नागपूर- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड मध्ये एकाने शाईफेक केल्यानंतर यावर भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खरे म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा शब्द चुकला असेल, तरी त्यांच्या वाक्यातील आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे की, पूर्ण वाक्याचा आशय न दाखवता, केवळ चुकीचा शब्द दाखवणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जी लोकं अशाप्रकारचे कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांनी आधी ते वाक्य नीट ऐकले पाहिजे आणि त्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले आहे, जो शब्द खटकणारा आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासा केलाय आणि माफीदेखील मागितली आहे. त्यानंतरही त्यांना टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य एवढेच होते की, आज लोकं अनुदानाच्या मागे लागतात. पण त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी जनतेतून पैसा उभा करुन शिक्षणाची व्यवस्था उभी केली. हा आशय महत्त्वाचा घेतला पाहिजे. अशा पद्धतीने टार्गेट करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले