजय हेगडे यांचे बहारदार गायन तर जगविख्यात तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मेलोडिक रिदम’ या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. गायन-वादन-नृत्य या तीनही कलांचा अनोखा मिलाफ यातून अनुभवायला मिळाला. अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे यांच्या वतीने पुणे विद्यार्थी गृहाच्या कुलगुरू दादासाहेब केतकर सभागृहात ‘ज्ञानदेव संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात अकादमीतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर’ या पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंगाने झाली. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक विलास जावडेकर, दादा तरंगे, अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. युवा व्हायोलिन वादक राजस उपाध्ये यांनी राग झिंझोटीमधील आलाप, झपताल, तीनताल आणि मध्यलयतील बंदिश सादरीकरणाने केली. त्यानंतर उपाध्ये यांनी राग किरवाणी सादर केला. कधी सुरांची आराधना करत तर कधी सुरांशी लडिवाळपणे संवाद साधत उमटलेले व्हायोलीनचे सूर रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. अनुराग अलुरकर (तबला) यांनी दमदार साथ केली. पंडित रघुनाथ खंडाळकर यांचे गुरू मधुसूदन नारायण कुलकर्णी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या युवा वादक पुरस्काराने राजस उपाध्ये यांना सन्मानित करण्यात आले. किराणा व ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळालेले सुप्रसिद्ध गायक धनंजय हेगडे यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग भूपालीतील विलंबित तीन तालातील ‘अब मानले’ या बंदिशीने केली. द्रुत लयीत ‘जाऊ तोरे चरण’ ही भातखंडेबुवांनी रचलेली बंदिश प्रभावीपणे सादर करत द्रुत एकतालात रामश्रय झा यांची ‘मान लिजीए सुंदरवा’ ही रचना सादर केली. हेगडे यांनी मैफलीची सांगता केदार रागातील गुरू पंडित विनायक तोरवी यांच्या ‘चलो चलो हटो सैंय्या मोरे’ या बंदिशीच्या सादरीकरणाने केली. हेगडे यांचा खुला आवाज, स्पष्टोच्चार, दमदार ताना आणि सुश्राव्य गायनाने रसिक प्रभावीत झाले. अमेय बिचू (संवादिनी), आशय कुलकर्णी (तबला) यांची सुरेल साथसंगत होती. पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मेलोडिक रिदम’ या गायन-वादन आणि नृत्य कलांचा अनोखा संगम साधणाऱ्या अनोख्या कार्यक्रमाला रसिकांसह उपस्थित कलाकारांनी मनमुराद दाद देत आनंद घेतला. सुरुवातीस सुरंजन खंडाळकर यांनी वडिल, गुरू रघुनाथ खंडाळकर यांनी रचलेली ‘राधे देवो बांसुरी’ ही भक्तीरसपूर्ण रचना सादर केली. त्यावर कथक नृत्यांगना शितल कोलवालकर यांनी नृत्याविष्कार सादर केला. पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त एकल तबलावादनाने रसिकांना मोहित केले. तबला, पखवाज आणि नृत्य यांच्या जुगलबंदीला उपस्थित कलाकार व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता सुरंजन खंडाळकर यांनी ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ या सुप्रसिद्ध भैरवीने करताना गायन-वादन आणि नृत्य यांचा अनोखा मिलाफ पहावयास मिळाला. अमेय बिचू (संवादिनी), ओंकार दळवी (पखावज), सागर पटोकार (पढंत) यांनी समर्पक साथ केली. कलाकारांचा सत्कार पंडित रघुनाथ खंडाळकर, संध्या खंडाळकर, विलास जावडेकर, दादा तरंगे, बाळासाहेब भोपे, मधुकर शिंदे, लहू लोहकरे यांनी केला. सूत्रसंचालन स्वानंद पटवर्धन यांनी केले.
