Home Blog Page 1593

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0

अहमदाबाद, दि. 26 : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियाटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गुजरातचे वन राज्यमंत्री श्री. जगदीश विश्वकर्मा व श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यात आज सोमवार, 26 सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे यासंदर्भात चर्चा झाली.

प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीकडून प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्री सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. 4 एप्रिल 2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली चे संचालक जी मल्लिकार्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक श्री सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती.

त्यावर श्री. सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री श्री. विश्वकर्मा यांनी सोमवारी 26 सप्टेंबर ला विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.

गॅबनला भेट देणारी पहिली भारतीय युद्धनौका

0

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2022

भारतीय नौदलाची आयएनएस तरकश ही युद्धनौका सागरी चाचेगिरी विरोधी गस्तीसाठी सुरु असलेल्या गिनीच्या आखातामधील आपल्या तैनातीचा भाग म्हणून गॅबनमधील पोर्ट जेंटिल येथे पोहोचली. भारतीय नौदलाच्या एखाद्या जहाजाने गॅबनला दिलेली ही पहिलीच भेट आहे.

बंदरावरील आपल्या मुक्कामादरम्यान जहाज आणि त्यावरील कर्मचारी अधिकृत आणि व्यावसायिक संवाद तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील.  

जहाजाच्या व्यावसायिक संवादामध्ये अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण, वैद्यकीय आणि अपघातग्रस्तांच्या सुटकेबाबतच्या समस्या आणि डायव्हिंग ऑपरेशन्सवरील चर्चा आणि कवायती याचा समावेश असेल. यावेळी परिचय भेटी देखील होतील. याशिवाय, योग सत्रे आणि सामाजिक संवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

हे जहाज पर्यटकांना पाहण्यासाठी देखील खुले राहील.

सीपीआर जागरुकता व प्रशिक्षण सप्ताहाचे अभिनेत्री मृणाल कुलकर्णीच्या हस्ते उद्घाटन

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ व रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशनतर्फे जागतिक हृदय दिनानिमित्त ‘धडकन’ प्रकल्प

२ ऑक्टोबरपर्यंत हृदयरोग तज्ज्ञांची टीम देणार प्रशिक्षण  

पुणे | जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 व रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या ‘धडकन’ प्रकल्पाचे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पांतर्गत रोटरीच्या मदतीने २ ऑक्टोबरपर्यंत हृदयरोग तज्ज्ञांची टीम सीपीआर जागरुकता व प्रशिक्षण देणार आहे. शहरातील विविध भागातील सोसायट्यांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ व रिव्हाईव्ह हार्ट फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘धडकन’ प्रकल्पाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते लॉ कॉलेज रोडवरील नॅशनल फिल्म अर्काईव्ह येथे झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर डॉ अनिल परमार, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ जगदीश हिरेमठ, डॉ. किंजल गोयल, डॉ. सुनील साठे, पल्लवी साबळे, हेमंत शिरगुप्पी, डॉ जिग्नेश पंड्या, नरेंद्र गांधी, पद्मजा जोशी, केतन शाह, महेंद्र चित्ते, मनिषा सुर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

धडकन प्रकल्पाविषयी आणि याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सीपीआर प्रशिक्षणासंबंधी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार यांनी माहिती दिली. केतन शाह यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे आत्तापर्यंतचे कार्य स्लाईड शोच्या माध्यमातून सांगितले.

यावेळी डॉ. जगदिश हिरेमठ यांनी रक्तदाब मोजण्याची पद्धत सांगितली. त्याचप्रमाणे बंद पडलेलं हृदय तत्काळ सुरु करण्याची शक्ती सीपीआर मध्ये आहे असे सांगून सीपीआर नेमकं कसं करतात त्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. तसेच सीपीआर कसा करावा या संदर्भात लघुपट दाखवण्यात आला.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सीपीआर संदर्भात कुठलीही मदत करण्याचे आश्वासन दिले. तर, अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी हृदय विकाराच्या प्रथमोपचारासाठी लागणारे AED मशीन जास्तीत जास्त पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश गांधी यांनी केले.

10 यूट्युब वाहिन्यांवरील 45 ध्वनी-चित्रफितींवर घातली बंदी

0

भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला हानी पोहोचवण्यासाठी मॉर्फ केलेल्या प्रतिमा आणि ध्वनी-चित्रफितींचा वापर केला गेला

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2022

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, यूट्युब या ऑनलाईन मंचाला त्यांच्या 10 युट्युब वाहिन्यांवरील 45 ध्वनी-चित्रफितींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित ध्वनी-चित्रफितींबर बंदी घालण्याचे निर्देश 23.09.2022 रोजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम 2021 च्या तरतुदींनुसार जारी करण्यात आले होते. बंदी घालण्यात आलेल्या ध्वनी-चित्रफितींना 1 कोटी 30 लाखांहून अधिक एकत्रित प्रेक्षक संख्या मिळाली होती. 

