Home Blog

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा महोत्सव-केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ

फर्ग्युसन महाविद्यालय येथे १३ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन

पुणे, दि.१३: पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात पुणे ही पुस्तकाची राजधानी करण्यासाठी प्रयत्न करणार असून पुढील वर्षी हा महोत्सव जागतिक पुस्तक महोत्सव म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु सुरेश गोसावी, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक विश्वास पाटील, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, ,पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, पुस्तक महोत्सव संयोजन समितीचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

पहिल्या पुस्तक महोत्सवात सुमारे ११ कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी ४० कोटी रुपयांची पुस्तक विक्रीद्वारे या पुस्तक महोत्सवाला प्रतिसाद वाढत असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, जगाची पुस्तकाची राजधानी पुणे व्हावी, याकरिता या वर्षीच्या जागतिक पातळीवर होणाऱ्या पुस्तकासंबंधित उपक्रमात पुणे पुस्तक महोत्सवाने सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचे युनेस्कोमार्फत मूल्यमापन करण्यात येत आहे, त्यामुळे जागतिक पुस्तकाची राजधानी पुणे व्हावी याकरिता अधिकाधिक नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी. असे झाल्यास पुढच्या वर्षी पुणे पुस्तक महोत्सव हा जागतिक पुस्तक महोत्सव म्हणून आयोजन करण्यात येईल, या माध्यमातून जागतिक पातळीवरील प्रकाशक, लेखक या ठिकाणी येतील.

पुस्तक वाचनाचा आनंद मोठा असतो त्यामुळे ई-बुकच्या युगात पुस्तकाचे वाचन सुरुच राहील. मातृभाषा मराठी भाषेचा अभिमान वाटेल अशी भाषा आहे, देशात सुमारे १२ कोटी मराठी भाषिक आहेत, अशा मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी नाटक व चित्रपट पहावेत, साहित्याचे वाचन करावे, गीत ऐकावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

श्री. मोहोळ म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला मागील दोन वर्षात वाचकांची मोठया प्रमाणात उपस्थिती, पुस्तकाची विक्रमी विक्री, साहित्य महोत्सवाच्या माध्यमातून विद्वतापूर्ण आणि वैचारिक मंथन घडवून आणणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन तसेच विविध जागतिक विक्रम झाले असल्याने हा महोत्सव पुस्तक खरेदीचा महोत्सव न राहता खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा महोत्सव म्हणून ओळखला जात आहे.

ते पुढे म्हणाले, येथे देश विदेशातील विविध भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत, याचाच अर्थ पुणे हे साहित्य, कला, संस्कृती याच मानबिंदू असलेले शहर म्हणून ओळख आहे. या महोत्सवाकडे वाचन संस्कृतीला समृद्ध करण्याचे व्यासपीठ म्हणून बघितले जात असून पुणेकरांच्या मनात या महोत्सवाबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. अभिजात मराठी भाषासह सर्व भारतीय भाषेचे संवर्धन, नवोदित लेखकांना व्यासपीठ तसेच सर्व वयोगटात वाचन संस्कृती रुजविण्याचे काम या महोत्सवाने केले आहे. पुणे शहर हे ज्ञानाची, विचाराची आणि सांस्कृतिक परंपरेची नगरी असून या परंपरेला साजेसा वाचन महोत्सव पुणेकरांनी मनापासून स्वीकारला आहे, असेही ते म्हणाले.

या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय भाषेचे अनुवाद, साहित्यिकांच्या विचाराचे आदानप्रदान चालना, वैविध्यपूर्ण भारतीय साहित्य, संस्कृती आंतरराष्ट्रीय वाचकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, येत्या काळात पुण्याला पुस्तकाची राजधानीचा दर्जा मिळण्यास मदत होईल तसेच दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाच्या धर्तीवर पुढच्या वर्षी पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन होईल, अशा विश्वास श्री. मोहोळ यांनी व्यक्त केला.

विश्वास पाटील म्हणाले, दिल्ली आणि कलकत्ता येथील पुस्तक महोत्सवाप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा भव्य महोत्सव आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करुन येत्या काळात पुणे ही पुस्तकाची राजधानी होण्यास मदत होईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

पुणे पुस्तक महोत्सवामध्ये सुमारे ७५० हून अधिक पुस्तकाचे दालन आहेत. पुणे साहित्य महोत्सवात साहित्यक, कलाकार आदी सहभागी होणार आहेt असे सांगून श्री. मराठे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाच्या धर्तीवर उपराजधानी नागपूर येथे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला. येत्या काळात गोवा येथे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. वाचन संस्कृतीची चळवळ अशीच अखंडपणे पुढे चालत राहावी याकरीता प्रयत्न करणार आहोत. असेही ते म्हणाले.

श्री. पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता हा ‘पुणेकरांचा उत्सव’ झालेला आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते; परंतु पुढच्या वर्षी पुणे ही पुस्तकाची जागतिक राजधानी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पुणे साहित्य महोत्सवाचे १६ डिसेंबर पासून आयोजन करण्यात येणार असून सुमारे १५० हून अधिक नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत, असेही श्री. पांडे म्हणाले.

यावेळी विश्वास पाटील लिखित ‘लस्ट फॉर मुंबई’ या कांदबरीचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमानंतर मान्यवरांनी पुणे पुस्तक महोत्सवातील विविध दालनाला भेट देऊन विविध पुस्तकाविषयी माहिती घेतली.
0000

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

0

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार ही गंभीर समस्या बनली आहे. जवळपास रोज कुठे ना कुठे बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असून अनेक ठिकाणी निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर वनखात्याकडून सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांवरून राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलामध्ये एक कोटी शेळ्या सोडण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेत बोलताना तीव्र नाराजी व्यक्त करत, हा निर्णय अत्यंत हास्यास्पद असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यावर उपाय शोधताना गंभीरतेचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

अजित पवार यांनी बिबट्यांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, राज्यात बिबट्यांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक असण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यांना पकडून वनतारामध्ये हलवण्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी वास्तव मांडले. वनताराकडून राज्य सरकारला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ते 50 पेक्षा अधिक बिबट्यांना सामावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्व बिबटे पकडून वनतारामध्ये सोडणार, अशा चर्चा प्रत्यक्षात अमलात आणणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच संदर्भात जंगलामध्ये एक कोटी शेळ्या सोडण्याच्या कल्पनेवर अजित पवारांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बिबट्यांची नसबंदी हा पर्याय चर्चेत असला तरी, त्याचे परिणाम दिसायला अनेक वर्षांचा कालावधी लागेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तातडीच्या समस्येवर दीर्घकालीन आणि अव्यवहार्य उपाय सुचवले जात असल्याचा सूर त्यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे उमटला.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर, नाशिक, नागपूर, पुणे यांसह ग्रामीण आणि शहरी भागांत बिबट्यांचा शिरकाव वाढला आहे. मानवी वस्तीच्या आसपास बिबटे दिसू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. लहान मुले, शेतकरी, महिला आणि वृद्ध हे हल्ल्यांचे बळी ठरत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जंगलाबाहेर बिबटे येऊ नयेत, यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलात एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामागे जंगलातील भक्ष्याची कमतरता हे कारण पुढे करण्यात आले होते. मात्र, या उपायावर आता प्रशासन, राजकारण आणि समाजातील विविध घटकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन करताना सांगितले होते की, सध्या जंगलांमध्ये हिंस्त्र प्राण्यांसाठी आवश्यक असलेले भक्ष्य उपलब्ध नाही. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे वळत आहेत. यावर उपाय म्हणून प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांसाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग लावून जंगलात सोडण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले होते. प्रत्येक गावात जसा नंदी असतो, तशाच पद्धतीने या शेळ्या-बकऱ्या असतील, असे उदाहरण देत त्यांनी या योजनेचं समर्थन केलं होतं. काही ठिकाणी वनखात्याने अशा शेळ्या सोडल्याचा दावा करत, नागरिकांनी त्यांचे संरक्षण करावे, जेणेकरून बिबट्यांचा धोका माणसांवर येणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, या योजनेच्या व्यवहार्यतेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.

