Home Blog Page 2569

राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली ससून मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची थेट भेट

कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर,रुग्णांशी संवाद; जाणून घेतल्या अडचणी

पुणे- कोरोनामुळे पुणे आणि मुंबईतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.याच पार्श्वभूमीवर (दि.२७) रोजी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे येथील ससुन हॉस्पिटलला भेट देत तेथील रुग्णांशी संवाद साधला.यावेळी आ.पवारांना अतिदक्षता विभागात जाण्याबाबत विचारणा करण्यात आली त्यावेळी आ.पवार न घाबरता आवर्जुन त्या ठिकाणी जाऊन जे गंभीर रुग्ण आहेत त्यांची व कोरोनाशी लढा देत असताना संक्रमित झालेल्या डॉक्टर,नर्स,सुरक्षारक्षक आदींची भेट घेतली. ‘काळजी घ्या’ असा आपुलकीचा सल्ला दिला.यावेळी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या असणाऱ्या अडचणी व तेथील परिस्थितीही जाणून घेतली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याबरोबरच पुणे येथील हॉस्पिटलवरही बारकाईने लक्ष आहे.कोरोना वॉरीयर्सना लागणारी मदतही ते पोहोचवत आहेत.असे आ. रोहित पवार बोलताना म्हणाले.

दरम्यान मानदेशी फाऊंडेशनच्या वतीने ससून हॉस्पिटलसाठी पी.पी.ई.किट, गॉगल व एन-९५ मास्क आ. रोहित पवार यांचेकडे देण्यात आले होते.हे सर्व साहित्य ससुन हॉस्पिटलचे डीन डॉ.मुरलीधर तांबे यांच्याकडे सुपूर्द केले.कोरोनाशी लढणाऱ्या
सर्वच डॉक्टर कर्मचाऱ्याचे आ. रोहित पवार यांनी विशेष आभार मानले.अनेक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत.अनेक रुग्ण सध्या कोरोनावर यशस्वी मातही करत आहेत.कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असताना आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाशी लढा देणाऱ्या कोरोना वॉरीयर्सना संरक्षित करण्यासाठी आमदार रोहित पवारांनी मागील काही दिवसांपूर्वी पुण्यातील रुग्णालयांना सॅनीटायझर पुरवले.कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता आणखी काय उपाय योजना करता येतील का? याबाबत आ. पवार हे प्रयत्नशील आहेत.
यावेळी डॉ.योगेश गवळी, डॉ.हरीश ताटीया, डॉ.मुरलीधर बिरादार व इतर डॉक्टर,नर्स व कर्मचारी उपस्थित होते.


मतदारसंघातील ‘त्या’ रुग्णाचीही घेतली भेट!
आ. रोहित पवारांनी ससुन हॉस्पिटलमधील रुग्ण,डॉक्टर नर्स आदींना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान मतदारसंघातील रुग्ण देखील याच हॉस्पिटलमध्ये असल्याचे आ.पवार यांना समजताच त्या रुग्णाचीही आवर्जून भेट घेतली. कोरोनाला हरवुन लढाई जिंकायची आहे असे म्हणत प्रोत्साहित केले.


त्यांच्या भेटीचाही ‘शब्द’ पाळला!
मागील काही दिवसांपुर्वी आ.पवार यांनी नायडू रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.त्यांना प्रोत्साहित केले.तेथील डॉक्टर, नर्स आदींनी रुग्णालयात येवून जा असा आग्रह धरला होता.आ.पवारांनी त्या ठिकाणी जाऊन सर्वांची भेट घेऊन सर्वांचे आभार मानले. आणि दिलेला शब्द पाळला.

