Home Blog Page 2175

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची बैठक संपन्न

0

            पुणे, दि.२३ : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील निरनिराळ्या पीकांचे सन २०२२-२३ साठीचे पीककर्ज दर निश्चित करण्यात आले.

            नाबार्डच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत  नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक रोहन मोरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सहकार विभागाचे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे, कृषी विभागाचे उपसंचालक विजय कानडे, अग्रणी बँकेच्या बँक प्रतिनिधी किरण अहिरराव, कृषी विस्तार संचालक शांताराम साकोरे उपस्थित होते.

            जिल्ह्यातील शेतकरी व इतर जिल्हा तांत्रीक समिती सदस्य यांचेशी पीककर्ज दर चर्चा करण्यात आली. पीकाचे उत्पन्न, त्यासाठी  येणारा खर्च व राहणारा नफा यांची सांगड घालून पीककर्ज दर ठरविण्यात आल्याचे डॉ.देशमुख यांनी यावेळी सांगितले. दर १५ दिवसांनी कर्ज वाटपाचा आढावा घेणार असल्याचेही ते म्हणाले.

कोविड लशीच्या दुसऱ्या मात्रेचे प्रमाण वाढवा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

0

            पुणे दि.२३- कोविड लशीची दुसरी मात्रा देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावे आणि पोर्टलवर लसीकरणानंतर तातडीने नोंद घेण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा स्तरीय कृतीदल समिती आणि आरोग्य विषयक विविध समित्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार उपस्थित होते.

            डॉ.देशमुख म्हणाले, गेल्या काही दिवसात राज्यातील कोविड बधितांच्या प्रमाणात किंचित वाढ झाली आहे. ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि कटक मंडळ भागात कोविड चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. ओमीक्रॉंनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याने लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जाईल याची दक्षता घ्यावी , असे त्यांनी सांगितले.

            जानेवारी महिन्यात होणाऱ्या पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, मोहिमेअंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या वस्त्यांमधील बालकांना पोलिओची मात्रा देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे.  जिल्ह्यातील उद्योग आणि साखर कारखान्यातील मजुरांना पोलिओ कार्यक्रमाविषयी माहिती  देण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. घंटागाडी आणि इतर माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात यावा.

            यावेळी आरोग्यविषयक इतरही कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. पुरंदर, दौंड आणि मुळशी तालुक्यांनी आरोग्य विषयक निर्देशकाबाबत  आवश्यक कार्यवाही करावी. डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव असणाऱ्या शहरी भागात सर्वेक्षण आणि जनजागृतीवर भर द्यावा. प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत जुन्नर आणि बारामती तालुक्यात गरोदर मातांच्या लसीकरणाकडे विशेष लक्ष द्यावे आणि बालकांच्या लसीकरणाच्या नोंदी वेळेवर कराव्यात अशा  सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

            यावेळी जिल्हा आरोग्य अभियान नियामक समिती, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समिती, जिल्हा हिवताप सोसायटी, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण समिती, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, जन्म मृत्यू नोंदणी, तसेच जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

            बैठकीला जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची डीआरडीओ नं केलेली पहिली चाचणी यशस्वी

0

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2021

डीआरडीओ- म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं आज म्हणजेच 22 डिसेंबर  2021 या स्वदेशी बनावटीच्या, जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची पहिलीच यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ ए.पी. जे. अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. प्रलय ने आपले लक्ष्य अचूकरित्या भेदले.

या नव्या क्षेपणास्त्राने इच्छित असे निम-बैलेस्टीक मार्गक्रमण पूर्ण करत, अत्यंत अचूकतेने लक्ष्यभेद केला. क्षेपणास्त्राची नियंत्रण, मार्गदर्शन आणि मिशन अल्गॉरिदम प्रणाली यावेळी सुविहितपणे कार्यरत होती. त्याशिवाय, उपप्रणालीचे कामही समाधानकारक होते. पूर्व किनाऱ्यावर स्थापन केलेल्या सर्व सेन्सर्सनी या क्षेपणास्त्राचा माग घेत, प्रत्येक टप्प्यावरच्या घटनांची नोंद केली आहे.

या क्षेपणास्त्रात भक्कम असे प्रोपेलंट रॉकेट मोटरसह इतर अनेक आधुनिक तंत्रज्ञान आहे. या क्षेपणास्त्राची 150 ते 500 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असून मोबाईल लॉंचरद्वारे ते सोडता येईल. क्षेपणास्त्राला मार्गदर्शन करणाऱ्या प्रणालीत, अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली तसेच विमान तंत्रज्ञानही समाविष्ट आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, या यशस्वी चाचणीसाठी  डीआरडीओ आणि त्यांच्याशी संबंधित सर्व चमूचे अभिनंदन केले आहे. अत्यंत जलदगतीने हे क्षेपणास्त्र विकसित करणे आणि या अत्याधुनिक जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम अशा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कौतुकास्पद कामगिरी असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

डीआरडीओचे अध्यक्ष आणि संरक्षण विभागाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव, डॉ जी सतीश यांनीही आपल्या चमूचे कौतूक केले आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम अशा  या नव्या पिढीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त क्षेपणास्त्रामुळे सैन्यदलांना आवश्यक ते बळ मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

2022 च्या हंगामाकरिता खोबऱ्यासाठीच्या किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

0

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2021


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीने 2022 च्या हंगामाकरिता खोबऱ्यासाठीच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) मंजुरी दिली.

तेल काढण्याच्या घाणीसाठी उपयुक्त योग्य सरासरी गुणवत्ता (एफएक्यू) असलेल्या खोबऱ्याच्या एमएसपी मध्ये  2021 च्या प्रती क्विंटल 10,335 रुपयांवरून वाढ करून 2022 च्या हंगामासाठी 10,590 रुपये प्रती क्विंटल करण्यात आली आहे. गोटा खोबऱ्यासाठीच्या एमएसपी मध्ये 2021 च्या प्रती क्विंटल 10,600 रुपयांवरून वाढ करून 2022 च्या हंगामासाठी 11,000 रुपये प्रती क्विंटल करण्यात आली. हे अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चापेक्षा खोबरे घाणीसाठी 51.85 टक्के आणि गोटा खोबऱ्यासाठी 57.73 टक्के लाभ सुनिश्चित करते. 2022 हंगामासाठी खोबऱ्याच्या एमएसपीमधली वाढ ही अखिल भारतीय सरासरी खर्चाच्या किमान दीड पट स्तरावर निश्चित  करण्याच्या तत्वाला अनुसरून आहे. 2018-19 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा सरकारने केली होती.

कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या शिफारसीवर हा निर्णय आधारित आहे.

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने लाभ रूपाने किमान 50 टक्के नफा सुनिश्चित करणे हे  महत्त्वपूर्ण आणि प्रगतिशील पाऊल आहे.

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ हे नारळ उत्पादक राज्यांतील एमएसपी आधारभूत कार्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम जारी ठेवतील. 

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 13 विधेयके मांडली आणि 11 विधेयके मंजूर केली

0

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2021

केंद्रीय संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्री, प्रल्हाद जोशी, संसदीय कार्य राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि संसदीय कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री श्री व्ही. मुरलीधरन यांनी आज नवी दिल्ली  येथे माध्यमांना संबोधित केले.संसदेचे हिवाळी अधिवेशन, 2021  सोमवार, 29 नोव्हेंबर, 2021 रोजी सुरू झाले आणि गुरुवार, 23 डिसेंबर, 2021 रोजी संस्थगित  होणार होते, ते बुधवार, 22 डिसेंबर 2021 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. अत्यावश्यक सरकारी कामकाज पूर्ण झाल्याने अधिवेशन नियोजित 1 दिवसाआधीच तहकूब करण्यात आले.   या अधिवेशनात 24 दिवसांच्या कालावधीत 18 बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान, 13 विधेयके (लोकसभेत 12 विधेयके आणि राज्यसभेत 1 विधेयक) मांडण्यात आली.  संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 11 विधेयके मंजूर केली.

2021- 22 या वर्षासाठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांशी संबंधित विनियोजन  विधेयक लोकसभेने मंजूर करुन, राज्यसभेत पाठवले होते. कलम 109(5) नुसार 14 दिवसांची मुदत संपल्यानंतर दोन्ही सभागृहांनी ते मंजूर केले आहे असे मानले जाईल. 

संसदेच्या सभागृहांनी मांडलेल्या आणि पारित केलेल्या विधेयकांची संपूर्ण यादी परिशिष्टात जोडली आहे.

अध्यादेशाची जागा घेणारी तीन विधेयके:

केंद्रीय दक्षता आयोग (सुधारणा) अध्यादेश, 2021 (2021 चा 9), दिल्ली विशेष पोलिस आस्थापना (सुधारणा) अध्यादेश, 2021 (2021 चा 10) आणि अंमली औषधिद्रव्ये व मनोवर्ती पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, (2021 चा 8), राष्ट्रपतींनी 2021 हिवाळी अधिवेशनापूर्वी जारी केलेला अध्यादेश 2021 विचारात घेण्यात आला आणि सभागृहांनी मंजूर केला.

जैव विविधता (सुधारणा) विधेयक, 2021 हे एक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले आणि पाच विधेयके स्थायी समितीकडे पाठवली जात आहेत.