याचबरोबर, गणेश नाईक यांनी बिबट्यांना आफ्रिकेला पाठवण्याबाबतही वक्तव्य केल्याने वाद अधिकच वाढला. ज्या भागांत बिबट्यांची संख्या जास्त आहे, तेथील बिबटे आफ्रिकेला हलवण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. आफ्रिकेमध्ये वाघ आणि सिंह आहेत, मात्र बिबटे नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे तिकडे पाठवण्याबाबत केंद्रीय वनखात्याकडे विचारणा केल्याचा दावाही त्यांनी केला. या वक्तव्यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एकीकडे बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत असताना, दुसरीकडे उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने राज्य सरकारसमोर ही समस्या अधिकच आव्हानात्मक बनली आहे. अजित पवार यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर सरकार कोणती ठोस आणि व्यवहार्य भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता झाल्या आहेत हे शोभनीय नाही. मुंबई सारख्या शहरातून जर हे होत असेल तर महाराष्ट्रामधील नागरिकांमध्ये भीतीचे काय वातावरण आहे हे आपल्याला कळेल, हे सर्व रॅकेट आहे. सरकार विरोधकांवर आमदारांवर कारवाई करत असताना ही गँग कधी मोडणार आहे. या गँगबद्दल सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे, ते पकडले जातात आणि बेलवर बाहेर येतात. यावर काही कारवाई होणार का नाही? असा सवाल ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे.

सचिन अहिर म्हणाले की, आजच सकाळी राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे. आम्ही स्थगन प्रस्ताव मांडतो आहोत पण आम्हाला वेळ दिली जात नाही. सरकारला हे आकडे लपवायचे आहेत का? राज ठाकरे यांनी पोस्ट केल्यानंतर आता या प्रकरणाला वाचा फुटणार आहे. सभागृहाचे कामकाज तहकुब करत या विषयावर चर्चा झाली पाहिजे.

सचिन अहिर म्हणाले की, बेपत्ता झालेली मुलं सापडली हे सरकारकडून खोटं सांगण्यात येत आहे. बेपत्ता झालेले किंवा हरवलेले 2 ते 5 टक्के मुलं वापस आली आहेत. पण ज्यांचे अपहरण केले ती मुले वापस आली असे जर तुम्ही बोलणार असाल तर त्या अपहरण करणाऱ्यांनी ती वापस आणून सोडली मग काही सौदा झाला का? अपहरण करत मुलांना विकले जाते, त्यांना भीक मागायला लावली जाते. यामध्ये परदेशातील गँग सहभागी आहे का?असा सवाल उपस्थित होत आहे.

सचिन अहिर म्हणाले की, अखंड महाराष्ट्र ही आमची भूमिका आहे. भाजपचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री वेगळा विदर्भ आमच्या अजेंडामध्ये आहे स्पष्टपणे सांगत आहेत. कधी करणार हे मात्र ते सांगत नाही. मुख्यमंत्रीपदावर बसून वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडणे योग्य नाही. आमची भूमिका पहिल्यापासून अखंड महाराष्ट्राची आहे. वडेट्टीवार हे कधी तरी आमच्यासोबत होते तेव्हा त्यांची भूमिका काय होती आणि आज त्यांची भूमिका काय आहे हे सर्वांना माहिती आहे.

सचिन अहिर म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात केवळ वेळ घालवण्याचे काम सुरू आहे. यांना लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेतेपद आणि विरोधक नकोत.

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातले आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील,” असा दावा आंबेडकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होणाऱ्या मेगा भरतीमुळे शिंदे गटाची कोंडी झाली होती. या नाराजीतून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. यानंतर शिंदेंनी तडकाफडकी दिल्ली गाठून अमित शाह यांची भेट घेतली. सुरुवातीला महापालिका निवडणुका वेगळे लढणार असल्याचे भाजप सांगत होती. मात्र, आता युती करून लढू असे आता म्हणत आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठे भाकित केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्वतःची ‘पॉवर’ काय आहे, हे भाजपला दाखवून दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला आता माघार घ्यावी लागणार आहे. शिंदेंची ही किमया असून त्यांनी अमित शाह यांच्यासारख्या नेत्यालाही खिशात घातले आहे. त्यामुळे आता भाजपला शिंदे गटासोबत युती करूनच निवडणुका लढाव्या लागतील.”

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न करता उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. “शिंदेंना मुख्यमंत्री केले नाही, त्याचा हा बदला असावा. शिंदेंनी जी खेळी खेळली आहे, त्यावरून ते येत्या महिना-दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होतील, असेच चित्र दिसत आहे,” असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली होती. या भेटीचा संदर्भ देत आंबेडकर म्हणाले, “शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत. शिंदे आणि पवार यांच्या भेटीतून शिंदेंनी भाजपला योग्य तो संदेश दिला आहे. अमित शाह यांना झुकवण्यामागे या भेटीचाही संदर्भ असू शकतो.”दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये नक्की काय शिजतंय आणि भविष्यात मुख्यमंत्रीपदात बदल होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

‘दिव्या खाली दौलत’ला द्वितीय तर ‘रंग जाणिवांचे’ तृतीय क्रमांकाने सन्मानित!

मुंबई : सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या प्रथम पारितोषिकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाश योजना असे पाच पुरस्कार पटकावून कल्याण वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल,चे ‘अडलंय ‘का’ हे बालनाट्य अव्वल ठरले. कल्पनाशक्तीने समृद्ध अशा १९ दर्जेदार बालनाट्यांमध्ये ही रंगतदार चुरस रंगली होती. यंदा रविकिरण मंडळाची ही स्पर्धा मंडळाचे ज्येष्ठ, निष्ठावान सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लालमातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली होती. मंडळाचे जेष्ठ सभासद अशोक परब यांचा कलाक्षेत्रातील कार्याबद्दल आणि हेमंत चव्हाण यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेच्या निकालासाठी विशेष अतिथी म्हणून ‘सन मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांची विशेष उपस्थित होती. दोन्ही मान्यवरांचे ‘बालरंगभूमी’ व ‘रंगकलेशी’ जिव्हाळ्याचे अतूट नाते असल्याचे दिसून आले. मुलांनी दाखवलेले अभिनय कौशल्य, सादरीकरणातील पकड आणि लेखकांनी खास तयार केलेल्या संहितांतील अद्भुत कल्पनाशक्ती, काळानुसार विषयंतील विविधता यामुळे यंदाची स्पर्धा अविस्मरणीय ठरली. या स्पर्धेत आपले कलागुण दाखविणारे बालकलावंत उद्याचे चमकते तारे असणार आहेत हे निश्चित असे दीपक राजाध्यक्ष यांनी उद्गार काढले.

या स्पर्धेचे परीक्षण लोकप्रिय युवा अभिनेत्री पूर्वा पवार, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक हेमंत सुहास भालेकर आणि ज्येष्ठ नाट्यसमीक्षक, निवेदक, कलादिग्दर्शक व पत्रकार नंदकुमार परशुराम पाटील यांनी केले. अभिनेते प्रमोद पवार, नारायण जाधव, महेंद्र पवार, विनोद पवार यांसह अनेक दिग्गज कलावंतांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली.