कोथरुडमधील सागर कॉलनीतील १२०० जणांची मोफत आरोग्य तपासणी

आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने कोथरूडमधील सागर कॉलनी या प्रतिबंधित क्षेत्रांमधील स्थानिक नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून भारत सरकारच्या आयुष मंत्रालय निर्देशानुसार कोरोनाच्या साथीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बम ३० औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोथरुडचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये गरजुंना मोफत अन्नधान्य वाटप, गावी परतणार्या नागरीक आणि मजुरांची मोफत तपासणी करुन प्रमाणपत्र देणे आदींचा समावेश आहे. यामध्येच आता कोथरुड मधील सागर कॉलनी हा प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून या भागातील नागरिकांची मोफत तपासणीचा उपक्रम राबविण्यात आला. याचे उद्घाटन सरचिटणीस पुणे शहर माननीय श्री राजेशजी पांडे व पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री या श्री रविजी अनासपुरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये स्थानिक १२०० नागरिकांची तपासणी करून अर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथी औषध देण्यात आले. या शिबिरामध्ये डॉ संदीप बुटाला, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. गौरव पाटील, डॉ चिन्मय चोपडे, डॉ प्रशांत बोरुडे व सहकारी डॉक्टरांनी औषधांची घेण्याची पद्धत व त्याचे डोस घेण्याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी नगरसेवक श्री. दिलीप वेडे पाटील, श्री. किरण दगडे पाटील, सौ. श्रद्धाताई प्रभुणे पाठक, सौ. अल्पनाताई वर्पे, श्री. पुनितजी जोशी, स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब टेमकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरासाठी अॅड. रुपेश भोसले, राहुलदादा देशपांडे, उमेश मोकाटे, विजय राठोड, अमित बांडागळे, अभिजित ठाकूर, हनुमंत थोरात, रामदास तुरपे, अभिजित मुळे, अजित शिगवण, राहूल बिराजदार, महादेव टेंगसे, जितेंद्र सुर्यवंशी, धनंजय रसाळ, जाधव काका, अमर वाघमारे, कुंडलिक दुपारगुडे, पिंटू कानगुडे, अशोक नरवडे, अखिल सागर कॉलनी मित्र मंडळ, एकदंत फ्रेंड्स सर्कल ट्रस्ट यांनी सहकार्य केले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 3 हजार 904

पुणे विभागातील 3 हजार 841 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 8 हजार 122 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

   पुणे दि. 27 :- पुणे विभागातील  3 हजार 841 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 122 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 904 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 200 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार 604  बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 355 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 954 आहे. कोरोनाबाधित एकूण 295  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 193  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 403 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील 394 कोरोना बाधीत रुग्ण असून 122 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 653 कोरोना बाधीत रुग्ण असून 297  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.     ॲक्टीव रुग्ण संख्या 292  आहे. कोरोना बाधित एकूण 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील  कोरोना बाधीत 88 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 39  आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील 383 कोरोना बाधीत  रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 360  आहे. कोरोना बाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 77 हजार 117 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी      72 हजार 747 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 370 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 64  हजार 516 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8 हजार 122  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.     

(टिप : – दि.27 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

ज्येष्ठ एकट्या बेसहारा कलाकारांना घरे देण्यासाठी अभिनेते विक्रम गोखलेंनी दिला अडीच कोटीचा भूखंड

पुणे-ज्येष्ठ अभिनेते  विक्रम गोखले यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराची जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा निर्णय घेतला. आज या जागेची बाजार भावानुसार किंमत जवळपास अडीच कोटी रुपये इतकी आहे. या जागेवर ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंतांना आसरा मिळावा म्हणून मोफत निवारा  देण्यात यावा म्हणून हा  निर्णय विक्रम गोखले यांनी घेतल्याचे वृत्त आहे .याचसाठी त्यांनी ही पूर्ण जमिन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली. अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभे  करण्याचे ठरवले असून त्यांनी विक्रम गोखले यांचे आभार मानले आहेत.काही कलावंत आपल्या घराचा वारसा घेऊनच आलेले आहेत मग तो अभिनयातील असो वा दानधर्माचा. विक्रम गोखल्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले हे दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्य दलाला मदत म्हणून देत असत.विक्रम यांनीही वडिलांचा हा वारसा पुढे सुरू ठेवला. त्यांचा हा स्तुत्य वारसा पुढे सुरू ठेवला असून दरवर्षी विक्रम गोखलेही त्यांच्या कमाईतील रक्कम मदत म्हणून देत असतात. दरम्यान, कोरोना व्हायरस या महामारीशी सामना करण्यासाठी अनेक कलाकार आपआपल्या परिने मदत करत आहेत. च्या पार्श्वभूमीवर सर्वच कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. विक्रमजींनी स्वतः मदत तर केलीच शिवाय बॉलीवूड मधील इतर कलावंतानाही हक्काने मराठी चित्रपटसृष्टीतील सहकलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.आतापर्यंत विक्रमजींनी ज्येष्ठ कलावंतांची होणारी फरफट पाहिली आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा अशी त्यांची कायमच भावना होती. आपली ही मनीषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची हि कसोटीची वेळ

  • विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
    पुणे, दि. 27 – पुणे विभागतील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयांत कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. कंटेनमेंट झोनमध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून गतीने उपचार सुरू करावेत तसेच कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे सांगतानाच कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही ख-याअर्थाने कसोटीची वेळ असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सांगितले.
    विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेले आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
    डॉ. म्हैसेकर म्हणाले, आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका व इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्मनक उपाययोजना करण्यामत येत आहेत. यासोबतच परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे सुलभ होईल व कोरोना प्रतिबंधासाठी उपयोग होईल. मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पल्स ऑक्सीमीटर, बीपी तपासणी तसेच शुगर तपासणीला प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य सर्वेक्षण अचूक असावे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून, तालुक्याचा हद्दीत व ग्रामीण भागात बाहेरुन प्रवास करुन येणाऱ्या नागरीकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे असे निर्देशही देवून डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याकरीता विशेष खबरदारी म्हणून संबंधित ग्रामीण भागामध्ये बाहेरुन प्रवास करुन जे प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा इतर कोणताही नागरीक प्रवेश करेल, या सर्व प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा नागरीक यांना संस्थात्मक विलगीकरण करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबतचे अंमलबजावणी करीता तसेच गावपातळीवर कार्यरत असलेल्या ग्रामसेवक, तलाठी किंवा आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
    पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात आतापर्यंत झालेली उपाययोजनांची अंमलबजावणी, स्थानिक स्थिती, संभाव्य स्थिती व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नव्याने करावयाचे उपाय आदी बाबींसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेचे अधिकारी यांनी आपल्या जिल्हातील उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सबंधित जिल्हा प्रशासनातील कोरोना जबाबदारी देण्यात आलेले समन्वय अधिकारी उपस्थित होते.

‘राहुल गांधींची भूमिका दुटप्पीपणाची

0

मुंबई. ‘आम्ही महाराष्ट्रातील सरकारला पाठिंबा दिला असला, तरी आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही,’ या राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरपू समाचार घेतला. ‘काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. सत्तेत असूनही निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवावी’, असा हल्लाबोल विखे पाटलांनी माध्यमांशी बोलताना केला.

राहुल गांधींच्या वक्तव्यावर विखे पाटील म्हणाले की, ‘राहुल गांधींचे विधान दुटप्पीपणाचे आहे. एकीकडे सरकारमध्ये राहायचे आणि दुसरीकडे आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगायचे. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, तर तुम्ही सरकारमध्ये कशाला थांबलात?’, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. पुढे ते म्हणाले की,’ काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार नाही तर सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवा. सध्या काँग्रेसची अवस्था डबलढोलकी सारखी झाली आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

‘महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. परंतू, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे हा यातला फरक आहे’, असे राहुल गांधी म्हणाले होते.

राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

0

मुंबई दि. 27:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी दि. 15 जूनपर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. आज मंत्रालयातून राज्यातील कापूस खरेदीबाबत जिल्हाधिकारी, डीडीआर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आढावा  घेऊन संवाद साधला, त्यावेळी सहकारमंत्री श्री. पाटील यांनी वरील सूचना केल्या.

मंत्री श्री. पाटील  म्हणाले,  कापूस खरेदीला गती द्यावी त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी, शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात ,कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या-त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी. सर्व खरेदी विक्री व्यवहारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, इतर राज्यातील कापूस खरेदी संपुष्टात आल्याने सीसीआय ने आपले ग्रेडर राज्यातील केंद्रांवर तातडीने  उपलब्ध करुन द्यावेत.

सीमेलगतच्या जिल्ह्यात परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या कापसाच्या खरेदीची शक्यता असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या हद्दींवर चेक पोस्टद्वारे त्यावर नियंत्रण ठेवावे.

वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी ,कापूस खरेदी केंद्रावरील तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामे कमी पडणार नाहीत त्यामुळे कापूस खरेदीला गती द्यावी अशा सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.

यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, सीसीआच्या सीएमडी श्रीमती अल्ली राणी, कॉटन फेडरेशनचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन संचालक सुनील पवार, वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवशंकर उपस्थित होते.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारची परवानगी

  • महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
  • ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य शासनाची मान्यता
  • पुढील प्रक्रिया तातडीने करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे (प्रतिनिधी)

पुणे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ स्थायीचे समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी ही संकल्पना मांडत विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला होता. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यास महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

महापौर मोहोळ यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या महाविद्यालयाची संकल्पना मांडून निधीही उपलब्ध करुन दिला होता. हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय परिसरात साकारणार असून त्यासाठी १० एकर जागा राखीव करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्यसभेत गेल्या वर्षी २८ ऑगस्टला मान्यता मिळाली होती. या संदर्भातील पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत महापौर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकासचे मुख्य सचिव महेश पाठक यांच्याकडे व्यक्तिशः पाठपुरावा केला होता.

या संदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘मुख्य सभेच्या मान्यतेनंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत अहमदाबाद महापालिकेने साकारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर या संदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करत वेगाने पाठपुरावा केला. आणखी काही तांत्रिक मान्यता घेऊन पुढील वर्षीच्या जूनमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ५०० खाटा असणारे सुसज्ज आणि अद्ययावत महाविद्यालय करण्याचा मानस आहे. या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे पुणेकरांच्या वतीने मी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो’.

५९५ पदांची निर्मिती आणि ६२२ कोटींची गरज

‘महाविद्यालयात प्रत्यक्ष साकारताना विविध प्रवर्गातील ५९५ पदांची निर्मिती करुन भरती प्रक्रिया पार पडणार असून येत्या सहा वर्षात यासाठी टप्प्याटप्प्यात ६२२ कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे’, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

कोरोनाच्या लढाईत आशीर्वादासाठी बागवे पिता -पुत्र गणराजाच्या द्वारी (व्हिडीओ)

पुणे- सारे जग कोरोनाच्या संक्रमणाने त्रस्त झाले असताना एकीकडे पुणे आणि आपल्या भवानीपेठ परिसरात जनजागृती आणि जनसेवा करता करता अखेर रमेश बागवे आणि अविनाश बागवे या पिता पुत्रांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजांच्या द्वारी माथा टेकून गणराजाला साकडे घातले . कोरोनाची लढाई लढतांना सैनिक हि कोरोनाच्या आक्रमणात वेढले जात आहेत . जगातील सर्व नागरिक ,कोरोना विरोधात लढा देणारे योद्धे यांना बळ दे म्हणून बागवे पिता पुत्रांनी येथे प्रार्थना केली . सर्व प्रयत्न झालेकी प्रार्थना हा एकमेव मार्ग उरतो आणि त्यातूनही यशप्राप्ती होते या भावनेने आज त्यांनी दगडूशेठ ला साकडे घातले .
रमेश बागवे हे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत तर अविनाश बागवे हे कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत .त्यांच्या समवेत यावेळी राजेंद्र शिरसाट, प्रवीण करपे, सुरेश कांबळे, आदित्य गायकवाड येथे उपस्थित होते

क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता ची आत्महत्या

0

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलेल्या पोस्टवरून स्पष्ट होत आहे.

क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने तिच्या इंदौरमधील घरी गळफास घेत आत्महत्या केली. कोरोना व्हायरच्या लॉकडाऊनमध्ये प्रेक्षा तिच्या घरी आली होती. प्रेक्षाच्या आत्महत्येमागचं नेमके कारण समजू शकलेले नाही मात्र डिप्रेशनमुळे तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

प्रेक्षाला अभिनेत्री व्हायचे असल्यामुळे ती मुंबईत आली होती मात्र लॉकडाऊननंतर ती तिच्या घरी परतली. त्यानंतर लॉकडाऊन वाढत गेले आणि आता आपल्याला यापुढे काम मिळणार नाही या भावनेने ती डिप्रेशनमध्ये जात होती आणि डिप्रेशनमध्येच तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान पोलीस तपासात तिची कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही.

प्रेक्षा आपल्या घरी परतल्यानंतर ती काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. सोमवारी रात्री ती जेव्हा तिच्या रुममध्ये गेली तेव्हा काही वेळ ती तिचा फोन वापरत राहिली. त्यानंतर तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निराशजनक स्टेटस अपलोड केले होते. ज्यात तिनं लिहिलं, ‘सर्वात वाईट असते ते म्हणजे तुमची स्वप्न मरूनजाणे’.

क्राईम पेट्रोल’, ‘मेरी दुर्गा’ आणि ‘लाल इश्क’ या मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रेक्षाला गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नसल्याने ती तणावात असल्याचे बोलले जात होते. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टवरून तिने आत्महत्येचे पाऊल हे नैराश्येतून उचलले आहे, असा दावा केला जात आहे. टीव्ही मालिका करणारी प्रेक्षा लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटूंबियांसोबत राहत होती. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
अभिनेत्री ऋचा तिवारी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. ती म्हणते, “हसऱ्या चेहऱ्यामागे बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात. त्याला कुणी समजून घेऊ शकत नाही. आपण जितकी काळजी शरीर स्वास्थाची घेतो तितकी मनाचीही घ्यायला हवी. आमच्या परिवारातील एक सदस्य आता राहिली नाही.

रूग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) १४ दिवसांवर आणण्यात यश – मुख्य सचिव अजोय मेहता

0

लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येचा गुणाकार रोखण्यास मदत

कोरोना रुग्णांसाठीच्या उपचार सुविधेला गती

मुंबई, दि. २६ : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) 14 दिवसांवर आणण्यात यश आले आहे. मुंबईमध्ये 75 हजार खाटा तयार असून कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबविली जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असून राज्यात लवकरच 27 नवीन प्रयोगशाळा सुरु होतील. त्यामुळे राज्यातील प्रयोगशाळांची संख्या 100 होणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज येथे दिली.

मंत्रालयातून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्य सचिव बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ.प्रदीप व्यास, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस.चहल उपस्थित होते.

यावेळी झालेल्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे असे :

मुख्य सचिव म्हणाले :

· राज्यात सध्या 35 हजार 178 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

· 9 मार्चपासून आतापर्यंत 52 हजार 667 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 15 हजार 768 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

· राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी तीन दिवसांवरुन 14 दिवसांवर आणण्यास यश मिळाले आहे. लोकांमधील जागरुकता आणि लॉकडाऊनमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविणे शक्य झाले आहे.

· राज्यात टेस्टींग, ट्रेसींग आणि आयसोलेशन या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला.

· 9 मार्चला राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या आज 72 प्रयोगशाळा कार्यान्वित असून नव्याने 26 लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित होतील. त्यामध्ये रत्नागिरी येथे एक, आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 18 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या प्रयोगशाळा सुरु होतील.

· मार्चमध्ये दिवसाला 600 ते 700 चाचण्यांची असणारी क्षमता 13 हजारांहून अधिक झाली आहे.

· राज्यात सर्वेक्षण पथकांची संख्या दिवसांगणिक वाढत असून सध्या 16 हजार सर्वेक्षण पथक कार्यरत असून 66 लाख लोकांचे सर्वेक्षण आतापर्यंत झाले आहे.

· कॉन्टॅट ट्रेसींगवर भर दिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये यश मिळाले आहे.

· राज्याचा मृत्यूदर एप्रिलमध्ये 7.6 एवढा होता. तो आता 3.25 टक्के इतका खाली आला आहे.

· कोरोनावर उपचारासाठी 11 तज्ज्ञ डॉक्टरांचे कृतीदल नेमण्यात आले आहेत. त्यांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला. तो सर्व जिल्ह्यांना देखील पाठविण्यात आला. हे डॉक्टर्स 24 तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करु शकतात.

· राज्यभरात त्रिस्तरीय उपचारपद्धती करण्यात येत असून सुमारे 80 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास :

· राज्यात सुमारे 1 हजार 114 लोकांना (3.6 टक्के) ऑक्सीजन, व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे.

· कोविड केअर कॉर्नर 1600, कोविड हेल्थ सेंटर 432, कोविड हॉस्पिटल 277 एवढी संख्या असून त्यामध्ये 2 लाख 70 हजार आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत.

· 24 हजार 345 बेड्सना ऑक्सीजनची सुविधा आहे.

· राज्यातील 20 टक्के रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता असून तर 10 टक्के रुग्णांना आयसीयूची गरज आहे.

· राज्यात तीन हजार व्हेंटीलेटर उपलब्ध असून अतिदक्षता विभागातील 8 हजार 400 बेड्स उपलब्ध आहेत.

· राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या एक हजार रुग्णालयातून मोफत उपचार मिळतील.

· राज्यातील 95 टक्के कोरोना रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून त्यातील 70 टक्के रुग्ण मुंबई व परिसरातील आहेत.

मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस.चहल :

· मुंबईत 31 हजार 789 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यातील 8 हजार 400 रुग्णांना घरी सोडण्‍यात आले आहे. सध्या 22 हजार रुग्णांचर उपचार सुरु असून त्यातील 15 हजार 800 रुग्णांना लक्षणे नाहीत.

· मुंबई महापालिका परिसरातील मृत्यूदर हा सध्या 3.2 टक्के असून तो 3 वर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

· मुंबईत कॉन्टक्ट ट्रेसींगवर भर देण्यात येत असून त्यासाठी ‘चेस द व्हायरस’ ही नवी मोहीम हाती घेण्यात येत आहे. याअंतर्गत एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट सहवासातील 15 जणांना सक्तीने संस्थात्मक कॉरंटाईन केले जाणार आहे.

· कम्युनिटी लीडर नेमले असून त्यांना सहा प्रकारचे काम नेमून देण्यात आले आहे. त्यामध्ये कोमॉर्बीड रुग्णांची माहिती देणे. संस्थात्मक कॉरंटाईनमध्ये मिळणाऱ्या जेवणाची माहिती देणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, खासगी दवाखाने उघडले की नाही याची माहिती ते देतील. यासाठी प्रत्येक वार्डमध्ये वॉररुम उघडण्यात आली आहे.

· मुंबई महापालिका प्रत्येक बेडला विशिष्ट ओळख क्रमांक देणार असून त्या माध्यमातून उपलब्ध बेडच्या संख्येबाबतची माहिती ऑनलाईन होणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून ते कार्यान्वित होईल.

· मुंबई महापालिकेची हेल्पलाईन असलेल्या 1916 क्रमांकासाठी मार्गिका वाढविण्यात येत असून उद्यापासून त्यावर कार्यवाही सुरु होईल. यामुळे नागरिकांचा प्रतिक्षा कालावधी कमी होईल.

· रुग्णालयातील खाटांसाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येत असून दर अर्धा तासात रिकाम्या झालेल्या खाटांची माहिती तेथे अपलोड होईल.

· मुंबईत सध्या 75 हजार खाटा तयार असून त्यामध्ये सीसीसी 1 आणि डीसीएच यांची संख्या 44 हजार आहे.

· ज्या कोरोना रुग्णांना डायलेसीसची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी coviddialysis.in  हे पोर्टल तयार करण्यात आले असून डायलेसीससाठी उपलब्ध असणाऱ्या मशीनची माहिती मिळणार आहे. या सुविधेमुळे डायलेसीस अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळणार आहे.

· रुग्णवाहिकांची संख्या 456 करण्यात आली आहे. सर्व रुग्णवाहिकांच्या चालकांना पीपीइ किट्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उबेर ॲपचे यासाठी सहकार्य घेण्यात येत असून या ॲपवर रुग्णवाहिकांचे लोकेशन दिसणार आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात रुग्णवाहिकांची कार्यक्षमता अधिक वाढून रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होईल.

· मुंबईतील 33 खासगी रुग्णालयांमध्ये 3 हजार 600 बेडस्‍ नॉनकोविड रुग्णांसाठी तर 2 हजार 624 बेडस्‍ कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अतिदक्षता विभागातील 100 टक्के खाटा देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व खाटांच्या वितरणाबाबत नियंत्रण कक्षाबाबत देखरेख केली जात आहे.

· भारतीय प्रशासन सेवेतील सात अधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तिथे वॉररुम करण्यात येणार असून कोविड वॉर्ड, आयसीयू वार्ड सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती

पदाचे नाव : आशा स्वंयसेविका – ३६० जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ८ वी उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा : वय वर्ष किमान २५ ते कमाल ४५ पेक्षा जास्त नसावे.

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2ZzWClX

अर्ज करण्याची अंतिम तारीख, स्थळ आणि वेळ :

महापालिकेचे आकुर्डी रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे यमुनानगर रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे भोसरी रुग्णालय – २९, ३० मे, १, २ जून २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय (कुटुंब कल्याण विभाग) – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे सांगवी रुग्णालय – २९, ३० मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे जिजामाता रुग्णालय – २९, ३० मे सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे तालेरा रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

महापालिकेचे थेरगाव रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३

राज्यातील लघु उद्योगांना पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबईदि. २६ : केंद्र शासनप्रमाणे राज्य शासन देखील लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल. याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.

नवभारत टाइम्सच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. श्री. देसाई म्हणाले की, कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योगचक्र हळुहळु गतिमान होत आहे. सध्या राज्यात पन्नास हजार उद्योग सुरू झाले असून त्यात १३ लाख कामगार रुजू झाले आहेत. ४३ हजार कारखान्यांनी  परवाने मागितले आहेत.

दरम्यान, रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार व दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत १ जूननंतर शासन निर्णय घेऊ शकते, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

औद्योगिक कामगार ब्युरो सुरू केला जाणार आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या पोर्टलद्वारे कुशल-अवकुश मनुष्यबळाची नोंदणी केली जाणार आहे. याद्वारे जेथे जेथे कामगारांची गरज भासेल त्याठिकाणी कामगारांचा पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, मागील दोन वर्षात राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेतले. यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांची उद्योग विभागाकडे नोंद आहेत. त्यातील तरुणांना देखील रोजगाराची संधी निर्माण करून दिली जाणार आहे.

विदेशी गुंतवणुकीसाठी एमआयडीकडे ४० हजार हेक्टर जमीन सर्व सुविधांसह सज्ज आहे. विदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. देश-विदेशातील लघु उद्योगांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करावी, असे आवाहन उद्योगमंत्र्यांनी केले.

पावसाळ्यात आपत्तीच्या दृष्टीने यंत्रणांत समन्वय ठेवा; रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २६ : सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ते आज आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत होते.

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता,  सर्व विभागीय आयुक्त, रेल्वे, नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल, हवामान विभागाचे  तसेच मुंबई पालिका आयुक्त व  इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र तरी देखील पाऊस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाऊस, ढग फुटी असे काहीही होऊ शकते, त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा.

ज्याप्रमाणे विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते त्याप्रमाणे रेल्वेने देखील पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून  रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भ त्यांनी दिला.

आपण आपत्तीत बचावकार्य करणार आहोत पण सध्या कोविड परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स. मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या वर्षीप्रमाणे सांगली – कोल्हापूरला पुराची पुनरावृत्ती नको

गेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या

कोणत्याही परिस्थितीत खड्डे नकोत

मुंबईत २००५ च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधांनिशी काम करू लागलो. नालेसफाई, त्यांचे  खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्त्वाचे आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे  तेथील पाईप्स मोकळे आहेत का ते पहायला पाहिजे. शहरी असो किंवा ग्रामीण भाग पण कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणे आणि पडले तर तात्काळ बुजविणे महत्त्वाचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुर्गम भागात पावसाळ्यात अन्नधान्य, औषधी पुरवठा व्यवस्थित झालेला आहे का हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विभागवार, जिल्हावार बैठका घेऊन व त्यात सबंधित डॉक्टर्सना सहभागी करून घेऊन पावसाळ्यातील रोगांसाठी चांगले नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात कोविडसाठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या, असे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक पातळीवर माजी सैनिकांना सहभागी करून घेतल्यास भारतीय लष्कर आणि प्रशासनात चांगला समन्वय राहील असेही ते म्हणाले.

मेघदूत आणि उमंग मोबाईल एप

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक के एल होसाळीकर यांनी यावेळी सादरीकरण करून सांगितले की, राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल.  १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. ज्यामुळे गेल्या वर्षी उत्तरार्धात भरपूर पाऊस झाला तो इंडियन ओशन डायपोल देखील अनुकूल आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणरित्या महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल आणि  नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला होता असे ते म्हणाले.

मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क

मुंबईतील हवामान विभाग मुंबई पालिकेच्या समन्वयाने काम करीत आहोत. मुंबई तुंबते त्यासाठी पूर इशारा यंत्रणा विकसित केली आहे. प्रभाग पातळीवर किती पाऊस पडून पाणी पातळी किती वाढू शकते याची वेळीच माहिती मिळते . १४० पर्जन्यमापन केंद्रे सध्या असून शेतकऱ्यांसाठी मेघदूत मोबाईल एप आहे तसेच उमंग मोबाईल एपवर देखील रिअल टाईम माहिती मिळू शकेल असे ते म्हणाले.

मुंबईतील हवामान विभागाचे संपर्क क्रमांक ०२२-२२१५०४३१/ ०२२- २२१७४७१९ आणि ईमेल acwc.mumbai@gmail.com असे आहेत.

पावसाळ्यात समस्या येऊ नये म्हणून मुंबई पालिका सज्ज

मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, मान्सूनपूर्व कामे करण्यासंदर्भात मुंबईत बांधकामे सुरु असणाऱ्या संस्थांकडून विनंती करण्यात आल्या होत्या. १ हजारपेक्षा जास्त परवानग्या प्रलंबित होत्या. त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घेऊन मुंबईत बांधकामांच्या ठिकाणी मान्सून पूर्व सुरक्षिततेसाठी, तसेच डेब्रिज काढणे वगैरेची कामे सुरु झाली आहे. मुंबईतील ४०० किमीचे नाले ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले असून तुंबणारे नाले स्वच्छ करण्यात येत आहेत.

प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याने रेकी करून त्यांच्या भागात गटारे व चेंबर्स उघडी नाहीत ना याची खात्री करून घ्यायला सांगितले आहे. हिंदमाता, कलानगर, आणि इतर ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करणार असून उच्च क्षमतेचे पंप्स वापरून पाणी उपसणे शक्य केले आहे.  मुंबईत कुठेही अडचण येणार नाही असे आश्वस्त करून पालिका आयुक्त म्हणाले की, मुंबईत ३३६ पुराची ठिकाणे आहेत. मिठी नदीचे सफाईचे ७७% काम पूर्ण झाले आहे.

३२४ पाणी उपसणारे पंप कार्यान्वित आहेत. पुराचे पाणी उपसा करण्यासाठी ६००० लिटर्स प्रती सेकंद पाणी उपसणारी यंत्रणा देखील सुरु आहे असे ते म्हणाले. कुर्ला, सायन येथे पाणी साचू नये म्हणून मोठ्या शक्तिशाली क्षमतेचे पंप बसवले आहेत. रस्त्यांची ६०९ कामे १० जूनपर्यंत पूर्ण करणार असून ३२ पूल दुरुस्ती कामे सुरु आहेत.

५६१ मृत झाडे पूर्णपणे तोडायची असून १,१७,००० झाडांच्या फांद्या छाटण्यात येत आहेत असे सांगून ते म्हणाले की, २०१९ मध्ये पावसाळ्यातील विविध रोगांमुळे मुंबईत २० मृत्यू झाले होते. यात लेप्टो, डेंग्यू,स्वाईन फ्ल्यू  या रोगांचा समावेश होता. यंदा मे महिन्यापर्यंत गॅस्ट्रोमुळे १८०२, मलेरिया ५१९, हेपेटायसीस १८८, स्वाईन फ्ल्यू चे ४२ असे रुग्ण आढळले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्सूनपूर्व कामांची माहिती दिली.

गेल्या वर्षी कल्याण, सांगली, कोल्हापूर येथे नौदलाने अविरत काम करून अनेकांचा जीव वाचवला आमचे  दल मुंबई, पुणे, नागपूर याठिकाणी हेलीकॉप्टरने सज्ज आहे असे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले.

तटरक्षक  दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी ९ जहाजे तयार असून ८ एअरक्राफ्ट देखील आहेत. याशिवाय, मेरीटाईम नियंत्रण कक्षाच्या मदतीने संकटाशी मुकाबला करण्यात येईल.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफच्या  अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडे १८ टीम्स असून  (एका टीम मध्ये ४७ जवान असतात) मुंबई, नागपूर व पुण्यात त्या तैनात आहेत. बोटींची मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे रबरी बोटींचा आगाऊ साठा ठेवावा असेही ते म्हणाले. भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३९ कंपन्या या आम्ही तयार ठेवल्या आहेत. सेन्ट्रल कमांडिंग सेंटरमधून आपत्तीच्या वेळी सुचना मिळाव्यात म्हणजे प्रत्यक्ष नियोजन करता येणे शक्य होईल अशी सुचना त्यांनी केली. माजी सैनिक यांचा लष्कर आणि प्रशासनात चांगले समन्वयक म्हणून काम करतील अशी सूचनाही त्यांनी केली.

अभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं योगदान

0

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी स्वाती डॉक्टर असल्याचे फारच कमी लोकांना माहित आहे. इतकंच नाही तर कोरोना व्हायरसच्या संकटात त्यांनी मोलाचे योगदानही दिले आहे.

जोगवा, सूरसपाटा, यलो यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता उपेंद्र लिमये याची पत्नी डॉ. स्वाती लिमये होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध कोरोना होण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवत असल्याचे जाहीर करत या औषधाचे सेवन करण्याचा नागरिकांना सल्ला दिलात्याला अनुसरून गोरेगाव येथे राहत असलेल्या होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर स्वाती उपेंद्र लिमये यांनी स्वतः अर्सेनिक अल्बम 30 हे औषध बनविले आहे आणि गोरेगाव व मालाड परिसरातील सुमारे 640 कुटुंबांना औषधाचे मोफत वाटप केले आहे. तसेच त्यांनी मालाड पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 252 पोलीस कुटुंबासाठी औषध दिले.येत्या काळात कोरोनाचे संकट लक्षात घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर हे औषध तयार करून मोफत वाटप करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या मोलाच्या कार्यात त्यांचा पती म्हणजेच अभिनेता उपेंद्र लिमये, मुलगी भैरवी लिमये तसेच संदीप भोसले, अर्जुन दळवी, आमोद दोशी सहकार्य करत आहे.