दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी एकूण रक्कम रुपये २,०६,३१,९४५/- उत्पन्न प्राप्त.
दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी रोजी महामंडळाकडून १६९८ बसेस संचलनात.
१२ लाख २३ हजार प्रवाशांनी केला पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर.
पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व त्यालगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास
प्राधिकरण कार्यक्षेत्रात प्रवाशांकरीता बससेवा पुरविण्यात येते. दिपावली सुट्टी संपत असल्याने परगांवी गेलेले प्रवासी
परतत असल्याने मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये व प्रवाशांना
सुरक्षित उत्तम दर्जाची तत्पर बससेवा देणेकामी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी सर्व अधिकारी यांना
परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्ण क्षमतेने व सर्व नियोजीत शेड्युल मार्गस्थ करणे बाबतच्या सुचना देण्यात आल्या
होत्या. तसेच महत्वाच्या बसस्थानकावर बससंचलनावर नियंत्रणासाठी व प्रवाशांना मार्गदर्शन होणेकामी आगार
व्यवस्थापक यांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या.
वाहतूक कोंडीचा विचार करता पीएमपीएमएल च्या ताफ्यात असणाऱ्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस
व सीएनजी बसेसचा वापर शहरवासियांनी व शहरात येणाऱ्या प्रवाशांनी वाढविला आहे. सोमवार दि. २० नोव्हेंबर
२०२३ रोजी मार्गावर १६९८ बसेस संचलनात होत्या व जास्त उत्पन्नाच्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या
त्यामुळे परिवहन महामंडळास रक्कम रूपये २,०६,३१,९४५ /- इतके उत्पन्न प्राप्त झाले असून १२,२३,०८७ इतक्या
प्रवाशी नागरिकांनी बससेवेचा लाभ घेतलेला आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरांची लाईफलाईन म्हणून ओळख
असलेली पीएमपीएमएलची बससेवा ही किफायतशीर, सुरक्षित व विश्वासार्ह असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित
झाले आहे.
मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर नेहमीच विश्वास
दाखवला आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा व कॉलेज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या
विद्यार्थी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे.
दैनंदिन प्रवाशी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेवर
दाखविलेला विश्वास आहे. प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा
जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.
‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा
जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या, वाहनांची तोडफोड; तणावाची स्थिती
50 दिवसांची मुदत संपली, म्हणून मोर्चा-दोन महिन्यांपूर्वी धनगर समाजाच्या वतीने चौंडी (जि.अहमदनगर) येथे धनगर समाजाला एसटी संवर्गाचे आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. या वेळी शासनाच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन 50 दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली तरी शासनाने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने आज जालन्यात हा मोर्चा काढण्यात आला होत.जिल्हाधिकाऱ्यांना देणार होते निवेदन‘उठ धनगरा जागा हो…. आरक्षणाचा धागा हो’ हे ब्रीदवाक्य घेऊन मोर्चासाठी येणाऱ्या धनगर समाजातील नागरिकांनी सकाळी बारा वाजता गांधी चमन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर नियोजित मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न्याय्य हक्कांविषयी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. परंतू त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार होते.
जालना-धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करा या प्रमुख मागणीसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधी चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या तर वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे या आंदोलनाचा हिंसक वळण लागले. तर या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला. सुरुवातीला हा मोर्चा शांततेत निघाला. पण जस जसं जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आलं तसे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर अचानक जमावाने तोडफोड सुरू केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच वाहनेही फोडण्यात आली. त्यामुळ एकच गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना पांगवण्यास सुरुवात केली आहे. मोर्चाला अचानक हिंसक वळण लागल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
राज्यात संयुक्त कुष्ठरोग आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियानाला सुरुवात
नागरिकांनी सहकार्य करण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन
पुणे, दि.२१ – राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सोमवार २० नोव्हेंबरपासून संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली. हे अभियान ६ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा आणि आपल्या घरातील, तसेच परिसरातील संशयित कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्णांची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देऊन या विशेष अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण भागात शोधलेला एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या संयुक्त अभियानाची आखणी आणि नियोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत घरोघर सर्वेक्षणाद्वारे समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण आणि सक्रिय क्षयरुग्ण शोधून त्यांना त्वरित औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे.
संयुक्त कुष्ठरोग व सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेसाठी आरोग्य विभागाने राज्यभरात ६५ हजार ८३३ पथके तयार केली आहेत. एक पथक एका दिवसात शहरी भागातील २५ आणि ग्रामीण भागातील २० घरांना भेटी देणार आहे. गृहभेटी अंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले जाणार असून, अंदाजे ८ कोटी ६६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
गेल्या ५ वर्षापासून राज्यात दरवर्षी कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येते. या अभियानात १०० टक्के ग्रामीण लोकसंख्येची व साधारणतः २० टक्के शहरी लोकसंख्येची एक आशा सेविका व एक पुरुष स्वयंसेवकाच्या पथकाद्वारे प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करुन संशयित लक्षणे असलेले रुग्ण शोधून काढले जाणार आहेत. या संशयितांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन कुष्ठरोगाचे निदान झालेल्या कुष्ठरुग्णांवर बहुविध औषधोपचार करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ पासून राज्यात दरवर्षी जोखमीच्या भागामध्ये सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येते. या मोहेमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षण करून क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत.
नागरिकांनी आरोग्य विभागाच्या या विशेष अभियानाला सहकार्य करावे आणि कुष्ठरोग व क्षयरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
देशाच्या आर्थिक विकासात सहकारी बँकांचे योगदान महत्त्वाचे
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे ; जनता सहकारी बँकेतर्फे ‘भारताची आर्थिक सद्यस्थिती आणि नागरी सहकारी बँकांची त्यातील भूमिका’ या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम
पुणे – जनता सहकारी बँकेतर्फे राष्ट्रीय सहकार सप्ताह आणि बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहकारी बँकांच्या परिषदेमध्ये’भारताची आर्थिक सद्यस्थिती आणि नागरी सहकारी बँकांची भूमिका’ या विषयावर चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन डीपी रस्त्यावरील घरकुल लॉन्स येथे करण्यात आले. व्यासपीठावर जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, उपाध्यक्ष अलका पेटकर यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ बँकिंग तज्ञ जयंत काकतकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, एन के जी एस बी बँकेच्या अध्यक्ष हिमांगी नाडकर्णी, सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे आदी या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते.
