Home Blog Page 2604

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

0

राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि ४ : अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे काही शहरांमधील दृश्य गंभीर होते. पोलीस आणि प्रशासनाने गर्दीही होणार नाही आणि सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मे अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ग्रीन झोन हवा

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी  तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे मात्र मला येणाऱ्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे. लॉकडाऊन करणे सोपे होते पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनचे योग्य पालन होत नाही अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे.

रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग नको

ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये आपण उद्योग- व्यवसाय काही प्रमाणात सुरु केले मात्र याठिकाणी रेड झोन मधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल. काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. घाई गर्दीने आपल्याला काहीही करायचे नाही. आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचे ते होतेच आहे पण आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल हेही त्यांनी स्पष्ट केले.

नॉन कोव्हीड रुग्णास दुर्लक्षित करू नका

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोव्हीड आणि नॉन कोव्हीड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे. आपापल्या भागातील डॉक्टर्सना, वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना याकामी सहभागी करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

रुग्ण माहिती अद्ययावत ठेवावी

यावेळी बोलताना मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले की, शहरी भागात असलेला कोरोना राज्याच्या ग्रामीण भागात शिरकाव होऊ न देणे महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी कोरोनाविषयक रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत ठेवायची आहे तसेच चाचण्यांचे अहवाल वेळेत मिळतील याकडे बारकाईने लक्ष द्यायचे आहे. आयसीएमआरचा डाटा हाच प्रमाण मानला जाईल. यात कुठेही चूक होता कामा नये असे सांगितले. कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष द्यायचे आहे. हे क्षेत्र जितके लहान ठेवता येईल तितके ठेवा तसेच क्षेत्राच्या सीमा पूर्णत: बंद असतील, तसेच क्षेत्राच्या आतमध्ये देखील वेळच्यावेळी तपासण्या, सुरक्षित अंतर, फवारणी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहील व तेथील लोक हे पाळतील हे पाहावे असेही ते म्हणाले.

 कोविड योद्धे लवकरच मैदानात

यावेळी माहिती देतांना प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी कोविड योद्धा म्हणून सहभागी झालेल्यांचे प्रशिक्षण दोन तीन दिवसांत संपेल आणि मग हे सर्व त्या त्या जिल्ह्यांत वैद्यकीय सेवेसाठी जाऊ शकतील अशी माहिती दिली. प्रथमोपचार प्रशिक्षण घेऊन गिर्यारोहक महासंघाचे कार्यकर्ते देखील नगर, ठाणे, सांगली इथे प्रशासनास मदतीसाठी तयार आहेत असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या

प्रधान सचिव राजीव जलोटा यांनी यावेळी कोरोना बाबतीत जिल्ह्यांची आकडेवारी आणि निष्कर्ष यांचे संगणकीय विश्लेषण केले व ५ दिवसांची सरासरी सादर केली.  प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनीही याला अनुसरून माहिती दिली. देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ३१ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत तसेच देशातील एकूण मृत्युच्या ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. बरे होऊन घरी जाण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून ९.३ दिवस इतका झाला आहे. देशात रुग्ण  दुप्पट होण्याचा कालावधी ११.३ दिवस इतका आहे. मृत्यू दर देशात ३.२३ टक्के आहे तर महाराष्ट्रात देखील तो कमी होऊन ४.२२ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्रात दर दशलक्ष १२२५ चाचण्या महाराष्ट्रात होतात त्या देशात सर्वाधिक आहेत असे सांगितले.

ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण दुप्पटीचा कालावधी कमी आहे तसेच मृत्यू दर जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये अधिक काळजी घ्यावी व हे रोखण्यासाठी नियोजन करावे असेही बैठकीत सांगण्यात आले.

प्रधान सचिव राजीव मित्तल तसेच डॉ.नितीन करीर यांनी देखील यावेळी परप्रांतीय मजुरांना कशा पद्धतीने पाठवत आहोत याची माहिती दिली.

इतर राज्यात व जिल्हयांमध्ये जाणाऱ्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी, मजुरांनी घाबरुन जावून नये – विभागीय आयुक्त

 

पुणे दि 4: पुणे विभागातून इतर राज्यांत किंवा इतर जिल्हयांमध्ये जाणाऱ्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी, मजूरांनी घाबरुन जावू नये, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात अडकलेल्यांना ज्या भागात जावयाचे आहे त्यांना त्यांच्या भागाची स्वीकृती देणे अपेक्षीत आहे. जी व्यक्ती किंवा ग्रुप जावू इच्छितो त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच खाजगी किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र चालू शकतील. त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या समोर अनावश्यक गर्दी टाळावी. सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपण अर्ज पाठवावा. अर्ज पाठविल्यानंतर तो अर्ज संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे जाईल. जेथे जावू इच्छीता त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज पाठविण्यात येईल. त्यांची संमत्ती मिळाल्यावरच जाण्यास परवानगी दिली जाईल. अशी परवानगी देतांना त्यांनी स्वत: जाण्याची व्यवस्था करणे अपेक्षीत आहे. काही ठिकाणी राज्य शासन व केंद्र शासन जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे रेल्वेची व्यवस्था केली जावून शकते. परंतु त्याबाबतीत केसनिहाय निर्णय होईल्. म्हणून माझी सर्वांना पुन्हा कळकळीची विंनती आहे की विनाकारण, अनावश्यक गर्दी टाळावी. आजपर्यंत आपण सोशल डिस्नसिंग व लॉकडाऊन मुळे जे काही प्राप्त केलय त्याचे विनाकारण नुकसान होईल असे कुठलीही कृती करु नये, असेही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

कोरोना प्रभावग्रस्त वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर

जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, दि.4: पुणे जिल्हयातील महानगरपालिका क्षेत्राकरिता प्राधिकृत अधिकारी असणारे पुणे व पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजल्यापासून आदेशात नमूद महापालिका क्षेत्र हे हॉटस्पॉट/ कंन्टेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. तसेच कोरोना प्रभावग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्हयातील ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 7 तालुके प्रतिबंधित क्षेत्रे जाहिर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निर्गमित केले आहेत.
पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील काही भाग हॉटस्पॉट/ कंन्टेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.
तसेच बारामती तालुका – माळेगाव बुद्रक व लकडेनगर.
इंदापूर तालुका- भिगवण, तक्रारवाडी व डिक्सळ.
हवेली तालुका – मौजे जांभुळवाडी, मौजे वाघोली, आव्हाळवाडी, भावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी व कोळेवाडी या गावाचा रहिवास परिसर, मौजे किरकटवाडी (कोल्हेवाडी), मौजे नऱ्हे, खानापूर, लोणीकंद, उरळी कांचन, पिसोळी, वडाची वाडी, हांडेवाडी या गावाचा रहिवास परिसर, सिध्दीविनायक नगरी, दत्तनगर, परमार कॉम्प्लेक्स, निगडी (पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्र), मांजरी बुद्रुक, कदमवस्ती, लोणी काळभोर, कोंढवे धावडे.
शिरुर तालुका- शिक्रापूर.
वेल्हा तालुका- मौजे निगडे मोसे, मौजे ओसाडे, वेल्हे बुद्रुक, कोंढवाळे बुद्रुक व कोंढवाळे खुर्द, खोडद, ढाणे, वाघदरा, ब्राम्हणघर, हिरपोडी.
भोर तालुका – मौजे नसरापूर, कामथडी, खडकी, उंबरे, केळवडे, नायगाव, मालेगाव, देगाव, दिडघर, सांगवी बुद्रुक, निधान, विरवाडी, व केतकवळे.
दौंड तालुका – मौजे दहिटणे, मिरवाडी, नांदूर, खामगाव, गणेशनगर, देवकर मळा, बैलखिळा, व डुबेवाडी, दौंड शहर व बिगर नगरपालिका क्षेत्र, मौजे गोपाळवाडी, माळवाडी, मसनरवाडी, लिंगाळी, पवार वस्ती, दळवीमळा (सोनवडी), भवानीनगर व भोंगळेमळा (गिरीम).
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कोरोना बाधित 3 कि.मी. परिसर
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मोदीखाना कॅम्प 3 कि.मी. परीसर, ताडिवाला रोड, गल्ली नंबर 2, 32, 234 घोरपडी गाव, लक्ष्मीनगर व यशवंतनगर येरवडा.
देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड – देहू गाव व देहू रोड कॅन्टोन्मेंट या गावाचा रहिवासी परिसर

मुंबईची अर्थव्यवस्था संकटात -वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा बरोबर राज्य सरकारने लॉकडाउनही उघडावे

0

मोठ्या संख्येमध्ये रोजगार संपुष्टात येण्याची शक्यता- भाजपा अध्यक्ष लोढ़ा 

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येसुद्धा लॉकडाउन उघडण्याबरोबरच वैद्यकीय सुविधा विकसित करण्याविषयी राज्य सरकारने तत्काळ विचार करावा, कारण देशातील काही अन्य राज्यांमध्ये लॉक-डाउन उघडण्याची सुरुवातही झाली आहे. मुंबईची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्यामुळे मुंबईमध्येही आरोग्य सेवा सुधारणांसह त्या बळकट करण्याबरोबर लॉक- डाउन उघडण्यासंदर्भात राज्य सरकारने आपली योजना स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा यांनी राज्य सरकारला केली आहे. लोढ़ा यांनी म्हंटले आहे की, लॉकडाउन आणखी काही काळ राहिला, तर मुंबईतील उद्योग धंदे व व्यापार ठप्प होईल व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी समाप्त होतील, आणि लॉक- डाउन उघडल्याशिवाय वैद्यकीय सुविधांचा विकाससुद्धा शक्य नाही आहे.

लॉकडाउन संदर्भात मुंबईच्या जनतेमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे, असे म्हणून मुंबई भाजपा अध्यक्षांनी म्हंटले की, 18 मे नंतर मुंबईमध्ये रोजगाराची स्थिती कशी असणार आहे, हे लोकांना माहिती नाही आहे. त्यांनी म्हंटले आहे की, मुंबईमध्ये आता जर आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी भक्कम प्रयत्नांबरोबरच राज्य सरकारने लॉकडाउन उघडले नाही, तर मुंबईसाठी‌ आगामी काळात परिस्थिती अतिशय गंभीरसुद्धा होऊ शकते. कारण एका बाजूला कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढेल व दुसरीकडे वाणिज्य कामेही ठप्प होतील. ही परिस्थिती समजल्यामुळे लोक मोठ्या संख्येने मुंबईतून निघून जाण्याच्या तयारीत आहेत. लोढ़ा यांनी हेसुद्धा म्हंटले की, लोकांना हे माहिती नाही आहे की, लॉकडाउननंतर सरकार कशा प्रकारे मार्केट उघडणार आहे व व्यापाराच्या विकासासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार आहे. अशा असमंजस स्थितीमध्ये अडकलेल्या लाखो कामगार लोकांना कसेही करून मुंबईतून बाहेर पडावेसे वाटत आहे.

मुंबई भाजपा अध्यक्ष लोढ़ा यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र सरकार ह्याबद्दल काहीही बोलत नाही आहे. त्याउलट देशातील काही इतर राज्यांनी ह्यासंदर्भातील आपली योजना घोषित करून लॉकडाउन उघडण्याची प्रक्रियासुद्धा सुरू केली आहे. लोढ़ा यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले व म्हंटले की, 24 मार्चला देशामध्ये लॉक-डाउन करण्याचा निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे होते. कारण तेव्हा लॉक- डाउन झाले नसते तर देशभरात आणि मुंबईमध्येही स्थिती अतिशय भयावह झाली असती. परंतु मुंबईमध्ये कोरोना संक्रमणाची जी स्थिती आहे, ती खूप दीर्घ काळ टिकणारी आहे. कारण आरोग्य सेवांना बळकटी दिल्याशिवाय परिस्थितीमध्ये सुधारणा शक्य नाही आहे. अशा स्थितीत, मुंबईच्या अर्थव्यवस्थेला विपरित अवस्थेत जाण्यापासून वाचवणे हे सर्वांचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांच्या बरोबरच मुंबईमध्येही राज्य सरकारने आरोग्य सेवांना बळकटी देण्यासाठी व त्यांना भक्कम करण्याबरोबर लॉकडाउन उघडण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन आपली योजना स्पष्ट केली पाहिजे.

पुण्यातून रेल्वेने परराज्यात जाणाऱ्या मजुरांचा खर्च काँग्रेस करणार -मोहन जोशी

पुणे – परराज्यातील आपापल्या गांवी रेल्वेने जाऊ इच्छिणाऱ्या पुणे आणि परिसरातील मजुरांचा खर्च काँग्रेस पक्ष करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. याबाबतचे निवेदनही त्यांनी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना दिले आहे.

केंद्र सरकारने केवळ चार तासांची मुदत देऊन लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखो मजूर आपापल्या गांवी जावू शकले नाहीत. त्यातील काहीजणं पायपीट करत गेले. १९४७ च्या फाळणीनंतर प्रथमच असे विदारक चित्र देशात पाहायला मिळाले. आजही लाखो मजूर देशाच्या अनेक भागांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना आपापल्या गांवी जायचे आहे. पण, जाण्यासाठी काही व्यवस्था नाही. त्यांच्याजवळ पैसेही नाहीत. हे मजूर संकटात असताना भारत सरकार व रेल्वे मंत्रालय या मजुरांकडून गाडी भाड्यासाठी पैसे घेत आहे हे दुर्देव आहे. परदेशात अडकलेल्यांना आपण आपले कर्तव्य म्हणून विशेष विमान पाठवून त्यांना मायदेशी आणण्याची मोफत सोय केली. गुजरातमधील एका कार्यक्रमाच्या भोजन आणि प्रवासासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले. रेल्वे मंत्रालयाने प्रधान मंत्री कोरोना फंडात एकशे एक्कावन्न कोटी देणगी देऊ शकते तर देशाच्या विकासात ज्यांचे योगदान आहे त्या गरीब मजुरांना मोफत रेल्वेची सुविधा का देऊ शकत नाही? या मजुरांच्या मोफत रेल्वे प्रवासासाठी काँग्रेस पक्षाने वारंवार मागणी केली. परंतु, ना सरकारने, ना रेल्वे मंत्रालयाने त्याकडे लक्ष दिले. म्हणून काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी यांनी ठाम भूमिका घेऊन निर्णय घेतला की, या मजुरांना त्यांच्या गांवी मोफत पाठविण्यासाठी त्या-त्या राज्यांमधील प्रदेश काँग्रेस त्या मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च करेल. त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाप्रमाणे पुणे आणि परिसरातून रेल्वेने गांवी जावू इच्छिणाऱ्या मजुरांचा खर्च काँग्रेस पक्ष करणार आहे.