‘सोस्यूर ते चॉम्स्की’ भाषांतरित पुस्तकाचे प्रकाशन पुणे : बारा कोटी मराठी भाषक असूनही मराठी भाषाविज्ञान हा महत्त्वाचा विषय महाराष्ट्रात दुर्लक्षित आहे. राज्याच्या कुठल्याही विद्यापीठात मराठी भाषाविज्ञान शिकण्याची सोय नाही; कारण मराठी भाषेत ते कुठेही शिकवले जात नाही, अशी खंत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ प्रा. प्र. ना. परांजपे यांनी व्यक्त केली. ‘मराठीचे भाषाविज्ञान शिकण्याची सोय मराठीमध्येच हवी’, असे आग्रही मतही त्यांनी मांडले. ‘सोस्यूर ते चॉम्स्की’ हे पुस्तक म्हणजे आधुनिक भाषा विज्ञानातील काही मूलभूत निबंधांचे सटीक भाषांतर असून, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. मिलिंद मालशे यांनी भाषांतर केले आहे. लोकवाङ्मय गृहतर्फे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रा. परांजपे बोलत होते. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ भाषांतरकार डॉ. मिलिंद मालशे तसेच भाषाविज्ञानाचे अभ्यासक डॉ. प्रकाश परब, डॉ. विजया देव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. डॉ. मालशे म्हणाले, भाषाविज्ञान हे वैज्ञानिक अभ्यास पद्धती वापरणारे विशिष्ट असे अभ्यासक्षेत्र आहे. पाश्चात्य जगात २०व्या शतकात सोस्यूर या स्विस अभ्यासकाने व्याख्यानांतून मांडलेली तत्त्वे आधुनिक भाषाविज्ञानाला पायाभूत ठरली. आणि विविध भाषाभ्यासकांनी त्यावर मंथन करून आपापले विचार निबंध आणि पुस्तक रूपांत मांडले. यामध्ये भारतीय भाषांचाही संदर्भ आहे. मराठी भाषेत हे विचार एकत्रित यावेत, हा भाषांतर करण्यामागचा एक महत्त्वाचा हेतू होता. भाषा ही व्यवस्था असते. तिच्या अनेक पातळ्या असतात. ध्वनी, शब्दरूपे, वाक्य आणि अर्थ अशा अनेक स्तरांवर ही व्यवस्था कशी घडलेली असते याचा अभ्यास व संशोधन भाषाविज्ञानात होते. हे आधुनिक विचारधन मराठीमध्ये आणणे महत्त्वाचे वाटले. राज्यातील विद्यापीठांमध्ये भाषाविषयक ज्ञान इंग्रजी भाषेत दिले जाते, याविषयी टीका करून प्रा. परांजपे म्हणाले, मराठी भाषेतच मराठी भाषाविज्ञान शिकण्यासाठी चांगली पाठ्यपुस्तकेही उपलब्ध नाहीत. डॉ. मिलिंद मालशे यांनीच लिहिलेले एकमेव पुस्तक भाषाविज्ञानासंदर्भात उल्लेखिले जाते. स्वतः मालशे यांनीच आता दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा मराठी भाषा विज्ञानासंदर्भातील मौलिक असे नवे पुस्तक वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या हाती दिले आहे. हा फक्त अनुवाद वा भाषांतर नाही. मराठी वाचकांची तयारी आणि वकूब लक्षात घेत त्यांनी हे भाषांतर केले आहे. त्यातून मराठीच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, अभ्यासकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळेल’, असे ते म्हणाले. डॉ. विजया देव यांनी मराठीमधील भाषाविज्ञानविषयक अस्तित्वात असलेल्या लेखनाचा परामर्श घेतला. डॉ. मालशे यांच्या दीर्घकालीन व्यासंगाचे फलित म्हणजे हे पुस्तक आहे. सैद्धांतिक मांडणी आणि उपयोजन, या दोन्हीवरही त्यांची उत्तम पकड असल्याने भाषाविज्ञानाचे क्षेत्र समृद्ध होत राहील. भाषाविज्ञानासारखा तात्विक आणि अतितांत्रिक विषय भाषांतरित करताना उभे राहिलेले परिभाषेचे आव्हान डॉ. मालशे यांनी कित्येक नवे शब्द घडवून पेलले आहे. आधुनिक भाषाविज्ञान – सिद्धांत आणि उपयोजन या मालशे यांच्याच आधीच्या पुस्तकाचे हे एक जोडपुस्तक आहे. मूळ सैद्धांतिक लेखन वाचकांपर्यंत सुगमतेने नेण्यासाठी डॉ. मालशे यांनी दिलेली तपशीलवार माहिती आणि टीपा, लक्षणीय आहेत. मराठी भाषेसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे, असे डॉ. प्रकाश परब म्हणाले. मराठी भाषेसंबंधीचा एक activist म्हणून काम करताना भाषा विज्ञानाचा उपयोग कसा होतो, हे डॉ परब यांनी स्पष्ट केले. भाषा ही सामाजिक संस्था आहे, असे सांगून अध्यक्षीय समारोपात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, हे पुस्तक भाषाविज्ञानाचे समग्र भान देणारे आहे. भाषा ही व्यक्ती आणि विश्व यांच्यातील दुवा असते. भाषेवर अनेक घटक परिणाम करत असतात. डॉ. मालशे यांनी या पुस्तकामधून झापडबंद दृष्टीला धक्का देण्याचे कार्य केले आहे. पाश्चात्य भाषातज्ज्ञांनी भाषाव्यवहार आणि भाषा व्यवस्था असा फरक करून मांडणी केली आहे. एकभाषिक समाजातही भाषा व्यवहाराचे स्वरुप एकसारखे नसते. आर्थिक, राजकीय आणि धार्मिक सत्ता असलेला वर्ग समाजावर वर्चस्व गाजवत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ साहित्याचा अभ्यास नाही. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक आहे. साहित्यापलीकडे भाषेची जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषाविज्ञान हे एक व्यापक अभ्यासक्षेत्र आहे. भाषेकडे पाहण्याचा बुद्धिवादी दृष्टिकोन स्वीकारणे, भाषेच्या विविध रूपांबद्दल कुतूहल बाळगून अभ्यास करणे, भाषेबद्दलचे खोटे अभिमान टाळून भाषेची अधिकाधिक रहस्ये उलगडण्याची इच्छा बाळगणे, यासाठी भाषाविज्ञान महत्वाचे आहे. डॉ. मिलिंद मालशे यांच्या या पुस्तकामुळे मराठी भाषेच्या अभ्यासकांची भाषा विज्ञानाची समज अधिक व्यापक व सखोल होईल. पुस्तक लिखाणात सहाय्य करणारे डॉ. मालशे यांचे शिष्य विवेक भट, अर्चना विद्वांस, प्रा. चिन्मय धारुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. अर्चना विद्वांस यांनी सूत्रसंचालन केले तर प्रदीप कोकरे यांनी आभार मानले.
हवाई दल प्रमुख पंतप्रधानांना भेटले, पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी हेरांना अटक नवी दिल्ली-पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताने चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, जम्मूतील रामबन येथे बांधलेल्या बगलिहार धरणाने चिनाबचे पाणी थांबवले आहे. त्याच वेळी, काश्मीरमधील किशनगंगा धरणातून झेलम नदीचे पाणी रोखण्याची योजना आहे.दुसरीकडे, एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7 लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान आणि एअर चीफ मार्शल यांच्यात चर्चा झाली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (२२ एप्रिल) १२ दिवस झाले आहेत. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी सतत लष्करप्रमुखांसोबत बैठका घेत आहेत; शनिवारी त्यांनी नौदल प्रमुखांसोबतही बैठक घेतली.दरम्यान, पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी रविवारी दोन हेरांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की दोघेही परदेशात लष्करी छावण्या आणि हवाई दलाच्या तळांची माहिती आणि छायाचित्रे पाठवत होते. हे दोघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यकर्ते आहेत.
दुसरीकडे, रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. शनिवारी रशियन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर इस्लामाबाद पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, मग तो अणुहल्ला असला तरी.पाकिस्तानने सलग १० व्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर भागात गोळीबार केला आहे. शनिवारी पाकिस्तानने कुपवाडा, उरी आणि अखनूर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
पुणे-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी, पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बारावीच्या निकालाबाबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबद्दलची माहिती दिली आहे. उद्या 5 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेतली होती. यंदा ही परीक्षा दरवर्षीपेक्षा 10 दिवस आधी घेण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उद्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेत संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल, विभागनिहाय निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. तर 6 मे मंगळवारपासून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा. होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता. ICSE, ISC बोर्डाचे निकाल जाहीर
दरम्यान, भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने म्हणजेच CISCE ने 30 एप्रिल रोजी ISC आणि ICSE बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. यामध्ये 99.64 टक्के मुले आणि 99.45 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आयएससी बारावीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत झाल्या होत्या, तर आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च 2025 या कालावधीत झाल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत 1.06 लाख विद्यार्थी बसले होते तर दहावीच्या परीक्षेत 2.53 लाख विद्यार्थी बसले होते.
मुंबई-अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीझालेत… मलाही मुख्यमंत्री बनायचे आहे, पण योग जुळून येत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत एका कार्यक्रमात आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता त्यांनी या विधानावरून यू टर्न घेतला आहे.मी गंमतीत म्हटले होते, मी तसे म्हटले असेल तर माझे शब्द मागे घेतो, असे म्हणत अजित पवारांनी सारवासारव केली.
महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद आहे. मात्र असे असले तरी अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत इच्छा कायम आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातही अजित पवारांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवत मनातील भावना व्यक्त केली होती. त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या. तर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षाही बोलून दाखवली. विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी किमान पाच वेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण यावेळी त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले.
मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना आज प्रश्न विचारला. त्यावर बोलताना त्यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली. मी गंमतीत म्हटले होते. मी तसे म्हटले असेल तर माझे शब्द मागे घेतो. त्यामुळे आता तो प्रश्न मिटला आहे, असे अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्यांची इच्छा असली तर 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तरच इच्छा पूर्ण होईल. आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी 145 पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ आहे. त्याआधी एकनाथ शिंदेंना होते, त्याआधी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पाठबळ होते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरळी येथे 1 ते 4 मे कालावधीत महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा होत आहे. त्यात 2 मे रोजी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात अजित पवारांनी मनातील भावना व्यक्त केली. सत्कारमूर्ती महिलेच्या एका वक्तव्याचा धागा पकडत ते म्हणाले, मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठं जमतंय. कधी ना कधी सीएमपदाचा योग येईल. योग येणारच नाही असे नाही. महिलांना उद्देशून पवार यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री झाल्या. जयललितांनी स्वत:च्या तमिळनाडूत ताकदीवर राज्य मिळवले. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही महिला मुख्यमंत्री होऊ शकते.
दरम्यान, अजित पवार यांनी आतापर्यंत पाचवेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे. सध्या त्यांची सहावी टर्म आहे. अजित पवार 2010 मध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2012 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. नोव्हेंबर 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी ते फक्त 80 तास उपमुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. अडीच वर्षे ते या पदावर होते. 2022 सालीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केले आणि भाजपासोबत सत्तेत सामील झाले. यावेळी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडली. आता महायुती सरकारमध्ये ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
मुंबई-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. करुणा शर्मा यांनी ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची 60 लाखांची थकबाकी धनंजय मुंडे यांनी द्यावी यासाठी वांद्रे कोर्टात तीन अर्ज दाखल केले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या आणि छळ सुरूच असल्याची लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी कोर्टात दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना, स्वतः धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले आहे. लव्ह जिहादपेक्षा जास्त माझ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे कोर्टाच्या आदेशांना न जुमानता आपल्याला दररोज धमक्या आणि एआयच्या माध्यमातून मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत असल्याची लेखी तक्रार करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे.
करुणा शर्मा म्हणाल्या, मला 2 लाख पोटगी मिळाली तेव्हापासून तसेच आमदारकी रद्द होणार अशी कोर्टाकडून नोटीस आल्यापासून मला धमक्या येत आहेत. स्वतः धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे. माझ्याविरोधात अजूनही हिंसा सुरूच आहे. यासंदर्भात कोर्टात तक्रार दिली आहे. व्हॉट्सअप चॅट, एनसी देखील पुरावे कोर्टात दिले आहेत. पोलिसांकडे देखील तक्रार दाखल केली आहे, मात्र ते काही करत नाही.
पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, ते किती पाण्यात आहेत, हे मी दाखवून देणार आहे. एफआयआर करा असे मी सांगितले होते, पण काहीही केले नाही. मला संरक्षण द्यायला कोर्टात सांगितले आहे, मात्र अद्याप काही केले नाही. मुलीला घेऊन जाणार अशी मला धमकी दिली जात आहे. तसेच मी पोटगी संदर्भात कोर्टात याचिका लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली आहे. मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे, त्यांनी वेळ दिला नाही. तरी मी मंत्रिमंडळ बैठकीला जाणार आहे आणि या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार करणार आहे. लव्ह जिहादपेक्षा देखील अधिक जास्त माझ्यावर अन्याय होत आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला अजुनही धमक्या आणि आता एआयच्या माध्यमातून छळ सुरूच असल्याची तक्रार करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे. तसेच कोर्टानं पोटगीबाबत दिलेल्या आदेशांनुसार 60 लाखांची वसुली आणि करूणा यांच्या मालकीच्या संपत्तीची विक्री करू नये असे आदेश देण्याची मागणी करत करूणा शर्मा यांनी कोर्टात नव्यानं अर्ज केले आहेत.
कोर्टाच्या आदेशानंतरही धनंजय मुंडेंकडून धमक्या आणि छळ सुरूच. प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे कोर्टाचे स्पष्ट निर्देश असतानाही धनंजय मुंडे आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला दररोज जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार करत करूणा शर्मा यांनी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं नव्यानं अर्ज केला आहे. धमक्यांसोबत आपल्या मोबाईलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले अश्लील व्हिडिओही पाठवले जात असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
ज्या व्हीडिओ आणि फोटोत आपण नाही, तरीही त्यात आपणं असल्याचं दाखवून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे. तसेच कोर्टानं दिलेल्या आदेशांनुसार दर महा 2 लाख रूपये या हिशोबानं साल 2022 पासून आपण आजवर 60 लाख रूपये पोटगीस पात्र असल्यानं त्याची कोर्टानं धनंजय मुंडे यांच्याकडून वसुली करावी अशी मागणीही करूणा शर्मा यांनी कोर्टाकडे केली आहे. तसेच आपल्या नावावर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही कोर्टानं जारी करावेत अशी मागणी करत तीन स्वतंत्र अर्ज करूणा शर्मा यांनी आपले वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कोर्टापुढे केले आहेत.
पुणे–नागपूर वंदे भारत, पुणे–नाशिक नवीन मार्गांसाठी हालचाली सुरू – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
पुणे, 3 मे 2025
पुणे ही ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण नगरी असून, येथील रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या अंतर्गत चार नवीन फलाटांची उभारणी आणि जागतिक दर्जाची डिजिटल यंत्रणा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे दिली.
हडपसर येथून सुरू होणाऱ्या हडपसर–जोधपूर एक्सप्रेस व एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन आज वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि मेधा कुलकर्णी उपस्थित होते. तसेच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन (चेन्नईहून) आणि गजेंद्रसिंह शेखावत (जोधपूरहून) दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
वैष्णव यांनी सांगितले की, पुणे, हडपसर, खडकी, शिवाजीनगर, उरळी कांचन आणि आळंदी या सहा स्थानकांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. पुणे–नागपूर वंदे भारत रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुणे–नाशिक मार्गावर देखील नवीन ट्रॅकच्या चाचण्या सुरू असून, खोडद येथील जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेमुळे या मार्गाला प्राधान्य दिले जात आहे. पुणे–लोणावळा मार्गावर तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम लवकरच पूर्ण होईल.
मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, हडपसर–जोधपूर एक्सप्रेसमुळे पुण्यातील राजस्थानी समुदायाला मोठा लाभ होणार आहे. राज्यात रेल्वे विभागाची एक कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत भारत योजनेअंतर्गत पुणे, हडपसर, उरळी आणि शिवाजीनगर स्थानकांचा विकास सुरू आहे.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी कुंभमेळा लक्षात घेता पुणे–नाशिक दरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली.
हडपसर–जोधपूर एक्सप्रेस वेळापत्रक:
५ मे २०२५ पासून ही गाडी नियमित सुरू होईल.
हडपसर – प्रस्थान: संध्या. ७.१५ वाजता | जोधपूर – आगमन: दुसऱ्या दिवशी दुपारी ३.००
जोधपूर – प्रस्थान: रात्री १०.०० | हडपसर – आगमन: दुसऱ्या दिवशी संध्या. ५.००