केंद्रीय पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू झाल्यापासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक झालेला आहे. सहकारी बँका या केवळ देशाच्या आर्थिक विकासातच नव्हे तर सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्याचे काम करतात. देशाची अर्थव्यवस्था पुढील दोन वर्षात पाच ट्रिलियन होणार आहे .यामध्ये देशातील सहकारी बँकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे मत रिझर्व बँक आॅफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.
सतीश मराठे म्हणाले, सहकारी बँकांवर बंधने आणून छोट्या बँका बंद करण्याचे कोणतेही धोरण रिझर्व बँकेचे नाही. बदलत्या काळामध्ये सहकारी बँकांना राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकांशी मोठी स्पर्धा करावी लागणार आहे. यामध्ये काळा बरोबर सहकारी बँकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे, सायबर सिक्युरिटी सुरक्षा अधिक सक्षम करणे यावर भर दिला पाहिजे.
जगदीश कश्यप म्हणाले, सहकार्य यशोधनम या बँकेच्या ब्रीदवाक्य नुसारच बँकेची वाटचाल अत्यंत यशस्वीरित्या सुरू आहे. सहकारी बँकांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांशी सहकार्य केले, तर अधिक वेगाने विकास होऊ शकतो. ‘विना सहकार नही उद्धार’ यानुसार सहकारी बँकांनी देशाच्या विकासामध्ये एकत्र येऊन अधिक व्यापक प्रमाणात योगदान दिले पाहिजे.
अलका पेटकर म्हणाल्या, बदलत्या काळानुसार विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे येत्या काळामध्ये सायबर सिक्युरिटी हे सहकारी बँकांसमोरील मोठ्या आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सहकारी बँकांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे.
विद्याधर अनास्कर म्हणाले, ग्राहक जेव्हा छोटा असतो तेव्हा तो सहकारी बँकांमधून व्यवहार करतो, परंतु काही काळानंतर त्याचा व्यवहार वाढला की त्याचा ओढा हा खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे जातो. त्यामुळे सहकारी बँकांनी हा ग्राहक सहकारी बंकेमध्येच राहील व त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील, त्यासाठी सहकारी बँकांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजे.
मिलिंद काळे म्हणाले, सहकारी बँकांवर सर्वसामान्यांचा पूर्ण विश्वास आहे, हे आपणच लोकांना सांगितले पाहिजे. विश्वास वाढला तरच सहकारी बँकांमधील डिपॉझिट वाढते आणि एकूण बँकिंग व्यवसाय अधिक मजबूत होऊ शकेल.
वैशाली आवाडे म्हणाल्या, सहकारी बँका या मुख्यत: ग्रामीण भागातील व्यवसाय आणि शेतीला पूरक अशा व्यवसायांना आर्थिक सहकार्य करतात. सहकारी बँका मजबूत झाल्या तर ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिशील होऊ शकेल. त्यासाठी रिझर्व बँक आणि केंद्र सरकारने सहकारी बँकांना अधिक मदत केली पाहिजे.
सुभाष मोहिते म्हणाले राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत सहकारी बँका या ग्रामीण भागामध्ये अधिक पसरलेल्या आहेत. सर्वसामान्य माणूस हा पैशाने तसेच भावनेने ही त्या बँकांची जोडला गेलेला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम सहकारी बँकांनी केले आहे.
हिमांगी नाडकर्णी म्हणाल्या, इतर बँकांमध्ये घोटाळे झाले तर त्यांच्यावर कारवाई होत नाही. परंतु सहकारी बँकांवर मात्र त्वरित कारवाई होते आणि मोठ्या प्रमाणावर बंधने आणले जातात. त्यामुळे सर्वसामान्यांचा सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, ही परिस्थिती बदलण्यासाठी रिझर्व बँकेने सहकारी बँकांना घातलेली बंधने शिथिल केली पाहिजेत आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे.
शरद गांगल म्हणाले, वेगळे सहकार मंत्रालय निर्माण झाल्यापासून रिझर्व बँकेचा सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक झालेला आहे, याचा फायदा घेऊन सर्व सहकारी बँकांनी एकत्रित येऊन व्यवसाय वाढीवर भर दिला पाहिजे. तसेच सहकार बँकांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सायबर सिक्युरिटी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ बँकिंग तज्ञ जयंत काकतकर यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. बँकेचे संचालक अमित घैसास यांनी आभार मानले. चर्चासत्रात ३७ नागरी सहकारी बँकांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, असे १५० मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न
केदार टाकळकर यांचे व्याख्यान : उत्तर पत्रिका लेखन तंत्र व परीक्षा पूरक अभ्यास पद्धती या विषयावर मार्गदर्शन
पुणे : विद्यार्थ्यांनी दहावीचा पेपर लिहिताना बोर्डाचे परिक्षक आणि नियंत्रक यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहायला हवे. अभ्यास करताना देखील एकाग्रता असण्याच्या दृष्टीने वातावरण तयार करुन अभ्यास करावा. असे प्रतिपादन करीअर मार्गदर्शक केदार टाकळकर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी बोर्ड उत्तर पत्रिका लेखन तंत्र व परीक्षा पूरक अभ्यास पद्धती या विषयावर केदार टाकळकर यांचे उपयुक्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी आणि सेवा प्रकल्प संचालक विवेक कुलकर्णी उपस्थित होते. विद्यार्थी आणि पालकांसाठी व्याख्यानाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते.
केदार टाकळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला बसताना योग्य जागा निवडायला हवी. परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासोबतच आपल्या आहाराकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भल्या पहाटे मुख्यमंत्र्यांकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी
मुंबई, दि. २१: मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी पहाटे फिरून प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वाढविण्याची सूचना त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन इकबाल सिंह चहल यांना यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांनी आज पहाटे पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन सबवे, टर्नर रोड, जॉगर्स पार्क आदी परिसरास भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. या पाहणी प्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, एच पूर्व विभाग सहायक आयुक्त श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, शहरात मागील काही दिवसांत वाढलेले प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांवरील धूळ तसेच हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी दिवसाआड पाणी फवारणी करण्याच्या त्याचप्रमाणे वॉटर फॉगर, जेटींग मशिन, सक्शन मशिन, स्मॉग गन, आदींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते धुण्यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्यात येणार आहेत. मुंबईत शासनाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच बांधकामाची अनेक कामे सुरू आहेत. या कामांच्या ठिकाणी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काम सुरू असलेल्या इमारतींना ग्रीन कव्हर अत्यावश्यक करण्यात आले आहे. डेब्रिज उघड्या वाहनांमधून नेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अर्बन फॉरेस्टचे क्षेत्र वाढवून शहरावरील ग्रीन कव्हर वाढविण्यात येणार आहे. हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी शहरात ४० ठिकाणी वॉटर फॉगर आणि स्मॉग गन लावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांबरोबरच छोटे रस्ते, गल्ल्या, नाले, समुद्र किनारे आदी ठिकाणी सुद्धा स्वच्छता ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

प्रारंभी डी विभागामध्ये पेडर रोड येथे दुभाजक स्वच्छता कामाची पाहणी करून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. एच पूर्व विभागामध्ये कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भुयारी मार्ग परिसर; के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल आणि त्यानंतर एच पश्चिम विभागामध्ये जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग आदी ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी रस्ते, पदपथ स्वच्छता तसेच धूळ प्रतिबंधक कामांची पाहणी केली. दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रस्ता स्थित जॉगर्स पार्क येथे भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली.
नागरिकांशी साधला संवाद
महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे वांद्रे पश्चिम येथील जॉगर्स पार्क परिसरास भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शासनाच्या स्वच्छतेच्या कामात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपापल्या भागातील समस्या देखील मांडल्या. खारदंडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्र आणि नवीन जलवाहिनी या परिसरासाठी अंथरण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर ही समस्या सुटेल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. खार भूयारी मार्ग येथे वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत असल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की ही समस्या सोडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने खार भुयारी मार्ग येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर तेथील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल, असे त्यांनी नमूद केले. जॉगर्स पार्क येथे उद्यानातील प्रसाधनगृहांमध्ये शौचकूपांची संख्या वाढवावी, उद्यानामध्ये अधिक झाडे लावून हिरवळ वाढवावी, असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत चहापान
मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी स्वच्छतेची पाहणी करताना प्रत्यक्ष स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान केले. शासनामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील सर्व 46 वस्त्यांमध्ये संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली. मुंबई स्वच्छ राखण्यामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

०००
०००
गोळीबाराच्या घटनेनंतर निलंबित झालेले जालन्याचे एसपी तुषार दोशी आता सीआयडीचे SP झाले.
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. गृह विभागाने सोमावारी सायंकाळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले.जालन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दोशी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोशी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूर येथे बदली करण्यात आली. अमरावतीतील उपायुक्त संभाजी कदम यांची पुणे पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली. लोहमार्ग पोलीस दलातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश शिंदे यांची अमरावती येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. माधुरी केदार यांची लोहमार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.
कॅसिनोमध्ये जाणे नव्हे खोटे बोलणे गुन्हा; संजय राऊत म्हणाले, आता भाजपच्या लोकांना अच्छे दिन हे स्पष्ट ..
मुंबई-कॅसिनोमध्ये काय कुणी सँडविच खायला जात नाही. मकाऊ, बँकॉक हे काही थंड हवेचं ठिकाण नाही. अशा ठिकाणी जाऊन बसणं हा काही गुन्हा नाही. मी कुठे म्हटलं गुन्हा आहे? पण जाऊन तुम्ही खोटं बोलत आहात. मकाऊला मी पण जाऊन आलो आहे. एक गाव कसं उभं राहतं आहे ते मी पाहिलं आहे. आपण जबाबदार लोक आहोत. इथे येऊन आम्हाला ज्ञान दिलं जातं आहे. भाजपाला हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती. प्रत्यक्षदर्शी असं सांगतो त्या रात्री फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटींचे पोकर्स विकत घेतलं. पोकर्स ही तिथली करन्सी आहे. त्यांच्यापुढे पोकर्स आहेत. मला ते माहीत नव्हतं. माझ्याकडे २७ फोटो आणि व्हिडीओ आहे. आणखी एक महाशय होते त्यांनीही दोन कोटींचे पोकर्स विकत घेतले आहेत. आता भाजपाच्या लोकांना अच्छे दिन आले असतीलअसे म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.
जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात बावनकुळे यांचे कुटुंबीय आहे का? जे दिडदमडीचे लोक आमच्यावर टोळधाड सोडत आहेत. तर त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवे होते कि हो तो मीच आहे. कॅसिनोमध्ये जाणे गुन्हा नाही. खोटे बोलणे गुन्हा आहे.
चीनच्या अखत्यारीतील मकाऊ शहर जुगारासाठी प्रख्यात आहे. तेथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ फोटोसह उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी व्हायरल केला. मकाऊतील व्हेनिस हॉटेलच्या कॅसिनोमध्ये जुगार खेळून बावनकुळे यांनी 3 कोटी 50 लाखांची उधळपट्टी केली, असा आरोपही त्यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले, कॅसिनोमध्ये जाणे गुन्हा नाही. खोटे बोलणे गुन्हा आहे. तो मी नव्हेच, असे म्हणणे गुन्हा आहे. भाजपला हे अंगावर ओढून घ्यायची गरज नव्हती, असेही संजय राऊत म्हणाले.
अजून व्हिडीओ आहेत..
संजय राऊत म्हणाले, मकाऊमध्ये पिझ्झा, सँडविच खायला कोणी जात नाही. त्याठिकाणी निसर्गरम्य वातावरणही नाही. माणसाने सर्व काही शिकल्या पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, निरीक्षण केले पाहिजे. अशाठिकाणी जाणे गुन्हा नाही. खोटे बोलणे गुन्हा आहे. तो मी नव्हेच. मी तिथे पिझ्झा खायला गेलो होतो. माझ्याकडे अजून व्हिडीओ आहेत. मकाऊला मी सुद्धा गेलेलो आहे.
साडेतीन कोटींचे पोकर्स
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील जबाबदार व्यक्ती चीनच्या अख्यारितीत जाऊन जुगार खेळत आहेत. आणि उलट पुन्हा महाराष्ट्रात आम्हाला ज्ञान देणार. भाजपला हे अंगावर ओढून घ्यायची गरज नव्हती. प्रत्यक्षदर्शी असे सांगतात कि, फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटींचे पोकर्स विकत घेतले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर पिझ्झा, सँडविच नाहीये. पोकर्स आहेत. गॅम्बलिंगमध्ये जी करन्सी लागते त्याला पोकर्स म्हणतात. त्या महाशयांसोबत आणखी लोक होते. त्यांनी 2 करोडचे पोकर्स खरेदी केले.
तुमचे मन तुम्हाला का खात आहे?
संजय राऊत म्हणाले, जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात त्यांचे कुटुंबीय आहे का, जे दिडदमडीचे आमच्यावर बोलत आहेत त्याची काही गरज आहे का. एवढे तुमचे मन तुम्हाला का खात आहे. एवढी मोठी टोळधाड सोडण्यापेक्षा सांगायला हवे होते की, होय मी त्याठिकाणी गेलो. खोट का बोलताय. तसेच आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर बोलताना राऊत म्हणाले, तो ग्लास आहे कि डायट कोकचा कॅन आहे हे स्पष्ट दिसत आहे. मोदी जे पितात तेच आदित्य ठाकरे पितात
‘माझ्या आईने मला फॅशनच्या जगासमोर आणले!’ : सोनम कपूर
ग्लोबल फॅशन आयकॉन आणि बॉलिवूड स्टार सोनम कपूरचा भारतीय फॅशन लँडस्केप आणि पॉप संस्कृतीवर असलेला प्रभाव निर्विवाद आहे. सोनम, तिच्या स्टाइलिंगच्या अतुलनीय जाणिवेमुळे, जगासाठी भारताची फॅशन अॅम्बेसेडर आहे. ती जागतिक स्तरावर फॅशनमधील सर्वात प्रभावशाली आवाजांपैकी एक आहे आणि भारतातील लक्झरी ब्रँडच्या इक्विटीवर तिचा अविश्वसनीय प्रभाव आहे.
सोनम तिच्या आई सुनीता कपूरला श्रेय देते की तिने तिच्यामध्ये शैली आणि फॅशनची उपजत भावना निर्माण केली. ती म्हणते की सुनीता कपूरनेच तिच्या स्टाइलच्या आवडीला प्रोत्साहन दिले ज्यामुळे ती आज फॅशन आयकॉन बनली आहे.
ती म्हणते, “तुम्हाला माहिती आहे की, चित्रपट उद्योगात जन्माला आल्याने, तुम्हाला तुमच्या घरात आणि बाहेर सुंदर लोक पाहण्याची सवय आहे आणि मला वाटते की ट्रेंड ठरवण्यात चित्रपटांचा मोठा हात आहे, विशेषतः भारतासारख्या देशात. मला असे वाटते की मी चित्रपट आणि फॅशनमध्ये खूप वाढले याचे हे एक कारण आहे.”
“माझी आई – ती एक मॉडेल होती, आणि नंतर ती एक अतिशय यशस्वी फॅशन डिझायनर बनली आणि आता ती ज्वेलरी डिझायनर आहे. मी अबू जानी, संदीप खोसला, तरुण ताहिलियानी, अनामिका खन्ना, अनुराधा वकील आणि या सर्व फॅशन डिझायनर्सच्या आसपास वाढली आणि त्यांनी मला क्लोथिंग, आंतरराष्ट्रीय फॅशन, भरतकाम आणि कट्स बद्दल खूप काही शिकवले. खासकरून माझी आई, ती जुनी जरीचे तुकडे, जमावर आणि जुन्या जरीच्या साड्या गोळा करत होती!”
सोनम पुढे म्हणते, “मी लहान असल्यापासून या गोष्टी माझ्या मनात रुजल्या होत्या. तिने मला फॅशनच्या जगामध्ये, अनेक आंतरराष्ट्रीय डिझायनर्सना, केवळ फ्रेंच आणि इटालियन डिझायनर्सनाच नव्हे, तर जपानी डिझायनर्स आणि इतर आशियाई डिझायनर्सना देखील दाखवले, ज्यामुळे मला जगभरातील एक्सपोजर मिळाले. फॅशनमध्येही तिची आवड होती; एक डिझायनर असल्याने, ती एक किरकोळ विक्रेता देखील होती, त्यामुळे माझ्या आईकडून समजूतदारपणा आला.”
वर्क फ्रंटवर, सोनम पुढील वर्षी सुरू होणाऱ्या दोन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे, एक बॅटल फॉर बिटोरा आणि दुसरा अद्याप गुपित ठेवण्यात आला आहे.
,‘टायगर फ्रँचायझी माझी फिल्मोग्राफी नेहमीच चमकवत ठेवेल !’
हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टारांपैकी एक, सलमान खान, टायगर 3 सोबत आणखी एक यशोगाथा लिहिल्याबद्दल आनंदी आहे! YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट जगभरात 400 कोटी कमावणार आहे आणि हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठा दिवाळी हिट चित्रपट नोंदवणार आहे!

सलमान म्हणतो, “तीन टायगर चित्रपट, तीन यशोगाथा. टायगर फ्रँचायझी माझ्या हृदयात बसली आहे आणि मला आनंद आहे की तिने प्रेक्षकांच्या हृदयात देखील स्थान मिळवले आहे. टायगर फ्रँचायझी माझी सर्वात प्रिय आहे आणि निश्चितपणे एक वारसा ब्रँड आहे जो माझी फिल्मोग्राफी नेहमीच उजळ करेल.”
