पुणे : “गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून तुम्ही ‘स्मार्ट वर्क’ करण्यावर भर द्यायला हवा. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि कामात गतीशिलता येईल. भविष्यकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही अपडेट व्हायला हवे.” असे आवाहन आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. पाषाण येथील ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात सायबर लॅबच्या उदघाटन प्रसंगी पोलिसांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस उपाधिक्षक राजकुमार शिंदे, गृह पोलिस उपाधिक्षक बरकत मुजावर, पोलिस उपाधिक्षक शिवाजीराव देवकर यांच्यासह विविध पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बापट म्हणाले, बदलणार्या आधुनिक यंत्रसामुग्रीचे आणि समाजाचे सर्वात आधी प्रतिबिंब पोलिस दलात व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने तस दिसत नाही. सध्याच युग संगणकाच आहे या काळात समाजात अनेक बदल झाले आहेत. त्याला अनुसरून पोलिस खात्यात प्रगती झाली पाहिजे. पोलिस दलानेही या मध्ये पाठीमागे न राहता काळासोबत पुढे आले पाहिजे. पोलिस खात्यात अनेक गोष्टी संगणकाच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीमुळे येत्या काळात हे शक्य आहे. स्वातंत्र्यदिनी एकाच दिवशी राज्यातील 44 ठिकाणी सायबर लॅब सुरू करून मा. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. यंत्रसामुग्रीमुळे पोलिसांच्या कामात अचूकता आणि गतीशीलता वाढेल. तसेच संगणकामुळे पोलिसांच्या कामात कामात मानवी हस्तक्षेप कमी होतो. यामुळे पोलिस जास्तीत जास्त समजाभिमुख होतील. सामाजात ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत त्याचे प्रतिबिंब ही पोलिस दलात दिसले पाहिजे.
ते पुढे म्हणाले, कामाच्या प्रमाणात पोलिसांचे संख्याबळ कमी असल्यामुळे पोलिसांवर ताण पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता अत्याधुनिक तंत्रज्ञाच्या सहाय्याने अपडेट होणे गरजेचे आहे .समाज पोलिसांकडे रक्षक म्हणून पाहतात पण काही अपप्रवृत्तीमुळे पोलिसांची समाजातील प्रतिमा खराब होत आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनी अधिक लोकाभिमुख झाले पाहिजे . समाज आणि पोलिस दोघांनीही एकमेकांची दखल घेतली तरच सुशासन येईल. यामुळे सर्वसामान्यांचा पोलीसांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असेही ते बापट म्हणाले.