सर्वोत्कृष्ट बालनाट्य, लेखन व दिग्दर्शनाच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय अभिनेत्री या पुस्कारांवर ‘दिंडी ‘झ’ प्रतिष्ठान’च्या ‘दिव्या खाली दौलत’ने नाव कोरले तर सर्वात्कृष्ट अभिनय व लेखनाच्या प्रथम पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय बालनाट्य व दिग्दर्शनासह उत्तेजनार्थ अभिनेत्रीचा सन्मान ‘मुक्तछंद नाट्य संस्थेच्या ‘रंग जाणिवांचे’ला मिळाले. अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन, पुणे यांच्या सर्कस या बालनाट्यास स्पेशल ज्युरी अवॉर्डने गौरवण्यात आले. तसेच पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम विलेपार्ले शाळेच्या ‘रे क्षणा’ ला, तर दुसरे उत्तेजनार्थ ‘संदेश विद्यालय, पार्क साईट’च्या ‘होता जिवा म्हणुन वाचला शिवा’ ला देण्यात आले. १९ उत्कृष्ट बालनाट्यांमधून हा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

श्री नागेश शशिकला नामदेव वांद्रे (अध्यक्ष, रवीकिरण मंडळ)
“रवीकिरण बालनाट्य स्पर्धेला गिरणगावच्या सांस्कृतिक इतिहासात अप्रतिम असे स्थान आहे. अनेक दिग्गज कलाकारांना त्यांच्या कलेचे पहिले व्यासपीठ याच स्पर्धेमधून लाभले, ही या उपक्रमाची सर्वात मोठी ताकद आहे. ३९ वर्षांपासून पारदर्शक निर्णयप्रक्रिया, सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि बालरंगभूमीप्रती असलेल्या अपार निष्ठेमुळे रवीकिरणने या क्षेत्रात भक्कम, उठावदार आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. यंदाही परीक्षक म्हणून लाभलेल्या मान्यवरांनी बालरंगभूमीची जाण, संस्कार आणि संवेदनशीलता जपत, गेल्या दोन दिवसांत अत्यंत सूक्ष्म, प्रामाणिक आणि न्याय्य मूल्यांकन केले आहे. गिरणगावाशी त्यांचे असलेले आपुलकीचे नाते आणि रवीकिरणच्या कार्यावरील त्यांचे प्रेम हीच आमच्या परंपरेची खरी संपत्ती आहे.”

श्री विजय पुष्पलता राजाराम टाकळे (माजी अध्यक्ष, रवीकिरण मंडळ)
“गेल्या ३९ वर्षांची ही अनुपम परंपरा, रविकिरण मंडळाच्या तीन पिढ्यांनी मनापासून जपली आहे. गिरणगावच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या पूर्वजांनी सामाजिक मूल्यांचा आणि संस्कारांचा जो दिवा आमच्या हातात दिला, तो पुढील पिढीकडे अखंड तेजाने पोहोचवण्याचे आमचे कर्तव्य आहे, आणि आनंदाची गोष्ट अशी की आमची नवी पिढीही प्रत्येक कसोटीवर उत्तमरीत्या खरी उतरते आहे. रवीकिरणची बालनाट्य स्पर्धा असो किंवा समाजाभिमुख उपक्रम—ही परंपरा आमची तरुण पिढी आगामी काळातही निष्ठेने, उत्साहाने आणि नवचैतन्याने पुढे नेत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.”

संपूर्ण निकाल खालील प्रमाणे

मनोहर नगरकर आणि रंगकर्मी रघुनाथ कदम स्मृतिगत रविकिरण आयोजित ३९वी बालनाट्य स्पर्धा २०२५
निकालपत्र
उत्कृष्ट संगीत लाईव्ह): मधुरा / किमया कुबाडे / निष्ठी/ स्वरा / धवल मांडवकर
बालनाट्याचे नाव: रे क्षणा
शाळा संस्थेचे नाव: पार्ले टिळक, विलेपार्ले

उत्कृष्ट ध्वनी : अजिंक्य गोविलकर / आदर्श गायकवाड
बालनाट्याचे नाव : न्यानाचा प्रकाश
संस्थेचे नाव : लेक्सीकॉन ग्लोबल स्कूल

उत्कृष्ट प्रकाश योजना : हृषिकेश वायदांडे
नाट्याचे नाव : अडलंय “का”
शाळा संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, कल्याण

उत्कृष्ट नेपथ्य : प्रितीश खंडागळे, संदेश पडवळ
बालनाट्याचे नाव: शाळा/ संस्थेचे नाव : अडलंय “का”
शाळा संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, कल्याण

लेखन
लेखन तृतीय
लेखकाचे नाव : जयेश जोशी
बालनाट्याचे नाव : अवकाश
शाळा/ संस्थेचे नाव : अभिरंग बालकला संस्था, कल्याण

लेखन द्वितीय
लेखकाचे नाव : कृणाल रविंद्र दळवी
बालनाट्याचे नाव : दिव्या खाली दौलत
शाळा/ संस्थेचे नाव : दिंडी ‘झ प्रतिष्ठान

लेखन प्रथम
लेखकाचे नाव : संदिप प्रभु गचांडे
बालनाट्याचे नाव : रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव : मुक्तछंद नाट्यसंस्था

दिग्दर्शन
दिग्दर्शन तृतीय
दिग्दर्शकाचे नाव : करिष्मा विलास वाघ
बालनाट्याचे नाव : रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव : मुक्तछंद नाट्यसंस्था

दिग्दर्शन द्वितीय
दिग्दर्शकाचे नाव : कृणाल रविंद्र दळवी
बालनाट्याचे नाव : दिव्या खाली दौलत
शाळा/ संस्थेचे नाव : दिंडी ‘झ प्रतिष्ठान

दिग्दर्शन प्रथम
दिग्दर्शकाचे नाव : सुरेश. बा. शेलार
बालनाट्याचे नाव : अडलंय “का”
शाळा/ संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, कल्याण

अभिनय मुली

उत्तेजनार्थ
मुलीचे नाव : श्राव्या कुलकर्णी
भूमिकेच नाव : कनक
बालनाट्याचे नाव : नातं
शाळा/ संस्थेचे नाव: सुलु नाट्यसंस्था वाशी

उत्तेजनार्थ
मुलीचे नाव : स्वरा मेस्त्री
भूमिकेचे नाव : आई
बालनाट्याचे नाव: रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव: मुक्तछंद नाट्यसंस्था

तृतीय
मुलीचे नाव : आश्री कदम
भूमिकेचे नाव : शिक्षिका
बालनाट्याचे नाव : रे क्षणा
शाळा/ संस्थेचे नाव : पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले

द्वितीय
मुलीचे नाव : वल्हभी लोखंडे
भूमिकेचे नाव : आजी
बालनाट्याचे नाव : न्यानाचा प्रकाश
शाळा/ संस्थेचे नाव : लेक्सीकॉन ग्लोबल स्कूल

प्रथम
मुलीचे नाव : वंशीका विशाल घोगरे
भूमिकेचे नाव : अन्वेशा
बालनाट्याचे नाव : अडलंय “का”
शाळा/ संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, वरप- कल्याण

अभिनय मुले
उत्तेजनार्थ
मुलाचे नाव : डॅनियल ब्रम्हभट
भूमिकेच नाव : विक्रम साराभाई
बालनाट्याचे नाव : आकाशाच्या पलीकडे
शाळा/ संस्थेचे नाव : सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल, ठाणे

उत्तेजनार्थ
मुलाचे नाव : आरव भट
भूमिकेचे नाव : प्रकाश
बालनाट्याचे नाव : न्यानाचा प्रकाश
शाळा/ संस्थेचे नाव : लेकसीकॉन ग्लोबल स्कुल

तृतीय
मुलाचे नाव : दुर्व दळवी
भूमिकेचे नाव : ( दिनु / शाहीर)
बालनाट्याचे नाव : दिव्या खाली दौलत
शाळा/ संस्थेचे नाव: दिंडी ‘झ’ प्रतिष्ठान

