पुणे-
ज्येष्ठ व्हॉयलिन वादक प्रभाकर जोग यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रभाकर जोग यांनी गाणारं व्हॉयलिन कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हॉयलिन वादनाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली होती.
जोग यांच्या व्हॉयोलिनच्या सुरांनी प्रसिद्ध गीतरामायणालादेखील समृद्ध केले होते. तसेच व्हायोलिन वादनाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 6 दशके संगितक्षेत्राची सेवा केली आहे. त्यांना 2017 साली गदिमा आणि 2015 साली गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
प्रभाकर यांनी वयाच्या 5-6 वर्षापासून गजाननराव जोशी व नारायणराव मारूळकर यांच्याकडून गायन शिकण्यास सुरुवात केली होती. त्यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिन वादक होते. त्यासह ते घरीदेखील व्हॉयोलिननचे वर्ग घ्यायचे.
प्रभाकर जोग त्यांच्या आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेत मोठे झाले. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी व्हॉयलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पुण्यातील वाड्यांमधून सव्वा रुपये आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम सुरु केले होते. गीतरामायणाच्या सुमारे 500 कार्यक्रमांना जोग यांची साथ होती.
1952 साली जोग हे हिंदी चित्रपटसृष्टीत साँग व्हायो लिनिस्ट म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देववर्मन या संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी पुढे काम केले.
प्रभाकर जोग यांनी मिळालेले पुरस्कार
- पुण्याच्या भारत गायन समाजातर्फ 2013 साली त्यांना वसुंधरा पंडित पुरस्कार मिळाला
- महाराष्ट्र सरकारतर्फे 2015 साली त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला
- कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ‘सुरसिंगार’ पुरस्कार मिळाला
- 2017 मध्ये आखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने त्यांना नेत्रदिपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार मिळाला
- 2017 साली गदिमा पुरस्कार मिळाला
संगीतातील सुरेल पर्वाची अखेर – खासदार बापट
नादमधूर संगीताची भुरळ पाडणारे संगीतकार प्रभाकर जोग आज आपल्यातून गेले. संगीतातील एक सुरेल पर्व संपलं. अशा भावना खासदार गिरीश बापट यांनी रविवारी व्यक्त केल्या.ते म्हणाले व्हायोलिनच्या माध्यमातून त्यांनी शब्दांना बोलके केले. त्यांनी वाजविलेली अनेक गाणी,भावगीते रसिकांच्या मनावर कोरली गेली आहेत. साॅन्गव्हायलोनिष्ट म्हणून अनेक गायकांबरोबर त्यांनी जमविलेल्या मैफिली मराठी रसिक कधीच विसरणार नाहीत. ” शुभंकरोती कल्याणम् ” या सारख्या गाण्यांना चाली देऊन जोगसाहेब मराठी माणसांच्या घरातच नव्हे तर हृदयात विराजमान झाले आहेत. एक सुरेल पर्व संपलं. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली