Home Blog Page 548

सैन्याच्या शौर्यपूर्ण कामगिराचा देशाला अभिमान; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शरद पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केले आहे. भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तानातील 9 अतिरेकी अड्डे नष्ट करण्यात आले. या अतिरेक्यात पाकिस्तानी अतिरेकी संघटनांचे वरिष्ठ म्होरके ठार झाल्याची माहिती आहे. त्याची पुष्टी आज जसजसा वेळ पुढे सरकेल तसतशी होण्याची शक्यता आहे. तूर्त या हल्ल्यानंतर पाकिस्तानात एकच खळबळ माजली. शरद पवारांनी या हल्ल्यावर आनंद व्यक्त करत भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.

शरद पवार या कारवाईवर आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.

या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.

भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!

भारतीय हवाई दलाने मंगळवारी मध्यरात्री जैश ए मोहम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन, लश्कर ए तोयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ले केले. त्यात अनेक अतिरेकी मारले गेल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराने या हल्ल्यात एकही पाकिस्तानी नागरिक किंवा सैनिक मारले गेला नसल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात केवळ बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमधील अतिरेकी अड्ड्यांना नष्ट केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

श्रीनगरसह 11 विमानतळे बंद, दुपारी 12 वाजेपर्यंत 9 शहरांना जाणारी सर्व उड्डाणे रद्द

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचा देशभरातील विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. श्रीनगरसह ११ विमानतळांवरील कामकाज बंद करण्यात आले आहे. यामध्ये जम्मू, श्रीनगर, लेह, चंदीगड, बिकानेर, जोधपूर, राजकोट, धर्मशाला, अमृतसर, भुज, जामनगर विमानतळांचा समावेश आहे. विमान प्रवास पूर्णपणे प्रभावित झाला आहे.हवाई हल्ल्यानंतर विमान कंपन्यांनी ही माहिती दिली आहे. एअर इंडियाने सांगितले – जम्मू, श्रीनगर, लेहसह ९ विमानतळांवरील सर्व उड्डाणे आज दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. विमान कंपन्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमानाची स्थिती तपासल्यानंतरच विमानतळावर जाण्याची विनंती केली. हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत.
एअर इंडिया: जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे ७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द. अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल. अमृतसरला जाणारी दोन आंतरराष्ट्रीय विमाने दिल्लीकडे वळवण्यात आली. या अचानक झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांच्या सोयीसाठी, ०११-६९३२९३३३ / ०११-६९३२९९९९ हे हेल्पलाइन क्रमांक आहेत.

एअर इंडिया एक्सप्रेस – अमृतसर, जम्मू, श्रीनगर आणि हिंडनला जाणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान कंपन्या ७ मे रोजी दुपारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सर्व प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासावी. फ्लाइटशी संबंधित सूचना आणि सूचनांसाठी टियाशी चॅट करा: +९१ ६३६०० १२३४५
स्पाइसजेट: ऑपरेशन सिंदूरमुळे, उत्तर भारतातील धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर सारखी काही विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. या विमानतळांवरून येणाऱ्या विमानांच्या आगमन आणि निर्गमन वेळेवर परिणाम होऊ शकतो. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करावे आणि स्पाइसजेटच्या वेबसाइटवर त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासावी.

इंडिगो: प्रदेशातील हवाई परिस्थितीतील बदलामुळे, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, बिकानेर आणि धर्मशाला येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो.

ऑपरेशन सिंदूर-भारतीय सैनिकांनी पाकमध्ये घुसून ९ आतंकी अड्डे उध्वस्त केले, 30 ठार; जैश-लश्करचे मुख्यालय उद्ध्वस्त;

भारतीय (India Army) सेनेनं पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मिरमधील (Pakistan-Occupied Kashmir) अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हल्ले करण्यात आले.

ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तांनुसार, बहावलपूरमधील हवाई हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, लश्कर आणि जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते.
भारतीय लष्कराने म्हटले आहे की पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले नाही. दहशतवाद्यांच्या अड्ड्याला लक्ष्य करण्यात आले आहे. दुसरीकडे, सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ही एक संयुक्त लष्करी कारवाई होती, ज्यामध्ये भारतीय लष्कर आणि हवाई दलाने एकत्रितपणे अचूक स्ट्राइक शस्त्रे वापरली.

वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद आणि लष्करच्या अड्ड्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने लक्ष्य निवडले होते.

भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्तपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर २४ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच तिन्ही दलांनी संयुक्तपणे पाकिस्तानविरुद्ध मोठी लष्करी कारवाई केली आहे.

संरक्षण सूत्रांनुसार, पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला, ज्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचे सैनिकही ठार झाले आहेत.

भारताने अमेरिका आणि रशियाला हवाई हल्ल्याची माहिती दिली
वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, युएई आणि रशियामधील त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली आहे. त्यांना भारताच्या हवाई हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेने म्हटले- मला आशा आहे की हे लवकरच संपेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘हे लज्जास्पद आहे. मला वाटतं लोकांना माहित होतं की काहीतरी घडणार आहे. ते बऱ्याच काळापासून लढत आहेत. जर तुम्ही विचार केला तर, ते दशके आणि शतके लढत आहेत. मला आशा आहे की हे लवकरच संपेल.

पुण्यात तीन ठिकाणी जवळपास तीन तास मॉक ड्रिल

पुणे:पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलबाबत माहिती दिली.पुण्यात विधान भवन, तळेगाव सीआरपीएफ कॅम्प आणि मुळशी तहसील कार्यालयात होणार उद्या मॉकड्रिल होणार आहे. पुण्यातील विधान भवन या ठिकाणी मॉक ड्रिल होणार असल्याने या ठिकाणाची पाहणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांन केली.

पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार एक मीटिंग झाली. त्यानुसार उद्या संध्याकाळी चार वाजता पुणे विधान भवन येथे मॉक ड्रिल होणार आहे. ग्रामीण भागातही मॉक ड्रिल होणार असून सर्व विभागांचा यामध्ये समावेश असणार आहे.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, मॉक ड्रिलचा उद्देश असा आहे की भविष्यात काही झालं तर आपली तयारी असावी. पुण्यात तीन ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे. यात सायरन वाजवलं जाईल, या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. याची आज चाचणी केलेली आहे.सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे. हे मॉक ड्रिल आपण सुरक्षा, काळजी म्हणून घेत आहोत. विधान भवन येथील माँक ड्रिलमध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतलं जाणार असून पुण्यात तिन्ही ठिकाणी एकाच वेळी मॉक ड्रिल होणार आहे. जवळपास तीन तास मॉक ड्रिल चालेल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. आर्मी, अग्निशामक दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग ,पोलीसही यामध्ये असणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्वागतार्ह- प्रमोद नाना भानगिरे

पुणे:सर्वोच्च न्यायालयाने आज आदेश दिले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात हा निर्णय भारतीय लोकशाही प्रक्रियेस सुदृढ करणारा व दिशा दाखवणारा आहे. राज्य शासनाने ही निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नाही असे नमूद केले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे या निवडणुका लांबल्या होत्या. परिणामी पुणे शहराचा कारभार प्रशासकांकडून चालवला जात होता, जो केवळ तात्पुरता पर्याय असतो.

लोकशाहीची खरी ताकद ही जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमध्ये असते. अशा लोकप्रतिनिधींना त्यांच्या भागातील समस्या, गरजा आणि विकासाच्या दिशा अधिक चांगल्या प्रकारे समजतात. आता निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांनी आपले प्रतिनिधी निवडल्यास, शहराचा कारभार अधिक उत्तरदायित्वाने, पारदर्शकतेने व प्रभावीपणे पार पडू शकेल.

शिवसेना पक्ष या निर्णयाचे पूर्णतः समर्थन करतो, कारण स्थानिक स्वराज्य संस्था या विकासाचे मजबूत पाया आहेत. महानगरपालिकेची कार्यक्षमता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमुळेच वाढू शकते.

यामुळे पुणे शहराचा सर्वांगीण विकास, नागरी सुविधा, पायाभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा आमचा ठाम विश्वास आहे.

शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा पुणे शहराच्या सेवेसाठी कटीबद्ध आहेत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य रुपेरी पडद्यावर झळकणार

बहुभाषिक चित्रपटाची शासनाकडून निर्मिती:चरित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे

मुंबई ६ मे २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चरित्रपटाची निर्मिती शासनामार्फत करण्यात येणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चोंडी-अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत या चित्रपटाच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. हा व्यावसायिक दर्जाचा चित्रपट असल्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेला संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करून देण्यात येणार असून छाननी समिती व निवड समिती यांच्यामार्फत विहित कार्यपद्धतीनुसार दिग्दर्शक किंवा निर्मिती संस्था यांची निवड करण्यात येणार आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अवघे आयुष्य शौर्यपूर्ण आणि प्रेरणादायी असून विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजही उत्कृष्ट कार्याचा मापदंड ठरले आहे. या चरित्रपटाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा व्यापक प्रचार व प्रसार होण्यास मदत होणार असून, महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित होणार आहे.
अहिल्यानगर येथील चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळावरून त्यांच्या त्रिशताब्दीनिमित्त राज्य शासनाने मंगळवारी मोठी घोषणा केली. त्यांच्या कार्याचा संपूर्ण जगाला परिचय व्हावा यासाठी या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. हा केवळ जीवनपट नसेल तर त्यांच्या कार्याची प्रभावीपणे मांडणी यात करण्यात येईल.

स्वाती म्हसे पाटील
व्यवस्थापकीय संचालक
दादासाहेब फाळके चित्रनगरी

कृष्णरंगात रंगले रसिक

पुणे : ‌‘कृष्णरंग अधरी धरुनी वेणू‌’ या सांगीतिक कार्यक्रमात कृष्णाच्या अद्भुत लीला दर्शविणाऱ्या भक्तीरचनांमधून रसिक कृष्णरंगात रंगले.
निमित्त होते अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणेतर्फे आयोजित ज्ञानदेव संगीत महोत्सवाचे. पुणे विद्यार्थी गृहाच्या कुलगुरू दादासाहेब केतकर सभागृहात हा महोत्सव रंगला.
पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्या संकल्पनेतून आणि संगीत मार्गदर्शनातून साकारलेल्या ‌‘कृष्णरंग अधरी धरुनी वेणू‌’ या कार्यक्रमात संत एकनाथ महाराज, संत सूरदास, संत नामदेव महाराज यांनी रचलेल्या कृष्ण भक्तीपर रचना आणि गौळणी सादर करण्यात आल्या. अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर, सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर यांनी भक्तीरचना सादर केल्या.
‌‘कृष्णराधे राधेराधे‌’च्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. कृष्णाच्या बालक्रीडेचे वर्णन करणाऱ्या संत एकनाथ महाराज यांच्या ‌‘माझा कृष्ण देखीला का‌’ या रचनेनंतर छोट्या कृष्णाने आईकडे केलेली लडीवाळ तक्रार सादर करताना संत सूरदास रचित ‌‘खेलने ना जाऊ मैया, गोपिया खिजावे मोहे‌’ ही अनोखी रचना सादर करण्यात आली. कृष्णाच्या बासरीचे म्हणजेच वेणूच्या निर्मितीचे महत्व सांगत नाथ महाराजांच्या ‌‘अधरी धरुनी वेणू‌’ या रचनेतील आर्त स्वराने रसिक भक्तीरसात तल्लीन झाले. संत नामदेव महाराज रचित पाच भाषांमधील ‌‘गौळणी ठकविल्या‌’ ऐकविताना भक्तीला धर्म, जात, भाषेचे बंधन नसते हे दर्शविले गेले. कृष्णाचे गोपिकांशी असलेले वैश्विक नाते उलगडणारी ‌‘आहारे सावळीया‌’ ही रचना उपस्थितांना विशेष भावली. विविध ताल, सूर आणि रागांचा मिलाफ साधणारा ‌‘जो जो रे मधुसूदना‌’ हा पाळणा सादर करून ‌‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा‌’ ही गौळण सादर करण्यात आली. अजिंक्य जोशी (तबला), अमर ओक (बासरी), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड), पार्थ भूमकर (पखवाज), विश्वास कळमकर (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. निरुपण कीर्तनकार श्रेयस बडवे यांनी रसाळ वाणीत केले.

तत्पूर्वी सुप्रसिद्ध तबलावादक यशवंत वैष्णव यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी वादनाची सुरुवात तीन तालाने केली. उस्ताद झाकीर हुसेन यांनी रचलेला बायाप्रधान कायदा, अल्लारखा खाँ यांचे छंदविचार दर्शविणारे सादरीकरण प्रभावी ठरले. लखनऊ घराण्याशी नाते सांगणारा रेला, दिल्ली घराण्याचा कायदा, पारंपरिक रचना, बंदिशी, चक्रदार तोडा यांचे प्रभावी सादरीकरण रसिकांना विशेष भावले. मिलिंद कुलकर्णी यांनी लहेरा साथ केली.
पंडित रघुनाथ खंडाळकर यांचे शिष्य महेश कंटे व शंकर गिरी यांचे दमदार गायन झाले. मैफलीची सुरुवात पूरिया धनाश्री रागातील विलंबित एकतालातील ‌‘बल बल जाऊं‌’ या बंदिशीने करण्यात आली. त्यानंतर द्रुत तीन तालातील ‌‘पायलिया झनकार‌’ ही रचना सादर केली. संत तुकाराम महाराज रचलेली आणि पंडित खंडाळकर यांनी संगीतबद्ध केलेली ‌‘आम्ही नामाचे धारक‌’ ही भक्तीरचना प्रभावी ठरली. ‌‘जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा‌’ या गजराला रसिकांनीही नामघोष करत दाद दिली. खुला सुमधुर, आवाज, सुरेल ताना ऐकताना शिष्यांवर असलेल्या गुरुकृपेची अनुभूती आली. चैतन्य पवार (तबला), ऋषिकेश पुजारी (संवादिनी), अनिल भुजबळ (तालवाद्य), दिगंबर अस्मार, भैरवी डेरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
कै. विप्रदास चंद्रकांत मेणकर स्मृती पुरस्काराने पद्मश्री पंडित विजय घाटे यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध उद्योजक विलास जावडेकर यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध वैद्य प्रशांत सुरू, सुप्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित रघुनाथ खंडाळकर, सोमनाथ सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आलापिनी जोशी यांना ‌‘गानवर्धन‌’चा संगीतसंवर्धक पुरस्कार जाहीर

पुणे : गानवर्धन संस्थेचे संस्थापक कै. कृ. गो. धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या संगीतसंवर्धक पुरस्कारासाठी कराड येथील स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या संचालिका आलापिनी जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य या तीनही क्षेत्रात गेली 48 वर्षे गानवर्धन संस्था कार्यरत आहे. शास्त्रीय संगीतामध्ये ज्ञानदान व प्रसाराचे काम करणाऱ्या कलाकारास संस्थेच्या वतीने संगीतसंवर्धक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. अमेरिकास्थित सुधीर धर्माधिकारी आणि सविता हर्षे हे पुस्काराचे प्रायोजक आहेत. मातोश्री कै. स्वरगंधा टिळक यांनी स्थापन केलेल्या स्वरनिर्झर संस्थेच्या माध्यमातून आलापिनी जोशी गेली 25 वर्षे संस्थेच्या संचालिका म्हणून काम पाहात आहेत. आलापिनी जोशी यांच्या सांगीतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गुरू व विचारवंत माधुरी डोंगरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 21 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आलापिनी जोशी यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले असून समीर मोडक (तबला), मीनल नांदेडकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिराचा 33वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव 9 मे पासून

पुणे : सुमारे 131 वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराचा 33वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव दि. 9 ते 13 मे 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
संगीत नाट्य रसिकांसाठी पर्वणी असलेल्या या नाट्य महोत्सवातील प्रयोग दरारोज सायंकाळी 5:30 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवात गाजलेल्या नाट्यकृतींचा नव्याने रसास्वाद घेता येणार आहे, अशी माहिती भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे आणि कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. 9 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात भरत नाट्य मंदिराची निर्मिती असलेले नाट्य प्रयोग सादर केले जातात. पण या वर्षी पुण्यातील कोलाज क्रिएशन्स (आनंदमठ) आणि मुंबईतील विद्याधर गोखले प्रतिष्ठानची निर्मिती असलेली नाट्यकृती (बावनखणी) सादर केली जाणार आहे.
ऋषी बंकिमचंद्रांच्या 131व्या स्मृतीदिनानिमित्त बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारीत असलेल्या संगीत आनंदमठ या नाटकाद्वारे वासंतिक संगीत नाट्य महोत्सवाचा दि. 9 रोजी शुभारंभ होणार आहे. दि. 10 रोजी संगीत बावनखणी, दि. 11 रोजी हे बंध रेशमाचे, दि. 12 रोजी मत्स्यगंधा आणि दि. 13 रोजी कट्यार काळजात घुसली या नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
डॉ. चारुदत्त आफळे, डॉ. राम साठ्ये, रवींद्र खरे, गौरी पाटील, वज्रांग आफळे, हृषिकेश बडवे, अनुष्का आपटे, निधी घारे, स्वरप्रिया बेहरे, गौतम कामत, मैत्रयी नायक, अभिजीत कासखेडीकर, ओंकार कपलाने, बद्रिश कट्टी यांच्या नाटकात भूमिका आहेत.
वासंतिक नाट्य महोत्सवाची तिकिट विक्री दि. 1 मे पासून सुरू होत असून तिकिट दर अत्यंत अल्प ठेवण्यात आले आहेत. सिझन तिकिट 1200/- रुपये तसेच 800/- रुपये आहे; तर दैनंदिन तिकिट दर 300/- रुपये आणि 200/- रुपये आहे.

निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्यास यास सर्वस्वी फडणवीस, शिंदे व अजितदादा जबाबदार असतील: प्रशांत जगताप

पुणे: उच्च न्यायालयाने आज सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दिलेल्या आदेश,निर्देश निर्णयाचे स्वागत करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्यास यास सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जबाबदार असतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.

महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुढील चार आठवड्यात अधिसूचना जाहीर करून पुढील चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातील ३४ नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही याचिका दाखल करत न्यायालयात प्रदीर्घ लढा दिला. या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला तथा राज्य सरकारला सूचना देत पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. याबद्दल आनंद व्यक्त करत प्रशांत जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

: प्रशासन राज राबवत जन्मताला डावलण्याचा महायुतीचा प्रयत्न माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उधळून लावला. पुणे शहरातील नागरिकांसह महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी हा अत्यंत दिलासादायक निर्णय आहे.
— प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पुणे)

राज्य शासनाने लवकरात लवकर ओबीसी समाजाबाबत संपूर्ण डेटा दिला तर ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होतील अन्यथा या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील असा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी समाजाच्या हितासाठी आग्रही असून महायुती सरकारने लवकरात लवकर निवडणूक आयोगाकडे डेटा सादर करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्यास यास सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जबाबदार असतील असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला.

राज्य सरकारने ओबीसी समाजाबाबतचा सर्व डेटा लवकरात लवकर माननीय सर्वोच्च न्यायालयात सादर करावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज देण्यात आले आहे.

पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी प्रशासन राजच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला आहे. लवकरात लवकर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी देऊन हा भ्रष्टाचार समूळ उखडून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तयार आहे अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.

महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष तयारीनिशी सज्ज-माजी आमदार मोहन जोशी

भाजपचा भ्रष्टाचार आणि पुण्याची दैना
याविरोधात मते मागणार

पुणे : महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार असून गेल्या १० वर्षात विकासकामांमध्ये भाजपने केलेला भ्रष्टाचार आणि पुणे शहराची केलेली दैना या विरोधात जनतेकडे मतं मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, लोकशाहीच्या दृष्टीने तो एक ऐतिहासिक आहे असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. ओबीसी आरक्षण कायम राखल्याबद्दल सुप्रिम कोर्टाचे आम्ही अभिनंदन करीत आहोत,

निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष तयारीनिशी उतरत आहे. भाजपच्या भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभारामुळे पुणेकर वैतागलेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला धडा शिकवल्या शिवाय पुणेकर रहाणार नाहीत, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

पुणेकरांना चांगली पीएमपी बस सेवा भाजप देऊ शकला नाही. मुळा मुठा नद्या सुशोभीकरण, शुद्धीकरण यातही भाजपला अपयश आलेले आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्याची फक्त आश्वासने पुणेकरांना देण्यात आली. प्रत्यक्षात ती कोंडी अजूनही सुटलेली नाही. भाजपच्या अशा अनेक फसव्या घोषणा आणि भ्रष्टाचार आम्ही पुणेकरांपुढे मांडणार आहोत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पुण्याची पाणी कपात रद्द :निवडणुकांचा मार्ग मोकळा अन पाणीपुरवठा प्रमुखांचे (राजकीय)घुमजाव

पुणे- महापालिकेतील पाणीपुरवठा प्रमुख यांच्या नियोजना अभावी मध्यंतरी पुण्यात आठवड्यातून १ दिवस पाणी कपात जाहीर केली . आज दुपारी उच्च न्यायालयाने सार्वजनिक संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश काढले आणि त्यानंतर काही तासातच पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा प्रमुख यांनी घुमजाव करत आठवड्यातून एकदा नियोजित केलेली पाणी कपात रद्द केली आहे. हा राजकीय घुमजाव निर्णय आहे कि वास्तववादी आहे हे मात्र ..खरे खोटे देवच जाणो

या संदर्भात मुख्य अभियंता १ स्वारगेट पाणीपुरवठा विभाग पुणे महानगरपालिका यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’

वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्प झोनमधील असणाऱ्या धायरी, सनसिटी, वडगाव बु., हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्त नगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर इ. परिसरामध्ये पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि.०५/०५/२०२५ पासून विभागवार (रोटेशन) पद्धतीने पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन प्रसिद्ध करण्यात आले होते, तथापि खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचे पुर्नअवलोकन करण्यात आले असून सदर उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता व संभाव्य पावसाळा कालावधी यांचा विचार करून पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणारी विभागवार (रोटेशन) पद्धतीने दिवसनिहाय पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. या परिसरातील नागरिकांना या पूर्वीच्या नियोजनानुमार पाणीपुरवठा करण्यात येईल.

पुणे येथील किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे पदवीदान सोहळ्याचे आयोजन

पुणे – ६ मे २०२५ – पुणे येथील बाणेर येथे किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात यंदाच्या वर्षी व्यवस्थापन अभ्यासक्रमात पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेकडून सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला अनेक नामांकित व्यक्तींनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांना गुरुवर्य आणि कुटुंबीयांच्यासमक्ष पदवी बहाल करण्यात आली. या सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावल्याने हा क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला. पदवीदान सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याने संस्थेने सर्वांचे आभार मानले.

पदवीदान सोहळ्याला पिनकॉल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, ईका मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यांच्यासोबत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि संस्थेच्या गव्हर्निग कौन्सिलचे अध्यक्ष श्री. अतुल सी. किर्लोस्कर, गर्वर्निंग काऊन्सिलच्या उपाध्यक्षा सौ. अदिती किर्लोस्कर आणि किर्लोस्कर व्यवस्थापन संस्थेच्या पुणे येथील संचालिका डॉ. टी.जी. विजया आदी मान्यवरही उपस्थित होते. 

श्री. अतुल सी. किर्लोस्कर यांनी देशातील व्यवसाय उद्योग क्षेत्राविषयी आपले विचार मांडले. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक स्टार्टअपबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक संस्थेत आता शाश्वत उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्ल बोलताना त्यांनी किर्लोस्कर संस्थेतील बदलत्या धोरणांचीही प्रशंसा केली. किर्लोस्कर इन्स्टिट्यूटमधून पदवी बहाल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. मुलांच्या शिक्षणात पालकांचेही अमूल्य योगदान असते या शब्दांत त्यांनी पदवीदान सोहळ्याला उपस्थित सर्व पालकांचे मुलांना करिअरमध्ये योग्य दिशेने घडवण्यासाठी आभार मानले.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या डॉ. सुधीर मेहता यांनी आपला जीवनप्रवास सर्वांसमोर मांडला. मेहता यांनी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून करिअरला सुरुवात केली. या क्षेत्रात जम बसल्यानंतर हळूहळू त्यांनी ऑटोमोबाईल, कृषी, सेवा आणि क्रीडा क्षेत्रात सात कंपन्या सुरु केल्या. या काळात मी वेगवेगळ्या अनुभवांतून घडलो, शिकलो. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेतानाही येणा-या अनुभवात मिळालेले शिक्षण फार महत्त्वाचे असते, असे ते यावेळी म्हणाले. वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायत करताना येणा-या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी इलेक्ट्रिक वाहननिर्मितीचा अनुभव सांगितला. यश हे सरळ रस्त्याच्यावाटेतून मिळत नाही. त्यासाठी चढ-उतारांचा सामना करावा लागतो. हा प्रवास नेहमीच खाचखळग्यांनी भरलेला असतो, असे सांगत सर्वांना कठोर मेहनतीला पर्याय नसल्याचा सल्ला दिला.

याप्रसंगी डॉ.टी.जी. विजया यांनी संस्थेचा शैक्षणिक अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचा तसेच यावर्षीपासून सुरु करण्यात आलेल्या सोशल इमर्शन प्रोग्राम, कॅम्पस सुधारणा उपक्रम तसेच संस्थेला मिळालेल्या पुरस्कारांविषयीही त्यांनी माहिती दिली.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना सुवर्ण तसेच रौप्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. वित्त, विपणन, मानव संसाधन व्यवस्थापन, ऑपरेशन्स आणि व्यवसाय विश्लेषण या शाखांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता क्रमांकात अव्वल क्रमांक मिळवल्याने कोमल मुलचंदानी यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.

पुणे शहर भाजप निवडणुकीसाठी सज्ज-भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

पुणे-पुढील चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वागत केले असून, आम्ही पक्ष म्हणून निवडणुकीसाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

घाटे म्हणाले, “पुणे शहरात भाजपचे संघटन अतिशय मजबूत आहे. आम्ही नुकतीच शहरात साडेपाच लाख प्राथमिक पक्ष सदस्यांची नोंदणी पूर्ण केली आहे. त्याबरोबर नऊ हजार सक्रिय सदस्य नोंदणीचे लक्ष्य अंतिम टप्प्यात आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले होते. विविध पक्षातून पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी 105 हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

घाटे पुढे म्हणाले, ” लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला निर्विवाद यश मिळवून दिले. पुणे लोकसभेसह आम्ही लढवलेल्या विधानसभेच्या सहाही जागा आम्ही जिंकल्या. एका ठिकाणी मित्र पक्षाला विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार यांच्या माध्यमातून पुणे आणि परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विविध लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत आहेत. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ता काळात भाजपने मोठ्या प्रमाणात पायाभूत विकासकामे केली आहेत. त्यामुळेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिकेतही पुणेकर भाजपला विजयी करतील असा विश्वास वाटतो.”

एकदा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आता पुन्हा नको ..सांगत, आयोगाला सादर करणार निवडणुकीसाठी आराखडा

माजी विरोधी पक्षनेते केसकर आणि कुलकर्णी म्हणाले , उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुका वेळेत होऊ शकतात कसे तो आराखडा आम्ही आयोग आणि महापालिकेला देतो

पुणे- २०१७ च्या प्रभाग रचने प्रमाणे आणि २३ गावांच्या वेगळ्या रचनेने त्वरित निवडणुका घेणे शक्य असून याबाबतचा आराखडा आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही उद्या सादर करणार आहोत, आणि यापूर्वी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान आयोगाकडून झालाय आता पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे अशी हि सूचना करणार असल्याचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर , सुहास कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक प्रशांत बढे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले,’ आज सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांमध्ये निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले आहेत.
4 मे 2022 रोजी खानविलकर साहेबांच्या खंडपीठाने ज्यामध्ये आम्ही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती त्यामध्ये स्पष्ट आदेश दिले होते की 11/3/2022 रोजी अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेवर पंधरा दिवसांमध्ये निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करावी सोबत मेहरबान सर्वोच्च न्यायालय यांच्या निकाल पत्राची प्रत जोडली आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आणि राज्य निवडणूक आयोगाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
याबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे ईमेल देऊन निवडणुका न घेणे हा मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे असे सांगितले होते.
नवीन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्य निवडणूक आयोगाची आयुक्त म्हणून सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना देखील ई-मेल करून याची जाणीव करून दिली होती.
आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 74 व्या घटना दुरुस्ती नंतर स्थापन झालेल्या स्वायत्त राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी.पुण्याचा विचार केला तर 2018 साली अकरा गावे पुढे महानगरपालिकेच्या हार्दिक समाविष्ट केली होती त्यांची एक स्वतंत्र निवडणूक झाली होती त्यानंतर 30 जून 2019 रोजी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आणखीन 23 गावे समाविष्ट केली.
2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुका घेताना यानंतर समाविष्ट झालेल्या अकरा त्यातून दोन गावे वगळले म्हणजे 9 आणि 23 अशा गावांची वेगळी प्रभाग रचना लगेच करणे शक्य आहे.
2002 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे पुण्यातील जुन्या हद्दीची प्रभाग रचना करून त्याची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर एक महिन्याने समाविष्ट 23 गावांची निवडणूक वेगळे प्रभाग करून झाली आणि दोन्ही निवडणुकींचा निकाल एकत्र जाहीर केला या वेळेला देखील एक करणे शक्य आहे याबाबत एक आराखडा दोन दिवसांमध्ये राज्य निवडणूक आयोगाला आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही सादर करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत लोकप्रतिनिधींची महानगरपालिका असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो आणि राज्य निवडणूक आयोगाने त्वरित प्रभाग रचना उर्वरित गावांची सुरू करावी आणि त्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी वजा सूचना आहे.