Home Blog Page 2912

सुभाष जगतापांवर पोलिसी कारवाई चे मुख्य सभेत पडसाद ..

0
पुणे-भाजपच सत्तेच्या  काळात विरोधीपक्षाच्या लोकप्रतिनिधींवर पोलिसी दंडुकेशाहीच्या कारवाया होत असल्याचा आरोप आज विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे यांनी येथे केला तळजाई टेकडीवरील हिरवाई नष्ट करून विकासाच्या नावाखाली तेथे सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामावरून पालिकेतील सदस्यांनी मंगळवारी प्रशासनाला मुख्यसभेत  धारेवर धरले. या कामाला विरोध करणाऱ्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केल्याने त्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. अखेर, या प्रभागातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, त्यांच्या सहमतीनेच काम केले जावे, असे स्पष्ट आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिले.
 
तळजाई टेकडीवर वनोद्यान साकारण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार सध्या अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत काही भागांत निर्माण केल्या जाणाऱ्या वाहनतळाच्या कामामुळे तळजाईवरील अनेक झाडे तोडण्यात आली आहेत, तर बऱ्याच ठिकाणी सिमेंट काँक्रिटचा वापर करून डोंगरावरील जैवविविधता नष्ट केली जात असल्याचा आरोप करून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी हा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. या कामाला विरोध केला; म्हणून लोकप्रतिनिधींविरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचे कारण काय, अशी विचारणा त्यांनी केली. काही ठरावीक व्यक्तींच्या आग्रहामुळेच तळजाईच्या डोंगराचे काँक्रिटीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याची टीका त्यांनी केली.
 
महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनीही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. गेल्या अनेक वर्षांपासून तळजाईची जागा महापालिकेच्या ताब्यात मिळावी, यासाठी सुभाष जगताप यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे तळजाई टेकडी अजून हिरवीगार राहिली आहे; पण त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा प्रकल्प अत्यंत निंदनीय असून, याबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी बराटे यांनी केली.
 
तळजाईचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार केवळ वाहनतळासाठी शेड उभारण्याची कामे काही ठिकाणी सुरू असल्याचा खुलासा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केला. या ठिकाणी मारहाणीचा प्रकार झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
 
तळजाई येथे होणाऱ्या कामाची कोणतीही पूर्वकल्पना अथवा माहिती प्रभागातील स्थानिक नगरसेवकांना देण्यात आली नाही. नागरिकांकडून त्याबाबत सातत्याने विचारणा केली जात होती; पण त्यावर कोणतेही उत्तर देता येत नव्हते. त्यामुळे सर्व सदस्यांना योग्य स्वरूपात माहिती देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर प्रभागातील सर्व सदस्यांसह स्वीकृत सदस्यांना तळजाईवरील प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात यावी आणि त्यांच्या सूचना/कल्पना यांचा अंतर्भाव प्रकल्पात केला जावा, असे आदेश महापौरांनी दिले.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/313501776239129/

रस्त्यावर नाही आता वसुलीसाठी थेट घरी धडकणार पुण्याचे पोलीस .. हेल्मेट सक्ती …

0

पुणे-हेल्मेट सक्तीच्या नावाखाली रस्त्यावर चौका चौकात,टोळकी करून पोलीस नागरिकांना अडवून जाचक पद्धतीने वसुली करीत असल्याची ओरड झाल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी रस्त्यावर असा कारभार नको अशी भूमिका घेत घरी जावून वसुली करा अशी भूमिका घेतली आहे.पुण्यातील आमदारांच्या भेटी नंतर त्यांना दिलेले आश्वासन आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिलेली माहिती यातून फडणवीस यांनी  घुमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.एकंदरीत या प्रकरणात जरी घरी जावून वसुली करा म्हटले असले तरी , सीसीस टीव्ही ,चलन करणे ..घरी धडकने यासाठी लागणारी तांत्रिक यंत्रणा ,आणि पोलिसी मानसिकता पुणे पोलिसात आहे किंवा नाही याबाबत शंका व्यक्त होते आहे. हे मात्र निश्चित झाले आहे पोलीस आयुक्त यांनी  स्वतःच्या मर्जीने नाही तर पुण्यातील हेल्मेट सपाटा मुख्यमंत्र्यांच्याच मर्जीने लावला असल्याचा दाट संशय यामुळे निर्माण झाल आहे . लोकसभा निवडणुकीपूर्वी काही काल थांबलेली हि वसुली मतदानानंतर  पुन्हा सुरु करण्यात आली ,आणि आता विधानसभेच्या तोंडावर हि वसुली पुन्हा थांबण्याची शक्यता निर्माण झाली असून , निवडणूक झाल्यावर पुन्हा पुणेकरांच्या माना कापण्यासाठी पोलिसाना उभे केले जाईल असे म्हणण्यास वाव आहे.

पुणे पोलिसांनी हेल्मेटसक्ती करून दंडापोटी करोडो रुपये वसूल करण्याचा लावलेला सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच रोखला आहे. यापुढे नागरिकांना रस्त्यात अडवून दंड वसूल न करता मुंबई-नागपूरप्रमाणे ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून चलन फाडावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. हेल्मेटसक्तीला विरोध नाही. मात्र, या सक्तीच्या नावाखाली पोलिसांकडून नागरिकांना त्रास देण्यात येत असल्याने ‘सीसीटीव्ही’द्वारे कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सांगितले.

पुणे पोलिसांकडून हेल्मेटसक्तीची कारवाई जोरात सुरू असून गेल्या पाच महिन्यांत ४५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या सुसाट कारवाईमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धास्तावलेल्या आमदारांनी नागरिकांच्या रोषाचा विचार करून थेट मुख्यमंत्र्यांनाच सक्ती रोखण्याची विनंती केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, जगदीश मु‌‌ळीक, विजय काळे, योगेश टिळेकर आदींनी विधानसभा अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

शहरातील रस्त्यांवर वाहतूक पोलिस घोळक्याने उभे राहून हेल्मेट कारवाईचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत. त्यांच्या या कृतीमुळे वाहतूक नियमनाचा बोजवारा उडाला असून सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे यासारखे प्रकार वाढत आहेत. वाहतूक कोंडीच्या घटनाही नित्याच्या झाल्याने हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवून वाहतूक नियमनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. फडणवीस यांनी त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी संपर्क साधून त्यांना रस्त्यावर कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या.

याबाबत फडणवीस यांनी सांगितले की, ‘आमचा हेल्मेटसक्तीला विरोध नाही. मात्र, हेल्मेट सक्तीच्या नावावर नागरिकांना त्रास दिला जातो. पोलिसांचा गट रस्त्यावर उभा राहतो, नागरिकांना अडविले जाते, पर्यायाने रांगा लागतात. पोलिसांकडून अशा प्रकारे सक्तीची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने नागरिकांना त्रासदायक होते आहे. मुंबई आणि नागपूरमध्ये ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. त्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातही कारवाई करावी. रस्त्यांवर कोणालाही थांबविण्यात येऊ नये. नियमभंग करणारे ‘सीसीटीव्ही’त कैद होत असून त्यांच्या घरी दंडाचे ‘चलन’ पाठविण्यात यावे, असे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत.’ हेल्मेट सक्ती जनहितासाठी आहे. मात्र, या सक्तीने लोकांचा त्रास देणे किंवा त्यांच्या ऑफिसच्या वेळेत त्यांना थांबवून ठेवणे हे सुद्धा योग्य नसल्याचे टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

  • – माधुरी मिसाळ, आमदार

शहरात सुरू असलेल्या हेल्मेट सक्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष होता. या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या प्रश्नाला वाचा फोडली. पोलिसांकडून वाहनचालकांवर करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई, वाहन परवाना ताब्यात घेणे, अरेरावी करणे, याबाबतची भूमिका या वेळी मांडली.

  • – डॉ. के. व्यंकटेशम्, पोलिस आयुक्त-

कायद्यानुसार हेल्मेटची कारवाई सुरू राहील. फक्त त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- डॉ. के. व्यंकटेशम्, पोलिस आयुक्त

 

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला राज्य सरकार कडून ५० कोटी ..कोथरूड शिवसृष्टी विषय हवेतच …

0

मुंबई-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीच्या पाठीशी राज्य आणि केंद्र सरकार भक्कम पाने पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले असून ,कोथरूडच्या महापालिकेच्या वतीने होऊ घातलेल्या शिवसृष्टीचा विषय गुंडाळला जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्याच्या अर्थ संकल्पात अर्थसंकल्पात लोकमान्य टिळकांचा पुतळा दिल्लीतील महाराष्ट्र सदनात बसवण्यासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला राज्य सरकारकडून या वर्षीसाठी पन्नास कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारने या प्रकल्पाला यापूर्वीच अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. तसेच सांस्कृतिक आणि पर्यटन दर्जा जाहीर करत ३०० कोटी रुपयांचे आर्थिक साह्य मंजूर केले आहे. आता  पन्नास कोटी वर्षभरात उपलब्ध होणार आहेत.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शिवसृष्टीसाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी मंगळवारी जाहीर केला. बाबासाहेब पुरंदरे कात्रज-आंबेगाव परिसरात २१ एकर जागेवर शिवसृष्टी उभारत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन खात्याने बाबासाहेबांच्या शिवसृष्टीला विशेष प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे.

‘शिवसृष्टीचे काम  आता पूर्ण होत आले आहे. प्रतापगडाच्या भवानी देवीची प्रतिकृती तयार होत आहे. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे शिवसृष्टी उभारली जात आहे. मी केवळ या ट्रस्टचा  विश्वस्त आहे.  या शिवसृष्टीमध्ये इतिहासाचा आणि अभ्यासाचा आविष्कार पाहायला मिळेल,’ असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.

दरम्यान, ‘कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचे स्टेशन आणि चांदणी चौकाजवळील जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षित ५० एकर जागेवर शिवसृष्टी साकारण्यात येईल,’ असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. यामुळे शहरात दोन शिवसृष्टी उभारणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र बाबासाहेब साकारत असलेल्या शिवसृष्टीलाच्या पाठीशी सरकार असून, कोथरूड येथील शिवसृष्टी प्रकल्पाचा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही.

 

पत्रकार सन्मान आणि आरोग्य योजना जुलैपासून अंमलात आणणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई-सरकारने मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दर्पणकार बाळाशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी आणखी 10 कोटी रुपयांची केलेली तरतूद आणि पत्रकारांच्या आरोग्य विमा योजनेसाठी अर्थसंकल्पातून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. या दोन्ही योजना जुलैमध्ये अंमलात आणण्याचे आश्‍वासन देत त्यांनी तसे निर्देश सबंधीतांना दिले.

ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान योजना लागू व्हावी आणि महात्मा फुले जीवनदायी योजनेत पत्रकारांचा समावेश व्हावा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता. आज अर्थसंकल्प सादर होणार असताना सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करुन आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने दोन्ही योजनांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याने या योजना मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला स्थैर्य देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद केली आहे. आता या योजना जुलैपासून अंमलात आणण्यात येतील. त्याबाबत जर काही तांत्रिक अडचणी असतील तरी त्या दूर केल्या जातील. पत्रकारांच्या अन्य विषयांवरही राज्य सरकार सकारात्मक आहे. वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी उपाध्यक्ष दिपक भातुसे, कार्यवाह विवेक भावसार, कोषाध्यक्ष महेश पावसकर, कार्यकारिणी सदस्य अनिकेत जोशी, खंडूराज गायकवाड, कमलेश सुतार, सचिन गडहिरे उपस्थित होते.

बंगळुरु एफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मंदार ताम्हाणे यांची नियुक्ती

0

क्लबच्या 6वर्षांनंतर ताम्हाणे नव्या भूमिकेत रुजू

बंगळुरु: पुण्याचे नामांकित क्रीडा संघटक मंदार ताम्हाणे यांची बंगळुरु एफसी संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे बंगळुरु फुटबॉल क्लबने आज जाहीर केले. संघाचे मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर 6 वर्षांनी ताम्हाणे नव्या भूमिकेत रुजू होत आहेत. या नव्या पदावर असताना ताम्हाणे यांच्याकडे क्लबच्या तांत्रिक, बिगर तांत्रिक, आर्थिक, दैनंदिन कामकाज आणि प्रशासन अशा सर्व जबाबदाऱ्या असणार आहेत.

यावेळी बोलताना बंगळुरु एफसीचे संचालक पार्थ जिंदाल म्हणाले कि, जेएसडब्लू समूहाने नेहमीच अंतर्गत अधिकर्यांपैकी गुणवान अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमित जबाबदाऱ्यापेक्षा मोठ्या पदावर संधी देण्याचे आणि नवनवीन आव्हाने स्वीकारण्याचे धोरण स्वीकारले आहे. मंदार ताम्हाणे यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीमुळे बंगळुरु एफसीने जी दैदिप्यमान कामगिरी बजावली. त्यामुळे क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती देताना मला अत्यंत आनंद होत आहे.

मंदार ताम्हाणे यांनी याआधी भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे व्यवस्थापक म्हणून प्रशंसनीय कामगिरी पार पाडली होती. तसेच, बंगळुरु एफसीच्या स्थापने (2013)पासून गेली 6 वर्षे ते क्लबच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

यावेळी बोलताना मंदार ताम्हाणे म्हणाले कि, बंगळुरु एफसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे आणि माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवून आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी क्लबच्या व्यवस्थापनाचा अत्यंत आभारी आहे. या नियुक्तीमुळे माझ्या नावामागे एका नव्या पदाची नोंद होणार असली, तरी क्लबच्या प्रगतीसाठी माझे प्रयत्न आणि निष्ठा 2013पासूनच्या प्रवासाप्रमाणे कायम राहणार आहेत. मी बंगळुरु एफसीमध्ये विलक्षण क्षमतेच्या सहकार्यांसोबत काम करत असून त्यांनी क्लबच्या यशासाठी माझ्याबरोबर मोलाचा वाटा उचलला आहे. केवळ क्लबच्याच नव्हे तर भारतीय फुटबॉलच्या उज्वल भवितव्यासाठी माझे प्रयत्न यापुढेही कायम राहतील, असे मी आश्वासन देतो.

आता डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे वीजचोरी उघडकीस ;लातूर शहरात २ लाख ३७ हजारांची वीजचोरी पकडली

0

मुंबई-
वीजचोरीला आळा बसावा यासा दि. १ठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र नवीन रेडिओ फ्रिक्वेंसी व इंफ्रारेड असे अत्याधुनिक ईलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, याही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या लातूर शहरातील ३३ ग्राहकांची वीजचोरी रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे (डीसीयू) उघडकीस आणण्यात आली आहे.

नांदेड, लातूर व जळगाव या परिमंडलांमध्ये मोठ्या प्रमाणात वीजहानी असून वीजहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी या परिमंडलातील काही शहरांमध्ये येत्या वर्षभरात सुमारे ८ लाख ५० हजार रेडिओ फ्रिक्वेंसी मीटर बसविण्यात येणार आहेत. सदर रेडिओ फ्रिक्वेंसी मीटरचे रीडिंग हे डेटा कॉन्सेट्रेटर युनिटद्वारे केंद्रीय बिलींग प्रणालीच्या सर्व्हरवर आणून केंद्रीय बिलींग प्रणालीद्वारे ग्राहकांचे वीजबिल तयार करण्यात येत आहे.

रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर युनिट ही प्रणाली मानवविरहित असून या प्रणालीद्वारे ग्राहकांचे अचूक मीटर वाचन नोंदविले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची वीजबिलांबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. या प्रणालीद्वारे प्रत्येक ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध होत असून दर १५ मिनिटांमध्ये ग्राहक किती विजेचा वापर करीत आहे ते (realtime)  बघता येईल. तसेच त्या भागात वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रावर त्यावेळी किती वीजभार आहे, याची अचूक माहिती देखील या प्रणालीमुळे मिळणार आहे.

या रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर प्रणालीद्वारे होणाऱ्या मीटर वाचनामुळे एखादा ग्राहक वीजचोरी करीत असेल तर त्याची माहिती केंद्रीय सर्व्हरमधून मिळते. त्यामुळे ग्राहकांकडून होणाऱ्या वीजचोरीस आळा बसण्यास मदत होणार आहे. लातूर शहरामध्ये ८८,३३८ एवढे मीटर बसवायचे असून त्यापैकी ६२,२६५ इतके मीटर बसविण्यात आले आहेत. या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटर रीडिंगची माहिती येण्यास सुरवात झाली असून एप्रिल- मे महिन्यामध्ये एकूण ३८ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्याची माहिती केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये दिनांक व वेळेसहित उपलब्ध झाल्याने त्या ग्राहकांची प्रत्यक्ष वीजचोरी पकडण्यात आली आहे.

या प्रणालीद्वारे लातूर उत्तर व दक्षिण उपविभागातील ३३ ग्राहकांनी वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी २४ हजार ९९५ युनिटची वीजचोरी केली असून त्याची अनुमानित रक्कम २ लाख ३७ हजार ३९५ रुपये तर तडजोड रक्कम रू. १ लाख १८ हजार आहे. सदर वीजग्राहकांविरूध्द विद्युत अधिनियम-२००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांनी वीजचोरीच्या वाईट प्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री

0

मुंबई, दि. 18: महाराष्ट्र विधिमंडळात आज सादर करण्यात आलेला 2019-20 या वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे उत्पन्न वाढवितानाच खर्च कमी करून सर्व घटकांना सर्वार्थाने पुढे घेऊन जाणारा असल्याने तो सर्वजनहिताय सर्वजनसुखाय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, दिव्यांग, वंचित-उपेक्षितांना खऱ्या अर्थाने न्याय देणाऱ्या योजना सादर करतानाच उद्योग व रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात शेतीविषयक बाबींबरोबरच सिंचन क्षेत्रासाठी सर्वात जास्त तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी जलसंपदा विभागासाठी साडेबारा हजार कोटींहून अधिक तरतूद केली आहे. यामुळे राज्याची सिंचनक्षमता वाढण्याबरोबरच सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. शेतीचा शाश्वत विकास करण्यासाठी स्मार्टसारखी योजना महत्त्वाची ठरणार असून त्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 2200 कोटींची उभारणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्यात आली असून तांत्रिक तरतुदीमुळे संस्थात्मक यंत्रणेच्या बाहेर राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची कटिबद्धता देखील या अर्थसंकल्पात अधोरेखित करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अनेक रचनात्मक सुधारणा झाल्यानंतरही 7.5 टक्क्यांनी अर्थव्यवस्था विकसित होत आहे. देशातील सर्व राज्यांशी तुलना करता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 55 हजार कोटींपेक्षा अधिक कर्जाची क्षमता असतानादेखील ते प्रमाण 11 हजार कोटींच्या आत नियंत्रित करण्यात राज्याला यश आले आहे. अशा परिस्थितीत तूट वाढू न देता सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मी अभिनंदन करतो.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात आला असून त्यासाठी आवश्यक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील पाणी पुरवठ्याच्या योजनांना गती देण्यात आली आहे. राज्याने जाहीर केलेल्या नव्या औद्योगिक धोरणाला अनुकूल योजना अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत, अशी माहिती देऊन ते म्हणाले, अर्थसंकल्पात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जाहीर करण्यात आली असून त्यामुळे रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. युवक, गरीब महिला, विधवा, परित्यक्त्या यांसह नक्षलग्रस्त भागातील जनतेला या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार असणाऱ्या बलुतेदारांसाठीही वेगवेगळ्या योजना आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या परिपोषण आहार भत्त्यात वाढ करण्यात आली असून दिव्यांगांसाठी जाहीर करण्यात आलेली घरकूल योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वंचित-उपेक्षितांसाठी असलेल्या अनेक योजनांच्या अनुदानात 600 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी देखील या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने आम्ही न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्याचबरोबर आदिवासींना लागू असलेल्या 22 योजना धनगर समाजाला देखील लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असून त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आदिवासींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणतीही कपात न करता धनगर समाजाला न्याय देण्याचा आमचा शब्द आम्ही पूर्ण केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

पुणे परिमंडलातील 27.49 लाख वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे सेवा

0

पुणे : महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या पुणे परिमंडलातील 27 लाख 49 हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे. उर्वरित वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून वीजग्राहकांना वेळोवेळी ‘एसएमएस’द्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचा कालावधी, नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड किंवा विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची व वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, वीजबिलाची मुदत उलटून गेल्यास त्यासंबंधीची माहिती, वीजपुरवठा खंडित करण्याची नियमाप्रमाणे नोटीस आदींची माहिती निशुल्क देण्यात येत आहे.

यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्य झाले आहे. महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात ‘एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. तसेच वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतून सुद्धा ‘एसएमएस’ उपलब्ध आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे तालुक्यात एकूण 29 लाख 26 हजार वीजग्राहक आहेत. यापैकी 93.92 टक्के म्हणजे 27 लाख 48 हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. उर्वरित वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

 वीजवापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक नोंदणी करावी – वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधीत वीजवाहिनीवरील ग्राहकांना महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती व दुरुस्तीसह वीजपुरवठा कधी सुरु होणार याची माहिती तात्काळ दिली जाते. मात्र काही वीजवापरकर्ते हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. परंतु त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत घरमालकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्याचे प्रामुख्याने वाघोली, हिंजवडी, वाकड, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, विश्रांतवाडी, विमाननगर, खराडी आदी परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे महावितरणकडून येणारे ‘एसएमएस’ हे घरमालकाच्या मोबाईलवर जात अाहेत व प्रत्यक्षात वीजवापर करणाऱ्या भाडेकरूंना वीजसेवेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे वीजवापरकर्त्यांनीच किंवा भाडेकरूंनी संबंधीत ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजेच सर्वस्व नाही-भूषण गगराणी

0
पुणे : “स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण मेहनत घेतात. मात्र, इथे स्पर्धा मोठी आणि जागा कमी अशी स्थिती असल्याने अनेकांना अपयश येते. तीन-चार किंवा त्यापेक्षा अधिक वेळा परीक्षा देऊन यश मिळाले नाही, तर वैफल्य येते. मात्र स्पर्धा परीक्षेतील यश-अपयश हेच सर्वस्व नाही. त्यासाठी केलेल्या अभ्यासाचा उपयोग आपल्याकडील ‘बी प्लॅन’ यशस्वी करण्यासाठी करायला हवा,” असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वास्तव ,भवितव्य व दिशा दाखवण्यासाठी आयोजित स्पर्धा परीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भूषण गगराणी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, स्टडी सर्कलचे संचालक डॉ. आनंद पाटील, सृजन फाऊंडेशनचे संस्थापक व बारामती अॅग्रो फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे आदी उपस्थित होते.भूषण गगराणी म्हणाले, “तीस वर्षांपूर्वी अभ्यासासाठी काहीच माहिती किंवा मार्गदर्शन उपलब्ध नव्हते. आज माहितीचा खजिना आणि मार्गदर्शन करणारे क्लासेस मोठ्या प्रमाणावर आहेत. स्पर्धा परीक्षांविषयी जागृती झाल्याने त्याकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण स्वप्न घेऊन पुण्या-मुंबईत तयारी कारण्यासाठी येतात. खूप अभ्यासही करतात. मात्र, यशासाठी केवळ अभ्यास उपयुक्त नसतो. तर नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि सजगपणे केलेली तयारी तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रमात सातत्याने बदल होत असतात. ते समजून घेऊन आपण तयारी केली पाहिजे. पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे. मात्र अवास्तव अपेक्षा असू नयेत. प्रशासनात येताना आपले उद्देश चांगले असावेत. स्पर्धा परीक्षेतील यश हे साध्य नसून, ते करिअरचे एक साधन आहे. मान-सन्मान आणि आदर हे आपल्या कामातून मिळत असते. त्यामुळे कामातील सचोटी, प्रामाणिकपणा महत्वाचा असतो.

मधुकर कोकाटे म्हणाले, “परीक्षा पद्धती नीट समजून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आपल्यातील क्षमता ओळखून त्याप्रमाणे तयारी केली पाहिजे. तीन-चार वर्षांच्या तयारीनंतर उत्साह कमी होतो. म्हणून विद्यार्थ्यांनी तीन-चार वेळा परीक्षेत यश आले नाही, तर त्यामागे धावण्यापेक्षा अन्य पर्यायांवर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. या परीक्षांमधील जागा अथवा पदे ही मर्यादित असणार आहेत. त्यामुळे अपयश आलेल्यांनी खचून जाऊ नये. या परीक्षांसाठी केलेल्या तयारीचा उपयोग अन्य करिअरसाठी करावा. या क्षेत्रातील मार्गदर्शकांनी अभ्यासक्रम शिकविण्यासोबतच प्रोत्साहकाची (मेंटॉर) भूमिका बजावायला हवी. एक चांगला नागरिक घडविण्याची जबाबदारी आपली आहे.”
आनंद पाटील म्हणाले, “स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची मॅरेथॉन आहे. या परीक्षा देण्यासाठी ‘शहाणपण’ असणे अधिक महत्वाचे आहे. आपल्यातील क्षमता ओळखून या परीक्षांमधील कोणता पर्याय निवडायचा ते ठरवावे. स्पर्धा परीक्षेच्या प्रेमात पडल्याशिवाय किंवा त्याचे व्यसन लागल्याशिवाय तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. वेळेचे नियोजन, चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. या परीक्षा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग आहे. या परीक्षांची तयारी करताना अभ्यासासोबतच आहार आणि आरोग्य या गोष्टींनाही महत्व द्यायला हवे.”

रोहित पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच करिअरसाठी योग्य दिशा मिळावी, यासाठी हा महोत्सव आयोजिला आहे. आपले स्वप्न हे कुटुंब आणि मित्रपरिवाराचेही असते. त्यामुळे वेळीच आपण सजग होऊन, वास्तव समजून घेत वाटचाल केली पाहिजे. ज्या क्षेत्राची आपण निवड केली, त्यात प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असते. अपयशाने खचून न जात अन्य संधींचा वेध घेत त्यामध्ये ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे.

महेश बडे यांनी प्रास्ताविक केले. निलेश आरडळे, त्रिवेणी काहलकर, आरिप पटेल यांनी सूत्रसंचालन केले. किरण निंभोरे यांनी आभार मानले.

आदर्श उद्योजक-उद्योजिका पुरस्कारांचे रविवारी वितरण

0
पुणे : मराठी उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी कार्यरत मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरमच्या (एमईएन) चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन व आदर्श उद्योजक-द्योजिका पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रविवार, दि. २३ जून २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती फोरमचे सुरेंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजेश जोशी, नंदकुमार तळेकर, वृषभनाथ कोंडेकर, स्वप्नील मोकाशी, शिवाजी बिराजदार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित मोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सेवा क्षेत्रातील जीवन हेंद्रे, उत्पादन क्षेत्रातील प्रकाश दीक्षित, कृषी उद्योगातील उत्तम हुकरे यांना आदर्श उद्योजक, तर उत्पादन क्षेत्रातील उज्ज्वला गोसावी व खाद्य क्षेत्रातील प्राजक्ता पाठक यांना आदर्श उद्योजिका पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे
मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम मराठी उद्योजकांनी मराठी उदयोजकांसाठी तयार केलेले व्यासपीठ आहे. विविध व्यवसायातील लोकांशी देवाणघेवाण करून व्यवसायाची व्याप्ती वाढविणे, या विचारांतून फोरम काम करत आहे. फोरमतर्फे महिन्याला सभासदांची बैठक घेऊन उद्योजकांना एकमेकांशी जोडले जात आहे. उद्योजकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, असेही देशपांडे यांनी नमूद केले.
मराठी व्यावसायिकांना आपला उद्योग वाढवावा, यासाठी फोरमच्या वतीने २३, २४ आणि २५ ऑगस्ट या कालावधीत उद्योगांचे प्रदर्शन आयोजिले आहे. अधिकाधिक मराठी व्यावसायिकांनी या प्रदर्शनात सहभाग घ्यावा, असे आवाहन राजेश जोशी यांनी केले आहे.

खूब लडी मर्दानी वो झॉंसी वाली रानी थी…..

0

पुणे ः ‘खूब लडी मर्दानी वो झॉंसी वाली रानी थी’, ‘मेरी झॉंसी नही दूँगी’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत झाशीच्या राणीच्या पराक‘माचे १६२ व्या स्मृतिदिनानिमित्त स्मरण करण्यात आले.

क‘ांतिकारकांची स्ङ्गूर्तिदेवता म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झालेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी शाळेच्या घोष पथकाने बालगंधर्व रंगमंदिर चौकातील लक्ष्मीबाईंच्या अश्‍वारूढ पुतळ्यासमोर मानवंदना दिली. मु‘याध्यापिका स्नेहल कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

बिकट परिस्थितीत खंबीरपणे लढण्याची प्रेरणा देणार्‍या झाशीच्या राणीने उत्तम प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावली होती. त्यांचे कार्य समाजाला आजही प्रेरणादायी असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

घोष पथकात इयत्ता दहावीतील ४० विद्यार्थिनींचा समावेश होता. पथकाने जयमाला आणि भूप या रागांचे सादरीकरण केले. नेहा चव्हाण या विद्यार्थिनीने पथकाचे नेतृत्त्व केले. मु‘याध्यापिका स्नेहल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपाली पवार, सुषमा राऊत, दर्शना कोकरे, योगेश रोकडे यांनी संयोजन केले.

हेल्मेट सक्ती अखेर आमदार जागले : अन पोलीस कमिशनर थांबले …

0
पुणे : दुचाकी चालवीत असताना पुणे शहरात पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली हेल्मेटसक्ती तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे वृत्त  आहे. या संदर्भात स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना खाजगीत सूचना केल्या असून यानंतर आता शहरी भागात हेल्मेट नसल्यास होणारी कारवाई थांबविण्यात येत  आहे. यासंदर्भात शहरातील आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या.
याबाबात अधिक माहिती देताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत व दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हेच लक्षात घेत आज आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या प्रश्नाला वाचा फोडली. याबरोबरच विनाहेल्मेट वाहन चालकांच्या वर पोलिस करित असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे व पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिका देखील मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुण्यात शहरी व नागरी भागात हेल्मेट सक्ती स्थगित करण्याबाबतची आमची विनंती मान्य करीत पुणे पोलीस आयुक्तांना तात्काळ तशा सूचना दिल्या आहेत. यामुळे शहरी भागात हेल्मेटच्या प्रश्नाबाबत पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा शाळेने पारंपारिक पद्धतीने केले नवागतांचे स्वागत

0
जुन्नर /आनंद कांबळे
 शाळेचा पहिला दिवस .नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात  झाली,शाळेतील पहिला दिवस कायम बालचमुंच्या स्मरणात रहावा यानिमित्ताने आज शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पारंपरिक वाद्यवृंद ढोलताशाने प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले.
दिवसेंदिवस बैलगाडीत बसून प्रवास करण्याचा आनंद  दुर्मिळ होत आहे. त्याचा आनंद आज बैलगाडीच्या मिरवणुकीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला.
          शाळेतील पहिले दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात आले.प्रभात फेरी नंतर मुलांसाठी शाळेमध्ये प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. शाळेतील सर्व मुलं मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवामध्ये सहभागी झाली याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जाकीर पटेल उपाध्यक्ष सुशील जावळे व सर्व सदस्य उपस्थित होते.
त्याचबरोबर निमगाव सावा गावचे सरपंच सौ. सुनीता ताई घोडे ,सर्व सदस्य ग्रामस्थ पालक मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवांमध्ये सहभागी झाले व सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावर्षी शाळेची यावर्षी शाळेची पटसंख्या वाढत असून सर्वांनी कौतुक केले .शाळा प्रवेशोत्सवसाठी सर्वांनी खूपच मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक  लक्ष्मण लांडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
          प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजन शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गणेश थोरात,गणपत घोडे गुरुजी, रवी शेगर,उपशिक्षक लहू गोफने, संतोष साळुंके,सौ.शोभा गोंदके,सौ. जयश्री जावळे,सौ. प्रशाली डुकरे, सौ.आशा चुकाटे यांनी नियोजन केले .उपशिक्षक संतोष डुकरे यांनी सूत्र संचालन केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल शाळेने पारंपारिक पद्धतीने केले नवागतांचे स्वागत

0
जुन्नर /आनंद कांबळे
  आदिवासी  भागातील जिल्हा परिषदेच्या  उच्छिल शाळेत ,नवीन शैक्षणिक शाळेतील पहिला दिवस कायम बालचमुंच्या स्मरणात रहावा यानिमित्ताने आज शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पारंपरिक वाद्यवृंद ढोलताशाने प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले.नवीन मुलांची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली.
          शाळेतील पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात आले.प्रभात फेरी नंतर मुलांसाठी शाळेमध्ये प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.
शाळेतील सर्व मुलं मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवामध्ये सहभागी झाली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भालेराव , जगदिशशेठ नवले,रोहिदास नवले , गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानबाबा नवले.रघुनाथ बगाड.गणपत भालेराव,निलेशशेठ नवले व सर्व सदस्य उपस्थित होते.
महिला सदस्य नूतन साबळे व विमल करवंदे आणि ग्रामस्थ पालक मोठ्या उत्साहाने या प्रवेश उत्सवांमध्ये सहभागी झाले व सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद शाळेची शाळेची पटसंख्या कशी वाढेल व पश्चिम भागात असलेल्या आपल्या  शाळेची गुणवत्ता व मागील शैक्षणिक वर्षात शाळेनी केलेली उल्लेखनीय कामगिरी याबद्दल ग्रामस्थांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले .शाळा प्रवेशोत्सवासाठी 100%विद्यार्थी दाखल झाले व  सर्वांनी खूपच मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.
             प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजन महिला शिक्षक सौ. स्मिता ढोबळे,सौ.आरती मोहरे आणि श्रीम. लिलावती भवारी  यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.सुभाष मोहरे यांनी सूत्रसंचालन केले.

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाची विजयी सलामी

0

पुणेपुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा 42-39 असा पराभव करून विजयी सलामी दिली. 

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स  संघाने मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा 42-39 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्यात 8वर्षाखालील मिश्र गटात रोअरिंग लायन्सच्या वीरा हरपुडेला रेजिंग बुल्सच्या नील देसाईने 1-4 असे, तर 10वर्षाखालील मुलांच्या गटात रोअरिंग लायन्सच्या नील केळकरला  रेजिंग बुल्सच्या शार्दूल खवळेने 1-4 असे पराभूत करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 10 वर्षाखालील मुलींच्या गटात रोअरिंग लायन्सच्या मृणाल शेळकेने स्वर्णिका रॉयचा 4-2 असा तर 12 वर्षाखालील मुलांच्या गटात आरुष मिश्राने अद्विक नाटेकरचा टायब्रेकमध्ये 6-5(5) असा पराभव करून संघाचे आव्हान कायम राखले. 12वर्षाखालील मुलीच्या गटात रितिका मोरेचा रेजिंग बुल्सच्या प्रिशा शिंदेने 2-6 असा पराभव केला.  14वर्षाखालील मुलांच्या गटात रोअरिंग लायन्सच्या अनमोल नागपुरे याने जय पवारचा 6-2, तर मुलींच्या गटात रुमा गायकैवारीने  रेजिंग बुल्सच्या  संचिता नगरकरचा 6-0 असा सहज पराभव केला. कुमार दुहेरी मुलांच्या गटात  प्रणव गाडगीळ व रियान मुजगुले यांचा रेजिंग बुल्सच्या जश शहा व शौर्य राडे यांनी 3-6 असा पराभव केला. 14वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत रोअरिंग लायन्सच्या अर्जुन अभ्यंकर व ऋषिकेश बर्वे  यांनी मानस गुप्ता व देवेन चौधरी या जोडीचा 6-1 असा पराभव केला. 10 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत रेजिंग बुल्सच्या वरद पाटील व वीरेन चौधरी या जोडीने  रोअरिंग लायन्सच्या समीहन देशमुख व आर्यन किर्तने यांना 4-1 असे नमविले. मिश्र दुहेरीत रोअरिंग लायन्सच्या कनिका बाबरने अथर्व जोशीच्या साथीत रेजिंग बुल्सच्या आदित्य ठोंबरे व याशिका बक्षी यांचा टायब्रेकमध्ये 6-5(7)) असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. 
 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स वि.वि.मेट्रोसिटी रेजिंग बुल्स 42-39(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: वीरा हरपुडे पराभूत वि.नील देसाई 1-4; 10वर्षाखालील मुले: नील केळकर पराभूत वि. शार्दूल खवळे 1-4; 10 वर्षाखालील मुली: मृणाल शेळके वि.वि.स्वर्णिका रॉय 4-2; 12 वर्षाखालील मुले: आरुष मिश्रा वि.वि.अद्विक नाटेकर 6-5(5); 12वर्षाखालील मुली: रितिका मोरे पराभूत वि. प्रिशा शिंदे 2-6; 14वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे वि.वि.जय पवार 6-2; 14वर्षाखालील मुली: रुमा गायकैवारी वि.वि.संचिता नगरकर 6-0; कुमार दुहेरी मुले: प्रणव गाडगीळ/रियान मुजगुले पराभूत वि.जश शहा/शौर्य राडे 3-6; 14वर्षाखालील मुले दुहेरी: अर्जुन अभ्यंकर/ऋषिकेश बर्वे वि.वि.मानस गुप्ता/देवेन चौधरी 6-1; 10 वर्षाखालील मुले दुहेरी: समीहन देशमुख आर्यन किर्तने पराभूत वि. वरद पाटील/वीरेन चौधरी 1-4; मिश्र दुहेरी: कनिका बाबर/अथर्व जोशी वि.वि.आदित्य ठोंबरे/याशिका बक्षी 6-5(7));