या ध्वनी-चित्रफितींमध्ये बोगस बातम्या आणि धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने मॉर्फ केलेले व्हिडिओ याचा समावेश होता. उदाहरणांमध्ये सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार काढून घेतल्याचे खोटे दावे, धार्मिक समुदायांविरुद्ध हिंसक धमक्या, भारतात सांप्रदायिक युद्ध भडकल्याची घोषणा इ. याचा समावेश आहे. या ध्वनी-चित्र फितींमध्ये सांप्रदायिक विसंवाद निर्माण करण्याची आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करण्याची क्षमता असल्याचे आढळून आले. 

मंत्रालयाने बंदी घातलेल्या काही ध्वनी-चित्रफिती अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र दले, भारताची राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मीर आणि अशाच संबंधित मुद्द्यांवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरल्या जात होत्या. ही सामग्री भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या परदेशी देशांबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या दृष्टीकोनातून चुकीची आणि संवेदनशील असल्याचे आढळून आले होते.

काही ध्वनी-चित्रफितींमध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या काही भागांसह भारतीय हद्दीबाहेर भारताची चुकीची बाह्य सीमा दाखवण्यात आली होती. नकाशामधून करण्यात आलेले हे चुकीचे सादरीकरण भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी हानीकारक असल्याचे आढळून आले.  मंत्रालयाने बंदी घातलेली सामग्री भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, देशाची सुरक्षा, भारताचे परदेशी देशांबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध आणि देशाच्या  सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हानीकारक असल्याचे आढळून आले. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A च्या कक्षेत ही सामग्री समाविष्ट करण्यात आली. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे.  

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

0

मुंबई, दि. 26 : नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. त्यासाठी दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपाडे यांनी केले.

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा अवर सचिव शरद दळवी उपस्थित होते.

श्री.देशपांडे म्हणाले की, राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. 18 भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf  या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा मार्कशिटची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिनांक 1 ऑक्टोबर पर्यंत पदवीधर मतदार संघाकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. 19 भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-19.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे श्री.देशपांडे यांनी सांगितले.

या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीं किंवा रहिवाशी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 हा आहे. दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील आणि अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राच्या क्षमतांच्या पुरेपूर वापरासाठीच्या धोरणांबाबत सरकार आणि उद्योग जगतादरम्यान संवाद

0

मुंबई, 26 सप्‍टेंबर 2022

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज, 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईतील चित्रपट उद्योगातील विविध भागधारकांशी संवाद साधला.

दृकश्राव्य क्षेत्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरणे, परस्पर सहकार्य तसेच सरकार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक यांच्यात नियमित संवाद आवश्यक आहे. या अनुषंगाने, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे – एनएफडीसी तर्फे आज, 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईत, अशा भागधारकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर भाकर, या बैठकीसाठी उपस्थित होते.

त्याचबरोबर, मॅडॉक फिल्म्सचे संस्थापक दिनेश विजन, धर्मा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता, अयान मुखर्जी, आर. बाल्की, अबंडांटियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम मल्होत्रा, अॅमेझॉन प्राइम व्हिडीयोचे गौरव गांधी आणि अपर्णा पुरोहित, नेटफ्लिक्सच्या मोनिका शेरगिल, पीईएन इंडियाचे अध्यक्ष जयंतीलाल गाडा, बालाजी मोशन पिक्चर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाविनी शेठ, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशीष सरकार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन तेज आहुजा तसेच निर्माते महावीर जैन आणि मधु मंटाना, अशा प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी आणि मनोरंजन उद्योग व्यावसायिकांनी उद्योग विश्वाचे प्रतिनिधित्व केले.

प्रसार माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या धोरणात्मक उपक्रमांबाबत यावेळी प्राधान्याने चर्चा करण्यात आली. भारतात चित्रीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी चित्रपट सुविधा कार्यालयाच्या माध्यमातून माहिती आणि प्रसारण मंत्रालय करत असलेले प्रयत्न तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाच्या प्रयत्नांबाबत माहिती देण्यात आली. आंतरराष्‍ट्रीय निर्मिती आणि अधिकृत सह-निर्मितीसाठी नुकतीच सुरू करण्यात आलेली प्रोत्‍साहनपर योजना आणि त्‍यामुळे भारतात आशय निर्मितीसाठी होणाऱ्या लाभाबाबतही यावेळी तपशीलवार चर्चा करण्यात आली. सरकारतर्फे देऊ करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत, उद्योगांनी केलेल्या अपेक्षित प्रोत्साहनपर सूचनांची नोंदही यावेळी घेण्यात आली.

आगामी 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  यशस्वी करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांबाबत आणि त्याद्वारे उद्योगासाठी निर्माण होणाऱ्या संधींबाबतही प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून, सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2021 च्या मसुद्यामध्ये केलेल्या सुधारणांबाबत अभिप्राय घेण्यात आला. या भागधारकांनी सकारात्मक अभिप्राय देत, प्रस्तावित सुधारणा एकमताने स्वीकारल्या.

भारतातील चित्रपटगृहांच्या संख्येबद्दल उद्योग जगताच्या मनातील प्रश्नांची दखल घेत, चित्रपटगृहांच्या बांधकामांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने एक खिडकी यंत्रणा विकसित करत असून, त्यासंदर्भातील कायदा प्रगतीपथावर असल्याची माहितीही संबंधित भागधारकांना देण्यात आली. दृकश्राव्य क्षेत्रातील इतर अनेक उपक्रमांबाबतही उपस्थितांना तपशीलवार माहिती देण्यात आली.

आजची चर्चा यशस्वी झाल्याचे सांगत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले “चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी मंत्रालयाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी  मनोरंजन उद्योग जगतासोबत साधलेला संवाद, ही एक उत्तम संधी आहे. या संवादात सहभागी सर्व भागधारकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. त्यांच्यासाठी प्रदान केलेल्या विविध प्रसारण मंचांचा लाभ घ्यावा आणि भारताला ग्लोबल कंटेट हब बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन आम्ही त्यांना केले आहे.”

मानवरहित विमानांसाठीचे एव्हीगॅस 100 एलएल या हवाई इंधनाच्या स्वदेशी उत्पादनाच्या वापराचा प्रारंभ

0

इंडियन ऑइल ठरली एव्हीगॅस 100 एलएलचे उत्पादन आणि विपणन करणारी देशातील पहिली तेल विपणन कंपनी

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2022

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज नागरी विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्य मंत्री जनरल (डॉ.) व्ही. के. सिंह (निवृत्त) यांच्या उपस्थितीत पिस्टन इंजिनची विमाने आणि मानवरहित विमानांसाठी बनवण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या एव्हीगॅस 100 एलएल (AVGAS 100 LL) या हवाई इंधनाच्या वापराचा प्रारंभ केला. भारतात सध्या या इंधनाची युरोपियन देशांमधून आयात होते. इंडियन ऑइलने भारतीय वायुसेनेच्या हिंडन हवाई तळावर आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभाला भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, एमओपीएनजी (MoPNG) आणि एमओसीए (MoCA) चे वरिष्ठ अधिकारी आणि वैमानिक प्रशिक्षण संस्थांचे (FTOs) अधिकारी सहभागी झाले होते.

स्वदेशी बनावटीच्या एव्हीगॅस 100 एलएलचा वापर सुरू होण्याचे महत्व सांगताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणाले की एव्हीगॅस 100 एलएल हे भविष्यात विमानतळांवरील वाढती गर्दी तसेच वैमानिक प्रशिक्षण आणि प्रशिक्षणार्थी विमानांसह वैमानिक प्रशिक्षण संस्थांची वाढती संख्या यासह भरभराटीला येत असलेल्या विमान वाहतूक उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाचे आहे. भारतातील विमान प्रवासाची मागणी भविष्यात अनेक पटींनी वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रशिक्षित वैमानिकांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. आणि यासाठी, एफटीओ (FTOs) संख्येतही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे, ते म्हणाले.  

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल:

सध्या एव्हीगॅस 100 एलएल हे इंधन पूर्णपणे आयात केले जाणारे उत्पादन आहे. इंडियन ऑइलने गुजरात येथील तेल शुद्धीकरण केंद्रात उत्पादित केलेल्या  एव्हीगॅस 100 एलएल चे देशांतर्गत उत्पादन भारतात विमान उड्डाणाचे प्रशिक्षण अधिक परवडणारे बनवेल. एफटीओ आणि संरक्षण दलांद्वारे चालवल्या जाणार्‍या विमानांना इंधन पुरवणारे हे उत्पादन भारत अनेक दशकांपासून आयात करत आहे. इंडियन ऑइलच्या संशोधन आणि विकास (R&D), तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि विपणन संघांनी स्वदेशी उत्पादनाची ही यशस्वी कामगिरी केली आहे आणि उद्योग क्षेत्राला कमी किमतीचा फायदा दिला आहे.

कर्करुग्णांना निवारा देणाऱ्या नाना पालकर रुग्ण सेवा सदनसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 26 : नाना पालकर स्मृती समिती आपल्या रुग्ण सेवा सदनाच्या माध्यमातून देशभरातील गोरगरीब कर्करुग्ण व त्यांच्या नातलगांना मोफत व नाममात्र शुल्क घेऊन निवारा, अन्न व औषधोपचार देण्याचे सेवाभावी कार्य निःस्वार्थ भावनेने करीत आहेत. मुंबई येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन कर्करुग्णांना सेवा देणाऱ्या नाना पालकर स्मृती समितीसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या व त्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

परळ मुंबई येथील नाना पालकर स्मृती समितीच्या पुढाकाराने बोरिवली येथे ‘डे केअर किमोथेरपी’ केंद्र सुरू करण्यासंदर्भात नाना पालकर स्मृती समिती तसेच टाटा मेमोरियल सेंटर यांनी केलेल्या सामंजस्य कराराचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत आदान-प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे व नाना पालकर स्मृती समितीच्या सचिव डॉ. सुमेधा जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

नाना पालकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी वेचले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले नाना पालकर रुग्ण सेवा सदन केवळ कर्करुग्णांनाच नाही तर इतर अनेक रुग्णांना तसेच त्यांच्या आप्तेष्टांना मदत करीत आहे असे राज्यपालांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात वाराणसी येथेदेखील कर्करुग्णांच्या उपचाराची सोय आहे. परंतु ‘टाटा’ या नावातच काही जादू आहे, की ज्यामुळे लोक देशभरातून टाटा स्मृती हॉस्पिटल येथे उपचारासाठी येतात, असे राज्यपालांनी सांगितले.  विज्ञानातील संशोधनामुळे एक दिवस प्रत्येक कर्करुग्ण बरा होईल असा आपणास विश्वास वाटतो असे राज्यपालांनी सांगितले.

कर्करोग निदान करण्यासाठी लागणार वाढता खर्च चिंताजनक : डॉ. राहुल बाणावली

देशातील लोकांचे सरासरी वय जसे वाढत आहे, तसे कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून सन २०३५ पर्यंत देशात दरवर्षी २० लक्ष कर्करुग्णांचे निदान होईल, असे सांगताना कर्करुग्णांच्या उपचाराचा वाढत असलेला खर्च आणि रोगनिदान होईपर्यंत होणारा खर्च चिंताजनक असल्याचे टाटा स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल बाणावली यांनी सांगितले.

टाटा रुणालयात आजही उपचार परवडणाऱ्या किंमतीत होत असल्यामुळे देशभरातून रुग्ण मोठ्या संख्येने मुंबईत येत असल्याचे त्यांनी सांगितले.  रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातलगांसाठी मुंबईत निवाऱ्याची सोय होणे महत्त्वाचे असते, असे सांगून नाना पालकर संस्थेसारख्या किमान दहा सेवाभावी संस्थांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बोरिवली येथे २ ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या केमोथेरपी केंद्रामुळे लोकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा मिळेल तसेच त्यामुळे पश्चिम उपनगरे, विरार, डहाणू, पालघर येथील रुग्णांची सोय होईल असे नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बडवे यांनी सांगितले. संस्थेच्या सचिव सुमेधा जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

सुरुवातीला राज्यपालांनी रुग्ण सेवा सदनाला भेट देऊन तेथील सेवाकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी  विविध विभागांना भेट दिली तसेच निवासी रुग्ण व नातलगांशी संवाद साधला.

मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 26 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठीचे प्रस्ताव गृह विभागाने तातडीने शासनास सादर करावेत. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेचा विषय अत्यंत महत्त्वाचा  असून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गृह विभागाने आणि पोलिसांनी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, प्रधान सचिव (सुरक्षा) संजय सक्सेना, प्रधान सचिव (अपील आणि सुरक्षा) श्याम तागडे, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कुलवंत कुमार सरंगल, अमितकुमार सिंग, अर्चना त्यागी, सह पोलीस आयुक्त, मुंबई विश्वास नांगरे-पाटील, राजवर्धन, राजकुमार व्हटकर यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अपराध सिद्धतेचा दर वाढविण्यासाठी पोलीस दलाचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा फेर प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील सर्व पोलीस घटकांच्या आकृतिबंध मंजुरीचे प्रस्ताव तातडीने 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे. राज्यात नवीन पोलीस स्टेशन निर्मिती करण्यासाठी एक सर्वंकष आराखडा तयार करावा तसेच हा आराखडा तयार करताना लोकसंख्या आणि तंत्रज्ञान हे आधारभूत मानण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यातील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी पोलीस स्पोर्टस् अकादमीचा प्रस्ताव प्राधान्याने तयार करावा. तसेच पोलिसांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावेत. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रलंबित असलेली परवानगीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देऊन याबाबत उचित कार्यवाही करावी, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा टप्पा 1 पूर्ण झाला असून टप्पा 2 ची कार्यवाही सुरु आहे. या प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरु आहे. येत्या एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने असुरक्षित सागरी तळावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याबरोबरच नवीन बोटी खरेदी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच सागरी सुरक्षेकरिता जुन्या बोटींची दुरुस्ती आणि तांत्रिक पदे भरती करण्यासाठीचाही प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सायबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठीचा प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात यावी. नागरिकांना अनेक सेवा ऑनलाईन देण्यात येतात. सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा. सध्या असलेल्या अंमली पदार्थ विरोधी (नार्कोटिक) कायद्यात राज्य सरकारच्या सुधारणा प्रस्तावित करण्यासंदर्भात विभागाने अभ्यास करावा. मुंबईमध्ये प्रस्तावित डिटेंशन सेंटरचा प्रस्ताव तातडीने सादर करुन त्यास मंजुरी घ्यावी. तसेच राज्यामध्ये प्रशिक्षित असे श्वान पथक तयार करावे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शक्ती कायदा, निर्भया पथक या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राजकीय, सामाजिक आंदोलनातील, कोरोना काळातील, गणपती व दहीहंडी उत्सव काळातील खटले मागे घेण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याबाबतचे खटले मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

राज्यामध्ये नवीन कारागृह निर्मिती करण्याबरोबरच कारागृह विभागात सुधारणा करण्यात येणार आहेत. सध्या 1 हजार 641 बंदींना जामीन मंजूर असून त्यांना कारागृहातून सोडण्याची योग्य ती कार्यवाही करावी. यासाठी शासनाने सर्व कायदेशीर सहकार्य करावे तसेच यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यासंदर्भात सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीत महिला सुरक्षा, पोलीस स्टेशन बांधकाम, पोलिसांसाठी घरे, पोलीस गृह कर्ज योजना, पोलिसांच्या आस्थापना विषयक बाबी, पोलिसांसाठी अद्ययावत वाहने, राज्य राखीव पोलीस दल, डायल 112, अम्बीस प्रणाली, सिसिटीएन्स प्रणाली टप्पा 2, तुरुंग सेवा यांसह विविध विषयांचा आढावा उपमुख्यमंत्री यांनी घेतला. यावेळी सर्व पोलीस घटकांनी समन्वयाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस भरतीला प्राधान्य

राज्यामध्ये सध्या सन 2019 मधील 5 हजार 297 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. सन 2020 मधील 7 हजार 231 पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच सन 2021 अखेर रिक्त होणाऱ्या 10 हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या 10 हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच अन्य रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.

गृह विभागाचे सादरीकरण अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांनी केले. तर महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी सादरीकरण केले.

कमी खर्चात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन

पुणे दि.२६ – गुणवत्तेचे शिक्षण कमी खर्चात मिळत नाही तोपर्यंत सामान्यांसाठी ते उपलब्ध होणार नाही. सामान्य जनतेला खाजगी संस्थांमधूनही कमी खर्चात उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, प्रा. शामकांत देशमुख, प्रा.सुरेश तोडकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, शिक्षण आणि आरोग्यावर विशेष लक्ष दिल्यास देशाच्या विकासाला चालना मिळू शकेल. त्यामुळे स्वस्त आणि उत्तम शिक्षण सुविधा सर्वांना उपलब्ध असणे आवश्यक आहे. यावर्षी काही महाविद्यालयांना भेट देऊन एफआरएने निश्चित केलेल्या शुल्काची तपासणी केली जाईल.

जीवनाला दिशा देणारे शिक्षण गरजेचे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा जागृत करणारे , गतवैभवाची जाणीव करून देणारे आणि भविष्यातील उन्नत ज्ञानाचा आग्रह धरणारे आहे. विद्यार्थ्यांनी प्रयोगशील असावे, त्या प्रयोगांना मान्यता मिळवावी आणि त्याच्या साहाय्याने समृद्धी प्राप्त करावी अशी अपेक्षा आहे. या माध्यमातून जीवनाला दिशा देणारे आणि स्वावलंबी करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.

बहुशाखीय पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन
नवीन शोध लावणे आणि त्याला बाजारात आणण्याचे हे जग आहे. त्यामुळे नवे शोध लावणाऱ्या तरुणाईमुळे देश आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होईल. त्याचा पाया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. बहुशाखीय अभ्यासक्रम शिकून पदवी मिळविल्यास यशस्वी विद्यार्थी तयार करता येतील. मॉडर्न महाविद्यालयाने असे अभ्यासक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. राज्यात असे अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येईल.

शैक्षणिक संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार श्री.शिरोळे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची महाविद्यालये नावीन्यतेला प्रोत्साहन देत आहेत. कोरोनानंतरच्या काळात या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.

डॉ. एकबोटे म्हणाले, शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या देशांचा विकास वेगाने झाला आहे. आपल्या देशाची ओळख विकसीत राष्ट्र अशी करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वेगाने राबवावे लागेल.

संस्थेचे कार्यवाह श्री.देशमुख यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्क्युबेशन सेंटर, विद्यार्थ्यांच्या न्यूट्रिडिश स्टार्टअप ॲपचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने करण्यात आले. मॉडर्न विधी महाविद्यालयाने तयार केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ महत्वाच्या निर्णयांवर आधारित ‘७५ माईलस्टोन्स’ या पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विधी महाविद्यालयाच्या ‘इनोव्हेशिया आयपीआर सेल’, तसेच ‘आयमॉडर्ना’ आभासी संवादीका, इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या आभासी प्रयोगशाळा उपकरणाचे उद्घाटनदेखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एंजल प्लेयर’ या उपकरणांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाकडून नारायण राणे यांचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी 2 महिन्यांची मुदत

0

2 आठवड्यांची मुदत होती, 2 महिन्यांपर्यंत वाढली

मुंबई- भाजप नेते नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी नारायण राणे यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच, बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली आहे.एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे हे आदेश कायम ठेवले आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊनही बसायचा तो दणका त्यांना बसला आहे.

अधीश बंगल्यातील अवैध बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच, दोन आठवड्यांत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नारायण राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच, अधीश बंगल्यावरील कारवाईसंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेशही कायम ठेवले आहेत.

2 आठवड्यांची मुदत होती, 2 महिन्यांपर्यंत वाढली

अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्यासाठी उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना 2 आठवड्यांची मुदत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने यात थोडासा दिलासा देत ही मुदत 2 महिन्यांपर्यंत वाढवली. तसेच, 2 महिन्यांत नारायण राणे यांनी अधीश बंगल्यातील अवैध बांधकाम पाडले नाही तर, मुंबई महापालिका कारवाई करेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. नारायण राणे यांच्याकडून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली तर, मुंबई पालिकेकडून तुषार मेहता यांनी बाजू मांडली.

नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू भागात अधीश नावाचा बंगला असून, तो समुद्र किनाऱ्यावर आहे. बंगल्याच्या बांधकामात सीआरझेडचे तसेच एफएसआयचे उल्लंघन करण्यात आले, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आठवडाभरापूर्वी उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी अवैध बांधकाम तोडण्याचे आदेशदेखील उच्च न्यायालयाे दिले होते. हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने नारायण राणे यांना आता या बंगल्यातील अवैध बांधकाम तोडावे लागणार आहे.

संतोष दौंडकर यांनी नारायण राणेंच्या या अधीश बंगल्याविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणेंना नोटीसदेखील बजावली होती. या बंगल्याची पाहणी महापालिकेच्या पथकाकडून करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद उच्च न्यायालयात गेला होता. यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्येही चांगलाच वाद निर्माण झाला होता.

हे बोलणं बरं नव्हं: मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी खेचले, तानाजी सावंतांचे कान

नागपूर-मराठा आरक्षणावर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते.आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांवर टीका करताना तोल सुटला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चापासून ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका त्यांना सहन करावी लागतेय. आता राधाकृष्ण विखे-पाटलांनीही त्यांना घरचा आहेर दिलाय.

काय म्हणाले सावंत?

सावंत म्हणाले की, सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे. याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे. पण, मराठा आरक्षणाचा विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे.

काय म्हणाले विखे-पाटील?

मंत्रिमंडळातील सहकारी डॉ. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. मात्र, त्यांनी जर तसं वक्तव्य केले असेल, तर ते दुर्दैवी आहे. मला वाटतं जबाबदार लोकांनी अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे.

आघाडीमुळे आरक्षण गेले

विखे-पाटील पुढे म्हणाले की, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री असताना एवढे मोर्चे निघाले. मात्र, आपण आरक्षण टिकवले. हे आरक्षण महाविकास आघाडीमुळे गेले. समाजबांधवांनी संयम पाळावा. आता उपसमिती करण्यात आलीय. ती सर्वांच्या भावनांना अंतर्भुत करेल. सर्वांना न्याय देईल.

सावंतांचा मााफीनामा

वादग्रस्त वक्तव्यावर टीका होताना पाहून अखेर मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी माफी मागितली आहे. सावंत म्हणाले की, समाजातील पाळण्यातील मुलांपासून आजोबा पणजोबापर्यंत सर्वांची मी जाहीर माफी मागतो आहे. केवळ माफी मागून मी स्वस्थ बसणार नाही तर, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी अविरत प्रयत्न करत राहणार आहे.

ओघात बोललो

सावंत म्हणाले की,आमचा समाज मागासलेला आहे. जवळपास तासभर मी त्या कार्यक्रमात बोललो आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस मंत्रिपदावर आहे. हे आरक्षण घेतल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मराठा आरक्षण मिळाले नाही. तर मी राजीनामा देईल. या भाषेत मी बोललो आहे. ग्रामीण भाषेत ओघवत्या शैलीत मी बोलून गेलो आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.

श्री देवी चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना

पुणे-

श्री देवी चतुःशृंगी मंदिरात आज सकाळी ९ वाजता नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. सकाळी देवीला या वर्षीचे मंदिर व्यवस्थापक नंदकुमार अनगळ यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात आले. नारायणराव कानडे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. आज पहाटेपासून दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

उत्सव काळात मंदिर भाविकांसाठी २४ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. दररोज सकाळी 10 व रात्री 9 वाजाता महाआरती करण्यात येणार आहे. तसेच गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण करण्यात येईल. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ पुस्तकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन!

0

जयश्री खाडीलकर, अशोक समेळ, अजित भुरे, भरत दाभोळकर यांचीही विशेष उपस्थिती!

मुंबई-मागील ६३ वर्षांपासून जाहिरात क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे सर्वेसर्वा विजय पाध्ये उर्फ बाबा यांनी लिहिलेल्या ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये जाहिरात, अभिनय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’चे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत जयश्री खाडीलकर पांडे, अशोक समेळ, अजित भुरे, भरत दाभोळकर आणि विवेक मेहेत्रेही मंचावर हजर होते. त्यासोबतच प्रेक्षागृहात विजय पाध्ये यांचे बंधू श्रीराम , दिलीप , प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, अतुल परचुरे, प्रसाद कांबळी, उदय धुरत, दिलीप जाधव, विजय गोखले, अनुराधा राजाध्यक्ष, सुधीर जोगळेकर, अनिल हर्डीकर, योगिता प्रभू, चंद्रकांत राऊत, अक्षर शेडगे, मनसेचे नितीन सरदेसाई, जयेंद्र साळगांवकर, रामदास पाध्ये, सत्यजीत पाध्ये अश्या अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. उद्वेली प्रकाशनच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’चा प्रकाशन सोहळा हा जाहिरात क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विजय पाध्ये नामक यशस्वी उद्योजकाचा जणू कौतुक सोहळाच ठरला. उपस्थित सर्वच मान्यवरांनी विजय पाध्ये यांच्यावर स्तुतीसुमने उधळत ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. दिलीप प्रभावळकर यांनी मुलाखत घेत विजय पाध्ये यांचे अंतरंग उलगडण्याचा केलेला प्रयत्न उपस्थितांची दाद मिळवणारा ठरला. यावेळी प्रभावळकर म्हणाले की, जाहिरात क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान होऊनही माणुसकीचा धर्म न विसरलेल्या विजय पाध्ये यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. माझा खूप जुना मित्र असलेल्या विजयचे ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ हे पुस्तक यशस्वी जीवनाचा मंत्र सांगणारे आहे. मितभाषी असलेला विजय हा खरा जगमित्र आणि अजातशत्रू आहे. ‘बीवायपी, व्हीआयपी आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी खास पुण्याहून इथे आलो. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केलेले विजयचे अनेक मित्र आहेत. या पुस्तकात त्या सर्वांचे किस्से आहेत. विजयचा जनसंपर्क अफाट असून, त्यातूनच त्याने या पुस्तकाचे लिखाण केले आहे. जाहिरात क्षेत्रातील व्यवसाय कशाप्रकारे सचोटीने करायला हवा हे विजय पाध्ये यांनी मराठी माणसाला दाखवून दिले आहे. त्याच जोडीला विविध क्षेत्रांतील माणसे कशी जोडायची हेदेखील विजयने दाखवून दिल्याचे प्रभावळकर म्हणाले.
या सोहळ्यात प्रभावळकरांनी घेतलेल्या मुलाखतीत विजय पाध्ये म्हणाले की, मृदू स्वभाव ही दादांची शिकवण तर आहेच, पण आपला स्वभावच मृदू आहे. माणसे जोडण्यासाठी समोरच्याचे ऐकायला हवे, वाद घालून प्रश्न सुटत नाहीत. व्यवसायात कित्येकदा तडजोडही करावी लागली. नेहमी समोरच्या व्यक्तीचा विचार करत असल्याने तडजोडीचा कधीच त्रास झाला नाही. समोरच्याचा इगो जपला, तर तो आपल्या प्रेमात पडतो. तांबे आरोग्य भुवनच्या बापू तांबेंनी व्यवसायात संयम शिकवला. दादांकडून खरे बोलायला, मावशीकडून व्यवहार सांभाळायला, मनोहर जोशींकडून वेळ पाळायला आणि विद्यालंकार क्लासेसच्या देशपांडे यांच्याकडून फायलींगसोबतच वेळेचे नियोजन करायला शिकलो. नंदी ब्रँड अगरबत्तीने जेव्हा बीवायपीला एक नवी ओळख मिळवून दिली, तेव्हा अमिन सयानींसारख्या दिग्गजांनीही कौतुक केले होते. या सर्व गोष्टीं सांगताना जाहिरातींमधील काही गिमिक्सही विजय पाध्ये यांनी उघड केली. जीवलग मित्र अभिनेते विनय आपटे यांच्यावर संकट कोसळल्यावर आपल्या संतापाचा विस्फोटही झाल्याचा किस्साही विजय पाध्ये यांनी सांगितला. राहून गेलेल्या गोष्टींमध्ये स्विमिंग कधीच केले नसून कधीच भपकेदार कपडे घातले नसल्याचे सांगितले.
विजय यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी या पुस्तकाचे लेखन सुरू केले. ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर पांडे म्हणाल्या की, पाध्ये यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एक ग्रंथच आहे. त्यांना मिळालेले यश हे त्यांचे वडील दादांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराचे यश असल्याचेही खाडीलकर म्हणाल्या. अशोक समोळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, विजय यांनी लिहिलेले पुस्तक जगण्याचा फॅार्म्युला सांगणारे आहे. यासोबतच हे पुस्तक माणुसकीचा धर्म जपणाऱ्या व्यक्तींच्या ऐश्वर्याचे दर्शन घडवणारे असल्याचे अशोक समेळ म्हणाले. अॅडमॅन भरत दाभोळकर यांनी शाब्दिक फटकेबाजी करत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. ते म्हणाले की, बी. वाय. पाध्ये ही एकत्र कुटुंबावर चालणारी संस्था आहे. या कुटुंबाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. हे केवळ पुस्तक नसून एक एनसायक्लोपीडिया किंवा डिक्शनरी असल्याचे मतही दाभोळकर यांनी व्यक्त केले. अजित भुरे यांनी दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या आठवणीना उजाळा देताच सभागृहातील वातावरण काहीसे भावूक झाले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम बागेश्री पाध्ये पंडित यांनी केले.

वैभव आणि पूजा पुन्हा एकत्र

कलाकारांच्या काही जोडया खूप हीट होतात. मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अशा काही जोडया आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत जोडी ही त्यापैकीच एक. प्रेक्षकांची मने जिंकलेली ही जोडी परत एकत्र कधी येणार? याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असतेच. वैभव आणि पूजा या जोडीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.  

‘हॅण्डसम’ वैभव तत्ववादी आणि ‘ब्युटीफुल’ पूजा सावंतची लव्हेबल केमिस्ट्री परत एकदा जुळणार आहे. पण ही जोडी कशासाठी एकत्र येतेय? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे या दोघांनी पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

चित्रपट, अल्बम, जाहिरात यापैकी कोणत्या माध्यमातून ही जोडी एकत्र येणार याची खूप उत्सुकता शिगेला पोहचली  असली तरी बऱ्याच कालावधीनंतर ही जोडी एकत्र येणार असल्याने चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. लवकरच हे दोघे त्यांच्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत