मुंबई. सर्वत्र लॉकडाउनमुळे उद्योग आणि अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. त्यात आरोग्य मंत्र्यांनी 21 दिवसांचा हा लॉकडाउन लवकरच हटवला जाणार असे संकेत दिले आहेत. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाउन लवकरच हटवला जाऊ शकतो. महाराष्ट्र सरकार हा लॉकडाउन टप्प्या-टप्प्याने हटवण्याचा विचार करत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. तत्पूर्वी शनिवारी सकाळी बोलताना राज्यातील जनतेने शिस्तीचे पालन केले नाही तर 14 एप्रिल रोजी सरकार लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेणार नाही उलट तो वाढवावा लागू शकतो असा इशारा त्यांनी दिला होता.
वेबकास्टवरून थेट संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, टप्प्यांमध्ये लॉकडाउन हटवण्यावर सध्या सरकार विचार करत आहे. तरीही प्रत्येक झोनमध्ये कठोर शिस्तीचे पालन करावेच लागेल. तोपर्यंत नागरिकांनी घरातच राहून सकस आहार घ्यावा आणि घरातच व्यायाम करावा असे आवाहन टोपे यांनी केले. ते पुढे म्हणाले, “अनेक आयुर्वेद तज्ज्ञ कोरोनावर उपचार पद्धत सांगू इच्छित आहेत. त्यांना जी काही माहिती द्यायची आहे, त्यांनी ती आयुष पोर्टलवर टाकावी.”
साहजिकच लॉकडाउन मागे घेत असताना तो पूर्णपणे उठवता येणार नाही. सगळ्याच लोकांनी एकदाच घराबाहेर पडणे अपेक्षित नाही. त्यामुळे, लॉकडाउन शिथील करतानाचा निर्णय टप्प्यानेच लागू करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी देशात 24 मार्च पासून 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला. देशात कोरोना व्हायरसचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून सर्वात वाइट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 530 पेक्षा अधिक झाली आहे.