मुंबई-शिवसेनेत बंड झाल्यानंतरच्या दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना सोमवारी (२७ जून) नोटीस बजावली असून याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांकडे २४ जून रोजी तक्रार केली होती
२२, २३ आणि २४ जून या दिवशी राज्य शासनाने मोठ्या संख्येने शासन निर्णय, परिपत्रके जारी केली होती. सुमारे १६० पेक्षा जास्त निर्णयांचे आदेश शासनाने अवघ्या तीन दिवसांत जारी केले होते. सरकार जाण्याच्या भीतीने घाईघाईत हे निर्णय जारी केले असल्याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांकडे २४ जून रोजी तक्रार केली होती. हे सर्व निर्णय संशयास्पदरीत्या घेतले असल्याचा आरोप दरेकर यांनी केला होता..महाविकास आघाडी सरकारने दोन दिवसांत तब्बल १०६ जीआर काढले आहेत. आमदारांना १ हजार ७७० कोटींच्या निधीपैकी ३१९ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. मविआच्या या निर्णयांना प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला होता. तसंच महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणीही दरेकर यांनी राज्यपालांकडे केली होती.