याकरिता पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक यांना निवेदने दिली. पुणे आणि परीसरातून जावू इच्छिणारे मजूर, रेल्वे प्रशासनाचा त्यांच्यासाठी होणारा खर्च याचा तपशील मागवला आहे. तो तत्काळ मिळावा असे निवेदनात म्हटले आहे.

रेल्वेने जावू इच्छिणाऱ्या मजुरांची तपासणी बी.जे मेडिकल ग्राऊंड अथवा तत्सम ग्राऊंडवर करण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांना सुचविण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय स्वरुपाचे सहकार्य करण्याची तयारी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमा आणखी काही दिवस बंदच

कंटेन्टमेंट झोनमधील प्रादुर्भाव कमी करण्यावर राज्य शासनाचा भर

मुंबई, दि. 4 – राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता  उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा  प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत. जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहतील, असे आज राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कंटेन्टमेंट झोन वगळता इतर ठिकाणी एकल दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असली, तरी साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त दिलेल्या सवलतीबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात. तसे करताना ते अधिकची सवलत देऊ शकत नाहीत पण राज्य शासनाने दिलेली सवलत सकारण नाकारू शकतात, असेही आज शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने सुरू करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात दुकानदार व नागरिकांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी पत्रकारांच्या शंकांचे निरसन केले.

राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार, शहरी भागात महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील मॉल, बाजार संकुल व बाजारातील जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे कंटेन्टमेंट झोन वगळून शहरी भागात सर्व प्रकारची स्वतंत्र एकल (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने सुरु करता येतील. क्षेत्रातील स्वतंत्र (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने असे दुकान स्थित असलेल्या गल्ली/रस्त्यावर अत्यावश्यक वस्तू विक्री दुकानांव्यतिरिक्त व्यवहार सुरु असलेल्या इतर दुकानांमध्ये जास्तीत जास्त 5 दुकाने चालू करण्यास अनुमती दिली आहे. मात्र, एका लेनमधील कुठली पाच दुकाने सुरू करावीत, यासंदर्भात त्या भागातील दुकानदारांनी आपआपसात ठरविल्यास चांगले होईल. मात्र, तसे न करता आल्यास यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व महानगरपालिका आयुक्त हे निर्णय घेतील, असे श्री. गगराणी यांनी  सांगितले. यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सुधारित आदेश काढल्यानंतर अद्यापही दुकानदारांची तयारी पूर्ण झाली नसल्याने अनेक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली नाहीत. येत्या एक-दोन दिवसात ही दुकाने सुरू होऊ शकतील.

नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये

जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने सुरू केल्यानंतर होणारी गर्दी टाळण्यासाठी योग्य ती काळजी प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्याशिवाय खरेदीसाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

राज्य शासनाने सध्या कंटेन्टमेंट झोनमधील प्रादुर्भाव कमी करण्यावर भर दिला आहे. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून ग्रीन अथवा ऑरेंज झोनमधील जिल्ह्यात प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंद राहणार आहेत. मात्र, वैद्यकीय कारणामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी देण्यात येत असून आतापर्यंत अशा कारणांसाठी 56 हजार 600 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.

मजुरांच्या स्थलांतरासाठी योग्य ती काळजी

परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी राज्य शासनाने योग्य ती काळजी घेतली आहे. ज्या राज्यांना अशा मजुरांना घेण्यास मंजुरी दिली आहे, अशा राज्यातील मजुरांना रेल्वे अथवा खासगी बसेसद्वारे त्या त्या राज्यात पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत 35 हजार मजुरांना इतर राज्यात पाठविण्यात आले आहे. मजुरांना पाठविताना त्यांची योग्य ती तपासणी करून पाठविण्यात येत आहे. तसेच विविध राज्यांशी मजुरांच्या स्थलांतरासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहे.

इतर नैसर्गिक आपत्तीपेक्षा कोविड प्रादुर्भावाचे संकट हे वेगळे आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत व पुनर्वसनावर भर देण्यात येते. मात्र, कोविडचा प्रादुर्भाव किती काळ टिकेल व तो कमी करण्यासंदर्भात नेमकी प्रक्रिया अद्याप तयार नसल्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी केंद्र शासन व राज्य शासन आदेश निर्गमित करत आहे. स्थानिक परिस्थितीनुसार राज्य शासन निर्णय घेत आहे. सध्या कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या दिसून येत आहे. कंटेन्टमेंट झोनची अंमलबजावणी कडकपणे केल्यामुळे पूर्णपणे नवीन रुग्ण सापडत नाहीत.

आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजना

लॉकडाऊन झाल्यानंतर वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क येणे बंद झाल्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती प्रभावित झाली आहे. कोविडमुळे जीवितहानी कमी करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. त्यानंतर आर्थिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने आर्थिक व्यवहार सुरू करण्यात येत आहे. कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काय उपाययोजना करावे, हे सुचविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच आर्थिक व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती त्यांच्या अहवाल दिल्यानंतर त्यावर राज्य शासन योग्य ती कार्यवाही सुरू करणार आहे. राज्यातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काही ठिकाणी असे उद्योग सुरू झाले असून अनेक ठिकाणी नियमांची पूर्तता करून लवकरच उद्योग सुरू होतील, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ‘महापारेषण’कडून साडेपाच कोटी

0

मुंबई, दि. 4 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने चांगला प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणने सुमारे साडेपाच कोटी रूपये जमा केले आहेत. ‘कोरोना’ विरोधी लढ्यामध्ये केलेल्या आर्थिक योगदानाबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणचे कौतुक केले आहे.

कोरोना संकट निवारणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुमारे १ कोटी ५५ लाख ४३ हजार ३६१ रुपये देऊन महापारेषणने प्रतिसाद दिला होता. आता महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचे वेतन सुमारे १ कोटी ९३ लाख ३५ हजार ७६२ रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत. तसेच महापारेषणच्या सांघिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) फंडातून तब्बल दोन कोटी रूपये राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लढाईसाठी महापारेषणने एकूण सुमारे साडेपाच कोटी रूपये दिले आहेत.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. वाघमारे म्हणाले, ‘कोरोना’ विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. महापारेषणकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही महापारेषणच्या कामाचे जाहीर कौतुक केले आहे. वीजपुरवठा अखंडित व चांगल्या क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

पुण्यात २४ तासात ९० नवे रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 4:-पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 2 हजार 364 बाधित रुग्ण असून 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 103 बाधीत रुग्ण असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 78 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 135 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 34 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 103 झाली आहे. 499 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 489 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 83 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत.
आजपर्यत विभागात 23 हजार 942 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 22 हजार 823 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 119 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 20 हजार 393 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 71 लाख 40 हाजर 436 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 79 लाख 65 हजार 967 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 618 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
00000

पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील….पण वाहतूक व्यवस्था आपापली ..

पुणे- पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिबंधित
क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही कामगार किंवा कर्मचाऱ्याला कामावर जाण्याची किंवा प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. उर्वरित क्षेत्रातील कामगारांनी सोबत आपले ओळखपत्र बाळगावे, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कामगार किंवा कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी औद्योगिक आस्थापना, उद्योग कारखान्यांनी खास वाहतूक व्यवस्था (डेडीकेटेड ट्रान्सपोर्ट ॲरेंजमेंट) करायला हवी, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्गुरू शंकर महाराजांचा ७३ वा समाधी सोहळा अभिनव पद्धतीने साजरा

पुणे : धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज मठ म्हणजे देशाविदेशातील लाखो शंकर महाराज भक्तांचे अढळ श्रद्धास्थान आहे. श्री सदगुरू संतवर्य शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी एप्रिल , मे दरम्यान साजरा केला जाणारा सद्गुरू शंकर महाराज समाधी सोहळा म्हणजे भक्तांसाठी मोठ्या आनंदाची पर्वणी असते. यंदा मठातर्फे सद्गुरू शंकर महाराजांचा ७३ वा समाधी सोहोळा २४ एप्रिल ते २ मे दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊन लक्षात घेऊन समाधी ट्रस्टच्या वतीने हा सोहळा अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आल्यामुळे तो सर्वत्र चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला.

श्री सदगुरू संतवर्य शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) या निधीस रू १० लाखांचे अर्थ साहाय्य करण्यात आले.तसेच ससून हॉस्पीटल देणगी समितीस आौषधे व साधन सामुग्री करीता रू ५ लाख देण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार श्री शंकर महाराज समाधी मंदिर (मठ), ७३ व्या समाधी सोहळ्याच्या काळात सुद्धा बंद ठेवण्यात आले. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे मठाच्या विश्वस्तांनी काटेकोरपणे पालन केले. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य भक्तांसोबतच महापौर, आमदार, नगरसेवक, पोलीस व प्रशासकीय अधिकारी अशा पदाधिकारी भक्तांनी देखील शंकर महाराजांचे दर्शन, मठाच्या दरवाजा बाहेरूनच घेऊन विश्वस्तांना सहकार्य केले. तसेच दर्शनासाठी दरवाजा उघडावा, म्हणून मठाच्या सिक्युरिटी ना कोणताही त्रास दिला नाही.
दर्शनासाठी मठाच्या दारात आलेला भक्त उपाशी राहता कामा नये, अशी शंकर महाराजांची ईच्छा असल्याने मठातर्फे दररोज खिचडीचा प्रसाद आणि सोहळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते. कोरोनाच्या पाश्रर््वभूमीवर यंदा ७३ व्या समाधी सोहळ्यानिमित्त विद्यार्थी, बेरोजगार मजुर, गरीब कुटुंबे अशा हजारो वंचितांना खिचडीच्या प्रसादचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भक्तांनी अन्नदानासाठी ?ानलाईन देणग्या देऊन आर्थिक साहय्य केलं.
भक्तांना समाधी सोहळा सप्ताहात दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून विश्वस्तांकडून अभिनव पद्धतीचा अवलंब करण्यात आला. फेसबुक व व्हॅट्सअपवर दररोजच्या पुजेचे तसेच मठाच्या परिसरातील फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आले. त्यामुळे समाधी मंदिर बंद असले, तरीही भक्तांना निर्विघ्नपणे शंकर महाराजांचे दर्शन घेणे शक्य झाले. त्यामुळे जणू महाराज आपल्या सोबत आहेत, याची प्रचीती भक्तांना आली. यावेळी मठातील धार्मिक विधी व पारंपारीक शोडषोपचार, प्रतिकात्मक रीतीने पार पाडण्यात आले. यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचार्यांनी पुजा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी खूप मेहनत घेतली.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इंटरनेटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ११ गुरुजींनी घरूनच रुद्र पठण करुन लघुरुद्र अभिषेक केला व आधुनिक संकल्पना स्विकारण्यात मठ, मंदिरेही मागे नाहीत हे दाखवून दिले. भक्तांनी आपापल्या घरी महाराजांची पूजा, नैवेद्य, पारायण, भजन करून हा सोहळा साजरा केला आणि त्याचे फोटो व्हिडीओ अपलोड केले.

अशाप्रकारे सामाजिक भान ठेवून सोहळा पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल विश्वस्तांनी सर्व भक्तांचे आभार मानले. तसेच कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन भक्तांना श्रींच्या समाधीचे दर्शन घडावे, अशी सद्गुरु शंकर महाराज चरणी प्रार्थना केली. करोनाच्या पाश्रर््वभूमीवर लॉकडाऊन संपेपर्यंत मठात शिधा, देणगी स्विकारण्यात येणार नसल्याने भक्तांनी समाधी परिसरात येवू नये; पोलीस, सिक्युरिटी, व्यवस्थापन कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट, पुणे च्या विश्वस्तांनी केले आहे. या वेळी अध्यक्ष भगवान खेडेकर , सचिव सुरेंद्र वाईकर, विश्वस्त चंद्रकांत मालपाणी, सुरेश येनपुरे, सदानंद खामकर,सकाळ चे ज्येष्ठ पत्रकार  नागराज नायडू, प्रताप भोसले उपस्थित होते.

परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करु नये-जिल्हाधिकारी राम

 

पुणे-दवाखान्यांमध्ये कोरोना लक्षणांचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पर राज्यात जायला इच्छुक कामगार अथवा परजिल्ह्यात जायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी, कामगार, नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यात गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. शिवाय परराज्यात 100 अथवा 200 अशा संख्येत गटाने जाणाऱ्या कामगारांची त्यांच्या नजीकच्या ठिकाणी प्रशासनामार्फत वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी म्हटले आहे.

 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना सुरु करण्यात येणार आहेत, तसेच या भागातील बांधकामे सुरु होत आहेत. त्यामुळे याठिकाणी कामगारांना सोशल डिस्टनसिंग ठेवून काम सुरु करता येणार आहे. शिवाय सध्याच्या परिस्थितीत घरभाडे आकारू नये, अशा सूचना घरमालकांना देण्यात आल्या आहेत.

कामगार ज्या राज्यात जाणार आहेत, त्या संबंधित राज्याची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांना इच्छित स्थळी जायची परवानगी देण्यात येणार आहे. या नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर शासकीय निकषानुसार त्यांना परवानगी मिळेल, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी म्हटले आहे.

९७ टक्के पुणे शहर खुले – आयुक्त शेखर गायकवाड

mymarathi.net संपूर्ण अन कट पत्रकार परिषद

सोशल डीस्टेन्स ,सॅॅनिटायझरशन चा वापर करून काळजी घेतली तर मंदिरे, धार्मिक स्थळे सुरु करता येतील ,घरकाम करणाऱ्या महिला काम करू शकतील ,मात्र पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून रिक्षा ला परवानगी नाही .आयटीचे वर्क फ्रोम होम च सध्या … भाजीपाला ,किरण मालाच्या दुकानातून संसर्ग वाढला . विरोधी पक्षांचे आरोप नाकारले मी महापालिकेत १२ ते १३ तास उपलब्ध …कोरोनाचा सामना करताना लोकांना आपली जीवन शैली बदलावी लागेल ,प्रत्येक वेळी दीर्घकालीन लॉक डाऊन शक्य होणार नाही .के इएम हॉस्पिटल ने पी पी ई  कीट चे एका रुग्णाला ८० हजार रुपये आकारणे हे अयोग्यच …खाजगी हॉस्पिटल बाबत अनेक तक्रारी ,आता महापालिकेशी हॉस्पिटल करार करीत असल्याने बिलाचा प्रश्न उपस्थित होणार नाही .महापालिकाच एस आर ए प्रकल्प राबवेल .

पुणे : पुर्ण शहराचा ८४ चौरस किलोमीटरचा ”कंटेन्मेंट झोन” कमी करुन तो १० चौरस किलोमीटरवर आणण्यात आला आहे. ९७ टक्के पुणे शहर खुले करण्यात आले असून या भागातील नागरिकांना दुचाकी व चारचाकींचा वापर करता येणार आहे.यासोबतच त्यांना पेट्रोल डिझेलही उपलब्ध होणार आहे. यासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह अन्य दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मोलकरणींसह घरगुती कामगारांना योग्य खबरदारी बाळगत कामावर येण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

गेल्या दोन महिन्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता झोपडपट्ट्या, दाटीवाटीच्या भागात सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. हा भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सवलती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. पुण्यामध्ये नागरिकांना आवश्यक गोष्टी टप्प्याटप्प्याने खुल्या केल्या जाणार आहेत. अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांना गरजेनुसार वाहन घेऊन फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच बांधकाम मजूर जर साईटवरच राहणार असतील तर अशा बांधकाम प्रकल्पांना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ई-कॉमर्सअंतर्गत येणा-या आस्थापनांना सवलत देण्यात येणार आहे.
खुल्या करण्यात आलेल्या भागातील वैयक्तिक दुकानांना प्राधान्य देण्यात आले असून जिवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. ज्या रस्त्यावर सलग दुकाने आहेत अशा ठिकाणी दिवसाआड आड पाच दुकानांना  अशी पाच दुकाने सुरु ठेवता येणार आहेत.अर्थात स्थानिक पातळीवर पोलीस निरीक्षक ,अथवा संबधित पोलीस अधिकारी याबाबत असा निर्णय करतील खासगी ऑफिसेस खुली करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कोणत्याही स्वरुपाच्या खासगी दुकानांना परवानगी नसली तरी आगामी काळात शासनाच्या निदेर्शांनुसार बदल होऊ शकतो.

शहरातील झोपडपट्ट्यांमधील आणि दाटीवाटीच्या भागातील लोकसंख्येची घनता कमी करण्याकरिता आता महापालिकाच पुढाकार घेणार असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत आता पालिकाच एसआरए प्रकल्प राबविणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. भविष्यात पालिका अशा प्रकारचे प्रकल्प यशस्वीरित्या मार्गी लावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहरातील दाटीवाटी कमी करण्यासाठी लोकसंख्येची घनता कमी करणे आवश्यक असून त्याकरिता ‘अर्बन रिन्युअल’ अंतर्गत उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची सविस्तर बातमी लोकमत ने प्रसिद्ध केली होती. शहरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टी भागातील आहेत. ही दाटीवाटी कमी करायची असेल तसेच शहर झोपडपट्टीमुक्त करायचे असल्यास एसआरए योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडून एसआरए प्रकल्पांकरिता प्रकरण सादर केले जाते. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी काही प्रकल्पही पुर्ण केले आहेत. या बांधकाम व्यावसायिकांना एफएसआय वाढवून दिला जातो. तसेच काही जागाही वापरण्यास मिळते. त्याच धर्तीवर आता पालिका एसआरए प्रकल्प राबविणार आहे. दाटीवाटीसह झोपडपट्ट्यांच्या पुननिर्माण आणि विकासाकरिता ८ ते १० नवीन पर्याय पालिका मांडणार आहे. या आठवड्यात या पर्यायांचे डॉक्युमेंटेशन करुन स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त गायकवाड म्हणाले.

विरोधीपक्षनेते आणि शिवसेना गट नेत्यांची देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टिका (व्हिडीओ)

पुणे- काल विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी सयुंक्त  पत्रकार परिषद घेऊन काल कोरोना प्रकरणी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले .यावेळी पहा विपक्ष नेत्या दिपाली धुमाळ आणि शिवसेना गट नेते  पृथ्वीराज सुतार नेमके काय म्हणाले ….

 

घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

0

नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण बनला आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले.

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सरकारने विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली. रेल्वे परिपत्रकानुसार स्थानिक सरकारी अधिकारी सर्व पडताळणी करून मजुरांना तिकिटे देतील आणि त्यांच्याकडून तिकीट भाडे आकारले जाईल. मजूर आणि कामगारांकडून आकारण्यात येणारी तिकिटाच्या स्वरूपातील एकूण रक्कम ते अधिकारी रेल्वेला देणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदी सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं असून, त्यांनी ते ट्विट केले आहे. ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, राज्य कॉंग्रेस कमिटीच्या प्रत्येक विभागानं गरजू मजूर व कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा प्रवास खर्च उचलावा. त्यांच्या तिकिटांचा खर्च करण्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलावीत. खरं तर राज्यांवर मजुरांच्या तिकिटाचा खर्च टाकून आणि त्यांच्याकडून भाडे वसूल केल्यानं विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळेच या स्थलांतरित कामगारांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने उचलावा, अशी मागणी भाजपा विनाशासित राज्यांची आहे.

पुण्यात आज पासून काही ठिकाणी तसाच लॉक डाउन तर काही ठिकाणी थोड़ा शिथिल

https://www.facebook.com/1501539223422053/posts/2605646426344655/

पुण्यात या भागाला शिथिलीकरणाचे फायदे

  • सिंहगड रस्ता
  • औंध, बाणेर
  • वारजे, कर्वेनगर

पुणे-महापालिकेने शहराचा सुमारे 80 टक्के भाग सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून रविवारी रात्री जाहीर केला. त्यामुळे तेथे सध्याचीच परिस्थिती कायम राहणार आहे. लॉकडाउनच्या शिथिलीकरणाचे फायदे तेथे मिळणार नाही. मात्र, सिंहगड रस्ता, औंध-बाणेर, वारजे-कर्वेनगर या भागाला शिथिलीकरणाचे फायदे मिळतील. तेथे अत्यावश्यक वस्तू व सेवांशिवाय काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 तर, त्या बाहेरील क्षेत्रात सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान दुकाने खुली राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अशी होणार अंमलबजावणी

  • दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान खुली राहतील
  • निवासी भागातील अत्यावश्यक सेवांशिवाय प्रत्येकी पाच दुकाने त्या-त्या भागात सुरू राहणार
  • या भागात मद्यविक्रीची दुकाने ठरविक वेळेत काही अटींवर खुली राहतील
  • अत्यावश्यक वस्तू ई-कॉमर्सद्वारे घरपोच मिळतील
  • बांधकामांना लॉकडाउनच्या शासकीय अटींनुसार परवानगी
  • पोलिसांनी परवानगी दिलेल्या दुचाकी आणि मोटारींची वाहतूक करता येईल
  • दुचाकीवर एकच तर मोटारीत चालकाशिवाय दोघांना बसता येईल

मायक्रो कंटेन्मेंट झोन
पुणे शहरातील महापालिकेच्या 15 पैकी 12 क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारितील सुमारे 80 टक्के भाग रविवारी रात्री सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात आला.

त्याच्या सीमा पोलिस सील करणार असून त्याअंतर्गत जीवनावश्यक वस्तू आणि सेवा ठराविक वेळेत नागरिकांना मिळतील. या भागातून कोणाला बाहेर पडता येणार नाही किंवा आत जाता येणार नाही. लॉकडाऊन शिथिलीकरणाचे फायदे या भागाला मिळणार नाहीत. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या वाहतुकीसाठी पोलिसांच्या पासची गरज नसेल. या भागातील दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान, खुली राहणार आहेत

पुण्यातील संक्रमणशील भाग

  • कसबा – विश्रामबागवाडा
  • भवानी पेठ
  • कोंढवा येवलेवाडी
  • कोथरूड – बावधन
  • ढोले पाटील रोड
  • शिवाजीनगर – घोले रोड
  • धनकवडी – सहकारनगर
  • नगर रोड – वडगाव शेरी
  • बिबवेवाडी
  • येरवडा, कळस, धानोरी
  • वानवडी, रामटेकडी
  • हडपसर – मुंढवा