मुंबई : करोना ही देशावरील आपत्ती आहे. आज महाराष्ट्र आणि संपूर्ण देश त्याचा एकजुटीने सामना करतोय. राज्य सरकार यासाठी जी काही पाऊले उचलत आहे, त्याला आमचे संपूर्ण समर्थन आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हे आवाहन करतानाच आताची परिस्थिती हाताळण्यासाठी काही सूचना सुद्धा त्यांनी राज्य सरकारला केल्या आहेत.
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा महानगरांमधील व्यवहार ठप्प होत असताना, रोजंदारी कामगारांबाबत काही उपाययोजना राज्य सरकारला कराव्या लागतील. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात सुमारे ५० लाख बांधकाम कामगार आहेत. बांधकाम कामगारांसाठीचा एक सेस राज्य सरकारकडे आहे. त्यात सुमारे चार हजार कोटी रूपये निधी आहे. या निधीचा वापर करून या रोजंदारी कामगारांच्या जेवणाची, त्यांच्या भत्त्याची व्यवस्था राज्य सरकारला करता येईल. इतरही विविध प्रकारचे कामगार दैनंदिन उत्पन्नावर उदरनिर्वाह करीत असतात. अशांसाठी स्वयंसेवी संघटनांकडून मदत घेऊन, त्यासंदर्भात एसओपी तयार करून तपशीलवार मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची सुद्धा नितांत गरज आहे. रोजगारावर जे संकट आले त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने पाऊले उचलण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.