द्वितीय
मुलाचे नाव : तन्मय चोरगे
भूमिकेचे नाव : जीवा
बालनाट्याचे नाव : होता जिवा म्हणुन वाचला शिवा
शाळा/ संस्थेचे नाव : संदेश विद्यालय -पार्क साईट

प्रथम
मुलाचे नाव : अमोघ टिपणीस
भूमिकेचे नाव : सोहम
बालनाट्याचे नाव : रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव : मुक्तछंद नाट्यसंस्था

उत्तेजनार्थ बालनाट्य २०२५
नाट्याचे नाव : होता जिवा म्हणुन वाचला शिवा
शाळा/ संस्थेचे नाव: संदेश विद्यालय. पार्क साईट

उत्तेजनार्थ बालनाट्य २०२५
बालनाट्याचे नाव : रे क्षणा
शाळा/ संस्थेचे नाव : पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम विलेपार्ले

तृतीय बालनाट्य २०२५
बालनाट्याचे नाव : रंग जाणिवांचे
शाळा/ संस्थेचे नाव : मुक्तछंद नाट्यसंस्था

द्वितीय बालनाट्य २०२५
बालनाट्याचे नाव : दिव्या खाली दौलत
शाळा/ संस्थेचे नाव : दिंडी झ प्रतिष्ठान

सर्वोत्कृष्ट बालनाट्य २०२५
बालनाट्याचे नाव : अडलंय “का”
शाळा/ संस्थेचे नाव : सेक्रेड हार्ट स्कुल, वरप कल्याण

स्पेशल ज्युरी अवॉर्ड
बालनाट्य नाव – सर्कस
सादरकर्ते – अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन, पुणे

सायली संजीवच्या दमदार अभिनयासह ‘कैरी’चा यशस्वी प्रीमियर

भावना, थरार आणि निसर्गसौंदर्याचा संगम—‘कैरी’चा भव्य प्रीमियर

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘कैरी’ चा प्रीमियर आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. प्रीमियरनंतर चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला. प्रभावी कथा, थरारक मांडणी, सुरेल संगीत आणि कोकणच्या निसर्गसौंदर्याने नटलेला सिनेमॅटिक अनुभव यामुळे ‘कैरी’ने प्रेक्षकांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला आहे.

चित्रपटात सायली संजीव हिने साकारलेली कावेरी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. एक स्त्री जेव्हा हरवलेल्या आयुष्याचा शोध घेत असते, तेव्हा त्या प्रवासात तिला स्वतःचीच ओळख कशी सापडते—हा भावनिक आणि थरारक प्रवास ‘कैरी’ अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे मांडतो.

प्रीमियरला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटातील कथानक, पार्श्वसंगीत आणि थरारक ट्रीटमेंटचे विशेष कौतुक केले. सायली संजीवसोबतच शशांक केतकर (आकाश), सिद्धार्थ जाधव (गोपाल), सुबोध भावे (कॅम), सुलभा आर्या (आजी) आणि अरुण नळावडे (आकाशचे वडील) यांनी साकारलेल्या भूमिका कथेला अधिक सशक्त आणि भावस्पर्शी बनवतात.

चित्रपटातील कोकणच्या निसर्गरम्य लोकेशन्स हा ‘कैरी’चा एक स्वतंत्र आकर्षणबिंदू ठरतो. हिरवाईने नटलेली गावं, शांत समुद्रकिनारे आणि निसर्गाच्या कुशीतून उलगडणारा कावेरीचा प्रवास पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आला असून, हा अनुभव प्रेक्षकांना दृश्यात्मक समाधान देतो.

चित्रपटाची सर्जनशील टीम

‘कैरी’ हा चित्रपट नाईन्टी वन फिल्म स्टुडिओज निर्मित असून ए. व्ही. के. पिक्चर्स यांच्या सहकार्याने सादर करण्यात आला आहे.
गीतलेखन मनोज गोलंबरे, तर संगीत निशाद गोलंबरे यांचे आहे.
चित्रपटाचे निर्माते नवीन चंद्रा, नंदिता स्कर्नाड, स्वातखोपकर आणि निनाद बत्तीन असून सहनिर्माते तबरेज पटेल आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू रोडे यांनी केले असून कथा व पटकथा स्वरा मोकाशी यांनी लिहिली आहे.
मुख्य भूमिकांमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, शशांक केतकर, सिद्धार्थ जाधव, अरुण नळावडे आणि सुलभा आर्या हे कलाकार झळकणार आहेत.

एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर सावित्री धामी, छायांकन पॅडी, संकलन मणी शिर्के, ऑनलाईन एडिटिंग किरण माद्रे यांचे आहे.
वेशभूषा मृणाल परब, कला दिग्दर्शन केतू, मेकअप व हेअर उर्वशी मेकअप, नृत्य दिग्दर्शन सिद्धेश यांनी केले आहे.
व्हिज्युअल प्रमोशन्स प्रोमोबॉक्स स्टुडिओज, पीआर कार्तिकेय यादव, डिजिटल मार्केटिंग टीम सोशलटाईम, तर पोस्ट-प्रोडक्शन अल्ट्रा स्टुडिओज येथे करण्यात आले आहे.

बनावट औषध निर्मिती:सदाशिवपेठेत छापा- अक्षय पुनिया,अमृत जैन,मनिष जैन,रोहित नावडकरसह देशभरातील ८ जणांवर गुन्हा दाखल

सिक्कीमच्या औषध कंपनीच्या नावाने बनावट औषधनिर्मिती:बिहारमधील मुदतबाह्य परवान्याचा गैरवापर, पुण्यातील औषध विक्रेत्यांसह आठ जणांवर गुन्हा

पुणे- सिक्कीममधील औषध कंपनीचे औषध बिहारमधील परवाने मुदतबाह्य झालेल्या वितरकाच्या नावाने औषधाची बनावट निर्मिती करुन ते देशभर विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील औषध विकत्यांसह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

यासंदर्भात औषध निरीक्षक श्रीकांत विश्वासराव पाटील (वय 39) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय हसमुख पुनिया (अक्षय फार्मा ,निंबाळकर तालीम चौक, सदाशिव पेठ), अमृत बस्तीमल जैन (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), मनिष अमृत जैन (आर्जस मेडिकल डिस्ट्रिब्युटर, साईस्पर्श अपार्टमेंट, सदाशिव पेठ), रोहित पोपट नावडकर (रिद्धी फार्मा तराटे कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणे), देवेंद्र यादव (सिन्ना फार्मा, बी सी मेडिसिन मार्केट, नय्या गाव, पूर्व, लखनौ), उमंग अभय रस्तोगी (रजा बाजार, रस्तोगी टोला चौक, लखनौ, उत्तर प्रदेश), महेश गर्ग (अमिनाबाद, लखनौ, उत्तर प्रदेश) आणि सोनी महिवाल (महिवाल मेडिको, भोरे गोपालगंज, बिहार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीचे ट्रिप्सिन या बनावट औषधाची पुणे शहरामध्ये विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्याअनुषंगाने 16 ऑक्टोबर 2025 रोजी औषध निरीक्षकांनी सदाशिव पेठेतील अक्षय फार्मा या दुकानातून औषधाच्या साठ्यामधून चाचणी व विश्लेषणासाठी नमुना घेतला. हे औषध सिक्कीम येथील टेरेंट फार्मास्युटिकल्स या कंपनीकडे तुलनात्मक अभ्यासासाठी पाठविण्यात आला. त्यामधून ही लबाडी उघडकीस आली.

कम्युनिटी बॉयलरचे अग्रणी स्टीमहाऊस इंडियाने 425 कोटी रु. उभारण्यासाठी सेबीकडे UDRHP केला सादर

0

भारतामधील कम्युनिटी बॉयलर प्रणालीचे अग्रणी स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडने त्यांचा अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस 1 (UDRHP I) सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)कडे दाखल केला आहे. कंपनीने कॉन्फीडेन्शीयल ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (CDRHP) सेबी कडे 01 जुलै 2025 रोजी सादर केले होते आणि त्यावर 14 ऑक्टोबर 2025 रोजी निरीक्षणे प्राप्त झाली.

प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्री मध्ये एकूण 425 कोटी रु. पर्यंतच्या प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश असून यामध्ये विशाल सन्वरप्रसाद बुधिया (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून 345 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 80 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल आहे.

BRLMs च्या सल्लामसलतीने, स्टीमहाऊस इंडिया लिमिटेड अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस 1दाखल केल्यानंतर आणि रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्यापूर्वी 15कोटी रु. पर्यंतच्या प्री- आयपीओचा विचार करू शकेल. तसे केल्यास उभारला जाणारा निधी फ्रेश इश्यूमधून वजा केला जाईल.

कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा उपयोग कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाची परतफेड किंवा पूर्वपरतफेड; कंपनीच्या अंकलेल्श्वर सुविधा केंद्र  (Phase 3) च्या क्षमतेच्या विस्तारासाठी पायाभूत सुविधा विकासाच्या (इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट) भांडवली खर्च गरजांसाठी आणि पानोळी सुविधा केंद्र  (Phase 2) च्या क्षमतेच्या विस्तारासाठी;
Dahej SEZ मध्ये वाफ निर्मितीसाठी नवीन उत्पादन सुविधा केंद्र उभारण्यासाठी भांडवली खर्च; तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी करणार आहे.

कंपनीचे प्रवर्तक आणि सीएमडी विशाल बुधिया यांच्या नेतृत्वाखाली, स्टीमहाऊस इंडियाने 2014 मध्ये भारतात कम्युनिटी बॉयलर प्रणालीची संकल्पना सादर केली (स्रोत: F&S अहवाल). कंपनीच्या औद्योगिक वायू व्यवसायात वाफ निर्मिती व वितरण, वाफ खरेदी व वितरण, तसेच नायट्रोजनचे एक्स्ट्रॅक्शन, कंप्रेशन आणि पाइपलाइनद्वारे पुरवठा यांचा समावेश आहे.

सध्या कंपनी गुजरातमध्ये सहा मालकीचे आणि एक भाडेतत्त्वावरील असे सात कम्युनिटी स्टीम बॉयलर्स चालवते. वापी फेज 1, वापी WTE युनिट, अंकलेश्वर फेज 1, अंकलेश्वर फेज 2, सारीगम, नांदेसरी आणि पानोळी या ठिकाणी हे कम्युनिटी स्टीम बॉयलर्स आहेत. कंपनीकडे औषधनिर्माण, रसायने, कृषी-रसायने, वस्त्रोद्योग, टायर्स, डाईज आणि पिगमेंट्स, पॉलिमर्स, पेंट्स आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील औद्योगिक ग्राहकांचा स्थिर आधार आहे. तसेच कंपनी प्रमुख बंदरांजवळ आणि ग्राहक क्लस्टर्सजवळ स्थित आहे.

कंपनीचे कम्युनिटी बॉयलर्स SPM, SOx आणि NOx उत्सर्जन आणि राखेचे प्रमाण कमी करतात.

15 नोव्हेंबर 2025 पर्यंत या बॉयलर्सची एकत्रित स्थापित वाफ निर्मिती क्षमता ताशी 345 टन असून ते वार्षिक 2,185,920 टन इतक्या स्थापित क्षमतेत रूपांतरित होते. याशिवाय, कंपनी Dahej GIDC आणि Sachin GIDC मध्ये खरेदी केलेल्या वाफेचे वितरण 56,236 मीटर्स लांबीच्या स्वतःच्या, संचालित आणि देखभाल केलेल्या पाइपलाइन प्रणालीद्वारे करते.

कंपनी आता इतर औद्योगिक वायूंच्या पुरवठ्यात विस्तार करत आहे. कंपनीने 1 फेब्रुवारी 2025 पासून नायट्रोजन उत्पादन आणि पुरवठा सुरू केला आणि तिचा पहिला नायट्रोजन प्रकल्प अंकलेश्वर येथील केंद्रातील समर्पित पाइपलाइन नेटवर्कद्वारे सादर करण्यात आला. कंपनीने तिच्या नायट्रोजन ऑपरेशन्समधून आर्थिक वर्ष 2025 मध्ये 0.90 दशलक्ष रु. आणि 30 सप्टेंबर  2025 रोजी संपलेल्या अंतरिम कालावधीत 3.01 दशलक्ष रु. उत्पन्न निर्माण केले. जोडीला, औद्योगिक वायू व्यवसायासाठी कंपनी प्राथमिक इंधन म्हणून कोळशाची खरेदी करते आणि इनव्होईस ओन्ली आधारावर कोळसा व्यापारही करते.

पारंपरिकपणे क्रायोजेनिक टाक्या किंवा ऑनसाइट नायट्रोजन जनरेशनचा वापर करण्याऐवजी

नायट्रोजनचा पुरवठा वितरित पाइपलाइन नेटवर्कद्वारे करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. 

कंपनी वाफ निर्मितीसाठी कोळसा तसेच प्लॅस्टिक कचरा आणि टेक्सटाइल चिंदीसारखे गैर-जीवाश्म इंधन यांसह विविध प्रकारची इंधने वापरते. आता ते वाफ निर्मितीकरिता इंधन स्रोत म्हणून कृषी-कचरा आणि रिफ्युज डीराईव्हड फ्युएल सारख्या पर्यायी इंधनांचे वाढीव पर्याय शोधत आहेत.

यांच्या प्रमुख ग्राहकांमध्ये एथर इंडस्ट्रीज लिमिटेड, अनुपम रसायन इंडिया लिमिटेड, ग्लोब एन्व्हायरो केअर लिमिटेड, गुजरात पॉलीसॉल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, देवांशी डायस्टफ, के. पटेल केमो फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, के. पटेल डाये केम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, महावीर सिंथेसिस प्रायव्हेट लिमिटेड, मंगलम इंटरमीडियरीज, ऑर्गो केम गुजरात प्रायव्हेट लिमिटेड आणि सुभास्री पिगमेंट्स यांचा समावेश आहे. एकूण कंपनीने 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत 174 ग्राहकांना सेवा दिली आहे.

कंपनीचे कामकाजामधून मिळणारे उत्पन्न आर्थिक वर्ष 24 मधील 2,917.10 दशलक्ष रु. वरून आर्थिक वर्ष 25 मध्ये 3,951.06 दशलक्ष रु. पर्यंत वाढले. त्यात 35.44% वाढ दिसून आली. याच कालावधीत करपश्चात नफा (PAT) 271.86 दशलक्ष रु. वरून 311.61 दशलक्ष रु. पर्यंत वाढला.

30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत, कंपनीने कामकाजामधून 2,384.17 दशलक्ष रु. उत्पन्न आणि 130.85 दशलक्ष रु. करपश्चात नफा PAT नोंदवला. कामकाजामधून मिळणाऱ्या उत्पन्नात पुन्हा आलेल्या ग्राहकांकडून असलेला वाटा 96.64% होता.

F&S नुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातील एकूण प्रक्रिया केलेल्या वाफेची मागणी सुमारे 186,000 TPH होती. आर्थिक वर्ष  2025 ते 2030 दरम्यान 9.5% च्या निश्चित केलेल्या  CAGR सह हा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारण्याच्या दिशेने आहे. औद्योगिक वायू औषधनिर्माण, रसायने आणि वस्त्रोद्योग यासारख्या मोठ्या स्तरावरील उद्योगांसाठी अत्यावश्यक असतात. ते अधिकाधिक उत्पादन कार्यक्षमता आणि कामकाज स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

आर्थिक वर्ष 2025 पर्यंत, सिलिंडर-आधारित पुरवठा हा भारताच्या औद्योगिक वायू (वाफ वगळून) मागणीच्या मूल्याच्या 42.0% इतका होता. भारतीय औद्योगिक क्षेत्र सतत विस्तारत असताना, पाइपलाइनद्वारे औद्योगिक वायू पुरवठा हा एक पसंतीचा पर्याय म्हणून उदयास येत आहे.

इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर (BRLM) आहेत.

लिंक: https://s3.ap-south-1.amazonaws.com/cms.equirus.tech/Steamhouse_India_Limited_UDRHP_I_85def25ff6.pdf

महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा प्रस्तावित करताना मनोरुग्ण,भिक्षेकरी यांची गरिमा राखण्याची काळजी घ्या

0

सर्व कलमांची सखोल छाननी करून काळानुरूप बदल संवेदनशील शब्दप्रयोगासह प्रस्तावित करा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. १३ डिसेंबर २०२५ :
महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करताना केवळ कायदेशीर नव्हे तर मानवी हक्क, सामाजिक संवेदनशीलता आणि आधुनिक धोरणात्मक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण अधिनियमातील सर्व कलमांची बारकाईने छाननी करून उचित, सन्मानजनक आणि काळानुरूप शब्दांचा समावेश करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

या अधिनियमातील सुधारणा प्रस्तावित विधेयकाच्या अनुषंगाने विधानभवनात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. बैठकीस विधीमंडळ सचिव श्री शिवदर्शन साठे,सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य श्री धीरज कुमार, सचिव विधी व न्याय विभाग श्री सतीश वाघोले, सचिव महिला व बालविकास श्रीमती नयना गुंडे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव विलास बेंद्रे, महिला व बालविकास विभागाचे उपसचिव आनंद भोंडवे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, विधेयकातील काही शब्दप्रयोग आजच्या सामाजिक जाणिवांशी विसंगत ठरत असून त्यामध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ, ‘वेडा’ या शब्दाऐवजी ‘मनोरुग्ण’ हा अधिक सन्मानजनक व वैज्ञानिक शब्द वापरण्या बाबत विचार व्हावा . विकृतचित्त शब्द आवश्यकता नसल्यास वगळण्याबाबत विचार करावा.अशा प्रकारे संपूर्ण अधिनियमातील प्रत्येक कलमाची सखोल छाननी करून काळानुरूप आवश्यक बदल सुचवावेत, असे त्यांनी सांगितले.

अधिनियमात विधेयकाद्वारे सुधारणा करताना काळानुरूप झालेले सामाजिक बदल, उपलब्ध शास्त्रीय संशोधन, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच केंद्र शासनाने संमत केलेले नवे कायदे यांचा सर्वांगीण अभ्यास करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

समाजातील प्रत्येक घटकाचे मानवी हक्क अबाधित राहावेत, यासाठी अधिनियम अधिक संवेदनशील, समतोल आणि मानवकेंद्री करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुधारणा करण्यात याव्यात आणि अधिनियमातील सुधारणा करताना त्यांची गरिमा राखली जाईल असे शब्दप्रयोग करण्याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सबंधितांना दिले.

प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री

0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सभागृहातील चर्चेअंती निर्मित कायद्यांमध्ये जनमाणसाचे प्रतिबिंब दिसते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १३ : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना कायदे निर्मितीची प्रक्रिया, संसदीय पद्धत अभ्यासण्याची संधी प्राप्त होते. अशा प्रशिक्षण प्रबोधनातूनच लोकशाही समृद्ध होते. त्यामुळे प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन हे समृद्ध लोकशाहीची त्रिसुत्री आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विधान परिषदेने संमत केलेले महत्त्वपूर्ण विधेयके ठराव आणि धोरणे याविषयी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या संदर्भ समृद्ध ग्रंथ मालिकेतील द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते आज विधानपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात झाले.

यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ज्या सभागृहाने १८ वर्ष शिकवीत अनुभवसंपन्न केले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली, अशा सभागृहात कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा येण्याचे भाग्य मिळाले. त्यामुळे या सभागृहातील आठवणींना उजाळा मिळाला. चर्चेद्वारे समोरच्याकडून राज्याच्या विकासासाठी हवे असलेले काढून घेण्याचे कौशल्य याच सभागृहाने दिले. विधान परिषद सभागृहात कायदा निर्मितीवर झालेल्या चर्चेतून परिणामकारक कायद्यांची निर्मिती झाली आहे. या सभागृहात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना नियमांची लढाई झाली तरी कधी वैयक्तिक संबंधांमध्ये कटूता आली नाही, हीच आपल्या लोकशाहीची समृद्ध परंपरा आहे.

लोकशाहीमध्ये संविधानाने अधिकार व कर्तव्य निश्चित केले आहेत. विकासाची समान संधी यातून निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या श्रेष्ठ परंपरांचे पालन विधिमंडळाने केले आहे. या ग्रंथांमधून सभागृहातील विचारांचा ठेवा नवीन पिढीसमोर येणार आहे. त्यामुळे या ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे, असे आवाहनही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी केले.

चर्चेअंती निर्मित कायद्यांमध्ये जनमानसाचे प्रतिबिंब दिसते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कायदा निर्मिती प्रक्रियेत सभागृहांमध्ये होत असलेली चर्चा अत्यंत महत्त्वाची असते. अशा चर्चांमधूनच प्रगल्भ कायद्याची निर्मिती होते. चर्चांमधून निर्मित झालेल्या कायद्यांमध्ये जनमानसाचे प्रतिबिंब दिसून येते. अशा कायद्यांचा निश्चितच लोककल्याणासाठी उपयोग होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधान परिषद सभागृहाचे सदस्य होते. या सभागृहाने अतिशय हुशार, अनुभवी सदस्य दिले आहेत. त्यांच्या हुशारी, अनुभवाचा लाभ कायदा निर्मिती प्रक्रियेत झाला आहे. या सभागृहाने पारित केलेले कायदे, ध्येयधोरणे यावर आधारित ग्रंथसंपदा निर्माण होत आहे. आपल्या सभागृहातील कामकाजाचे ‘ रेकॉर्ड ‘ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेकॉर्ड नसल्याने अनेक ऐतिहासिक संदर्भाना आपण मुकलो आहोत.

पश्चिमात्य देशांमध्ये ‘ रेकॉर्ड’ असल्यामुळे त्यांचे संदर्भ आपणास घ्यावे लागतात. आपली लोकशाही पद्धत त्यांच्यापेक्षा दोन हजार वर्षांनी जुनी आहे, मात्र रेकॉर्ड नसल्याने संदर्भ उपलब्ध होत नाहीत. इतिहास हा संकलित करावयाचा असतो. त्यामुळे सभागृहातील भाषणे, निर्मित कायदे यांचे संकलन करून प्रकाशित केलेला ग्रंथ हा नेहमी ऐतिहासिक दस्ताऐवज ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्याच्या मागास भागाचा विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 1950 नंतर पहिल्यांदा संविधानात उपलब्ध कलमांचा उपयोग केला. त्यामुळे विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरवही केला.

राज्याच्या विकासात सभागृहाचे उत्तुंग योगदान

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे

देशामध्ये द्वि सभागृह पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. प्रभावी कायदे निर्मिती यामुळे शक्य झाली आहे. राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणल्यानंतर निर्मित होणारे कायदे तसेच ध्येयधोरणे राज्याच्या विकासासाठी पोषक ठरतात. राज्याच्या विकासामध्ये विधान परिषद सभागृहाचे उत्तुंग योगदान आहे, अशा शब्दात सभागृहाचे महत्त्व विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी अधोरेखित केले.

निर्दोष कायदे बनवण्यासाठी द्वि सभागृहाची अत्यंत आवश्यकता आहे. या वरिष्ठ सभागृहातील अनुभव संपन्न सदस्यांकडून झालेल्या चर्चेअंती निर्मिती कायदा हा अत्यंत प्रभावशाली ठरतो. कायदे निर्मितीची प्रक्रिया अधिकाधिक निर्दोष करण्याची जबाबदारी वरिष्ठ सभागृहावर आहे. त्यामुळे कायदा निर्मिती प्रक्रियेत येथे झालेली चर्चा ही ऐतिहासिक ठरत असल्याचेही सभापती प्रा. शिंदे यांनी प्रतिपादित केले.

प्रास्ताविकात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या कार्याविषयी माहिती देत विधान परिषदेतील कायदे ठराव नियम यावर आधारित ग्रंथांविषयी माहिती दिली. ग्रंथाच्या संपादन कामामध्ये पत्रकार योगेश त्रिवेदी, विलास मुकादम व किशोर आपटे यांनी सहभाग दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी केले. कार्यक्रमाला मंत्री, विधिमंडळ सदस्य, पत्रकार अधिकारी व संसदीय अभ्यास वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.

जुन्नर वन विभागात आता पर्यंत 68 बिबट पकडले ; पिंजरे आणि इतर उपायाचा होतोय फायदा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

▪️सर्वात कमी काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात बिबटे पकडले

पुणे, दि. 13: जुन्नर वन विभागात वाढलेला बिबटयाचा प्रादुर्भाव वाढल्याने, तो कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 13 कोटी रुपये दिले. त्यातून मोठ्या प्रमाणात पिंजरे करण्यात आले, त्या पिंजऱ्याच्या मदतीतून आता पर्यंत 68 बिबटे वन विभागाने पकडले आहेत. आज पर्यंत एवढ्या कमी काळात एवढे बिबटे वन विभागाने पकडल्यामुळे बिबटे आणि मनुष्य संघर्ष येत्या काळात संपविण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरत असल्याची भावना व्यक्त करून यात उपवन संरक्षक प्रशांत खाडे आणि महादेव मोहिते यांच्या विशेष प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधोरेखित केले.

जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरुर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. बिबट हल्ल्यात सन 2025-26 या वर्षात 5 नागरिकांचा मृत्यू असून त्यांना 65 लाख रुपये, 5 नागरिक जखमी झाले असून त्यांना 2 लाख 18 हजार 964 रुपये, 1 हजार 657 जनावरांचा मत्यू झाले असून याकरिता 1 कोटी 61 लाख 16 हजार 889 रुपये तसेच 17 हेक्टर 7 आर पीकांचे नुकसान झाले असून 9 लाख 79 हजार 900 रुपये असे मिळून 2 कोटी 38 लाख 15 हजार 753 रुपये इतकी नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे.

जुन्नर वनविभागाकडून मानव व बिबट संघर्ष टाळण्याबरोबरच वन्यप्राणी बिबटचे व्यवस्थापन होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत आहे. सन 2020-2021 ते 2025-26 या कालावधीत 185 बिबट-बछडे पुनर्मिलन करण्यात आले आहे. गावांमध्ये वनकर्मचाऱ्यांनामार्फत गस्त, नागरिकांचे प्रबोधन, स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथकांची निर्मिती, त्यांच्याकडून गस्त व प्रबोधन करण्यात येत आहे. कलापथक यांचे माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये व शाळांमधून सुमारे 40 कार्यक्रम करण्यात आले असून व विषय प्राविण्य असणारे श्री सौमित्र यांचे मार्फत वेगवेगळ्या 50 गावांमध्ये विभागातील योजना तसेच बिबट जनजागृतीचे विशेष वर्ग ग्रामपंचायत पद अधिकारी यांचे सह घेण्यात आले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यांपासून घ्यावयाच्या काळजी घेण्याबाबतचे माहिती देणारे पोस्टर्स, घडीपत्रके, कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे. बचाव पथकाद्वारे वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी पथकातील सदस्य तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पथक यांच्या समन्वयाने वन्यप्राणी रेस्क्यू करण्याची कार्यवाही करण्यात येते. प्राथमिक बचाव पथकातील एकूण 400 सदस्य कार्यरत आहेत.

अतिसंवेदनशील गावांत 24 X 7 जनजागृती करण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून पिंपरखेड, न्हावरा, भीमा कोरेगाव (ता. शिरुर), आळे व नगदवाडी, जुन्न्र (ता. जुन्न्र), आणि गावडेवाडी (ता. आंबेगाव) या ठिकाणी ‘बिबट कृती दल’ बेस कॅम्प स्थापन करण्यात आलेले आहेत. यामुळे शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील व आंबेगाव, जुन्नरच्या पूर्व भागातील मानव-बिबट संघर्ष मागील 2 वर्षात मोठ्या प्रमाणात नियंत्रित झाला आहे.

माहे मे 2024 पासून विभागीय कार्यालय जुन्नर येथे निंयत्रण कक्ष (टोल फ्री क्रमांक 1800 3033) स्थापन आले असून 24 X 7 कार्यरत आहे, यामाध्यमातून अतिसंवेदनशील क्षेत्राची माहिती गोळा करुन गस्तीबाबत सूचना देण्यात येते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडील मंजुरीनंतर जुलै 2024 मध्ये संघर्षक्षेत्रातील 10 बिबट्यांचे जामनगर (गुजरात) येथील बचाव केंद्रात स्थलांतर करण्यात आले. मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांना 410 सौर दिवे व 410 लंबुंचे (टेन्ट) वाटप करण्यात आले आहेत. शिरुर व मंचर बनपरिक्षेत्रातील एकुण 50 ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला असून जुत्रर वनविभाग हा राज्यातील पहिला वनविभाग झालेला आहे.

वनविभागातील 233 अतिसंवेदनशील गावांना “संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र” घोषीत करण्यात आले आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या धर्तीवर शेतातील एकटी घरे आणि गोठ्याकरिता सौर ऊर्जा कुंपन हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून आतापर्यंत 150 घरांना सौर उर्जा कुंपण बसविण्यात आले असून आणखीन 550 घरांना सदर कुंपणाद्वारे सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. विभागात एकूण 400 पिंजरे कार्यान्वित आहेत. वनविभागामार्फत 400 आपदा मित्रांना प्राथमिक बचाव दल (पीएआरटी) सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना 3 हजार 300 नेक गार्डचे वाटप, 5 ठिकाणी अनायडर्स मशीन कार्यान्वित आहेत.

बिबट नसबंदी, शेतीपंपाकरिता दिवसा वीज पुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तिवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्सकरिता अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणी, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण, नवीन 4 बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावित आहे, असेही श्री. डुडी म्हणाले.

“पीएमआरडीए”कडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर!

पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवडमध्ये ३० महत्त्वाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महानगराच्या विकासाला ऐतिहासिक गती देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीएच्या मालकीचे असलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील विविध उपयोगांचे एकूण ३० भूखंड प्रथमच ८० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर ऑनलाइन ई-लिलाव पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भूखंडांमध्ये तीन शैक्षणिक वापराचे भूखंड, नऊ वाणिज्य व सार्वजनिक सुविधा भूखंड, एक वैद्यकीय वापराचा भूखंड, एक सार्वजनिक सुविधा (लायब्ररी/संगीत शाळा) भूखंड आणि एक फॅसिलिटी सेंटर भूखंड यांचा समावेश आहे. याशिवाय, पुणे ग्रामीण हद्दीतील १४ सुविधा भूखंड (Amenity Space) तसेच भांबुर्डा (शिवाजीनगर) येथील एक वाणिज्य भूखंडदेखील या ई-लिलावाचा भाग आहेत. या भूखंडांचे वाटप पात्र आणि इच्छुक व्यक्ती अथवा संस्थांना ई-लिलावाद्वारे केले जाणार आहे. या ई-लिलाव प्रक्रियेच्या अटी व शर्तींची सविस्तर माहिती https://eauction.gov.in आणि पीएमआरडीएचे अधिकृत संकेतस्थळ www.pmrda.gov.in वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे महानगराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

प्रमुख तारखा आणि प्रक्रिया:
1.नोंदणी व कागदपत्रे डाऊनलोड करण्याची मुदत: दि. १५ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १३ जानेवारी २०२६, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत इच्छुक व्यक्ती आणि संस्थांना https://eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
2.तांत्रिक बोलीदारांची घोषणा: तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या बोलीदारांची घोषणा दि. २२ जानेवारी २०२६ रोजी केली जाईल.

3.लाईव्ह ई-लिलाव (Live Auction): अंतिम ई-लिलाव प्रक्रिया दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होईल.

जावळीतील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडलं ? गृहमंत्रालयाने खुलासा करावा: हर्षवर्धन सपकाळ

पोलिसांनी कोणाला अटक केली, हे आरोपी, सावरी गावातील तेजस लॉज व ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांचा काय संबंध..?

मुंबई, दि. १२ डिसेंबर २०२५
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचने छापा टाकला आहे. पण या कारवाई बाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या कारवाईत नेमके काय सापडले? असा प्रश्न विचारून गृहमंत्रालयाने यावर खुलासा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने ९ डिसेंबरला दोन अंमली पदार्थांच्या तस्करांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ते मेफेड्रॉन पुण्यातील विशाल मोरे या व्यक्तीकडुन आणल्याचे सांगितले. मुंबई पोलीसांनी विशाल मोरेला पकडण्यासाठी सापळा रचला. मेफेड्रोन खरेदी करायचे आहे असे सांगुन १२ डिसेंबरला विशाल मोरेला पिंपरी चिंचवडच्या हद्दीत दोन किलो मेफेड्रोनसह पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात तो मेफेड्रोन तयार करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलीसांनी सावरी गावात धाड टाकली असता तिथे एका गुरांच्या गोठ्यात शेड उभारुन मेफेड्रोन तयार करणे सुरु होते. ती जागा गोविंद शिमकर नावाच्या बामणोलीत व्यक्तीची असुन ओंकार दिघे या सावरीत राहणा-या व्यक्तीच्या मार्फत मोरेला भाड्याने दिली होती. पोलीसांनी तिथुनच तीन कामगारांना अटक केली, जे पश्चीम बंगालचे आहेत.

सपकाळ पुढे म्हणाले की, सावरी गावातील गोठ्यात मेफेड्रोन तयार करणा-या तीन बंगाली कामगारांना ओंकार दिघे हा गावातील तेजस लॉजमधुन जेवण आणून देत होता. सावरी गावातील हे तेजस लॉज ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. दिड महिन्यांपुर्वी हे लॉज सुरु झाले असुन प्रकाश शिंदेंनी ते दरे गावातील रणजीत शिंदे याला चालवायला दिले होते. सावरी गावात ज्या जागेवर छापा टाकण्यात आला ती जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का नातेवाईकांची ? तिथे ड्रग्सची फॅक्टरी सुरु आहे का? बोगस नोटांचा कारखाना ? जादूटोणा सुरु आहे ? की आणखी काही अवैध धंदे ? मुंबई क्राइम ब्रांच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचले? सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकही तातडीने तिथे पोहचले. त्यांना तिथे काय आढळून आले ? या संपूर्ण प्रकरणाची माहिती दडवून सरकार नेमके काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे ? या प्रकरणी संशय बळावत असून गृह विभागाने खुलासा करावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या नातलगाच्या नावे असलेल्या जमिनीवर एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार करणारा कारखाना-महाराष्ट्र बनला ‘उडता महाराष्ट्र’

0

मुंबई–सातारा जिल्ह्यात चक्क एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावात चक्क एका म्हशीच्या गोठ्यात हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना याचा थांगपत्ताही नसताना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने येथे धाड टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 10 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत ‘ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची आहे का? आणि महाराष्ट्राला यामुळे ‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये?’ असे सवाल उपस्थित केले आहेत.

मुंबई गुन्हे शाखेने मुंबईत केलेल्या एका कारवाईत दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून साताऱ्यातील या कारखान्याची माहिती समोर आली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी जावळी तालुक्यातील सावरी येथे एम डी ड्रग्ज या कंपनीवर छापा टाकून तब्बल 15 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. म्हशीच्या गोठ्यात सुरू असलेल्या या कारखान्यात अंमली पदार्थांची निर्मिती व कच्चा मालाचा साठा करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन बांगलादेशी कारागीर व अन्य एक अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.

हर्षवर्धन सपकाळांचा सवाल या कारवाईनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात नक्की काय सुरू आहे? ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का नातेवाईकांची ? तिथे ड्रग्सची फॅक्टरी सुरु आहे का? बोगस नोटांचा कारखाना ? जादू टोणा सुरु आहे की, आणखी काही अवैध धंदे ? मुंबई क्राइम ब्रांच आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी तिथे का पोहोचले आहेत? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे ? मुंबई क्राइम ब्रांच ला इथे नेमके कोणते घबाड सापडले आहे? इथे नेमकं काय सुरु आहे ? सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक इथे तातडीने का दाखल झालेत ? इथून जवळच असलेल्या तेजस होटल मध्ये रात्री मुक्कामाला असलेले प्रकाश शिंदे कोण आहेत? या सर्व प्रश्नांवर गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाधक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये? – अंबादास दानवे

या प्रकरणावरूनठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. साताऱ्यात एमडी ड्रग्स तयार करणारा कारखाना उजेडात आला आहे. गृहमंत्री म्हणून जनतेच्या वतीने आपल्याला याबाबत काही प्रश्न आहेत देवेंद्र फडणवीसजी, असे म्हणत त्यांनी खालील पाच प्रश्न विचारले आहेत.

महाराष्ट्राला यामुळे ‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये?
साताऱ्यातील कारखान्याचे मुंबई-पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकार मधील घटकांच्या पिल्लावळीपर्यंत आहे, हे सत्य आहे का?
एक विशिष्ट पक्षाचे साताऱ्यावर वर्चस्व आहे, म्हणून या कारखान्याला अभय होते काय?
मुंबईतील पोलिस साताऱ्यात येऊन कारवाई करतात, सातारा पोलिस याबाबत गप्प कसे होते?
म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज तयार करण्याची ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती?

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात:कोकणाच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार मागून एका कंटेनरवर आदळली, दोघांचा मृत्यू

0

मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईकडून कोकणाच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार मागून एका कंटेनरवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला.

ही दुर्घटना सकाळच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत घडली. अपघातग्रस्त वाहन हुंडई कंपनीची ‘ऑरा’ कार असल्याची माहिती मिळाली आहे. कार कंटेनरच्या मागील भागावर जोरात आदळल्याने वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात कारमधील दोघांनी जागेवरच प्राण सोडले, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, महामार्ग पोलिस आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या एका जखमी व्यक्तीला हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने कोलाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या बचावकार्यामध्ये सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू पायलटही सहभागी झाले होते. त्यांनी घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. अपघाताचे स्वरूप पाहता वेगावर नियंत्रण नसणे किंवा कंटेनर अचानक थांबल्याने ही धडक बसली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, मुंबई–गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे.