पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे सरकार व प्रशासनाला आवाहन
पुणे, दि. 31 मार्च : किरकोळ किराणा दुकानदार वाढीव किंमतीने मालाची विक्री करीत आहेत या म्हणण्यात तथ्य नाही. मुळात किळकोळ किराणा दुकानदारांना मिळणारा माल होलसेल बाजारातच तुटवडा झाल्याने थोड्याशा वाढीव दराने मिळत आहे. त्यामुळे करोनाची परिस्थिती उद्भवण्यापूर्वी असलेल्या दरात किलोमागे काही रुपयांची वाढ झाली आहे. किराणा दुकानदारांची खरेदीच पूर्वीच्या विक्रीच्या किंमतीला होत असेल, तर त्यांनी विक्री कशी करायची आणि व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न या संकटसमयी किरकोळ विक्रेत्यांना पडला आहे. सरकार व प्रशासनानेच व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे करण्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सध्या बंद आहे. सरकारच्या आदेशानुसार व नागरिकांची गरज म्हणून फक्त जीवनावश्यक वस्तूंचा व्यवसाय सुरू आहे. परंतु, अनेक किरकोळ किराणा दुकानदारांना अत्यावश्यक सेवेसाठीचे ओळखपत्र नोंदणी करूनही मिळत नाही. आणि ओळखपत्र नाही म्हणून पोलिसांकडून कारवाई होते. नागरिकांच्या सोईसाठी होम डिलीव्हरी दिली जाते. पण, कामगारांना ओळखपत्र नसल्याने अडवले जाते. याबरोबरच काही लोक करोनापूर्वीचे भाव सांगून आता जादा दराने विक्री करीत असल्याचे सांगून व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देतात. परंतु, ते यामागचं वास्तव समजून घेत नाहीत. करोनाची परिस्थिती उद्भवण्यापूर्वी असलेल्या दरात किलोमागे काही रुपयांची वाढ निश्चित झाली आहे. परंतु त्याला तशी कारणे आहेत. होलसेल बाजारात मालाचा तुटवडा आहे. तिथेच किंमती वाढल्या आहेत. किराणा दुकानदारांची खरेदीच पूर्वीच्या विक्रीच्या किंमतीला होत असेल, तर त्यांनी विक्री कशी करायची आणि व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न या संकटसमयी किरकोळ विक्रेत्यांना पडला आहे, असे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.
किरकोळ विक्रेत्यांनी या करोना संसर्गाच्या काळात दुकाने सुरू ठेवून नागरिकांना जीवनावश्यक सेवा पुरविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. जीवावर उदार होत हे किरकोळ विक्रेते काम करीत आहेत. सरकारकडून या किरकोळ विक्रेत्यांना या करोनाच्या संकटात कोणतीही विशेष सवलत नसताना केवळ माणुसकीच्या नावाखाली किरकोळ दुकानदार सेवा देत आहेत. नागरिकांनी, प्रशासनाने व सरकारने कृपया याची नोंद घ्यावी, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.
माणुसकी नजरेसमोर ठेवून संकटकाळी किरकोळ विक्रेते काम करीत असतील आणि तरीही त्यांच्यावर आरोप होणार असतील, तर सरकार व प्रशासनानेच सांगावे की, किरकोळ विक्रेत्यांनी या संकटसमयी व्यवसाय कसा करावा? असा प्रश्न सर्वच व्यापारी व व्यावसायिकांना पडला असून याप्रकरणी मार्गदर्शन करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.