मुंबई. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर आवाज उठवला आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले आहे. जर हे वेळीच थांबले नाही तर म्युझिक इंडस्ट्रीतही आत्महत्ये सुरु होतील, अशी भीतीदेखील त्याने व्यक्त केली आहे.सोनूनंतर आता गायक अदनान सामी आणि अलिशा चिनॉय यांनीदेखील म्युझिक इंडस्ट्रीतील माफियांविरोधात आवाज उठवला आहे. अदनाने सोमवारी रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट करुन भारतीय चित्रपट आणि संगीत क्षेत्रात गंभीर आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.अदनान सामीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारतीय चित्रपट आणि संगीत क्षेत्रात आता मोठे बदल होणे गरजचे आहे. विशेषत: संगीताच्या बाबतीत, नवीन गायक, ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि संगीत निर्माता यांचे शोषण केले जात आहे. एकतर त्यांची हुकूमशाही सहन करा, अन्यथा तुम्ही बाहेर पडा… असे चित्र येथे आहे. ‘सर्जनशीलता’ अशा लोकांकडून नियंत्रित केली जात आहे, ज्यांना संगीताचे ज्ञान नाही, ते देव होण्याचा प्रयत्न करीत आहेत??’, असे अदनाने म्हटले आहे.
- आपण लोकांना काय देतोय फक्त रीमेक आणि रीमिक्स
त्याने पुढे लिहिले की, भारतात 1.33 अब्ज लोकआहेत, त्यांना देण्यासाठी आपल्याकडे काय आहे, फक्त रीमेक आणि रीमिक्स गाण्यांशिवाय आपण प्रेक्षकांना काय देतो?, असे प्रश्नदेखील अदनानने उपस्थित केला आहे.
- अलिशा चिनॉयने इंडस्ट्रीला विषारी म्हटले आहे
अलिशा चिनॉय हिनेदेखील अदनान सामीची पोस्ट म्युझिक माफियांच्या विरोधात आवाज उठवत शेअर केली आहे. यासह तिने लिहिले की, ही एक विषारी इंडस्ट्री आहे… जिथे चित्रपट आणि म्युझिक माफिया तुम्हाला भीती व सामर्थ्याने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात.. येथे कोणत्याही नैतिकतेशिवाय काम घेतले जाते आणि निष्पक्ष व्यवहारदेखील नसतात, असे तिने म्हटले आहे.