त्याचा पहिला टायगर चित्रपट केवळ ब्लॉकबस्टर टायगर फ्रँचायझीसाठीच नाही तर केवळ हिट्स देणार्या वायआरएफ स्पाय युनिव्हर्ससाठी पायरी तयार करेल अशी त्याची अपेक्षा नव्हती!
सलमान म्हणतो, “जेव्हा मी एक था टायगर करत होतो, तेव्हा मला कल्पना नव्हती की आमचा सिक्वेल असेल, आता आमच्याकडे टायगर 3 मध्ये थ्रीक्वल आहे ! आता 2012 पासून जगभरातील स्वतःच्या मनोरंजक प्रेक्षकांसाठी एक फ्रेंचायझी आहे. कोणत्याही चित्रपटाच्या किंवा फ्रँचायझीच्या यशाचा पुरावा त्याच्या पटकथेत लिहिलेल्या यशोगाथेत असतो.”
तो पुढे म्हणतो, “माझ्या मते टायगर फ्रँचायझीने प्रेक्षकांना देसी जासूस दिला आहे ज्यावर लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. मी टायगर म्हणून जगलो आहे आणि माझ्याबद्दल आणि चित्रपटांबद्दलच्या प्रेमाबद्दल आणि कौतुकाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
आदित्य चोप्रा निर्मित आणि मनीश शर्मा दिग्दर्शित टायगर 3 हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे.
उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा पहिला व्हिडिओ समोर:सर्व 41 जण सुरक्षित; गरम खिचडी बाटल्यांमध्ये भरून पोहोचवली
सिल्क्यरा बोगद्यात हा अपघात १२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता झाला. बोगद्याच्या प्रवेश बिंदूच्या 200 मीटरच्या आत 60 मीटर माती खचली. 41 मजूर आत अडकले. 16 नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले आणि त्यामुळे ढिगारा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला.बोगद्यात अडकलेले कामगार बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Rescue team officials establish audio-visual contact with the workers trapped in the tunnel for the first time, through the pipeline and endoscopic flexi camera.
— ANI (@ANI) November 21, 2023
(Video Source: District Information Officer) pic.twitter.com/JKtAtHQtN4
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगद्यात १० दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांचे पहिले फुटेज समोर आले आहे. एन्डोस्कोपिक कॅमेरा रविवारी नवीन 6 इंच रुंद पाइपलाइनद्वारे आत पाठवण्यात आला. त्याद्वारे कामगारांशी चर्चा करण्यात आली. त्याच्या आरोग्याबद्दल जाणून घेण्यात आले. कामगारांची मोजणी करण्यात आली. सध्या सर्व कामगार सुखरूप आहेत.
मजुरांना अन्न पोहोचवतानाचे काही नवीन व्हिडिओही समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये बचाव पथक गरमागरम खिचडी बनवून बाटल्यांमध्ये भरताना दिसत आहे. दुसर्या व्हिडिओमध्ये या बाटल्या पाईपद्वारे पाठवल्या जात आहेत. मंगळवार दुपारपर्यंत बोगद्यातील ३ ठिकाणांहून खोदकाम सुरू होण्याची शक्यता आहे.
सोमवारी बचावकार्यात दोन महत्त्वाचे यश मिळाले. प्रथम, नवीन 6 इंच रुंद पाइपलाइन टाकण्यात आली. दुसरे म्हणजे, औगर मशीनसह काम करणार्या कामगारांना कोणत्याही अप्रिय घटनेपासून वाचवण्यासाठी एक बचाव बोगदा बांधण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ जारी, मोकळ्या जागेमध्ये सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची झाली पुष्टी.#UttarkashiTunnelCollapse #Uttarakhand #UttarkashiRescue@DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/itG2UIugE1
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) November 21, 2023
48 तासांत लघुपट बनवण्यासाठी ‘फिल्म चॅलेंज’ आज होणार प्रारंभ
गोवा 20 नोव्हेंबर 2023
संपूर्ण भारतातील 75 सर्जनशील प्रतिभावंत युवक इफ्फी 54 मध्ये 48 तासांत लघुपट बनवण्यासाठी ‘फिल्म चॅलेंज’ स्वीकारायला सज्ज झाले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर उद्या (21 नोव्हेंबर, 2023) ’75 क्रिएटिव्ह माइंड्स’चा प्रारंभ करतील.
54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेची तिसरी आवृत्ती सर्जनशील प्रतिभावंत युवकांच्या नवोन्मेष आणि कथा सादरीकरणातील प्रभुत्वाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली आहे.
या अनोख्या उपक्रमामुळे निवडक 75 स्पर्धकांना केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच इफ्फीमध्ये उपस्थित असलेल्या जागतिक चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी देखील ते संवाद साधतील आणि फिल्म बाजार येथे चित्रपट व्यवसायाचे साक्षीदार बनण्याची संधी मिळेल. “क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो” हा उपक्रम युवकांना चित्रपट निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि उद्याचे आघाडीचे चित्रपट निर्माते आणि कलाकार बनण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
600 हून अधिक अर्जांमधून निवडलेले हे 75 युवा चित्रपट निर्माते आणि कलाकार विविध पार्श्वभूमी असलेले आणि विविध ठिकाणचे आहेत जसे की बिष्णुपूर (मणिपूर), जगतसिंगपूर (ओडिशा), आणि सदरपूर (मध्य प्रदेश) वगैरे. हे स्पर्धक आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या भारतातील 19 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. त्यांची निवड नामवंत व्यक्तींचा समावेश असलेल्या सिलेक्शन ज्युरी आणि ग्रँड ज्युरी पॅनेलद्वारे करण्यात आली आहे.
सहभागींचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असून, विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, स्पर्धेच्या संगीत रचना/ ध्वनी डिझाइन श्रेणीत सहभागी होणारा शाश्वत शुक्ला हा सर्वात तरुण स्पर्धक महाराष्ट्रामधील मुंबईचा आहे, आणि त्याचे वय १८ वर्षे आहे.
सहभागींना चित्रपट निर्मिती संस्था, AVGC कंपन्या आणि स्टुडिओ यासह भारतातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधता यावा यासाठी यावर्षी एक CMOT टॅलेंट कॅम्प देखील आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मोहिमेत सहभागींना आपल्या कल्पना आणि यापूर्वी केलेले काम चित्रपट उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसमोर प्रदर्शित करता येतील.
ग्रँड ज्युरी सदस्य:
श्रेया घोषाल (पार्श्वगायन)
श्रीकर प्रसाद (संपादन)
मनोज जोशी (अभिनय)
वीरा कपूर (वेशभूषा आणि रंगभूषा)
प्रिया सेठ (सिनेमॅटोग्राफी)
सरस्वती वाणी बालगम (अॅनिमेशन, VFX, AR-VR)
सलील कुलकर्णी (संगीत रचना)
उमेश शुक्ला (दिग्दर्शन)
साबू सिरिल (कला दिग्दर्शन)
असीम अरोरा (स्क्रिप्ट रायटिंग)
निवड समिती सदस्य:
मनोज सिंग टायगर (अभिनय)
निधी हेगडे (अभिनय)
अभिषेक जैन (दिग्दर्शन)
मनीष शर्मा (दिग्दर्शन)
चारुदत्त आचार्य (पटकथालेखन)
दीपक किंगराणी (पटकथालेखन)
चारुवी अग्रवाल (अॅनिमेशन, VFX, AR-VR)
दीपक सिंग (अॅनिमेशन, VFX, AR-VR)
नवीन नूली (संपादन)
सुरेश पै (संपादन)
धरम गुलाटी (सिनेमॅटोग्राफी)
सुभ्रांशु दास (सिनेमॅटोग्राफी)
नचिकेत बर्वे (वेशभूषा आणि रंगभूषा)
बिशाख ज्योती (पार्श्वगायन)
अनमोल भावे (संगीत रचना)
सब्यसाची बोस (कला दिग्दर्शन)
10 श्रेणीतील 75 तरुण कलाकारांची यादी इफ्फीच्या संकेतस्थळावर पाहता येईल.
इफ्फी:कथाकथनाला नव्याने परिभाषित करण्याचे वचन देणाऱ्या चित्ताकर्षक चित्रपट विषयक प्रवासासाठी सज्ज व्हा
गोवा 20 नोव्हेंबर 2023
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात सादर होणारे 25 फीचर आणि 20 नॉन-फीचर चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट विषयक अनुभव देणार आहेत. ‘आत्तम’ या मल्याळी चित्रपटाच्या प्रदर्शनासह उद्या इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांच्या सादरीकरणाला सुरुवात होणार आहे. विविधतेतील एकता आणि समावेशकता यांच्या सर्वत्र व्यापणाऱ्या संकल्पनांवर बेतलेले आणि जीवनाच्या सर्व स्तरांतील संस्कृती, दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्वे आणि कथा यांच्या विस्तृत श्रेणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
भारतीय चित्रपट विभागात सादर होणारा आणि आनंद एकरसाही यांनी दिग्दर्शित केलेला हा उद्घाटनपर चित्रपट, आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवण्याची संधी मिळालेली एक स्त्री आणि बारा पुरुष यांच्या जीवनावर बेतलेला आहे.

‘अँड्रो ड्रीम्स’ हा मीना लोंगीयाम दिग्दर्शित चित्रपट, नॉन-फिचर विभागात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. मणिपुरमधील ग्रामीण भागातील एका गावात चित्रित करण्यात आलेला हा माहितीपट म्हणजे लैबी ही वृध्द स्त्री आणि तीन दशकांपासून सुरु असलेल्या केवळ मुलींसाठीच्या तिच्या फुटबॉल क्लबची कहाणी आहे. हा माहितीपट आर्थिक आव्हाने, ईशान्य भारतातील प्राचीन गावातली पितृसत्ताक सामाजिक व्यवस्था आणि रुढीवाद यांच्याशी सुरु असलेल्या या क्लबच्या लढ्याचे दर्शन घडवतो.
अँड्रो ड्रीम्स
इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात दाखवल्या जाणाऱ्या फीचर आणि नॉन-फीचर चित्रपटांतून चित्रपट रसिकांना अत्यंत आनंददायी अनुभव मिळणार असून त्यातून भारतीय चित्रपटांची वैशिष्ट्यपूर्ण कथाकथन शैली आणि सांस्कृतिक समृद्धी यांच्या जगात त्यांना उत्सुकतेने विहार करता येईल.
चित्रपट कलेच्या मदतीने भारताची समृध्द संस्कृती आणि वारसा यांच्यासह भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्ष 1978 मध्ये इफ्फीच्या छत्राखाली भारतीय चित्रपट विभागाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासूनच, भारतीय चित्रपट विभाग वर्षभरातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्याप्रती समर्पित राहिला आहे.
परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना तब्बल ३० कोटी पर्यंत अर्थसहाय्य करणार : अनुराग सिंह ठाकूर- प्रोत्साहनपर निधी चित्रिकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या 40% पर्यंत देणार
गोवा20 नोव्हेंबर 2023आपल्या सिनेमाचं भारतात चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत वाढ करून ती चित्रिकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या 40% इतकी केली जाईल अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली आहे. गोव्यात पणजी इथे होत असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. यासाठीची यापूर्वीची मर्यादा वाढवून ती 30 कोटी रुपये (3.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त) केली जाईल असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी, प्रत्येक प्रकल्पासाठीच्या प्रोत्साहनाची मर्यादा केवळ 2.5 कोटी रुपये होती. यासोबतच ज्या सिनेमांमध्ये भारताशी संबंधीत महत्त्वाचा आशय [Significant Indian Content (SIC)] असेल अशा चित्रपटांसाठी अतिरिक्त 5% निधी बोनस म्हणून दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली.
ठाकूर म्हणाले की, भारताचे आकारमान आणि इथली अफाट क्षमता लक्षात घेता मध्यम आणि मोठ्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांना देशात आकर्षित करण्यासाठी अधिक सवलत देण्याची गरज होती. “चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीत केलेली वाढ कलात्मक अभिव्यक्तीप्रती भारताच्या वचनबद्धतेचा आणि पाठिंब्याचा दाखला आहे आणि चित्रपट निर्मितीसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून आमची भूमिका अधिक बळकट करते ” असे ते पुढे म्हणाले.