संसदेच्या सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांच्या जागी तीन अध्यादेशांसह काही महत्त्वाची विधेयके खालीलप्रमाणे आहेत:

  1. कृषी कायदे निरसन विधेयक, 2021
  2. धरण सुरक्षा विधेयक,2021
  3. सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (नियमन) विधेयक, 2021.
  4. सरोगसी (नियमन) विधेयक, 2021.
  5. राष्ट्रीय औषधशास्त्र शिक्षण आणि संशोधन संस्था (सुधारणा) विधेयक
  6. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (वेतन आणि सेवा शर्ती) सुधारणा विधेयक, 2021.
  7. अंमली औषधिद्रव्ये व मनोवर्ती पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, 2021 .
  8. दिल्ली विशेष पोलिस आस्थापना (सुधारणा) अध्यादेश, 2021
  9. केंद्रीय दक्षता आयोग (सुधारणा) अध्यादेश
  10. निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक 2021

लोकसभेत नियम 193 अंतर्गत दोन अल्पकालीन चर्चा झाल्या:

  1. कोविड-19 महामारी आणि त्याच्याशी संबंधित विविध पैलू, आणि
  2. हवामान बदल.

राज्यसभेत देशातील कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा झाली.

लोकसभेत अंदाजे 82% आणि राज्यसभेत अंदाजे 48% कामकाज झाले.

वाहनांची अखिल भारतीय नोंदणी: ‘भारत- BH- ही नवी सिरिज

0

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2021


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, 26 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या शासन आदेशान्वये (594 (E)) नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी ‘भारत- BH-सिरिज ही नवी नोंदणी क्रमांक मालिका जाहीर केली आहे. या वाहनांनी या मालिकेअंतर्गत वाहनांची नोंदणी केली असेल.  त्या वाहनांच्या मालकांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केल्यावरही, त्यांना नव्याने नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. ही वाहन नोंदणी सुविधा, “भारत- BH-series अंतर्गत, ऐच्छिक स्वरुपात उपलब्ध असून, संरक्षण विभागातील कर्मचारी, केंद्र सरकार/राज्य सरकार/केंद्रीय/राज्य सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या, ज्यांची कार्यालये चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहेत, अशा सर्वांना या सिरिजचा लाभ घेता येईल.यामुळे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केलेल्या वैयक्तिक वाहनांची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहू शकेल.

वाहनांवरील कर, दोन वर्षांसाठो किंवा दोन वर्षांच्या पटीत ( दोन, चार, सहा वर्षे) इतक्या कालावधीसाठी आकारला जाईल. चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर मोटार वाहन कर दरवर्षी आकाराला जाईल आणि तो आधीच्या करांपेक्षा अर्धा असेल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तरादाखल ही माहिती दिली.

राजस्थानात पिकवलेला टोमॅटो बाजारात उपलब्ध झाल्यामुळे घाऊक बाजारातील टोमॅटोच्या दरात आणखी घसरण होईल असा अंदाज

0

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2021

21 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त आकडेवारी लक्षात घेतली तर अखिल भारतीय पातळीवरील टोमॅटोच्या दरात, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात 12.89% घसरण झालेली दिसून येत आहे. संपूर्ण महिन्याभरातील दर लक्षात घेतले तर गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात टोमॅटो 23.69% नी स्वस्त झालेले दिसतात. एका आठवड्यापूर्वीच्या तसेच एका महिन्यापूर्वीच्या टोमॅटोच्या दरांशी तुलना केली तर असे लक्षात येते की, देशातील सर्व मुख्य शहरांमध्ये 21 डिसेंबर 2021 रोजी टोमॅटोचे दर कमी झाले होते.

CentresRetail Price of Tomato (Rs/kg)
Price As On1 Day1 Week1 Month% Variation
AgoAgoAgoOverOverOver
21.12.2120.12.2114.12.2121.11.211 Day1 Week1 Month
Delhi43454863-4.44-10.42-31.75
Mumbai414145540.00-8.89-24.07
Pune343445420.00-24.44-19.05
Jaipur424250550.00-16.00-23.64
Bengaluru575766880.00-13.64-35.23
Chennai4242631000.00-33.33-58.00
Hyderabad353550530.00-30.00-33.96
All-India47.5247.9354.5562.27-0.86-12.89-23.69

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील मुख्य बाजारांमध्ये  टोमॅटोची आवक वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांत या राज्यांमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण झालेली दिसते. राजस्थानात पिकवलेला टोमॅटो बाजारात उपलब्ध झाला आहे आणि इतर राज्यांतील टोमॅटो देखील डिसेंबर महिन्याअखेरीस बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात आणखी घसरण होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आता पाऊस कमी झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये टोमॅटोच्या पुरवठ्यात निर्माण झालेला अडथळा दूर झाला आहे, आणि बहुतांश किरकोळ बाजारांमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण झालेली दिसून येत आहे.

राष्ट्रीय छात्र सेना मुंबईच्या कॅडेट्सनी जुहू येथे राबवली सागर किनारा स्वच्छता मोहीम

0

मुंबई, 22 डिसेंबर 2021

पुनीत सागर अभियानाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मुंबई बी ग्रुप, NCC महाराष्ट्र संचालनालयाच्या वतीने, मुंबईत सागर किनारा स्वच्छता मोहीम राबवत आहे. NCC कॅडेट्सनी आज 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी मुंबईतील प्रमुख पर्यटन समुद्रकिनारा, जुहू चौपाटी येथे किनारा स्वच्छ केला.

समुद्र किनारे/चौपाटी प्लास्टिक आणि इतर टाकाऊ पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी आणि या भागांना स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी NCC द्वारे राबवण्यात आलेल्या देशव्यापी मोहिमेचा हा एक भाग आहे. स्थानिक लोकांमध्ये आणि भावी पिढ्यांमध्ये स्वच्छ समुद्रकिनारे/चौपाटी यांचे महत्त्व सांगणाऱ्या संदेशाचा प्रसार करणे हे महिनाभर चालणाऱ्या पुनीत सागर मोहिमेचे उद्दिष्ट आहे.प्रख्यात अभिनेते तेज सप्रू आणि प्रख्यात क्रीडा पत्रकार मिलिंद वागळे यांनी आज जुहू चौपाटीवरील मोहिमेत 1 आर्मड स्क्वाड्रन NCC आणि 1 नेव्हल NCC च्या 80 हून अधिक कॅडेट मुली आणि मुलांसह भाग घेतला. कॅडेट्सनी पुस्तिकांचे वाटप केले आणि समुद्रकिनाऱ्यावर पथनाट्य केले. तेज सप्रू यांनी कॅडेट्सशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरित केले आणि जबाबदार नागरिक म्हणून त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना सांगितले.कॅडेट्सनी गोळा केलेला कचरा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) सुपूर्द करण्यात आला असून, ते प्लास्टिक कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत करणार आहेत. NHAI सोबत केलेल्या सामंजस्य कराराचा हा एक भाग आहे.ग्रुप कॅप्टन नीलेश देखणे, मुंबई बी ग्रुपचे ग्रुप कमांडर कर्नल एस के दहिया, कर्नल मित्रा यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याबरोबरच त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि मोहिमेबद्दल जनजागृती केली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र

0

मुंबई, दि. 22- कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस बंद असलेले पर्यटन आता सुरू झाले असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाले आहे. या दर्जेदार सेवांची आणि सवलतींची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे मंत्रालय, मुख्य इमारत येथील प्रांगणात दिनांक 22 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत माहिती व आरक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.

या आरक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळी असलेल्या 29 पर्यटक निवासे, 30 उपहारगृहे यांच्या आरक्षणासंबंधी माहिती देण्यात येत आहे. सोबतच महामंडळाच्या जल पर्यटन विभागामार्फत कार्यान्वित केलेल्या नाशिक बोटक्लब, गणपतीपुळे बोटक्लब व तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ऍक्वाटिक स्पोर्ट्स (IISDA) या संस्थेबाबत माहिती देण्यात येत आहे.

एमटीडीसीमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना तसेच विविध कक्ष आरक्षणावर सवलत दिली जाते. यामध्ये असलेल्या जेष्ठ नागरीक सवलत, शैक्षणिक सहल सवलत, माजी सैनिक सवलत, दिव्यांग पर्यटक सवलत, अनिवासी भारतीय (NRI) सवलत, शासकीय व निमशासकीय कर्मचारी सवलत याबाबतही माहिती देण्यात येत आहे.

सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच मंत्रालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मंत्रालय प्रांगणात उभारण्यात आलेल्या आरक्षण केंद्राला अवश्य भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी केले आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ला सर्वसाधारण विजेतेपद ‘ पुणे येथील व्हिआयटी’ला उपविजेतेपद; पद्मभूषण चंदु बोर्डे व हिंद केसरी रोहित पटेल यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

0

पुणे, २२ डिसेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे १५व्या राष्ट्रीय पातळीवरील आंतर-अभियांत्रिकी ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२१’चे सर्वसाधारण विजेतेपद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेला (११६ गुण) मिळाले, तर उपविजेतेपद व्हिआयटी, पुणे (४४ गुण) यांना मिळाले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संघाला करंडक व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्यात आले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे दि. १८ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या राष्ट्रीय पातळीवरील आंतर अभियांत्रिकी ‘एमआयटी डब्ल्यूपीयू समिट-२०२१’ च्या पारितोषिक वितरण समारंभ कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात संपन्न झाला.
स्पर्धेच्या समारोप व पारितोषिक वितरणप्रसंगी भारताचे माजी क्रिकेटपटू पद्मभूषण चंद्रकांत बोर्डे आणि हिंद केसरी रोहित पटेल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव प्रा.डॉ. प्रशांत दवे, स्पर्धेचे समन्वयक  प्रा.डॉ. पी. जी. धनवे आणि विलास कथुरे उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
‘समिट-२०२१’मध्ये देशभरातील ९७ संघांच्या माध्यमातून १५०० विद्यार्थ्यांनी एकूण १६ क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला होता. विजेत्यांना करंडक, पदके, प्रशस्तीपत्र व रोख १५ लाख रुपये रकमेची पारितोषिके देण्यात आली. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉलिबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, लॉन टेनिस, चेस, कॅरम, स्क्वॅश, वॉटरपोलो, स्विमिंग, रोईंग, ई स्पोर्टस  व कबड्डी या १६ क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक क्रीडाप्रकारातील  विजेत्या संघाला  करंडक, सुवर्ण पदक व रुपये ३० हजार ते ८ हजार रोख. याखेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक  व रोख रक्कम  रुपये १८ हजार ते ५ हजार देण्यात आले.
चंदु बोेर्डे म्हणाले,“ खेळ जीवनाचा अविभाज्य अंग आहे. आजच्या काळात खेळामध्ये विद्यार्थीना मोठ्या प्रमाणात करियर करता येते. त्यातूनच किर्ती बरोबरच सर्वंच गोष्टी साध्य होतांना दिसतात. तसेच उत्तम प्रकारची नोकरी ही मिळते. वर्तमान काळात सर्वच खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आलेला आहे. पण कोरोनाच्या काळात बरेच काही हिरावून घेतले गेले आहे. खेळामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो व त्यातूनच स्वःताला फिट ठेवता येते.”  
रोहित पटेल म्हणाले,“ जीवनासाठी खेळ महत्वपूर्ण असून जो पर्यंत स्वतःचे गुरू बनणार नाही तो पर्यंत योग्य गुरूची निवड करता येणार नाही. गुरूसाठी १०० टक्के समर्पण भावनेने कार्य करावे. स्वच्छ मनाने खेळल्यास यश निश्चितच मिळते. तसेच, खेळतांना कधीही अहंकाराचा स्पर्श लागू देऊ नका. ईश्वर कृपेने आपण बनतो.”
 प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ शिस्त आणि चरित्र्या या दोन गोष्टींना जीवनात अनन्यसाधारण महत्व असल्याने याचा सांभाळ विद्यार्थ्यांनी करावा. देशासाठी हे अत्यंत महत्वाच्या असून यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व बनते. कौशल्य, खिलाडीवृत्ती, समर्पण या गुणांबरोबरच खेळामध्ये शिस्तीला अनन्यसाधारण महत्व आहे.”
प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी सर्वांचे स्वागत केले.
श्री पात्रा, ईश्वरी पाटील आणि रोहित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल दिवाण यांनी आभार मानले.

१५ व्या राष्ट्रीय पातळीवरील ‘आंतर अभियांत्रिकी एमआयटी डब्ल्यूपीयू समिट २०२१’ चा सविस्तर निकाल

टेबल टेनिस (महिला)
विजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उपविजेता – एआयएसएसएमएस सीओई, पुणे
उत्कृष्ठ खेळाडू – श्रृती देशमुख , एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

टेबल टेनिस (पुरुष)
विजेता – व्हीआयटी, पुणे
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उत्कृष्ठ खेळाडू – ओंकार रसल, व्हीआयटी पुणे व्हीआयटी

बॅडमिंटन (पुरुष)
विजेता – व्हीआयटी, पुणे
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उत्कृष्ठ खेळाडू – अनिकेत बंडगर, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

बॅडमिंटन (महिला)
विजेता – एमकेएसएस कमिन्स सीओई, पुणेे
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उत्कृष्ठ खेळाडू – ईशा देशमुख, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

बेस बॉल
विजेता –  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उपविजेता – संजीवनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कोपरगाव
टुर्नामेंट मधील सर्वोत्कृष्ठ खेळाडूः इशान देशामुख, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
बेस्ट पिंचरः शुभम पोपसे, संजीवनी कॉलेज, कोपरगाव
बेस्ट कॅचरः दिपक पडाळे, संजीवनी कॉलेज, कोपरगाव
बेस्ट बॅटरः राहुल जाधव, एमआयटी डब्ल्यूपीयू,पुणे

व्हॉलिबॉल (पुरुष)
विजेता – व्हीआयटी, पुणे
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – आफन बारगाजी, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उत्कृष्ट आक्रमक खेळाडू – आदित्य बिलारे, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
बेस्ट लिफ्टर – मल्हार सुरंगलीकर, व्हीआयटी, पुणे

व्हॉलिबॉल (महिला)
विजेता – एमकेएसएस कमिन्स सीओई, पुणे
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – ईशा गावकर, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उत्कृष्ट आक्रमक खेळाडू – अवनी सवरडोल, एमकेएसएस कमिन्स सीओई, पुणे
बेस्ट लिफ्टर – ईश्वरी गुडाते, एमकेएसएस कमिन्स सीओई, पुणे

बास्केटबॉल (पुरुष)
विजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उपविजेता – व्हीआयटी, पुणे
सर्वोत्कृष्ठ स्कोररः हर्ष तोमर, व्हीआयटी, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – जयश खटाडे, एमआयटी डब्ल्यूपीयू

बास्केटबॉल (महिला)
विजेता – एमकेएसएस कमिन्स सीओई, पुणे
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
सर्वोत्कृष्ठ स्कोररः रिया सावंत, कमिन्स सीओई, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – अरबिन कौर, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

फूटबॉल (पुरुष)
विजेता – एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेता – आयएसएल, हैदराबाद
उत्कृष्ट खेळाडू – धिरेन भतीजा, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

फूटबॉल (महिला)
विजेता – एमकेएसएस कमिन्स सीओई, पुणे
उपविजेता – एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – कल्याणी डेसाळे, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

क्रिकेट
विजेता – एआयएसएसएमएस आयओ आयटी
उपविजेता – व्हीआयटी, पुणे
मॅन ऑफ द मॅच – अर्बज नादफ, एआयएसएसएमएस आयओ आयटी
उत्कृष्ट गोलंदाज –  पार्थ फुलसुंदर, व्हीआयटी, पुणे
उत्कृष्ट फलंदाज – तन्मय गायकवाड, व्हीआयटी, पुणे
 सामनावीर – अर्बज नादफ, एआयएसएसएमएस आयओ आयटी

स्क्वेश
विजेता – बिट्स गोवा
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – अरमन चौफिल, बिट्स, गोवा

कॅरम
विजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उपविजेता – आएएआयटी, नवी मुंबई
उत्कृष्ट खेळाडू – कुणाल पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

बुध्दिबळ
विजेता – व्हीआयटी, पुणे
उपविजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
उत्कृष्ट खेळाडू – नमीत चव्हाण व्हीआयटी , पुणे

कबड्डी
विजेता – डॉ. जे.जे.मगदूम, नांदेड
उपविजेता – सीओईपी,
बेस्ट रायडर – साजीद मुलानी, डॉ. जे.जे.मगदूम, नांदेड
टॉप डिफेन्डरः शुभम जाधव, डॉ. जे.जे.मगदूम, नांदेडे

स्वीमिंग ५० मीटर फ्री स्टाईल (पुरुष)
विजेता – निचिकेत  बुजरूक, मॅनेट,पुणे
उपविजेता – सुकांत हार्डीकर, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

स्वीमिंग ५० मीटर फ्री स्टाईल ( महिला)
विजेता – सिमरण वैशिया, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेता – निलांबरी काळे, एमआयटी एसओई, पुणे

स्वीमिंग १०० मीटर फ्री स्टाईल (पुरुष)
विजेता – विधित अग्रवाल,  थडोमल सहानी, इंजिनियरींग कॉलेज
उपविजेता – रोहन चौधरी, पीव्हीपीआयटी

स्वीमिंग ५० मीटर बॅक स्ट्रोक (पुरुष)
विजेता – निचिकेत  बुजरूक, मॅनेट,पुणे
उपविजेता – वरद भुजाडे, व्हीआयटी, पुणे

स्वीमिंग ५० मीटर बॅक स्ट्रोक (महिला)
विजेता – सिमरन वैशाय, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेता – निलांबरी काळे, एमआयटी एसओई.

स्वीमिंग १०० मीटर बॅक स्ट्रोक (पुरुष)
विजेता – रोहन चौधरी, पीव्हीपीआयटी, पुणे
उपविजेता – सोहम शेठ, पीव्हीजी, सीओई

५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (पुरुष)
विजेता – सुकांत हार्डीकर, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेता – श्रीकुमार कमलापूरकर, एआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (महिला)
विजेता – सिमरन वैशाय, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेता – गायत्रिणी नोगी, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

१०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (पुरुष)
विजेता – अमोग शिलगवार, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे  
उपविजेता – रोहन चौधरी, पीव्हीपीआयटी

५० मीटर बटर फ्लाय (पुरुष)
विजेता – निचिकेत बुजरूक, मॅनेज, पुणे
उपविजेता – वरद भुजाडे, व्हीआयटी, पुणे

लॉन टेनिस ः पुरूष
विजेताः थड्डोमल सहानी, मुंबई
उपविजेताः एमआयटी डब्ल्यूपीयू, ए, पुणे
उत्कृष्ट खेळाडूः वेदांत अग्रवाल, थड्डोमल सहानी, मुंबई

वॉटर पोलोः पुरूष
विजेताः एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेताः एमआयटी एसओई, लोणी काळभोर
उत्कृष्ट खेळाडूः मृत्युंजय पाटील

ई स्पोर्ट व्हालरन्ट टीम ः
विजेताः एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
उपविजेताः एआयटी,
उत्कृष्ट खेळाडूः प्रणित जाधव, एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे े

देवेंद्र सरकारचा आदेश धुडकावून रद्द केलेला रस्ता जन्माला घालण्यासाठी ९० कोटीची निविदा -पुणे महापालिकेचा अजब कारभार

0

सर्वांनी पाहिला ….. डोंगरच्या डोंगर हलवून बाजूला नेला …होऊ द्यात इथे इडीची चौकशी

पुणे -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७ मध्ये त्यांनी २ वेळा महापालिकेने बिल्डरच्या हितासाठी टाकलेला डोंगर माथा डोंगर उतारावरील रस्ता रद्द करूनही आता मात्र पुणे महापालिकेत फडणवीसांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवीत या अस्तित्वात नसलेल्या रस्त्याच्या जन्मासाठी तब्बल ९० कोटी ची पीपीपी तत्वावरील निविदा काढल्याचे वृत्त आहे.याप्रकरणी निष्पक्षपातीपणे एक तर निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी करून घ्यावी अन्यथा हे प्रकरण इडीला सोपवावे अशी मागणी होते आहे . विशेष म्हणजे या प्रकरणात बिल्डरने नैसर्गिक डोंगरच जागेवरून काढून थोड्या अंतरावर हलविल्याचा गंभीर प्रकार घडूनही प्रशासनाने याकडे केलेल्या दुर्लक्षाकडे पाहता अनेक उच्च पदस्थ अधिकारी आणि पुढारी ही अशा चौकशीच्या फेऱ्यात सापडू शकतील असा दावा करण्यात येतो आहे.

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात मागील राज्य सरकारने दोन वेळा रद्द केलेल्या रस्त्यास केवळ शहर सुधारणा समितीची मान्यता घेऊन 90 कोटी रुपयांची निविदा काढण्याचा अजब प्रकार पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षांनी केला आहे. या बेकायदेशीर निर्णयाविरुद्ध काहूर माजत असले तरी येथील आसपासच्या रहिवाश्यांमध्ये मात्र बिल्डर आणि त्याच्या हित संबधितांची दहशत असल्याचे दिसून येते आहे.

महापालिका आयुक्तांनी ठेवलेले हे विषय पत्र आम्ही येथे देत आहोत जे वाचले कि संपूर्ण प्रकार लक्षात आल्याशिवाय राहत नाही .येथे हा नियोजित केलेला रस्ता 1987 व 2017 च्या विकास आराखड्यात होता. हा रस्ता डोंगरमाथा व डोंगर उतार क्षेत्रात येतो. मागील राज्य सरकारच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी विकास आराखड्यातील हा रस्ता रद्द केल्यावर विकसकाने राज्य सरकारकडे फेरविचारासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यास यश न येऊन मागील सरकारच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी हा नियोजित रस्ता रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला. मात्र, दोन वेळा मागील भाजपच्या राज्य सरकारने हा रस्ता रद्द केलेला असतानाही आता एमआरटीपी अ‍ॅक्ट 205 कलमांतर्गत हा रस्ता करण्याचा घाट घालून विकसकाचे हित सांभाळण्याचे कामकरण्यात आले आहे. म्हणजे मागील मुख्यमंत्र्यांंनी हा रस्ता रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जाण्यापर्यंत मजल महापालिकेत भाजपची सत्ता असूनही गेली आहे हे दिसून येते आहे.
यास केवळ शहर सुधारणा समितीची मान्यता घेऊन लगोलग 90 कोटी रुपयांची निविदाही काढली गेली आहे.

निविदा रद्द करा

दरम्यान महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारचे काम करणे हे पक्षाला बाधक ठरणारे असून हि निविदा तातडीने रद्द केली पाहिजे असे मत भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

…तर राष्ट्रपती राजवट स्वीकारून सगळाच कारभार केंद्राकडे द्या-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना आव्हान

0

पुणे-ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवरून काँग्रेसचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी समाचार घेतला. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असे आव्हान त्यांनी कॉंग्रेसचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना दिले.
आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षण गमावण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ढिलाई आणि बेपर्वाई कारणीभूत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करणे व त्यासाठी मुळात एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले असताना त्यासाठी महाविकास आघाडीने अजूनही काही प्रभावी पावले टाकलेली नाहीत. मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा केला असता तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. पण आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायची असे आघाडी सरकारचे धोरण आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोना महासाथ, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण अशा प्रत्येक महत्त्वाच्या विषयात आघाडी सरकार स्वतः काही जबाबदारी पार पाडायचे टाळून केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे. राज्यातील प्रश्न सोडविण्याची मुख्य जबाबदारी आघाडी सरकारची असताना त्यासाठी कोणताही पुढाकार घेताना आघाडी सरकार दिसत नाही. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून मोदी सरकारने जनतेला दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकार मात्र शक्य असून असा दिलासा देत नाही. केवळ केंद्र सरकारनेच कर कमी करून आणखी दिलासा द्यावा अशी अपेक्षा आघाडीचे नेते व्यक्त करतात. अशा रितीने राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायची आघाडी सरकारची अपेक्षा असेल तर या सरकारला राज्यात सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आघाडी सरकारने सत्ता सोडून राष्ट्रपती राजवट स्वीकारावी आणि मगच केंद्र सरकारकडून प्रत्येक कामाची अपेक्षा करावी.

तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण व नोंदणीबाबत तृतीयपंथीय संस्थांशी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांची चर्चा

0

पुणे दि.22: तृतीयपंथीयांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योग क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण, तृतीयपंथीयांसाठी पुण्यात आधारश्रम सुरु करणे तसेच तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण व नोंदणीबाबत तृतीयपंथीय संस्थांशी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी चर्चा केली.

सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या बैठकीला समाज कल्याण निरीक्षक नेत्राली येवले, तसेच पुणे जिल्ह्यातील बिंदु क्वीर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे तृतीय फाऊंडेशन व मंगलमुखी फाऊंडेशनचे प्रतिनिधी मयुरी बनसोड, भूमी फाऊंडेशनचे श्री. कैलास पवार, महालक्ष्मी सामाजिक संस्थेचे लखन ओव्हाळ, संजय टाकळकर तसेच समुपदेशक कृपाली बिडये उपस्थित होते.

श्रीमती संगिता डावखर म्हणाल्या, शासनाच्या निर्देशानुसार पुणे येथे तृतीयपंथीयांसाठी आधारश्रम सुरु करणे व तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी तसेच प्रशिक्षणाच्या अनुषंगाने तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. पुणे जिल्हयातील तृतीयपंथीय संस्थांशी जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी त्वरीत संपर्क साधून माहितीची नोंदणी करणेबाबत तसेच ट्रान्सजेंडर पोर्टलवर ओळखपत्र व ओळखप्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्यात यावे, तसेच आधारकार्ड व संजय गांधी निराधार योजनांचा लाभ घेण्यासाठी तृतीयपंथीयांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

राहुल गांधींची नक्कल करताना पंतप्रधानांचा व्हिडिओ सचिन सावंतांनी केला शेअर, म्हणाले – भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संसदेमधील कलाविष्कार

0

मुंबई-आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याने विरोधकांनी एकच गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे जाधवांना माफी देखील मागावी लागली. मात्र यानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंतांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नक्कल करत असल्याचे दिसत आहे. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत असे ट्विट सचिन सावंतांनी केले आहे.

सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणाले की, ‘विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत.’

काय आहे प्रकरण?
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजेच्या प्रश्नावर बोलताना कोरोना काळ आल्याने वीज माफीचे आश्वासन पूर्ण झाले नाही असे म्हटले. यानंतर भास्कर जाधव यांनी पुनरुच्चार करून पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरच संतप्त देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. भास्कर जाधव यांनी आक्षेपार्ह अंगविक्षेप करून पंतप्रधानांचा अपमान केला आहे. त्यांनी सभागृहात माफी मागावी. त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे असा आक्रामक पावित्रा फडणवीस यांनी घेतला. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील भास्कर जाधव यांच्या बोलण्यावर आपला आक्षेप नोंदवून कारवाईची मागणी केली. यानंतर नितीन राऊतांना माफी मागावी लागली.

सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार

0

मुंबई, दि. 22 : मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच विविध समाजमाध्यमे देखील महत्त्वाची आहेत. माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येत्या काळात समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर करुन शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे काम करीत अचूकता आणि गतिमानतेवर भर द्यावा, असे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी केले.

श्री. दीपक कपूर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी संचालक (प्रशासन) श्री. गणेश रामदासी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. कपूर यांचे स्वागत केले तर डॉ. पांढरपट्टे यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रदर्शने) श्रीमती सीमा रनाळकर, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर यांचेसह विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित बैठकीत श्री. दीपक कपूर म्हणाले की, समाजमाध्यमांमध्ये मोठी ताकद असून विविध जागतिक, राष्ट्रीय घडामोडींमध्ये याचा वापर कसा होतो ते दिसून आले आहे. शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काचे काम करीत असताना सर्व अधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करण्याची गरज आहे. समाजमाध्यमांवरील शासनविषयक किंवा आपल्या विभागाशी संबंधित पोस्ट्सवर तत्काळ प्रतिसाद दिल्यास शासनाच्या सकारात्मक प्रतिमानिर्मितीला त्याचा मोठा लाभ होणार आहे. लोकाभिमुख कल्याणकारी योजना, शासनाचे जनहिताचे निर्णय, घोषणा, उपक्रमांची माहिती तत्काळ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन श्री. दीपक कपूर यांनी यावेळी केले.

शासनाच्या समाजमाध्यमांवरील मजकूर हा प्रसारमाध्यमांसाठी बातमीचा स्त्रोत व्हायला पाहिजे हे सांगताना अचूक, वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती देणे हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बातम्यांचा मूळ गाभा आहे, त्यादृष्टीने कमी वेळेत अधिक गतीने माहितीचे प्रसारण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही श्री. दीपक कपूर यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना मावळते सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दोन वर्षांच्या कालावधीतील कार्याचा आढावा घेतला. इतर सर्व विभागांपेक्षा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाचा अनुभव आपणासाठी वेगळा होता, असे सांगताना त्यांनी अहोरात्र सजग राहून काम करणाऱ्या या विभागाने कोरोना काळात केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. डॉ. पांढरपट्टे यांची रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागात मृद व जलसंधारण सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

श्री. दीपक कपूर यांच्याविषयी…

भारतीय प्रशासन सेवेच्या 1991 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले श्री. दीपक कपूर हे सध्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे महासंचालक तथा सचिव (माहिती व जनसंपर्क) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

श्री. कपूर यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदांवर काम केले आहे.

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या विभागाचे सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर श्री. दीपक कपूर यांनी उल्लेखनीय सेवा केली आहे.