सुप्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या वैभवशाली कारकिर्दीचा गौरव करत 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तिला ‘भारतीय चित्रपटांतील योगदानाबद्दल विशेष सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे, “दीर्घ काळ गाजवलेले एक आयकॉनिक व्यक्तिमत्त्व म्हणून माधुरी दीक्षित हिने गेली चार दशके तिच्या अतुलनीय प्रतिभेने आपल्या भारतीय चित्रपटांना शोभा आणली आहे.”

यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ मध्ये निवडलेल्या युवकांसाठी भरती मोहिमेची घोषणा केली, ज्यामुळे त्यांच्या बहरलेल्या प्रतिभेसाठी आणि कारकीर्दीसाठी अमर्याद संधी खुल्या होतील. ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ चे यंदा तिसरे वर्ष असून युवकांना त्यांची सर्जनशील अभिव्यक्ती सिनेमाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून 2021 मध्ये याची सुरुवात झाली. “या वर्षी, 10 श्रेणींमध्ये सुमारे 600 प्रवेशिका आल्या , त्यापैकी 75 युवा चित्रपट निर्माते 19 राज्यांमधून निवडण्यात आले , यामध्ये बिष्णुपूर, जगतसिंगपूर आणि सदरपूर सारख्या दुर्गम भागांचा समावेश आहे”, असे ते पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यंदाच्या इफ्फी (IFFI) मध्ये पुरस्कारांच्या श्रेणीत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) या नवीन श्रेणीची घोषणा केली. महोत्सवातील नवीन गोष्टींवर प्रकाश टाकत ते म्हणाले की, भारतातील आशय संपन्न साहित्य निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी रोजगार निर्मिती आणि नवोन्मेष, यासाठी दिलेलं योगदान लक्षात घेत, त्यांच्या परिवर्तनशील भूमिकेला इफ्फी मध्ये मान्यता दिली जाईल आणि त्यांचा गौरव केला जाईल. ते म्हणाले, “सिनेजगत आणि माहितीपट विभागातील नवोन्मेष प्रदर्शित करून, नॉन-फिक्शन स्टोरीटेलिंग, अर्थात वास्तववादी कथा कथनाला प्रोत्साहन देण्यासाठी अद्ययावत ‘VFX आणि टेक पॅव्हेलियन’ चे आयोजन करून, इफ्फिने प्रथमच फिल्म बाजार उपक्रमाची व्याप्ती वाढवली आहे.”
महिला सक्षमीकरणासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, यंदाच्या इफ्फीमध्ये 40 महिला चित्रपट निर्मात्यांचे उल्लेखनीय चित्रपट दाखवले जातील. “त्यांची प्रतिभा, सृजनशीलता आणि असामान्य दृष्टीकोन, या महोत्सवात विविध गटांचे आणि आशयाचे प्रतिनिधित्व करेल.”.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राद्वारे सर्वसमावेशक आणि सर्वांना प्रवेश देणाऱ्या भारताच्या निर्मितीवर सातत्याने भर दिला आहे. पंतप्रधानांचा हा दृष्टीकोन पुढे नेत, इफ्फी ने सर्वसमावेशकतेला मार्गदर्शक तत्त्व बनवून ‘सबका मनोरंजन’ म्हणजेच ‘सर्वांसाठी मनोरंजन’ याचा पुरस्कार केला आहे, यावर त्यांनी भर दिला. “यंदाच्या महोत्सवातील सर्व आयोजन स्थळे दिव्यांग जनांसाठी सोयीसुविधांनी सुसज्ज असतील.
दृष्टी आणि श्रवणदोष असलेल्या प्रतिनिधींसाठी एम्बेडेड ऑडिओ वर्णनासह, चित्रपटांची चार अतिरिक्त विशेष स्क्रीनिंग्ज आयोजित केली जातील”, असे ते पुढे म्हणाले.
एकत्रित आणणारी शक्ती म्हणून सिनेमाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करताना ठाकूर यांनी सांगितले की, “चित्रपटाचा संपूर्ण इतिहास जर पाहिला तर चित्रपटाने कल्पना, कल्पनाशक्ती आणि नवोन्मेष अशा प्रकारे पकडला आहे आणि त्याला अशाप्रकारे त्याला पैलू पाडले आहेत की, चित्रपट हे दुहीमुळे अधिकाधिक व्यथित होत असलेल्या जगात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी प्रेरक शक्ती ठरतात, यावर माझा ठाम विश्वास आहे.”
भारतातील प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी अलीकडच्या काळात भारत सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांना देखील अनुराग सिंह ठाकूर यांनी स्पर्श केला. “अलीकडेच, माननीय पंतप्रधान, नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक, 2023 ला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीं सदनांकडून मंजुरी मिळाली आहे. हा कायदा केवळ कायदेशीर चौकटच विस्तृत करत नाही, तर कॉपीराईट संरक्षणाचा समावेश करण्यासाठी सेन्सॉरशिपच्या पलीकडे लक्ष केंद्रित करतानाच पायरसीविरूद्ध कठोर उपाय देखील प्रदान करतो,असे त्यांनी सांगितले .
सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणून चित्रपटांची असलेली भूमिका अधोरेखित करत केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “चित्रपट क्षेत्राच्या इतिहासात, चित्रपटांनी विविध संकल्पना, कल्पना आणि नवोन्मेष यांचे अशा प्रकारे चित्रण आणि विश्लेषण केले आहे की त्यातून विभाजनाच्या वाढत्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या जगात शांतता, प्रगती आणि समृद्धी यांच्यासाठीची प्रेरक शक्ती तयार झाली आहे.”
कलाकारांच्या द्रष्ट्या कार्यातून निर्माण झालेल्या वैज्ञानिक शक्यतांचा संबंध भारताच्या यशस्वी चंद्रयान-3 मोहिमेशी जोडताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “वर्ष 1902 मध्ये म्हणजे अवकाश संशोधनाची कल्पना जन्माला येण्याच्या किंवा त्याची कल्पना करण्याच्याही कितीतरी आधी जॉर्जेस मेलीस यांच्या ‘अ ट्रीप टू द मून’ या फ्रेंच चित्रपटाच्या रूपातील कलेच्या द्रष्ट्या आविष्काराने त्या दिशेने वैज्ञानिक शक्यतांची आणि प्रगतीची बीजे लोकांच्या मनात रोवली.” केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “चित्रपटांमध्ये अतुलनीय सामर्थ्य आहे आणि त्यातील संकल्पना ज्या प्रकारे आपल्या जगाला आकार देतात ते पाहणे अत्यंत रोमांचक आहे.”
2023 च्या प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या हॉलिवूड अभिनेते /निर्माते मायकेल डग्लस यांचे अनुराग सिंह ठाकूर यांनी अभिनंदन केले. त्यांनी इंडियन पॅनोरमा, सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) आणि उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या प्रतिष्ठित परीक्षकांचेही मनापासून आभार मानले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना मंत्री म्हणाले की, इफ्फीसाठीचा त्यांचा दृष्टीकोन केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित नाही, तर जेव्हा आपण अमृत महोत्सवातून अमृत काळामध्ये संक्रमण करत आहोत आणि भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वे वर्ष साजरी करेल तेव्हा इफ्फी कशाप्रकारे असावा, हा दृष्टोकोनही यामागे आहे, असे ते म्हणाले.
आपल्या सिनेमाचं भारतात चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत 30 % वरून वाढ करून तो 40% करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी गोव्यात पणजी इथे 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली. यासाठीची मर्यादा वाढवून 30 कोटी रुपये (3.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त) करण्यात आली असून ज्या सिनेमांमध्ये भारताशी संबंधीत महत्त्वाचा आशय असेल अशा चित्रपटांसाठी अतिरिक्त 5% बोनस दिला जाईल. यामुळे मध्यम आणि मोठ्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्पांना देशात आकर्षित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळेल.भारतात परदेशी चित्रपट निर्मिती प्रक्रिया सुटसुटीत करण्याबरोबरच व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे.परदेशी चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन योजना भारताने गेल्या वर्षी कान्स येथे जाहीर केली होती. यामध्ये देशात चित्रीकरण करणाऱ्या संस्थांना चित्रपट निर्मितीसाठी आलेल्या खर्चाच्या 30% पर्यंत आणि कमाल 2.5 कोटी रुपयांपर्यंत परतफेड मिळते. गोव्यात घोषणा करताना ठाकूर म्हणाले, “चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनात केलेली वाढ कलात्मक अभिव्यक्तीप्रति भारताच्या वचनबद्धतेचा आणि पाठिंब्याचा दाखला आहे आणि चित्रपट निर्मितीसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून आमचे स्थान अधिक बळकट करते.”माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने (केवळ माहितीपटांसाठी) 1.04.2022 नंतर चित्रीकरणासाठी परवानगी दिलेल्या आंतरराष्ट्रीय निर्मिती संस्थाच या प्रोत्साहन योजनेसाठी पात्र असतील. अंतरिम आणि अंतिम अशा दोन टप्प्यात प्रोत्साहन वितरीत केले जाईल. भारतात चित्रपट निर्मितीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंतिम वितरणाचा दावा करता येईल. विशेष प्रोत्साहन मूल्यमापन समितीच्या शिफारशीनुसार प्रोत्साहन दिले जाईल. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी ) अंतर्गत स्थापन करण्यात आलेले चित्रपट सुविधा कार्यालय ही प्रोत्साहन योजना राबवत आहे. हे कार्यालय एक-खिडकी सुविधा आणि मंजुरी यंत्रणा म्हणून काम करते आणि भारतात चित्रीकरण सुलभ करते, तसेच एक चित्रपट-स्नेही परिसंस्था उभारण्याचा प्रयत्न करते आणि चित्रीकरणासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून देशाचा प्रचार करते.चित्रपट सुविधा कार्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा आता भारतीय चित्रपट निर्मात्यांना देखील पुरवण्यात येत आहेत. योजनेची विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे चित्रपट सुविधा कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत: https://ffo.gov.in/enया क्षेत्रातील घोषणा आणि धोरणात्मक हस्तक्षेपांचा उद्देश अर्थव्यवस्थेला चालना देणे, रोजगार निर्माण करणे आणि देशात पर्यटन आणि संस्कृतीला चालना देणे हा आहे. एव्हीजीसी : अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि पोस्ट-प्रॉडक्शन सेवा सारख्या उदयोन्मुख उद्योगांनाही चित्रपट क्षेत्रातील नव्या उपक्रमांचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
इफ्फी: माधुरी दीक्षितचा ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष मान्यता’ पुरस्काराने सन्मान
गोवा 20 नोव्हेंबर 2023 -ख्यातनाम अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांना आज ‘विशेष सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या चार दशकांच्या शानदार कारकीर्दीमध्ये, माधुरी दीक्षित यांनी भारतीय चित्रपट उद्योगावर आपला अमीट ठसा उमटवला आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज गोव्यामध्ये पणजी इथे आयोजित 54 व्या इफ्फीच्या उद्घाटन समारंभात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या पुरस्काराची घोषणा केली.
“माधुरी दीक्षित यांनी चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या असामान्य प्रतिभेची छाप निर्माण केली आणि दीर्घ काळ जनमानसांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे”, केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले.

वैविध्यपूर्ण भूमिका जिवंत करण्याच्या त्यांच्या क्षमतेने अनेक पिढ्यांमधील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान’ पुरस्कार माधुरी दीक्षित यांची अपवादात्मक कामगिरी आणि भारतीय सिनेमावरील त्यांचा दीर्घकालीन प्रभाव, याची प्रचीती देत आहे. 1980, 90 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांमधील प्रमुख अभिनेत्री, माधुरी दीक्षित यांना सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून, विक्रमी चौदा वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. माधुरी दीक्षित यांनी ‘अबोध’ (1984) या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि ‘तेजाब’ (1988) चित्रपटाने त्यांना व्यापक लोकमान्यता मिळवून दिली. 2014 मध्ये त्यांची भारतातील युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाली होती.
